जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
गीतकार म्हणून मा. अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
आता कशाला उद्याची बात
आला खुशीत् समिंदर
एकलेपणाची आग लागली
तू माझी अन् तुझा मीच
दर्यावर डोले माझं
अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी
कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.
कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत.
त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.
कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, मा.कुमारजींप्रमाणेच मा.पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. मा.पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.
कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीत समीक्षक या नात्याने त्यांनी विविध इंग्रजी तसेच मराठी वृत्तपत्रांतून समीक्षालेखनही केले. आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. व्यवसायाने ते इंजिनिअर असले तरी संगीतक्षेत्रात त्यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले.
बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. बीना रॉय यांचा जन्म ४ जुन १९३८ रोजी झाला. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या. बीना रॉय व प्रेमनाथ यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात औरत चा समावेश होता विवाहानंतर या दोघांनी पी.एन.फिल्मस ही कंपनी काढली होती.
शगुफा हा त्यांच्या या कंपनीचा पहिला चित्रपट होता. समुंदर व वतन हे आणखी दोन चित्रपट त्यांनी काढले पण ते चालले नाहीत. बीना राय यांनी प्रदीपकुमार समवेत केलेले चित्रपट गाजले होते. अनारकली, ताज महल, घुंगट हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. बीना रॉय यांचे ६ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हेमंत गोविंद यांना स्वत:च्या लहानपणापासून समाजातील गरीब तसंच उपेक्षित जनतेची सेवा करण्याचे ध्येय बाळगले होते. वडिलोपार्जित राजकारणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे राजकारणात सुरूवातीची काही पाऊले टाकणे त्यांना फारसे जड गेले नसले, तरीदेखील गोरगरीबांच्या मनामध्ये विश्वासाची व प्रेमाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे कष्ट केले आहेत. समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी त्यांची नेमणूक करण्यात आली, यावरून त्यांनी दुर्बल समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान ध्यानात येते. फेब्रुवारी २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व जिल्हा परिषदेवर निवडून आले. ४ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या पदाधिकारांच्या निवडणुकीत त्यांना सभापती समाजक्ल्याण समिती या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवल्या. लघुउद्योग योजनेस मदत म्हणून ७ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला तर मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांना शिलाई मशीन पुरविण्यासाठी २२ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला. अनुदानित वस्तिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, तसेच त्यांना “नाईट ड्रेस” पुरविणे, वस्तीत जोडरस्ते बांधणे,सौरऊर्जा प्रकाश योजना राबविणे, महिला बचत गटांना साहाय्यक अनुदान, स्नानगृहे व शौचालय बांधणी, मागासवर्गीयांना घरे बांधणीसाठी किंवा दुरूस्तीसाठी अर्थसाहाय्य करणे अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या गरजू मुलांना सायकली पुरविण्यात आल्या, तर आर्थिक दृष्ट्या मागसांना घरघंटी पुरविण्यात आल्या आहेत त्यासोबतच अनेक कल्याणकारी कामे हेमंत गोविंद यांनी आजवर केली आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
मराठीतले उत्तम संकलक राजा ठाकूर व एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला. राजा ठाकूर यांचे वडील नोकरी निमित्त मुंबईला आले आणि पोलिस खात्यात नोकरीला लागले. नोकरीतल्या बढतीमुळे वडिलांची वारंवार तालुक्याच्या ठिकाणी बदली होई. वडील पोलिसात असूनही रसिक होते. गंधर्व कंपनीची नाटके ते आवर्जून पाहत. तालुक्याच्या ठिकाणी नाटकं आली तर मालकाला व नटवर्गाला ते घरी जेवायला बोलावत.
अडीअडचणीला मदत करीत. राजा ठाकूरांची नाटकाची व नाट्यसंगीताची आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्याला रत्नागिरीला खेळ करीत असलेल्या ‘देशबंधू नाटक मंडळी’त स्वत: नेऊन पोचवले. ही घटना १९४० सालची. दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. १९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. त्यांनी राजाला तार करून बोलावून घेतलं व त्याच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं- ‘बलिदान’. १९४७च्या ‘बलिदान’पासून ते १९५३पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं. संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते.
बाळ बापट व राजा ठाकूर हे वेळ मिळेल तेव्हा पुण्यातील कॅम्प एरियात असण्याऱ्या ‘वेस्टएन्ड’, ‘एम्पायर’, ‘कॅपिटल’ अशा चित्रपटगृहांमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट बघत. त्यातील कथेचे नावीन्य, तंत्राची ताकद त्यांना आवडे. फ्रँक काप्रा, बिसी वायलर, हिचकॉक या दिग्गज दिग्दर्शकांबद्दल ते वारंवार बोलत. मा.राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती.
राजा ठाकुरांचे वाचन चांगले होते. मराठी व इंग्रजीतील उत्तमोत्तम पुस्तके वाचण्याचा त्यांना नाद होता. त्यामुळेच त्यांच्या सर्वच चित्रपटांच्या कथा सकस होत्या. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले. ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते.
मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता. किंबहुना या चित्रपटात उपेक्षित कलावंतांचं अंतरंग उलगडून दाखवण्याची राजा ठाकुरांची तळमळच अधिक जाणवते. मानवी भावना आणि माणसांची आपापसातील साधी वाटणारी पण गुंतागुंतीची नाती हा ठाकुरांचा लाडका विषय होता.
राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं. राजाभाऊंच्या मराठी चित्रपटांनी अनेक पारितोषिके मिळवली होती पण रौप्यमहोत्सव साजरा केला नव्हता. मात्र ‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. पण त्यांच्या यशाला कुणाचीतरी दृष्ट लागली. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही.
राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. मा.राजा ठाकूर यांचे २६ जुलै १९७५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार
कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले. त्यांचा जन्म २७ मे १९१३ रोजी झाला. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून चित्रकला, नाटक, नृत्य, संगीत यांची आवड मात्र होती. मा.कृष्णदेव मुळगुंदांनी अनेक नृत्य नाटिका बसविल्या. घाशीराम कोतवाल ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती. त्या नाटकात मुळगुंदांच्या दिग्दर्शनाखाली नाना फडणविसांची भूमिका करणाऱ्या नटाने केलेला नाच लाजवाब होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ’जाणता राजा’ची सर्व कलात्मक बाजू कृष्णराव मुळगुंदांनी सांभाळली होती.
कृष्णदेव मुळगुंद हे स्वतः शिक्षक असल्यानं मुलांची मनं वाचणं हे काम त्यांना यशस्वीपणे करता आलं. भूतकथा, परीकथा, चेटकिणी, राक्षस यांबरोबच माणसांमधला चेटकिणी आणि माणसांमधले राक्षस याबाबतही मुलं संवेदनशील असतात, हे कृष्णदेवांनी जाणलं होतं. कृष्णदेवांचे नाट्यलेखन हे त्यांच्या विद्यार्थी मनवाचनाच्या व्यासंगातून निर्माण झालं होतं. त्यामुळेच त्यांच्या बालनाट्यात मंतरलेलं पाणी असलं, तरी मुलांच्या भावविश्वाचे मंत्रही त्यात आपोआपच येत होते. शिवाय गीत-संगीत-नृत्य यांच्या संयोगातून हे नाट्य अवतरले असल्यामुळे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही सहज होत असे. कृष्णदेवांनी ज्या ज्या नाट्यकृतीचं नृत्यदिग्दर्शन केलं ती अशी - पुजारिणी, महाश्वेता, कालिदास, उत्तररामचरितम्, महावीरचरितम्, रामायण, शांकुतल, कुमारसंभव, स्वप्न कासवदत्तम, घाशीराम कोतवाल, जाणता राजा, नंदनवन, आनंदवन भुवनी यातील काही संगीतिका काही ऑपेरा, काही नाटके आहेत. कृष्णदेवांनी सुमारे तीस लोकनृत्यांचे गीतलेखन, दिग्दर्शन केलं. एवढंच नव्हे; तर वेषभूषाही कृष्णदेवप्रणित होती. एकूण २० नाटकांचं लेखन, त्यापैकी १० भावनाट्ये, गाढवानं घातला गोंधळ, हयो हयो पावनं या लोकनाट्यांचं लेखनही कृष्णदेवांनी केलंय. याशिवाय ग्रामीण जीवनातील नृत्य-नाट्य-आविष्कार त्यांच्या ग्रामीण नृत्यगीते या गीतसंग्रहात उद्धृत झाला आहे. 'नाचतो मी नाचतो' हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे कृष्णदेव मुळगुंद या व्यक्तीचं जीवनचरित्रच केवळ नाही, तर अर्धशतकाचा नाट्य, शिक्षण, कला, चित्रकला यांचा संयोग असलेली ती एक समर्थ शब्दचित्रकृती आहे. मा.मुळगुंद यांचा उत्साह एवढा अमाप होता, की वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात भरविले होते. मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. भरत नाट्य मंदिराने मुळगुंद यांची अनेक बालनाट्यं प्रायोजित केली. आजचे आघाडीचे कलाकार त्यांच्या बालनाट्यात काम करीत असत. कृष्णदेव मुळगुंद यांचे ११ मे २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti