आपलं ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
मुंबईच्या वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्थेतून टेक्सटाईल विषयात पदवी घेतलेल्या सोमण यांनी २५ वर्षे मफतलाल मिलमध्ये नोकरी केली. त्यानंतर १९९५ साली स्वेच्छानिवृत्ती स्विकारुन ठाण्यात खगोलशास्त्राचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर १९७२ सालापासून निर्णयसागर, ढवळे, सोमण नॅनो पंचांग इत्यादी पंचांग त्यांनी संपादित केली. आजवर त्यांनी वृत्तपत्रांतून विज्ञान आणि खगोलशास्त्र विषयक बरच लेखन केलं आहे.
ठाण्यात झालेल्या ८४ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना पहिला “ठाणे भूषण” पुरस्कार, “पी सावळाराम” लेखन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.