अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.
त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.
पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले.
दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.
संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत.
प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते.
पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.
पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.
दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.
पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1
#PtUlhasBapat #UlhasBapat
June 7, 2022
कथाकार, कादंबरीकार व कवी “बी. रघुनाथ” म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी ७ कादंबर्या ६० कथा आणि १५० च्या आसपास कविता लिहिल्या होत्या.
अवघ्या ४० व्या वर्षी ७ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.
Bhagwan Raghunath Kulkarni
November 7, 2017
बिराजदार, हरिश्चंद्र
जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.
त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
August 5, 2017
अभिनेते विनय आपटेंचा जन्म १७ जून १९५१ साली झाला. विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले ते विजय बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्य नाट्य स्पर्धेत विनयजींनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली.
March 13, 2014
केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.
June 25, 2022
जळगावातील कलाशिक्षक आणि चित्रकार राजू बाविस्कर.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यावरचं लासूर हे त्यांचं गाव. घरची गरिबी सतत चिंतेत पाडणारी. पण हातात पडलेले कलेचे दान त्यांना लहानपणीच उमगले आणि शाळेत असतानाच त्यांनी आधी गंजलेल्या काळ्या पत्र्यावर, तर नंतर गावातील लग्नघरांच्या भिंतींवर चित्रं काढायला सुरुवात केली. लग्नघरातील या कामाचे त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. हेच पैसे त्यांच्या शिक्षणाच्या आणि घरच्याही उपयोगी पडू लागले. इथूनच सुरू झाला त्यांचा खरा कलाप्रवास. यातून त्यांना त्यांच्या कलेचे 'मोल'ही कळले. मग हळूहळू ते गावात-पंचक्रोशीत कलेची कामे घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले.
औरंगाबादमधून बॅचलर ऑफ फाइन आर्टचे शिक्षण घेतल्यावर बाविस्कर जळगावात ड्रॉइंगमास्तर म्हणून रुजू झाले. एके दिवशी शाळेतले शिक्षक व कवी नीळकंठ महाजन यांनी त्यांची रेखाटनं पाहिली आणि ती 'हंस' मासिकाकडे पाठवायला सांगितली. बाविस्करांनी ती पाठवली. त्यानंतर प्रकाशन व्यवसायात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला. पॉप्युलर, पद्मगंधा, शब्दालयसारख्या नामांकित प्रकाशकांकडून त्यांच्या रेखाटनांना, मुखपृष्ठांना मागणी येऊ लागली. त्यांची रेखाटनं आणि मुखपृष्ठं पाहून त्यांना भालचंद्र नेमाडेंपासून ना. धों. महानोरांपर्यंत आणि रंगनाथ पठारेंपासून राजन गवस यांच्यापर्यंत अनेकांची दाद मिळाली. हा प्रवास सुरू असतानाच बाविस्करांना अचानक जाणवलं की रेखाटनांत रेषांची खूप गर्दी होतेय. मग त्यांनी जाणीवपूर्वक रेषा कमी केल्या. चित्रांतील आकार कमी करत गेले आणि त्यांना आपल्याच चित्रांत निराकारातून आकार साकारत असल्याचे लक्षात आले. आता त्यांच्या रेखाटनांचा-चित्रांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू आहे.
राजू बाविस्कर यांना सांगलीचा प्रतिष्ठेचा 'चित्रकार पंत जांभळीकर स्मृती पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराने एकप्रकारे बाविस्कर यांच्या प्रयोगशीलतेवरच शिक्कामोर्तब केले. कारण देवदेवतांच्या चित्रां-पासून सुरू झालेला बाविस्कर यांचा कलाप्रवास आता अमूर्ताकडे सुरू झाला आहे. आकार, रेषा यांच्यात न अडकता त्यांचा कुंचला आता निराकारात आकार शोधू लागला आहे. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरलेल्या त्यांच्या अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शनाला मिळालेला जाणकारांचा प्रतिसाद, ते योग्य वाटेवर असल्याचेच दर्शविणारा आहे. मात्र बाविस्कर यांचा इथवरचा प्रवास हा एकप्रकारे कोणत्याही यशस्वी व्यक्तीसारखाच संघर्षाचा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
June 21, 2022
सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव
December 7, 2011
ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.
त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.
August 5, 2017
मराठी संतकवियित्री परभणी जिल्हातील गंगाखेड येथे जन्म. माता लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशी हि एक आख्यायिका आहे. पूढे नामदेवास आपले सर्वस्व मानून नामयाची दासी जनी या नावाने ती वावरली ती शेवटपर्यत अविवाहित होती.
जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले. तिच्या नावावर हरिश्चदाख्यात, प्रल्हादचरित्र कृष्णजन्म बाळकीडा,थालीपाक द्रौपदीस्वंयवर वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते तिची काव्यरचना साधी रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.
March 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti