लोकोत्तर पुरुषांच्या पश्चात त्यांच्या वंशजांवर काळाचा दबाव नकळत निर्माण होत असतो. विशेषत: बौद्धिक क्षेत्रातील अशा महान व्यक्तींच्या पुढील पिढय़ांना ती क्षमता टिकवून ठेवता येतेच असे नाही. परंतु अशाही स्थितीत आपण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरावे, असे बहुधा डॉ. सदानंद मोरे यांनी ठरवले असावे. महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. मोरे यांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.
महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्राचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ , ‘मंथन’, ‘त्रयोदशी’ या सारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे लोकव्यवहारातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. तत्त्वज्ञान विषयाचे गेली ३५ वर्षे अध्यापन करणारे डॉ. मोरे हे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव व संत तुकाराम अध्यासनांचे प्रमुख होते. अध्यापन हा जरी त्यांचा धर्म असला तरीही सतत चिंतन आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा स्वभाव आहे. नाशिक येथे या आठवडय़ात होत असलेल्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या विविधांगी अभ्यासाचा गौरव आहे, असे म्हटले पाहिजे. मराठी माणसांचा देशपातळीवरील पहिला जनसमुदाय म्हणून महाराष्ट्राचा जो उल्लेख होतो, त्याचे कारण महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने येथील जनतेला आत्मभान आणि राष्ट्रभान दिले हे आहे, त्यामुळेच संत नामदेव पंजाबपर्यंत जाऊ शकले आणि मराठय़ांनी पानिपतापर्यंत विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले, असे मत डॉ. मोरे आवर्जून मांडतात. मोरे यांच्या निवडीमुळे संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल, यात शंका नाही.
--------------------------------------------------------------------------
MSS - 0042
मोरे, (डॉ.) सदानंद श्रीधर
२५ जून १९५२
१९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणार्या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘कृष्ण : द मॅन अॅंड हिज मिशन’ ही इंग्रजी पुस्तकं, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
भक्तीरसात ओथंबलेले गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना आंध्रलता म्हटले. हीच उपाधी पुढे त्यांची ओळख झाली.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.
वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन, झुपुर्झा, पेशवेबखर, साहित्यशोभा, वाचनमाला आदी ग्रंथांचे संपादनही केले. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे.
समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.
कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे.
डॉ. खडसे यांची आजवर ३४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘काला सुरज’ या कादंबरीला १९९२ चा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयवंत दळवी यांच्या ‘कालचक्र’ या मराठी नाटकाचा तसेच ‘रामनगरी’ या राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे. ‘अपने ही होने पर’ या हिंदी काव्य संग्रहात विं. दा. करंदीकरांच्या कवितांचा अनुवाद संग्रहित केला आहे.
जळगावातील कलाशिक्षक आणि चित्रकार राजू बाविस्कर.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यावरचं लासूर हे त्यांचं गाव. घरची गरिबी सतत चिंतेत पाडणारी. पण हातात पडलेले कलेचे दान त्यांना लहानपणीच उमगले आणि शाळेत असतानाच त्यांनी आधी गंजलेल्या काळ्या पत्र्यावर, तर नंतर गावातील लग्नघरांच्या भिंतींवर चित्रं काढायला सुरुवात केली. लग्नघरातील या कामाचे त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. हेच पैसे त्यांच्या शिक्षणाच्या आणि घरच्याही उपयोगी पडू लागले. इथूनच सुरू झाला त्यांचा खरा कलाप्रवास. यातून त्यांना त्यांच्या कलेचे 'मोल'ही कळले. मग हळूहळू ते गावात-पंचक्रोशीत कलेची कामे घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले.
औरंगाबादमधून बॅचलर ऑफ फाइन आर्टचे शिक्षण घेतल्यावर बाविस्कर जळगावात ड्रॉइंगमास्तर म्हणून रुजू झाले. एके दिवशी शाळेतले शिक्षक व कवी नीळकंठ महाजन यांनी त्यांची रेखाटनं पाहिली आणि ती 'हंस' मासिकाकडे पाठवायला सांगितली. बाविस्करांनी ती पाठवली. त्यानंतर प्रकाशन व्यवसायात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला. पॉप्युलर, पद्मगंधा, शब्दालयसारख्या नामांकित प्रकाशकांकडून त्यांच्या रेखाटनांना, मुखपृष्ठांना मागणी येऊ लागली. त्यांची रेखाटनं आणि मुखपृष्ठं पाहून त्यांना भालचंद्र नेमाडेंपासून ना. धों. महानोरांपर्यंत आणि रंगनाथ पठारेंपासून राजन गवस यांच्यापर्यंत अनेकांची दाद मिळाली. हा प्रवास सुरू असतानाच बाविस्करांना अचानक जाणवलं की रेखाटनांत रेषांची खूप गर्दी होतेय. मग त्यांनी जाणीवपूर्वक रेषा कमी केल्या. चित्रांतील आकार कमी करत गेले आणि त्यांना आपल्याच चित्रांत निराकारातून आकार साकारत असल्याचे लक्षात आले. आता त्यांच्या रेखाटनांचा-चित्रांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू आहे.
राजू बाविस्कर यांना सांगलीचा प्रतिष्ठेचा 'चित्रकार पंत जांभळीकर स्मृती पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराने एकप्रकारे बाविस्कर यांच्या प्रयोगशीलतेवरच शिक्कामोर्तब केले. कारण देवदेवतांच्या चित्रां-पासून सुरू झालेला बाविस्कर यांचा कलाप्रवास आता अमूर्ताकडे सुरू झाला आहे. आकार, रेषा यांच्यात न अडकता त्यांचा कुंचला आता निराकारात आकार शोधू लागला आहे. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरलेल्या त्यांच्या अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शनाला मिळालेला जाणकारांचा प्रतिसाद, ते योग्य वाटेवर असल्याचेच दर्शविणारा आहे. मात्र बाविस्कर यांचा इथवरचा प्रवास हा एकप्रकारे कोणत्याही यशस्वी व्यक्तीसारखाच संघर्षाचा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
फाटक, कमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
कमल फाटक म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेतील लोभस व्यक्तिमत्व! लाल निशाण पक्षाच्या कम्युनमधील सर्व मुलांची आई म्हणजे कमलताई.
त्यांना ओळखणारे सर्व त्यांना कमलआई म्हणूनच ओळखत. कमलताई म्हणजे नितळ वागणे, स्वयंशिस्त, कामाचा प्रचंड उरक आणि टापटीप. कम्युनमध्ये सगळी कामे तन्मयतेने त्या करीत असत. कोणत्याही चर्चेत बोलणे जवळजवळ नाही, पण तपशील हवा असेल तर तो त्यांनीच द्यावा. कधीही अटक न झालेल्या त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. पण भूमिगत कामे करणे, पुढाऱ्यांचे गुप्त संदेश पोहोचविणे, कार्यकर्त्यांची काळजी घेणे आदी कामे त्या करीत असत. कमलताईंचा जन्म १९२१ मधला. आजी आणि आई या दोघींचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आई-वडिलांकडून मिळाले होते. १०-११ वर्षांच्या कमलताईंना वडील प्रभातफेरीसाठी ओंकारेश्वराच्या देवळात नेऊन सोडत असत. आई न चुकता ‘केसरी’चे वाचन करीत. सोन्याचांदीच्या कपाटात स्वराज्याच्या सनदा ठेवण्याचे विचार त्याकाळी त्या व्यक्त करीत. समजत नसले तरी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना स्वातंत्र्याचाच ध्यास होता. परदेशी साखरेवर बहिष्कार घातल्यामुळे त्यांनी कधी चहा घेतला नाही पण त्यांनी बनविलेल्या चहाची चव कधी बिघडली नाही. स्वयंपाक आणि मुले यांची त्यांना कधीच आवड नव्हती, पण त्यांनी केलेला स्वयंपाक आणि मुलांचे करणे दोन्हीही लाजवाब असायचे. सर्वच कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने पण मनापासून केली म्हणूनच त्या कमलआई म्हणून सर्वाच्या हृदयात विराजमान झाल्या. कमलताईंच्या आईला जडीबुटी औषधांची जाण होती. त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. घरात पिढीजात सावकारी होती, पण ती त्यांनी अनुभवलीही नाही. वडील देवाच्या शोधात गेले आणि नंतर परत आले. कमलताईंच्या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी खंडाळ्याच्या घाटातील (जुना रस्ता) रस्त्याचे काम केले होते. पुण्यात देवळाजवळच भाऊ फाटकांचे घर. भाऊंबरोबर कमलताईही हॅट घालून आणि सायकलवरून फिरायची. पण घरातून विवाहाला विरोध होता. सदूभाऊ गोडबोले यांनी त्यांचे लग्न लावून दिले. चणे-कुरमुरे (लेनिन मिक्श्चर) खाऊन भाऊ आणि कमलताईंनी अनेक दिवस काढले होते. कमलताईंना वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. भाऊंनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घ्यायचे आणि जमेल तितका देश-विदेश पाहायचा हेच त्यांचे ध्येय. कॉ. एस. ए. डांगे आणि त्यांच्या पत्नीचा सहवासही त्यांना लाभला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा आसफअल्लींच्या हस्ते झालेले ध्वजारोहणही त्यांनी पाहिले. एस. के. लिमयेंच्या वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने त्यांनी सोविएत संघराज्य पाहिले तर ‘मुलगी झाली हो’ च्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया पाहिला. १९७४-७५ मध्ये त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकांतून श्रवणभक्ती करीत. ‘मुलगी झाली हो’ या नाटकातील एका भूमिकेसाठी त्या स्वत:हून पुढे झाल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुण कार्यकत्यांना लाजविणारा होता. बरोबरीचे सर्व सोबती, मुलगी, जावई काळाच्या पडद्याआड जात असताना वार्धक्याने थकलेल्या कमलताई शेवटपर्यंत आपले आयुष्य सर्वाच्या कारणी लागावे यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या निधनाने एक सार्थक जीवन काळाच्या पडद्याआड गेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti