महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहे. मर्हाटी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान केलं आहे.
या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा विचारसरणीचा व कार्याचा फार मोठा प्रभाव विविध महाराष्ट्रीय धर्म सम्प्रदायांवरही तेराव्या शतकापासूनच पडला. हा इतिहास लक्षात घेतल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रभावकक्षा किती दूरगामी होती, याची कल्पना येते. महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच महाराष्ट्रावरही पडला. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होय. यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाला. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झालं.
महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.नाच्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते.
११०५ हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म - सन. बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करीत. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होत. मुंजीसारखे विधी/कर्मकांड अनावश्यक आहेत, असं त्यांचं मत असल्यानं त्यांनी मुंज करुन घेण्यास विरोध केला. त्याच प्रमाणं देवदासी, बळी देण्याची प्रथा,
व्यवसाय व जाती यांच्यातील श्रेष्ठकनिष्ठता, कर्मकांड हा त्यांना मान्यच नव्हतं. त्याला विरोध करुन त्यांनी नवसमाजनिर्मिती केली. सनातनी कर्मठांचा विरोध पत्करुन आचार्य जातवेदमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. प्रथम करणिक असलेले महात्मा बसवेश्वर पुढे कोषागार मंत्री झाले. पण प्रचाराचं कार्य त्यांनी लोकाभिमुख केलं व त्याला समताधिष्ठित, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न्याय देणारी प्रशासन-व्यवस्था निर्मिली.
इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, कर्म हेच कैलास (काय कवे कैलास ) या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणलं. त्यांच्या पुरुष अनुयाना शिवशरण व स्त्री अनुयायांना शिवशरणी म्हणतात. असे ७०० शिवशरण व सत्तर शिवशरणी होत्या. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनुभव मंटप या विचारपीठाची स्थापना केली व त्यांच्या या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चांभार ब्राम्हण-विवाहासारखे उपक्रम सुरु करुन त्यांनी समाजाची मानसिकता बदलली.
त्यांच्या विचारांना 'वचन' म्हणतात. त्यातून वीरशैवांचं 'वचनसाहित्य' निर्माण झालं. वीरशैव धर्माच्या तत्त्वज्ञ
नाचा गाभा म्हणजे षट्स्थलसिध्दान्त होय. वीस वर्ष शासनाच्या महत्त्वाचा पदावर राहून त्यांनी कार्य केलं नंतर पूर्णतया धर्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या कार्याला राहून घेतलं. कायक, दोह, सदाचार, समता व धर्मभावना ही त्यांच्या कार्याची 'पंचसूची' होती .
महात्मा बसवेश्वरांमुळं नवचैतन्य लाभलेला वीरशैव धर्म हा भारतातला एक प्रमुख धर्म आहे.
## Mahatma Basaveshwar
‘कलावैभव’चे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं आकस्मिक निधन ही सहा महिन्यांतली मराठी नाटय़सृष्टीवर आघात करणारी दुसरी मोठी दुर्दैवी घटना आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘चंद्रलेखा’ संस्थेचे निर्माते मोहन वाघ यांचंही असंच आकस्मिक निधन झालं.
मराठी नाटय़व्यवसायातील दुसरा बडा निर्माता असा लागोपाठ गेल्यानं नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाटकाचं वेड असलेले आणि नाटक सतत जगणारे असे हे दोन निर्माते होते. काहीएक रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची नाटके करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासही ते मागेपुढे पाहणारे नव्हते.
दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांचा हा नाटय़निर्मितीचा वारसा पुढे नेणारे त्यांच्या कुटुंबीयांत कुणी दिसत नाही. मोहन तोंडवळकर हे व्यावसायिक नाटय़निर्मात्यांमधले ‘प्रायोगिक निर्माते’ म्हणून ओळखले जात. राज्य नाटय़स्पर्धा तसेच इतरत्र होणाऱ्या नव्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावून त्यातलं एखादं नाटक वा कलाकार त्यांच्या रत्नपारखी नजरेस पसंत पडला की व्यावसायिक गणितं बाजूला ठेवून, ते त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत.
विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सई परांजपे, महेश एलकुंचवार, सुरेश खरे ते किरण पोत्रेकर, योगेश सोमणपर्यंत त्या-त्या काळातील नव्या लेखकांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं. साहस हे त्यांच्या रक्तातच होतं. ते करताना त्यांनी परिणामांची कधीच पर्वा केली नाही.
‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मला उत्तर हवंय’, ‘महासागर’, ‘पुरूष’, ‘जास्वंदी’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘सावित्री’, ‘पर्याय’, ‘दुसरा सामना’, ‘गोष्ट प्रेमाची?’, ‘नातीगोती’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘राव जगदेव मरतड’, ‘शॉर्टकट’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अपूर्णाक’, ‘कस्तुरीमृग’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘नल-दमयंती’, ‘पाऊलखुणा’, ‘महायोग’, ‘मी राष्ट्रपती’, ‘सौभाग्य’, ‘वन रूम किचन’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘लफडा सदन’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लपंडाव’, ‘अचानक’, ‘प्रासंगिक करार’ ते ‘शंभुराजे’पर्यंत कलावैभवने निर्मिलेल्या नाटकांचं वैविध्य पाहिलं तर त्यांच्या नाटय़निर्मितीच्या कक्षा किती लांब-रुंद आणि सखोल होत्या, याची कल्पना येते. नाना पाटेकरांपासून डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत अनेक कलावंतांना त्यांनी आपल्या नाटकांतून पुढे आणलं. परंतु याचं श्रेय मात्र त्यांनी कधीच घेतलं नाही. ‘जो-तो आपापल्या कर्तृत्वानं पुढे येतो. मी फक्त निमित्तमात्र ठरलो. त्यात कसलं श्रेय घ्यायचं?,’ असा त्यांचा सवाल असे. त्यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे.
लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. लगेचच ते नाटक बंद करीत आणि पुढच्या नाटकाकडे ते वळत. अर्थात त्यापुढचं नाटकही ते धंद्याचं गणित मांडून करतील, असंही कधी घडलं नाही. कलावैभव संस्था काढण्याआधी ते जुनी नाटकं कंत्राटी पद्धतीनं लावीत. त्यासाठी बीपीटीतल्या आपल्या सहकाऱ्यांकडून ते कर्ज वगैरे काढत. मात्र व्यवहार चोख असल्यानं त्यांना हवे तेव्हा पैसे उभे करता येत. पण तोंडवळकरांनी एकाच उद्योगात स्वत:ला कधी अडकवून घेतलं नाही. त्यांनी नाटकांबरोबरच सीरियल्स, टेलिफिल्म्सचीही निर्मिती केली. त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची ऑफर दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी दिली होती. परंतु तोंडवळकर चित्रपट क्षेत्रापासून मात्र का कुणास ठाऊक, कटाक्षानं दूर राहिले.
पल्लवी अॅडव्हर्टायझिंग ही जाहिरात संस्था काढून जाहिरातीची कामंही ते करीत. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तर त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून ते कळवीत. नाटय़क्षेत्रात ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. कुठलीही गोष्ट करताना फळाची अपेक्षा न धरता करणं, ही साधारणत: योग्यालाच साध्य होणारी गोष्ट तोंडवळकरांना साध्य झालेली होती. ते नेहमी म्हणत, ‘मी ‘आज’ जगतो. काल किंवा उद्याबद्दल मी बिलकूल विचार करीत नाही.’ त्यामुळेच ते नेहमी ‘आज’ला सामोरे गेले आणि म्हणूनच कायम समकालीन राहू शकले. जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.
वरकरणी ते आध्यात्मिक वृत्तीचे वाटत नसले तरी अंतर्यामी मात्र ते सगळ्यापासून अलिप्त असत. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, हे लगेचच जाणवणार नसलं तरी प्रायोगिकांना व्यावसायिक रंगभूमीवर काहीएक सादर करायचं असेल, त्या प्रत्येक वेळी एक खंदा आधारस्तंभ हरवलाय, याची जाणीव त्यांना-आणि पर्यायानं सशक्त आशयाच्या नाटकांच्या भुकेल्या रसिक प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय निश्चितच राहणार नाही.
दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीचे लेखक. याच कादंबरीवर आधारित चित्रपट फार गाजला.
ना. धों. महानोर हे सुपरिचीत ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांनी १९७३ मध्ये लिहिलेल्या ‘गांधारी’ या कादंबरीने ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूक टिपली होती.
संपदा भोंडसे, या यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक येथील जनसंपर्क अधिकारी या हुद्यावर काम करीत असून इच्छुक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, व त्यांच्या पुढील शैक्षणीक भविष्याचा आराखडा बनविण्यासंबंधीची हवी ती माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवित आहेत. विद्यार्थी व त्यांचे पालक यांना विद्यापीठाची, समस्त शिक्षकवर्गाची, विद्यापीठाकडुन घेतल्या जाणार्या कोर्सेसची, कार्यक्रमांची, उपक्रमांची, व अतिरीक्त स्पर्धांची सांगोपांग माहिती पुरविणे, पालक व शिक्षक यांच्यामधील नात्यामध्ये सुसुत्रता आणणे, व व्यवस्थापन व विद्यार्थीगण यांच्यामधील एकमेव दुव्याचे काम करणे अशा स्वरूपाचे, व्यापक असे कार्य त्या गेली अनेक वर्षे इमानदारीने करीत आहेत.
कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक नारायण केशव बेहरे यांचा जन्म ४ जुलै १८९० रोजी झाला.
कला क्षेत्र व तंत्रज्ञानाच्या विश्वाकडे कल असणारी कल्पनाशक्ती यांचा सुरेख मिलाफ साधला की एका व्यावसायिक चित्रकाराचा जन्म होतो. हे चित्रकार आपली निर्माणशक्ती कागदावर उतरवून केवळ त्यांच्या वैयक्तिक संग्रही ठेवित नाहीत तर जाहिराती, डिझायनिंग, ग्राफिक्स, व एखाद्या कंपनीच्या वस्तूंचा खप वाढविण्याकरिता त्या शक्तीचा फलदायी उपयोग करतात. ग्राहकांना विशीष्ठ ब्रँडस् कडे चुंबकांप्रमाणे आकर्षित करण्यात अशा कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो, व बाजारात अशा हाडाच्या कलाकारांना प्रचंड मागणी असते.
पुण्याच्या दापोडी परिसरात राहणार्या सरस्वते यांनी बजाज कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सौरऊर्जेचा वापर करुन दिवे लावण्याचा प्रकल्प तयार केला, “सोलर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट” या नावाने. आयुष्यात ज्यांना “दिवा” हा प्रकारच माहित नाही त्यांच्यासाठी ही गरज अधिक असणार म्हणूनच सरस्वते यांनी आसाममधील दुर्गम भागात असलेल्या हनग्रुम या हाफलॉंग तालुक्याची निवड केली आहे.
वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, साहित्य विश्वाचा अचूक संदर्भग्रंथ, परखड समीक्षक, व्यवहारात पारदर्शक, लिखाणासोबत स्वभावातही नितळपण..अशा अनेक वैशिष्टय़ांनी व्यक्तिमत्व सजलेले असल्याने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांच्या निधनाचा धक्का अवघ्या मराठी साहित्य विश्वाला बसणे साहजिकच. रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी २७ जुलै १९३० रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण मुंबईतील छबिलदास शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांची लेखनकलाही बहरत होती. वर्धा येथील गोविंददास सक्सेरिया महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारल्यानंतर हा पेशा व प्रवासाच्या आवडीमुळे त्यांच्या लेखनकलेस खतपाणी मिळाले. पुणे विद्यापीठातून ‘सन १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा प्रवास’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे हं.प्रा.ठा., बिटको आदी महाविद्यालयांमधून त्यांनी प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. पी.एचडी आणि एम.फिलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. १९९० मध्ये नाथीबाई ठाकरसी महिला महाविद्यालयातून ते निवृत्त झाले. कथाकार, समीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून असलेली त्यांची कामगिरी नवोदितांसाठी आदर्शवत अशीच. नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सान्निध्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व साहित्यिकदृष्टय़ा अधिकच बहरले. आपल्या साहित्यामधून त्यांनी वाचकाला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. ‘वळणावरचे साकव’ या व्यक्तिचित्रणसंग्रहातून ते सहजपणे वाचकाला अंतर्मुख करून जातात, तर ‘माळंदे’ या ललित लेखसंग्रहातून त्यांच्या खेळकर लेखनशैलीचा सहज सुंदर आविष्कार पहायला मिळतो. प्रवास करताना केवळ ‘पाहाणे’ नव्हे, तर ‘अभ्यासणे’ या त्यांच्या वृत्तीचे दर्शन ‘लू यू चीन,’ ‘देशादेशांतून’ या प्रवासवर्णनसंग्रहांमधून दिसते. ‘मराठी ललित गद्य’, ‘सफर बहुरंगी रसिकतेची’, ‘संशोधनाची लेखनशैली’ ही त्यांची समीक्षा व संशोधनपर पुस्तके. मुक्त विद्यापीठासाठी १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा. वर्तक यांचे ‘पारंब्या’, ‘फुलपंखी दिवस’, ‘अंकुर’, ‘मनमोर’, ‘धून’, ‘केटलिक वार्ताओ’ (गुजराती) हे कथासंग्रहही प्रसिध्द आहेत. ‘कॉन्व्हर्सेशन विथ स्टॅलिन-एक शर्थीची झुंज’ या समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथाचीही साहित्यवर्तुळाने विशेष दखल घेतली. याशिवाय त्यांच्या नावावर ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास खंड २, २४,’ ‘प्रभाकर पाध्ये-समग्र वाड:मयदर्शन’, ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड १३’ आदी ग्रंथ आहेत. लघुकथा, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्रे, ललित गद्य या प्रकारांमध्ये स्वैर मुशाफिरी करणारे वर्तक समीक्षक म्हणून अधिक ओळखले गेले. नवीन लेखकांचे तर ते गुरूच. आपल्या पुस्तकासाठी वर्तक यांनी दिलेला अभिप्राय नवलेखकांना बहुमोलाचा वाटे. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाने साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. याशिवाय डॉ. य. वा. परांजपे, किलरेस्कर, मराठी साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मु. ब. यंदे पुरस्कार त्यांना अधिक भावत असे. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्यभूषण परीक्षा समितीचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. येत्या २७ जुलै रोजी ८१ व्या वर्षांत ते पदार्पण करणार होते. वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करावयाचा, या नियोजनात पत्नी, दोन मुले यांसह मित्रांना मग्न ठेवत ते स्वत: परलोकीच्या प्रवासाला निघून गेले.
Copyright © 2025 | Marathisrushti