(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • गंगाराम तळेकर

    कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील.

  • नरेश भिकाजी कवडी

    कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

    “बीअरची सहा कॅन्स”, “चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा” हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे “भरली चंद्रभागा” हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक परिचित झाले.

    ## Naresh Bhikaji Kawadi

  • बाळ ज. पंडित

    अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत.

  • कोरगावकर भा. ल.

    काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात.

  • वंदना सूर्यवंशी

    अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘स्पेस फाउंडेशन’च्या एका अंतराळ कार्यक्रमात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका मराठी शिक्षिकेची, वंदना सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली! प्रत्येक गोष्टीतील नावीन्य टिपणे, दररोज नवे काही शिकणे हा स्वभावधर्म व प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक क्षणात खूप काही सामावलेले आहे.

  • कवी ना. घ. देशपांडे

    ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला.

    ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली. ‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या.

    १९२९ मध्ये लिहिलेला ''शीळ'' या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली '' शीळ '' या नावाने त्यांचा काव्यसग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली ‘अभिसार’. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने.. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते. ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले.

    ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले. नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १० मे २००० रोजी झाले.

    ना.घ. देशपांडे यांची काही गाणी
    अंतरीच्या गूढ गर्भी, काळ्या गढीच्या जुन्या ,घरदिव्यांत मंद तरी , डाव मांडून भांडून , तुझ्याचसाठी कितीदां , नदीकिनारीं नदीकिनारीं, फार नको वाकू जरी, बकुळफुला कधीची तुला, मन पिसाट माझे अडले रे, रानारानांत गेली बाई.

    अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

    कवी ना. घ. देशपांडे (नागोराव घन:श्याम देशपांडे)

    #NagoravGhanashyamDeshpande

  • जतीन्द्र कराडकर

    त्यांचे निश्चित वय कोणालाच माहित नव्हते. असेल ७२ किंवा ७५ वा ७८-असेच त्यांना जवळून ओळखणारेही म्हणत. त्यांचे शिक्षण? विज्ञानातील पदवीधर असावेत! पण कोणत्या महाविद्यालयात, कुठले विषय घेऊन, कधी आणि कोणत्या ‘क्लास’मध्ये पास झाले हेही त्यांचे बहुतेक निकटवर्ती सांगू शकत नसत. घरचा पत्ता होता; पण ते राहात होते त्याला लौकिक अर्थाने ‘घर’ म्हणणे कठीण! कॉटवर, खुर्चीवर, टेबलवर, सर्वत्र पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रांमधली कात्रणे.

    त्या सर्व अस्ताव्यस्त पसाऱ्यातून त्यांना पाहिजे तो संदर्भ ते शोधू शकत असत. नाहीतरी त्यांच्या स्मृतीत तो पक्का असायचाच..‘घरा’त कुठेतरी कपडे-धुतलेले, न धुतलेले, वाळत टाकलेले. इस्त्रीचा शर्ट त्यांनी कधी घातल्याचे कुणी पाहिलेले नाही. शर्टला बटण असण्याचे कोणते बंधन नाही. दाढी केली-न केली, भांग पाडला न पाडला, स्नान केले वा न केले तरी बघणाऱ्याला फरक कळणार नाही. (सवयीने बोलताना आंघोळ केली असे ते म्हणत), चष्माही बेंगरुळ. घरात रेडियो होता. लहान टीव्हीसुध्दा, पण त्याच्या वायर्स, केबल्स अशाच इकडे-तिकडे..भेटलेल्या माणसाशी चर्चा, वाद, भांडण अनेक मुद्दय़ांवरून. जशी पुस्तके, नियतकालिके, कात्रणे अनेक विषयांसंबंधात.

