तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वेगाने फोफावणार्या व आदर्श समाजबांधणीचे स्वप्न घेवून जगणार्या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच भयंकर आवड होती व ती आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे.
शेख, फैयाज
काही व्यक्तींच्या अंगी चतुरस्र गुण असूनही त्यांना त्यांच्या योग्यतेचे दान पदरी पडायला उशीर लागतो. ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख या अशांपैकीच एक! उत्तम गाणे, रूपसंपदा, अभिनय हे सर्व असूनही त्यांच्या या गुणसंपन्नतेचे म्हणावे तितके चीज झाले नाही.
आपण उत्तम गायिका-अभिनेत्री असूनही बऱ्याचदा आपल्या वाटय़ाला बदलीच भूमिका आल्या, याबद्दलची खंत त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेची उशिरा का होईना, यथोचित दखल घेतली गेली. सोलापूरमध्ये आपल्या नाटय़कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाटय़संपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाटय़सृष्टीत पदार्पण केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंत त्यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाटय़संगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाटय़-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्या मुंबईत येत त्यावेळी फैय्याज यांना गाणे शिकवीत. ‘कटय़ार’मधील झरिना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. ‘महानंदा’, ‘पैंजण’, ‘वजीर’, ‘दायरे’, ‘एक उनाड दिवस’ असे चित्रपटही त्यांनी केले. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्यासोबत केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढय़ांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. आजही त्या त्याच तडफेने कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाव फैयाज शेख पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात सहजपणे सामावून जाईल, असे व्यक्तिमत्त्व. मोठे डोळे आणि चेहऱ्यावर कायमचे स्मित. गळा अतिशय सुरेल. गायक कलावंत म्हणूनच कारकीर्द गाजावयाची. पण कलावंत म्हणूनच सतत रंगभूमीवर उभे राहण्याचे भाग्य मिळाले. फैयाज हे नाव कुणाही मराठी माणसाने उच्चारले तरी डोळ्यासमोर ‘कटय़ार काळजात घुसली’ मधील झरीनाच उभी राहणार. या कलावतीला मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घोषित होणे,
ही मराठी रंगभूमीसाठी आनंदाची बातमी ठरली. गद्य आणि संगीत नाटकांत तेवढय़ाच तडफेने भूमिका साकारणाऱ्या फैयाज यांची रंगभूमीवरील कारकीर्द साडेचार दशकांची आहे. १९६५ मध्ये त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजही त्या रंगभूमीवर अधूनमधून दर्शन देत असतात. या काळात त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या चार हजारांच्या घरात जाणारी आहे. दौरे आणि कार्यक्रमांनी न थकणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी त्या आहेत. कटय़ार काळजात घुसली, हे त्यांचे गाजलेले नाटक तसेच ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’, ‘मत्स्यगंधा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकातील त्यांच्या भूमिका स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. ‘महानंदा’ या चित्रपटातील त्यांची प्रमुख भूमिका रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. किनारा, वादळ वारं, पेइंग गेस्ट, थँक्यू मिस्टर ग्लाड, सूर राहू दे, मी मालक या देहाचा, अंधार माझा सोबती, गुंतता हृदय हे, भटाला दिली ओसरी, वीज म्हणाली धरतीला, मैत्र अशा नाटकांमधील तर बावनखणी, संत तुकाराम, पंडितराज जगन्नाथ, होनाजी बाळा, संत गोरा कुंभार या संगीत नाटकांतील त्यांचे काम रसिकांना भावले. बालगंधर्वासारख्या संगीत सम्राटाने रंगभूमीला जो अभिजाततेचा दर्जा दिला, तो टिकवून ठेवण्यासाठी आजही जे प्रयत्न होत आहेत, त्यामध्ये फैयाज यांचाही वाटा आहे. आपल्या गळ्याने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. संगीत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वाचीच म्हटली पाहिजे. रंगभूमीवर स्त्रियांनी काम करण्यास समाजाने मान्यता देण्यास विसावे शतक उजाडावे लागले. कमलाबाई गोखले, कमळाबाई बडोदेकर यांच्यासारख्या कलावंतांनी रंगभूमीवर भूमिका करून जी सांस्कृतिक क्रांती केली, त्यामुळे तर नंतरच्या काळात महिलांना जीवनाच्या इतर प्रांतातही प्रवेश करणे सुलभ झाले. हिराबाई बडोदेकरांनी संगीत रंगभूमीवर संशयकल्लोळ या नाटकात पहिल्यांदा अभिजात संगीताचा आविष्कार केला. त्यानंतरच्या काळात स्त्रियांना संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून गायन सादर करण्याची समाजमान्यता मिळाली. हिराबाईंनी केलेल्या या क्रांतीला सगळ्याच कलावंतांनी सादर प्रणाम केला पाहिजे. फैयाज या अशा देदीप्यमान परंपरेशी आपले नाते सांगणाऱ्या कलावती आहेत. संगीत रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ासाठी आणि ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी फैयाज यांनी पाश्र्वगायन केले होते. पाठराखीण आणि घरकुल या मराठी आणि बावर्ची, प्रेमपर्वत, अचानक, रंगबिरंगी, आलाप, गुंबीश, कलयुग का कृष्ण, धरतीपुत्र यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही रसिकमान्य झाली. एचएमव्हीने त्यांनी गायलेल्या ‘हुस्नेगजल’ या ध्वनिमुद्रिकेलाही रसिकांनी पसंतीची पावती दिली. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘जोगिया’ या काव्यसंग्रहातील कवितांचे संगीतकार सी. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले वाचन तर रसिक आजही आठवतात. सोलापूरचे पंचवाडकरबुवा यांच्याकडे संगीताचे शिक्षण सुरू केल्यानंतर पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव कुळकर्णी, बेगम अख्तर यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. मराठी रंगभूमीवर आपल्या कलेने रसिकांना सतत आनंद देणाऱ्या या कलावतीचे मनापासून अभिनंदन!
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज
सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्
ताने या गुणी अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध...
वीज म्हणाली धरतीला नाटकात जुलेखाची भूमिका करणा - या फैयाजबाईंच्या तोंडी एक गाणं होतं-
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी...
मात्र या चार पक्षिणींमधली एक राजहंसी होती, तर दोघी हंसी होत्या, चौथीला मात्र आपण कोण तेच ठाऊक नव्हतं. ती तना-मनाने त्यांच्याबरोबर होती. पण तोपर्यंत तिला आपल्या अस्तित्त्वाची ओळखच झालेली नव्हती. ती स्वत:ला त्यांची सावलीच समजत असे. अन् एके दिवशी अकल्पित घडतं...
बाण आला तो कोठुनी, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा...
फैयाजबाईंची कथा यापेक्षा वेगळी नाही. फरक एवढाच होता की, गाण्यातल्या कोकिळेला स्वत:ची जात शेवटपर्यंत कळली नव्हती. फैयाजबाईंना मात्र आपली कोकिळेची जात कधीच कळली होती. पण त्यांच्या आजुबाजूला कावळ्यांचा जमाव एवढा मोठा होता की, त्यांनी त्या कोकिळेला ऐन उमेदीत स्वतंत्रपणे गाण्याचं-उडण्याचं स्वातंत्र्य कधी दिलंच नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वषीर् फैयाजबाई मुंबईत आल्या. हैदराबादजवळ वरंगळला असलेली बाईंच्या वडिलांची चादरीची फॅक्टरी बंद पडली आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्या सोलापूरहून मुंबईत आल्या. अभिनयाची उत्तम जाण आणि गाण्या-नृत्याची आवड हेच त्यांच्याजवळचं तेव्हा भांडवल होतं. त्या भांडवलावरतीच 'नाट्यसंपदा' या नाट्यसंस्थेने बाईंना पाचशे रुपयांच्या नोकरीवर बांधून घेतलं. बाई पगारातले चारशे रुपये गावी पाठवायच्या आणि शंभर रुपयात कसंबसं स्वत:चं भागवायच्या. बाईंची हीच नड 'नाट्यसंपदा'ने नेमकी हेरली आणि तब्बल पंधरा वर्ष बाईंना आपल्याच कंपूत अडकवून ठेवलं. मात्र, एवढ्या वर्षांत 'कट्यार काळजात घुसली'मधील झरिना, 'अश्रूंची झाली फुले'मधील नीलम अशा दोन-तीन महत्त्वाच्या भूमिका सोडल्या, तर बाईंना कुठल्याच फ्रेश भूमिका मिळाल्या नाहीत. पंधरा वर्षं त्यांना केवळ रिप्लेसमेंटच्या भूमिकाच दिल्या गेल्या.
