(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • डॉ. रामचंद्र काशीनाथ भिडे उर्फ डॉ. नंदू भिडे

    डॉ. रामचंद काशीनाथ भिडे हे 'फास्ट ट्रॅक ओपन हार्ट सर्जरी' करणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. 'सुप्रापीप' या आज सर्जनप्रिय झालेल्या सुरक्षित तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दहा हजारांवर हृदयशस्त्रक्रिया केल्या होत्या. असंख्य रुग्णांना त्यांनी मृत्युशय्येवरून परत आणून जीवनदान दिले. वैद्यकीय क्षेत्र आज अनैतिक व्यवहारांमुळे बदनाम होत आहे. अशा काळात डॉ. भिडे प्रथम आपली लाईफ स्टाईल बदलून शस्त्रक्रिया कशी टाळता येईल याचा सल्ला पेशंटांना देत असत.

    या संशोधनाचे पेटंटही डॉ. भिडे यांना मिळाले होते. गरीबांना आपल्या संशोधनाचा फायदा व्हावा; अशी त्यांची भूमिका असे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या संशोधनाची दखल घेण्यात आली होती.

    नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात मानद हृदय शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार्‍या डॉ. भिडे यांनी ज्येष्ठ प्राध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी तर फार मोलाची ठरली. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचे विद्यार्थी यांना त्यांनी सलग नऊ वर्षे मार्गदर्शन केले. आपल्या देशातील तसेच अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र, गुजरात व केंद सरकारचे पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना जर्मनीला जावे लागले. स्वभावाने नम्र, व्यवसायात प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून दूर असे डॉ. भिडे सतत देशाचाच विचार करत.

    ते ज्युदो आणि अॅथलेटिक्सचे चॅम्पियन होते. वक्तृत्व, परिसंवाद आणि लेखनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. ठाण्यात ते भाड्याच्या घरात राहत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

    अधिक संशोधन, प्रयोग व प्रशिक्षणाकरिता त्यांनी मृत्युच्या चार-पाच महिन्यापूर्वीच जर्मनीला प्रयाण केले. जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या जर्मनीमधील हार्ट अॅन्ड डायबेटीस सेंटरमध्ये त्यादृष्टीने त्यांची आगेकूच चालू होती. ब्रिटिश कौन्सिलनेही त्यांच्या संशोधनासाठी अनुदान मंजूर केले होते.

    हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया करून त्यांना नवी जीवनसंजीवनी देणार्‍या डॉ. भिडे यांना काळाच्या पडद्याआड नेलं ते सुध्दा एका ह्रदयविकारानेच. डॉ. भिडे यांच्या अकाली निधनाने कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या प्रयत्नातील भारतातला मोठा संशोधक, शास्त्रज्ञ तसेच एक समाजसेवक हरपला आहे.

    डॉ. भिडे अवघ्या पन्नास वर्षांचे होते. सारा मित्रपरिवार आणि पेशंटही त्यांना 'नंदू भिडे' या नावानेच ओळखत. त्यांचे कृत्रिम हृदय प्राण्यांना बसविण्याचे प्रयोग सुरू होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • प्रदीप भिडे

    प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.

  • राम जाधव

    रत्नागिरी येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे गेली सहा दशके रंगदेवतेची पूजा बांधणाऱ्या एका निरलस पुजाऱ्याचा गौरव आहे. अकोला या आडवळणाच्या गावचा लौकिक जाधव, जाधव, राम

    रसिकाश्रयी असा आहे. नाटक जगवण्याचा अकोलेकरांचा ध्यास खूप जुना आहे. बालगंधर्वाची नाटय़ संस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबली तेव्हा नाटय़रसिकांनी पुढाकार घेऊन हे कर्ज फेडले आणि बालगंधर्वाना सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले,