    कार्ल मार्क्‍स ते किशोरी आमोणकर, हेन्री किसिंजर ते कथाकार ओ हेन्री, आइनस्टाईन ते पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर ते अब्राहम लिंकन असे सर्वजण त्यांचे ‘कुटुंबिय’ पुस्तकरुपाने त्यांच्या घरात व मनात नांदत असत. त्यांना नाव अर्थातच होते. जतीन्द्र कराडकर. आई-वडिल दोघेही स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही कम्युनिस्ट. म्हणजे वारसा जरी मीनाक्षी साने, कॉम्रेड कराडकर, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड सरदेसाई अशांचा आणि सदस्यत्वही (बहुधा!) कम्युनिस्ट पक्षाचे, तरी कोणत्याही चौकटीत मावू शकणारा हा माणूस नव्हता. ‘मार्क्‍स की मॅथेमॅटिक्स’ यापैकी एकच निवडायचा प्रसंग आला तर बहुधा त्यांनी गणिताचीच निवड केली असती ! गणित हा विषय किती आनंदाचा आहे हे ते सांगत आणि आपण कोणत्याही मुलाच्या मनातील गणिताविषयीची अढी काढून टाकू शकतो असे म्हणत. कोणतेही लौकीक वा प्रतिष्ठेचे गणित वा विज्ञान शिक्षण न घेतलेल्या जतीनने आयआयटीतर्फे होणाऱ्या खुल्या गणित स्पर्धामध्ये आठ वेळा पुरस्कार प्राप्त केले होते. फिजिक्स (अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स इ.) या विषयाचे त्यांचे ज्ञान विलक्षण होते. जगाच्या पाठीवर कुठेही या दोन विषयांत जे संशोधन होत असे त्याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असे आणि त्या शोधांचे स्वरूप कितीही गुंतागुंतीचे असले तरी ते उत्तमपणे समजावून सांगू शकत असत. त्यांच्या ज्ञानभांडारात या विषयांप्रमाणेच साहित्य-संस्कृती आणि राजकारणही असे.

    अनेक कविता मुखोद्गत आणि एखाद्या राजकीय घटनेचे, व्यक्तीचे वा एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचे निरुपण करताना ते नेमकी कविता म्हणून तो मुद्दा स्पष्ट करत असत. कराडकर कधीही परदेशी गेले नाहीत. पण त्यांना रशिया, अमेरिका, आफ्रिका इत्यादी प्रदेशांबद्दल इतकी भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक माहिती असे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना ते इतक्या वेधक पद्धतीने हे घटक विशद करून सांगत की खरे म्हणजे ते ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ विषयाचे प्राध्यापकही होऊ शकले असते.

    इतिहास- मग तो मराठय़ांचा असो वा इंग्रजांचा- माहीत असल्याखेरीज राजकारणातील गुंतागुंत कळत नाही असे त्यांचे मत होते. साहजिकच त्यांचा इतिहास- युद्धशास्त्रसुद्धा- हाही चिंतनाचा व अभ्यासाचा विषय होता. लौकीक अर्थाने त्यांना कुणीही विद्वान म्हणणार नाही. त्यांना ते आवडलेही नसते. त्यांना कुणीही कोणतेही पुरस्कार दिले नाहीत. त्याचे तर त्यांना अप्रूपही नव्हते. ते ज्या कम्युनिस्ट पक्षात-चळवळीत- वाढले त्यांनीही त्यांची फार कदर केली नाही. ज्याला इंग्रजीत ‘मॅवेरिक’ म्हणतात असा हा ‘मॅवेरिक कॉम्रेड’ होता. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट पक्षात संघटनेच्या शिस्तीला, पक्षाच्या ‘लाईन’ला आणि विविध प्रसंगांमधील धोरणांना खूप महत्त्व असते. ती शिस्त वा लाईन तोडून चालत नाही.

    कराडकरांना पक्षातून काढून टाकले नाही हा पक्षाचा मोठेपणा की कराडकरांचा मोठेपणा पक्षात कळू शकणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचा व्यासंगी विक्षिप्तपणा खपून गेला हे सांगणे कठीण आहे. जतीनची मूळ मार्क्‍सवादी विचारसरणी आणि कम्युनिस्ट आदर्शावर निष्ठा होती- तितकीच त्यांची ज्ञाननिष्ठाही होती. ते इतके नि:स्पृह होते की, आपण नि:स्पृह आहोत हेही त्यांना माहीत नव्हते- जसे इतका व्यासंग असून त्यांना कुणी ‘स्कॉलर’ म्हणून संबोधले नाही हे तर त्यांच्या गावीही नव्हते! असे लोकच निखळ बौद्धिक-वैचारिक जीवनाला अर्थ आणि आशय प्राप्त करून देतात.

  • कृष्णदेव मुळगुंद

    मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

  • भरत सासणे

    ‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.

    त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.

    शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.

    बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.

    जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.

    चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.

  • अजय वढावकर

    दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.