मात्र, कोंबडं झाकलं, तरी सूर्य उगवायचा राहात नाही, याच न्यायाने फैयाजबाईंचा उदयकाळ व्हायचा राहिला नाही. त्यांच्या अभिनयगुणाची, गानकौशल्याची झलक दाखवण्यासाठी 'कट्यार'सारखं नाटक पुरेसं होतं. आणि बाईंनी या संधीचं सोनं केलं. यातल्या त्यांच्या झरिनाच्या भूमिकेचं आणि गाण्यांचं पं. रविशंकर, जयदेव, कुमार गंधर्व, सी. रामचंद अशा बड्या मंडळींनी दिलखुलास कौतुक केलं. अर्थात याचं श्रेय फैयाजबाईंनी कायम नाटकात खाँसाहेबांचं काम करणाऱ्या वसंतराव देशपांडे आणि नाटकाला संगीत देणाऱ्या पंडित जितेंद अभिषेकीबुवांनाच दिलं आहे. कारण त्यांच्यामुळेच ही नामवंत मंडळी नाटक बघायला आलेली होती.
पण या नाटकाने फैयाजबाईंचा जणू पुनर्जन्म झाला. तब्बल सतरा वर्षं या नाटकाचे अखंड प्रयोग सुरू होते. वसंतराव देशपांडेंचं निधन झालं, तेव्हाच त्याचे प्रयोग थांबले. पण तोपर्यंत मराठी व्यावसायिक रंगभूमीला आणि उतरती कळा लागलेल्या संगीत रंगभूमीला एक गुणवान गायक अभिनेत्री गवसली होती. त्यामुळेच नंतरच्या काळात फैयाजबाईंना त्यांच्या गाण्याचा कस लागेल, अशी वीज म्हणाली धरतीला, संत गोरा कुंभार, राजहंसी प्रीत अशी एकाहून एक सरस नाटकं मिळाली आणि बाईंनी वेळोवेळी आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं.
झरिनाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेल्या गाण्याच्या तयारीमुळे आणि त्यांच्या खास पत्तीदार आवाजामुळेच जयदेव, सी. रामचंद यांनी त्यांच्याकडून काही गाणी गाऊन घेतली. सी. रामचंदांनी तर ग. दि. माडगूळकरांना 'गीत गोपाल'ची निमिर्ती करायला सांगून त्यातही बाईंकडून काही गाणी गाऊन घेतली. परंतु गीत रामायणाच्या प्रभावळीत 'गीत गोपाल' झाकोळलं गेलं.
अर्थात, गाणं हे काही बाईंचं करियर नव्हतं. पण त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांनी गाण्यातच करियर करावं, असं अनेकांना वाटायचं. त्यापैकीच एक म्हणजे ठुमरी-गझलसम्राज्ञी बेगम अख्तर. अख्तरीबाईंशी फैयाज यांची भेट वसंतराव देशपांडे यांनीच घडवली. मात्र या भेटीचं रूपांतर आपुलकीच्या नात्यात कधी झालं, ते फैयाज आणि अख्तरीबाईंनाही कळलं नाही. नंतर बेगम अख्तर जेव्हा जेव्हा मुंबईत येत, तेव्हा तेव्हा फैयाजबाईंना बोलावून घेत. आपल्या कार्यक्रमात त्यांना साथीला बसवत. आज फैयाजबाई बेगम अख्तर यांच्या गझला तेवढ्याच सशक्तपणे गातात, ते यामुळेच!
पण फैयाजबाईंनी आपलं गाणं आवडीच्या पातळीवरच ठेवलं. कारण एव्हाना नाटक, सिनेमा, दूरदर्शनमालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले होते. 'महानंदा' चित्रपटाच्या निमित्ताने बाईंच्या दमदार अभिनयाची चुणूक रसिकांना पाहायला मिळालीच. पण पुलं, श्रीराम लागू, विक्रम गोखले यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं.
त्याच लौकिकावर त्यांना नुकताच मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे बहुधा प्रथमच फैयाज यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली गेलेली असावी. अन्यथा आजवर त्यांची वाटचाल एक होती पक्षिणी अशीच होती...
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वर्ध्याचे अविनाश जोशी डॉक्टर झाले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सेवा देत असताना त्यांना पालक आणि मुलांच्या समस्या जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गतिमंदांसाठी 'मे फ्लॉवर' शाळेचे नंदनवन फुलविले. विशेष शाळा सुरु केली. शेकडो आयुष्ये सावरली. समाजात 'बुद्धी' विषयी जनजागृती व्हावी म्हणून 'म्युझियम ऑफ ब्रेन अॅण्ड माइंड' हा उपक्रम सुरु केला. मानसिक रुग्णांच्या वैवाहिक आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडू नये, म्हणून त्यांनी आता ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरु केला आहे...
'मे फ्लॉवर्स' चे नंदनवन
जागतिक किर्तीचे व जगातील आघाडीचे वास्तुविशारद व वास्तुशास्त्रसंशोधक शशिकिरण वझे यांच्या कार्यास अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.
एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्या रंगाने रंगलेले सार्या महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले.
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
येत्या बुधवारी १२ मे रोजी सकाळी न्या. सरोश होमी कापडिया भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारतील तेव्हा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च पदाच्या बाबतीत एक स्थित्यंतर घडेल. आजच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेने कापडिया, (न्या.) सरोश
१९५० मध्ये झाली. न्या. कापडिया हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायाधीश ठरतील. त्यादृष्टीने ते स्वातंत्र्योत्तर पिढीचे न्यायसंस्थेतील पाईक ठरतील.
स्वातंत्र्यानंतर अवघ्या ४६ दिवसांनी २९ सप्टेंबर १९४७ रोजी मुंबईत एका गरीब पारशी कुटुंबात जन्मलेल्या न्या. सरोश कापडिया यांचा गेल्या ६३ वर्षांचा जीवनपट खडतर परिस्थितीवर गुणवत्ता, हुशारी आणि जिद्द या जोरावर मात करून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान कसे प्राप्त करता येते याचा वस्तुपाठ घालून देणारा आहे. गुणवत्ता असली तरी संधी मिळावी लागते. न्या. कापडिया यांना अशा संधी मिळाल्या व त्यांनी त्या संधी दोन्ही हातांनी कवटाळून त्यांचे सोने केले. भारतातील पारशी हा अत्यंत अल्पसंख्य असला तरी या समाजाने भारताला विविध क्षेत्रात अनेक अनमोल रत्ने दिलेली आहेत. विशेषत: मुंबईच्या कायदा आणि न्यायविश्वात एकेकाळी या समाजाचा दबदबा होता. मुंबई उच्च न्यायालयात किमान एक तरी न्यायाधीश या पारशी समाजाचा असायलाच हवा हा गेल्या कित्येक दशकांचा अलिखित पायंडा आजही अबाधित आहे. या दृष्टीने न्या. कापडिया हे न्यायाधीश होण्यात परंपरेचा भाग असला तरी त्यातही एक वेगळेपण आहे. वकिलीची अजिबात परंपरा नसलेल्या घरात जन्माला येऊनही त्यांनी आधी वकिलीच्या व नंतर न्यायदानाच्या क्षेत्रात यशोशिखर गाठले. शिक्षणाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे न्या. कापडिया यांनी वयाच्या विशीत फोर्टमधील बेहरामजी जिजीभॉय प्रा. लि. या कंपनीत शिपाई, भाडेवसुली करणारा मुनीम व कारकून अशा सबकुछ पदावर नोकरी पत्करली. त्यांचा मालक त्यांना रोख पगार देत नसे. पण कॉलेजची फी भरत असे. ही नोकरी सात वर्षे करीत असताना त्यांनी बी.