    असा गौरवपूर्ण इतिहास अकोलेकरांचा आहे. याच शहरात इतिहास, सूतकताई आणि शारीरिक शिक्षण हे विषय तरुण वयात शिकवणारा राम जाधव नावाचा एक ‘वेडा’ गेली साठ वर्षे रंगदेवतेच्या पूजेत तन्मयतेने सहभागी झाला. राम जाधव रंगदेवतेची सेवा करत नाहीत पूजा करतात इतका भक्तिभाव त्यांच्या मनात आहे. ‘रसिकाश्रय’ ही नाटय़चळवळ १९६० साली संस्थारूपाने सुरू केली. येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत रसिकाश्रय ही संस्था सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असतानाच या संस्थेच्या शिरोमणीची अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी आणि तीही बिनविरोध हा सुवर्णकांचन योगच म्हणायला हवा. राम जाधव मुळचे बुलढाणा जिल्ह्य़ातले. साडेसहा दशकापूर्वी ते शिक्षणासाठी अकोल्याला आले आणि सर्वार्थाने अकोलेकर झाले. रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सततची फिरती आणि रंगभूमीची पूजा या दोन्ही आघाडय़ांवर ‘मामा’ म्हणून अकोल्यात आणि मराठी नाटय़ परिवारात परिचित असलेल्या राम जाधव यांनी स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवली. त्या काळात म्हणजे १९५० च्या दशकात आंतरधर्मीय विवाह करून खळबळ माजवणाऱ्या आणि कायद्याची पदवी संपादन केलेल्या राम जाधव यांनी नंतरच्या आयुष्यात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि नाटय़ चळवळीला रसिकाश्रय मिळवून देण्यासाठी कोणत्याही पदाची तसेच, सन्मानाची अपेक्षा न बाळगता सक्रिय असणारा निरलस कार्यकर्ता, अशी विविधांगी कामगिरी बजावली. या सहा दशकात सुमारे ९० नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली. यात ३ संगीत नाटके आणि ४ हिन्दी नाटकांचा समावेश आहे. विजया मेहता यांच्या संपर्कात आल्यावर १० बालनाटकांची निर्मिती करतानाच विजया मेहता यांनी आयोजित केलेल्या तसेच, विजया मेहता यांच्या नेतृत्वाखाली न झालेल्याही शेकडो नाटय़ प्रशिक्षण शिबिरात एक प्रशिक्षक म्हणून राम जाधव सहभागी झाले. जे काही करायचे ते नीट नेटकेच असले पाहिजे, असा आग्रही कटाक्ष बाळगणारा राम जाधव ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जातात. तरी विविध उपक्रमात सहभागी होताना कोणताही तोरा न बाळगता किंवा इतक्या प्रदीर्घ अनुभवाने आपण नाटय़ चळवळीतले ‘महागुरू’ झालो आहोत, असा अहं न दर्शविता सतरंजी उचलणारा-टाकणारा कार्यकर्ता ते प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकात राम जाधव लीलया वावरले. रंगदेवतेची पूजा हीच इतिश्री न मानता भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धातील मृतांच्या वारशांसाठी निधी संकलन, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणे अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमात स्वत: आणि रसिकाश्रयच्या सहकाऱ्यांसह धावून जाण्याची संवेदनशीलताही राम जाधव यांनी दाखवली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मलाचा दगड धरलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे संक्षिप्तीकरण करण्याचा धाडसी आणि आवाहनात्मक प्रयोगही राम जाधव यांनी यशस्वीपणे पेलला. ‘संक्षिप्त मी नटसम्राट’ हे एक आव्हान असून प्रत्येक प्रयोगात आणखी कठीण होऊन ते आव्हान खुणावत असते, असे सांगत गेली १३ वर्षे राम जाधव हे आव्हान तेवढय़ाच तन्मयतापूर्ण भाविकपणे पेलत आहेत. अकोलेकरांचा नाटय़चळवळीला आश्रय सक्रियपणे देण्याची परंपराही या काळात राम जाधव यांनी एखाद्या व्रतासारखी पाळली आहे. वृद्ध कलावंतांचा उचित गौरव आणि त्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी राम जाधव यांची धडपड आजही सुरू आहे. रसिक मराठी नाटकापासून दुरावत आहेत कारण, त्यांच्या आवडी-निवडीचा विचारच केला जात नाही, अशी खंत राम जाधव यांना आहे. या संदर्भात ठोस काही तरी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली सहा दशके अशा विविध भूमिकात अग्रणी राहूनही प्रसिद्धीची हौस न बाळगलेल्या राम जाधव यांची नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या चाहत्यांना सुखावणारी आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यानंतर म्हणजे सुमारे ४० वर्षांनंतर हा बहुमान विदर्भाच्या वाटय़ाला आला आहे, याचेही अप्रुप वैदर्भीयांना असणे स्वाभाविकच म्हणायला हवे.

    -------------------------------------------------

    राम जाधव - त्यांचा रसिकाश्रय

    भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, सतत नाविन्याचा शोध ही वैशिष्ट्यं असलेले अकोल्याचे राम जाधव नाट्यसंमेलनाध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत...

    बुलडाण्यात लेखक-कलावंतांची उत्तम निपज होते, असं म्हणतात. राम जाधव हेही बुलडाण्याचेच. तिथून आपलं कलावंतपण घेऊन अकोल्याला नोकरीच्या निमित्ताने आले आणि तिथेच रूजले.

    ' रसिकाश्रय' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. कुठल्याही कलावंतानं आणि रसिकानं हक्कानं आश्रयाला यावं, असं हे कलाघर. ही गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची. गेल्या पन्नास वर्षांत रसिकाश्रयचा पसारा इतका वाढत गेला की या वडाच्या पारंब्या पुन्हा मातीत रूजल्या, फांद्यांना फांद्या फुटत गेल्या आणि आज रसिकाश्रयचा हा एकमेव बुंधा स्वत:च त्या झाडाच्या सावलीत बसून वरचा विस्तार शांतपणे बघतो आहे. हौशी रंगभूमीच्या इतिहासात एक संस्था एकाच माणसाच्या आधारावर पन्नास वर्षं टिकल्याचं दुसरं उदाहरण नाही.

    राम जाधवांकडे नाट्यसंमेलनाध्यक्षपद चालत येण्यासाठी एवढं कर्तृत्वही पुरेसं आहे. पण त्यांचं काम तेवढंच नाही. केवळ संस्था उभी करणं आणि ती जिवंत ठेवणं हे अवघड असलं तरी अशक्य नाही. पण ती संस्था चाकोरीबाहेरचे मार्ग चोखाळत धगधगती ठेवणं, तिला ऊर्जा पुरवत राहाणं हे मात्र कठीण काम आहे. जाधव मामांचा पिंड हा जात्याच प्रयोगशील रंगकर्मीचा होता, त्यामुळे सतत वेगळ्या वाटेने जात राहाणं हे त्यांचं भागधेय बनलं. पण ते ज्या भौगोलिक परिसरात राहात होते तिथे राहून वेगळेपणाचा वसा घेणं, हे महाकठीण काम होतं. जाधवमामा ज्या काळात हौशी रंगभूमीवर कार्यरत झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकं करू लागले तो काळच मुळी मराठी रंगभूमीसाठी धामधुमीचा होता. साठ सालानंतर एक नव्या जाणिवेच्या रंगकर्मींची लाटच महाराष्ट्राच्या सर्व भागातून मराठी रंगभूमीवर आली. यात मुंबईतून विजया मेहता, अरविंद देशपांडे होते, पुण्यातून पीडीएचे भालबा केळकर होते, अहमदनगरमधून मधुकर तोरडमल नाटकं घेऊन स्पर्धेत उतरत होते, नागपुरातून पुरूषोत्तम दारव्हेकर येत होते, सोलापुरातून वामन देगांवकर नाटकं करत होते. तुल्यबळांचा मुकाबला राज्य नाट्य स्पधेर्त होत असे. अशा काळात राम जाधव विदर्भातल्या अकोला केंदातून नाटकं करू लागले. त्यांनी स्वत:चं नटपण कमावलेलं होतं. भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, नाटकाचं अर्थनिर्णयन करण्याची तयारी, सतत नाविन्याचा शोध आणि त्यातून आलेला धाडसीपणा एवढ्या भांडवलावर त्यांनी मुंबई-पुण्याकडच्या मंडळींना आपली दखल घ्यायला लावली. त्यांनी स्पर्धेत सादर करण्यासाठी नाटकं निवडली तीच राष्ट्रीय स्तरावर गाजलेली झालेली 'एवम् इंदजीत', 'आषाढ का एक दिन', 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'आणि एक दोणाचार्य', 'उद्ध्वस्त धर्मशाळा' अशी. ही नाटकं अकोल्यातील नाटकवेड्यांना बिल्कुल परिचयाची नव्हती. त्यामुळे त्यांच्या निवडीची चेष्टाही झाली. पण जाधव-मामांनी नेटाने ती केली. या अनवट नाटकांसाठी नटसंच तयार करण्याची, त्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारीही त्यांनी न कंटाळता पार पाडली.

    जाधवांच्या व्यक्तिमत्त्वात जसा एक नाटक्या आहे तसाच एक कार्यकर्ताही आहे आणि खमक्या संयोजकही आहे. आपल्या गावातल्या लोकांना नव्या संवेदनेच्या नाटकांसाठी तयार करायचं असेल, नवी अभिरुची घडवायची असेल तर नाटकाच्या बरोबरीने काव्यवाचन, नामवंतांच्या मुलाखती, चर्चा-परिसंवाद असेही कार्यक्रम आयोजित करायला हवेत आणि त्यासाठी नव्या विचारांच्या रंगकर्मींना सतत आपल्या परिसरात बोलवायला हवं, हे ओळखून त्यांनी रसिकाश्रयच्या छत्राखाली मुक्त व्यासपीठच उभं केलं. वसंतराव देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं ८२वं नाट्य संमेलन अकोल्यात भरवण्याचं धाडसही त्यांनी त्यापोटीच केलं. याच संमेलनात 'घाशीराम कोतवाल'वरचा परिसंवाद गाजला होता. याच संमेलनात नेते आपले राजकारणाचे जोडे बाजूला काढून चक्क श्रोत्यांतच बसले होते. याच संमेलनात राम जाधवांनी सादर केलेलं चिं. त्र्यं. खानोलकरांचं 'दोन पिकली दोन हिरवी' हे नाटक (ज्याची रंगावृत्ती कमलाकर सोनटक्के आणि बापू लिमये यांनी केली होती) सर्वत्र चचिर्लं गेलं. संमेलन भव्य झालं, मामांच्या कुशल संयोजनाची ग्वाही सगळीकडे फिरली. पण खर्च अंगाबाहेर गेला. तो निस्तरण्या-साठी जाधवमामांनी 'दोन पिकली'चे प्रयोग लावले. पन्नास-साठ प्रयोगांतून सुमारे दीड लाख रूपये उभे केले आणि देणेक-यांची तोंडं बंद केली. प्रसंगी पदरचे पैसे घातले. पण याबद्दल त्यांनी कधी वाकडा शब्द काढला नाही. प्रायोजक मिळवून संमेलनं फायद्यात नेण्याच्या आजकालच्या दिवसांत मामांचा तो व्यवहार आज चेष्टेचा विषय ठरेल, पण त्यांनी तो कोणतीही वाच्यता न करता निभावला. त्यांचा ऋजु स्वभाव आणि दांडगा लोकसंपर्क या दोन गुणांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा तोल कधीच ढळू दिला नाही.

    रेल्वेतली टीसीची नोकरी त्यांनी आनंदाने केली याचं एकमेव कारण त्यांना त्यानिमित्ताने सर्वत्र संचार करण्याची मिळालेली संधी, हेच असावं. आपलं नाट्यवेड जपण्यासाठीच त्यांनी नोकरीत मिळणारी बढती नाकारली आणि टीसीच राहाणं पसंत केलं. सर्व संमेलनांना हजर राहाणं, नाटकाच्या सेन्सॉरबोर्डात सतत क्रियाशील राहाणं, अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी भ्रमंती करणं हे सगळं वयाच्या पंच्याहत्तरीतही ते तबीयतीने करतात. काही वर्षांपूर्वी 'नटसम्राट' संक्षिप्त स्वरूपात सादर करण्याचा वेगळा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. शिरवाडकरांच्या या नाटकातली सगळी स्वगतं एका सूत्रात गुंफून ती ते एका निवेदिकेच्या मदतीने सादर करीत आणि संपूर्ण 'नटसम्राट' पाहिल्याचा अनुभव देत. विदर्भातल्या रसिकांनी या प्रयोगाची खूप प्रशंसा केली.

    तनाने-मनाने सदैव हौशी आणि प्रायोगिकच राहिलेले राम जाधव यांना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मिळणारा मान दुर्लभच म्हटला पाहिजे, कारण व्यावसायिक रंगभूमीभोवतीच बहुतेक वेळा फिरत राहिलेल्या नाट्यसंमेलनाला हौशी नाटकवाल्यांची फारशी आठवण आलेलीच नाही. म्हणूनच यावेळी जाधवमामांचा मान हा आपलाच बहुमान समजून महाराष्ट्रातल्या तमाम हौशी रंगकर्मींनी रत्नागिरीच्या संमेलनाला हजर राहिलं पाहिजे.

  • छत्रपती संभाजी महाराज

    जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले.

  • चिंतामण विनायक जोशी (चिं. वि. जोशी)

    विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून ज्यांनी अनेक वर्षे अगदी आजच्या पिढीपर्यंत हसवलं, ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चिंतामण विनायक तथा चि.वि. जोशी चि.विं. चा जन्म 19 जानेवारी 1892 सालचा.

    पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून 1911 मध्ये बी. ए. आणि 1916 मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. 1920 सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. 1928 पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे. एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. साहित्य लेखन हा अनेक लेखकांचा हातखंडा असला तरी विनोदी साहित्य निर्मिती हा अतिशय कठीण असा साहित्याचा प्रकार. तो सहजतेने हाताळणारे चि.विं. सारखे विनोदी साहित्यिक विरळाच.

    आयुष्यभर आपल्या लेखनाने महाराष्ट्राला हसविणार्‍या या विनोदी लेखकाचे 21 नोव्हेंबर 1963 रोजी निधन झाले.

    चि. वी. जोशी यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (21-Nov-2018)

    सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (19-Jan-2019)

    विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार चिंतामण विनायक जोशी उर्फ चि.वि.जोशी (19 Jan 2018)

  • दिलीप माजगावकर

    राजहंस प्रकाशनाचे संपादक अशी ओळख व ख्याती असलेल्या दिलीप माजगावकर यांनी माणूस हे साप्ताहिक वाचकप्रिय केले होते.

    राजहंस प्रकाशनाने अनेक लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्यकृती प्रकाशित केल्या आहेत.

  • सदाशिव आत्माराम जोगळेकर

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.

  • मंगेश तेंडुलकर

    मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.

  • (डॉ.) वा. द दिवेकर

    इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.

    पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

    १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.

    इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.

    गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.

    दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.

    वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.

  • भालचंद्र नेमाडे

    कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते… ‘ भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला’ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता.