(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • हुतात्मा बाबू गेनू

    १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.

  • डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे

    भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे बिगरहिंदी भाषक हिंदी लेखक पुरस्कार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार ठाण्याच्या डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांना मिळाला आहे.

    स्वातंत्र्य संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वसामान्य महिलांनीदेखील शौर्य गाजवले. या पराक्रमाची गाथा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवायची असेल तर ती हिंदीत अनुवादित करायला हवी, हे डॉ. सहस्रबुद्धे यांनी ओळखले होते. त्यांचे माहेर कोकणातले. घरात संस्कृत भाषेचा दरवळ कायमच. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना शिकण्याच्या उर्मीने त्यांनी एम. ए. केले. एम. ए. साठी हिंदीची निवड केली. त्याहीपुढे जात ' डॉ. शंकरशेष का नाट्य साहित्य ' या विषयात त्यांनी चाळीसाव्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. त्याच दरम्यान त्यांनी त्रिपुरारी शर्मा यांच्या ' दहलिज ' या मालिकेचा व भीष्म सहानींच्या ' माधवी ' या नाटकाचा रेडिओसाठी मराठीत अनुवाद केला. यानंतर मात्र त्यांना अनुवादाची गोडी लागली व ' स्वातंत्र्योत्तर कालीन मुंबई का हिंदी रंगमंच ' आणि ' प्रयोगशील रंगमंचीय आंदोलन में आविष्कार का योगदान ' या शोधप्रबंधांतून त्यांनी आपल्यातील अनुवादकाच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवली. या शोधप्रबंधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना पु. ल. देशपांडे यांची शाबासकी देऊन गेले.

    मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करताना त्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी गवाणकर यांच्याशी झाला. आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी व मानवती पांडेय, जानकी दावर, पी. नारायण कुट्टी, शकुंतला गांधी, बेला मुखर्जी, प्रतिभा पाल यांच्यासारख्या वीर महिला सैनिकांनी गाजवलेला पराक्रम व त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या कर्तव्यभावनेची ओळख देशभरातील जनतेला व्हावी, यासाठी गवाणकर यांच्या पुस्तकाचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला. कोणताही मोबदला न घेता अनुवादाची जबाबदारी स्वीकारण्याचे एका अर्थाने धाडस डॉ. सहस्रबुद्धे यांनी त्यावेळी केले. संहितेच्या अनुवादातून मिळणारा पैसा हे एकमेव उद्दिष्ट न मानता सृजनाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहस्रबुद्धे यांनी हे आव्हान पेलवून दाखवले. पुढे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिलेल्या अनुदानातून ते २००३ मध्ये कोलकात्यात प्रसिद्ध झाले.

    डॉ. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या ' कॅप्टन लक्ष्मी व झाशी रेजिमेंट - एक अकथित कथा ' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादासाठी या राष्ट्रीय गौरवाला त्या पात्र ठरल्या आहेत. भाषेची चौकट व मोबदल्याच्या चौकटीत जखडून न राहता उगवत्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यसमरातील महिलांच्या योगदानाची माहिती देणार्‍या या अनुवादाबद्दल त्यांचा झालेला हा गौरव सार्थ म्हणायला हवा.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • चित्रकार मारिओ मिरांडा

    मुंबई सोडून ब्राझील किंवा पॅरिसला जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतानाच त्यांना ‘ करंट ‘ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर ‘ टाईम्स ‘ ने त्यांना घेतले.

  • श्री. तात्या अभ्यंकर यांनी लिहिलेला गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील लेख

    दामू-गोविंदा जोड रे...
    राम राम मंडळी,

    १९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
    मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
    मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.

    "अरे तू इथे कुठे?"
    "बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
    "अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
    "त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
    शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
    पं गोविंदराव पटवर्धन!

    संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
    गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
    पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.

    एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
    मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.

    त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
    गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
    पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
    कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

    नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!

    बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
    मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!

    गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
    "पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
    साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
    साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
    मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
    तात्या अभ्यंकर.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • माजी सरन्यायाधीश पी एन भगवती

    नागरिकांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार असल्याचा निवाडा उच्च न्यायालयांनी दिला असताना व सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याच निकालाची अपेक्षा असताना भगवती यांनी नागरिकांच्या या अधिकाराविरोधात निकाल दिला. हा निकाल तेव्हा वादग्रस्त ठरला होता.

  • भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.

    पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला.

  • भारतीय क्रिकेटपटू सी. एस. नायडू

    ते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती.

  • चित्रपट निर्माते, लेखक, संपादक विजय आनंद

    विजय आनंद यांना गोल्डी म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला. १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय महाविद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये एक नाटक करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन करणारी आणि नाटकामध्ये दिग्दर्शकाची भूमिका करणारी व्यक्ती एकच होती. दोन्हींसाठी पहिले पारितोषिक पटकावणारे मा.विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. मुंबईत आल्यानंतर विजय आनंद यांनी देवआनंद याच्या नवकेतन या चित्रपट निर्मिती संस्थेतून नौ दो ग्यारह पासून ज्वेलथीफपर्यंत पडद्याच्या मागची भूमिका साकारली. नंतर त्यांना अभिनयाची ओढ वाटू लागली. काला बाजारमध्ये विजय आनंद यांचा चेहरा पडद्यावर दिसला होता. परंतु तेरे मेरे सपने या चित्रपटातून विजय आनंद यांनी अभिनयाकडे गांभीर्याने पाहायला सुरूवात केली. चोर-चोर, कोरा-कागज, डबलक्रॉस आणि मैं तुलसी तेसे आंगनकी इतके चित्रपट केल्यानंतर अभिनय ही आपल्याला जमणारी गोष्ट नाही हे त्यांच्या लक्षात आले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या मा.विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.

    विजय आनंद यांना सस्पेन्स सिनेमांचा बादशाह समजले जायचे. त्याचे 'तिसरी मंझिल', 'काला पानी', 'ज्वेल थीफ' हे रहस्यमय सिनेमे आज इतक्या वर्षांनंतरही वारंवार पाहिले जातात, त्यातलं रहस्य माहिती असूनही!

    चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होते. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला. विजय आनंद यांचे २३ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • अशोक पत्की – जिंगल्स किंग

    पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर! अशी तब्बल २५ वर्षे मी या क्षेत्रात काम केलेलं आहे. माझं स्वत:चं, त्याचबरोबर पी. वैद्यनाथन्, वनराज भाटिया, सुरेशकुमार यांचीही कामं त्यात असायची. एक वादक म्हणून मी भरपूर काम केलंय या मंडळींबरोबर! पूर्वी अशी पद्धत प्रचलित होती, की एकाच जिंगल्सच्या तीन- तीन चाली आम्हाला लावाव्या लागत. त्यातली मग क्लायंट आणि एजन्सीला कोणती आवडलीय, हे ते फोनवरून सांगत. त्यांच्या पसंतीस उतरलेली जिंगल मग दुसऱ्या दिवशी ध्वनिमुद्रित केली जाई.
    स्ट्रँड सिनेमा (कुलाबा) येथे एक स्टुडिओ होता. आर. टी. व्ही. सी. नावाने तो प्रसिद्ध होता. कुसूम कपूर व रावसाहेब यांचा तो स्टुडिओ होता. रावसाहेबांचे टुरिस्ट हॉटेल कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे त्याकाळी जिंगल्ससोबत अध्र्या तासाचे जाहिरातींचे रेडिओ प्रोग्रॅमही व्हायचे. मराठीमध्ये ‘राघू-मैना’ व हिंदीत ‘तोता-मैना’! त्यात सर्व बडी माणसं ‘ड्रामा’ करायची. छोटी छोटी गाणीही त्यात असत. तबस्सुम, सुधा चोपडा, हरीश भिमानी, विनोद शर्मा, विजय बहेल अशी त्यावेळची मातब्बर निवेदक मंडळी त्यात असायची. आणि गाणं आलं की ती स्वत:च गायचीदेखील! गाण्यांना चालीही मी तिथल्या तिथे लावून त्यांना शिकवायचो आणि रेकॉर्ड करायचो. दिवसभरात असे दोन प्रोग्रॅम होत. म्हणजे जवळजवळ १५ ते १६ गाणी!

    एकदा गंमतच झाली. मला दोन-अडीचपर्यंत ताप होता. मी कुसुमजींना फोन केला, की मला ताप आहे, मी नाही येऊ शकणार. उभं राहायचीही मला ताकद नव्हती. त्या म्हणाल्या, ‘आता कसं होणार? दोन्ही प्रोग्रॅम आज रात्रीच रेडिओला पाठवायचे आहेत. उद्या ब्रॉडकास्टिंग आहे. तू टॅक्सी कर आणि इथे ये.. प्लीज!’ मलाही त्यांची अडचण कळत होती. मी अंगात ताप असताना तसाच गेलो. त्यांनी माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं. मी तो दिवस अक्षरश: झोपून पेटीवर कम्पोझिशन केलं आणि त्यांना शिकवलं. तापाने फणफणलेला असूनही मी दिवसभर काम केलं. सगळ्यांना माझं भारी कौतुक वाटलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या एपिसोडला ‘फ.अ.ढ.अ.’ चा सवरेत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला मला!

    सिनेमातल्या पाच मिनिटांच्या एखाद्या गाण्याला चाल लावणं म्हटलं तर सोपं असतं. तुम्हाला आठ-दहा दिवस आधी हातात गाणं मिळतं. त्यावर विचार करायला भरपूर वेळ असतो. निर्माता, दिग्दर्शक व कवीबरोबर त्यावर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग गाणं ध्वनिमुद्रित होतं. या साऱ्यासाठी वेळच वेळ असतो. नाटकाचंही तसंच असतं. पण जिंगल म्हणजे तुमची खरी सत्त्वपरीक्षा असते. सर्व काही उत्स्फूर्तपणे तिथल्या तिथे करावं लागतं. तीच जिंगल जर दुसऱ्या भाषेत करायची असेल तर त्याच मास्टर ट्रॅकवर प्रत्येक भाषेतल्या स्क्रिप्ट रायटरबरोबर बसून नव्याने जिंगल तयार करावी लागते. त्याच मूळ ‘मीटर’मधला त्या- त्या भाषेतला चपखल शब्द अनुवादकाला त्याकरता शोधावा लागतो. त्यानंतर गायकाला त्याचं उच्चारण शिकवावं लागतं. अमूक एक शब्द उच्चारताना जीभ कुठे लावावी? टाळ्याला की दातांना? वगैरे बारीकसारिक गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात. कविता कृष्णमूर्तीला दक्षिणी भाषा तसेच बंगाली, ओडिशा, आसामी, हिंदी, इंग्लिश उत्तम अवगत असल्यामुळे तिला याचा त्रास होत नाही. पण विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ, प्रीती सागर, विनोद राठोड यांना अन्य भाषांतील जिंगल्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

    काही एजन्सीवाल्यांना काही नवीन प्रयोग करण्याच्या भरात वाटतं की, दहा-बारा सेकंदात एखादी जिंगल करायची तर त्यात कठीण ते काय? आपण अनू मलिक वा भप्पी लाहिरींकडून ती करून घेऊ. एकदा असे एक-दोघेजण गेले त्यांच्याकडे. पण ते म्हणाले, ‘आपको टय़ून सुनाते है. लेकिन वह डेढ- दो मिनिटसे कम नहीं होगी.’ आम्हाला मात्र आता जिंगल्स निर्मितीची इतकी सवय झाली आहे, की जणू रक्तातच भिनलं आहे ते! अर्थात हा सवयीचा परिणाम आहे. मला झटपट चाल लावण्याची सवय लागली ती जिंगल्समुळेच! हातात कागद पडला की दहाव्या मिनिटाला माझी चाल तयार असते. माझी एक खासियत आहे. पेटीवर हात ठेवून सूर छेडता छेडता ओठांवर कधी हसू यायचं तेच कळायचं नाही. विनय मांडकेने याचा अभ्यास केला होता. माझ्या तोंडावर हास्य दिसलं, की तो ओळखायचा, की अशोकला हवी ती चाल सुचली आहे!

    अशोक पत्की
    संकलन - संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • संगीतकार वसंत देसाई

    उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.