ए. व नंतर कायद्याच्या पदवीपर्यंतचे शिक्षण गुणवत्तापूर्वक पूर्ण केले. मे. गगराट अँण्ड कं. या नामवंत सॉलिासिटर फर्मचे भागीदार आर. ए. गगराट यांनी न्या. कापडिया यांना वकिलीची दिशा दाखविली. फिरोज दमानिया, के. जी. अभ्यंकर, साळी, परुळेकर, सी. आर. दळवी, सी. ज. सावंत, फली नरिमन आणि सोली सोराबजी अशा अनेक नामवंत वकिलांनी त्यांच्यातील वकील घडविण्यात मोलाची कामगिरी केली. पारशी समाजाने भारताला अगणित नामांकित वकील व न्यायाधीश दिलेले असले तरी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्या. कापडिया हे केवळ दुसरे झोराष्ट्रियन न्यायाधीश असतील. न्या. एस. पी. भरुचा यांच्या निवृत्तीनंतर बरोबर सात वर्षांनी ते या पदावर विराजमान होतील. कितीही गुणवत्ता असली तरी प्रत्येकाला योग्य वेळी ‘लिफ्ट’ देणारा कोणीतरी ‘गॉडफादर’ लागतोच. न्या. कापडिया यांना न्या. भरुचा यांच्या रूपाने असा ‘गॉडफादर’ लाभला, असे म्हणण्याने दोघांच्याही महत्तेत जराही उणेपणा येत नाही. ८ ऑक्टोबर १९९१ ते ४ ऑगस्ट २००३ अशी पूर्ण १२ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेल्या न्या. कापडिया यांची त्यापुढील वाटचाल मात्र जलदगतीने झाली. मुंबईहून हिमाचल प्रदेशात मुख्य न्यायाधीश म्हणून गेलेले न्या. कापडिया यांची त्यानंतर चारच महिन्यांत म्हणजे १८ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. न्या. भरुचा यांच्या सरन्यायाधीशपदाचा तो अगदी शेवटचा काळ होता. न्या. कापडिया सर्वोच्च न्यायालयावर गेले तेव्हा त्यांच्याकडे न्या. भरुचा यांचे भावी उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले गेले. ‘आम्हा भय कसले, आमचा कैवारी नारायण!’ या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा आदर्श ठेवून गेली २० वर्षे निर्भीडपणे न्यायदान करणाऱ्या न्या. कापडिया यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये पथदर्शक निकाल दिले आहेत. तरीही व्यापारी व व्यावसायिक वाद, करविषयक प्रकरणे ही त्यांची विशेष खासियत म्हणावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयात असताना घडलेल्या हर्षद मेहता याच्या महारोखे घोटाळ्याचा गुंता दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या रूपाने सोडविण्याचे सुरुवातीचे जिकिरीचे काम त्यांनीच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून लीलया केले होते. न्यायाधीशांच्या भ्रष्टाचार व गैव्यवहारांच्या जाहीर चर्चेने वरिष्ठ न्यायसंस्था विश्वासार्हता पुन्हा संपादित करण्याच्या प्रयत्नात असताना आणि न्यायाधीशांच्या नेमणुकींच्या बाबतीत प्रस्थापित ‘कॉलेजिएम’पद्धतीच्या परिणामकारकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असताना सरन्यायाधीश होणाऱ्या न्या. कापडिया यांना सरन्यायाधीशपदाचे हे सतीचे वाण सुमारे सव्वा दोन वर्षे म्हणजे २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत सांभाळायचे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti