(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • नंदकिशोर कलगुटकर

    नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.

  • कॅप्टन दिलीप दोंदे

    ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९६७ रोजी झाला.

    शिडाच्या नौकेवर एकट्याने २१हजार ६०० सागरी मैलांची विश्व सागर परिक्रमा पूर्ण करणारे कमांडर दोंदे हे पहिले भारतीय!

    या परिक्रमेने जभरातील त्या वेळच्या १७५ विश्वयात्री दर्यावर्दींच्या पंगतीत प्रथमच एका भारतीयाचे नाव कोरले गेले. निवृत्त व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांच्या प्रेरणेतूनच कमांडर दोंदे या आव्हानात्मक कामगिरीसाठी उतरले.

    कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.

    कमांडर दोंदे यांनी एनडीएत दाखल झाल्यापासूनच साहसी छंदांची आवड जोपासली होती आणि त्यांची मशागत करण्याची संधीही नौदलात मिळत असतेच. एनडीएमध्ये असताना ते घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन खेळायच्या पोलो या खेळात रमले. नंतर स्कीईंगच्या राष्ट्रीय स्पधेर्तही उतरले आणि नौदलाच्या सेवेत असताना डायव्हिंगचा थरारही त्यांनी आपलासा केला. मुंबई-कोची नौका सफारीत ते सहभागी होतेच...त्यामुळे आता हे नवं चॅलेन्ज...पण एकदा ते मनावर घेतल्यावर त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही.

    भारताला एवढा विस्तीर्ण सागरकिनारा आणि इतक्या वर्षांची दर्यावर्दींची परंपरा असूनही विश्वपरिक्रमेत आपण मागे का राहिलो, याची रुखरुख कमांडर दोंदे यांनाही भेडसावू लागलीच. त्याचवेळी त्यांनी यासंबंधीची माहिती काढली, तेव्हा काही रंजक नोंदी सापडल्या. सर अ‍ॅलेक रोज यांनी १९६० साली केलेल्या विश्वपरिक्रमेच्या वेळी वापरलेली नौका कोलकात्यात तयार करण्यात आली होती. तर त्यानंतर सर रॉबिननॉक्स जॉन्स्टन हे तर विश्वपरिक्रमेकरिता मुंबईतच बनलेल्या 'सुहेली' या नौकेवर स्वार झाले होते. कुठेही न थांबता सागरपरिक्रमा करणारे पहिले दर्यावदीर् आणि जूल्स व्हेर्न ट्रॉफीचे दुसरे विजेते तसंच २००६ मध्ये ६७ व्या वषीर् सागर परिक्रमा पूर्ण करणारे सर्वात वयस्क (?) सदस्य असे किताब नावावर असलेले जॉन्स्टन यांच्यापर्यंत कमांडर दोंदे जाऊन धडकले. अगदी रीतसर त्यांची शिकवणीच म्हणाना. सर जॉन्स्टन यांच्यासह त्यांनी ब्रिटनमध्ये तीन आठवडे घालवले आणि त्यांच्यासह त्यांच्या बोटीवर डागडुजीपासून सर्व कामे कमांडर दोंदे यांनी केली. सदुसष्टाव्या वषीर्चा जॉन्स्टन यांचा उत्साह पाहून दोंदे थक्क झाले. जॉन्स्टन दोंदे यांच्या नौकेची बांधणी पाहण्यासाठी गोव्यात दाखल झाले, तेव्हा तर शिडाच्या काठीवर चढून नौकेची मजबुती पाहण्याचा काटेकोरपणाही दाखवत होते. मुंबईत लकडाबाजारात कुठे सामान मिळते, याच्या टीप्सही जॉन्स्टन द्यायचे. अॅडमिरल आवटी यांचं तर आपल्या विंचुणीर्तून या सर्व घडामोडींवर लक्ष होतंच. पण गोव्यातल्या मांडवी नदीचं मूळ नाव धारण करणारी म्हादेई, त्या गोव्यातल्या मातीतच बनत होती. तिचं बाळंतपण करणारे रत्नाकर दांडेकरांचे हातही असंच काटेकोर लक्ष ठेवून होते. वर्षभरात 'म्हादेई'चं काम पूर्ण झालंच पाहिजे, अशी अटच नौदलाने कंत्राटात घातली होती. शेवटच्या तीन महिन्यात तर आपलं ऑफिस विसरून म्हादेईच्या सेवेतच ते होते. या सर्वांचा परिक्रमेत मोठा वाटा आहे, हे दोंदे वारंवार सांगतात.

    'म्हादेई' तयार झाल्यानंतर दोंदे यांनी त्यांचा सपोर्ट ऑफिसर अभिलाष याच्या साथीने मॉरिशसपर्यंत पहिली सागरी सफर केली. त्यानंतर ते एकटे २३०० सागरी मैल अंतर कापत म्हादेईच्या साथीने मुंबईत परतले, हीसुद्धा भारतीयाने केलेली पहिलीच लांब सफर ठरली. सागर परिक्रमेच्या अंतराच्या तुलनेत ते कमी असलं, तरी त्यातून नौकेची कसोटी पार पडली आणि अनुभवही मिळाला. एवढं सगळं झाल्यावर गेल्या वषीर् ऑगस्ट महिन्यात भर मान्सूनमध्ये दोंदेंची म्हादेई मुंबई बंदरातून निघाली, तेव्हा खरं तर मान्सूनचा काळ...म्हणजे वारे नैऋर्त्येकडून यायला हवेत, पण प्रत्यक्षात वारा वायव्येकडून येत होता...थोडक्यात काय, तर अथांग सागरात गेल्यावर वारा आणि लाटांबाबतचे आडाखे कसे चुकतील, याचा नेम नाही. विषुववृत्ताच्या जवळ गेल्यावरही त्यांना हाच अनुभव आला...अशा वेळी दोंदे सांगतात की, पर्याय काहीच नसतो, तुम्हाला तर पुढे जावंच लागतं, फार तर कधी ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी तुम्ही मॉरिशसच्या दिशेने जाता...दिशा थोडी बदलावी लागली, तर डेस्टिनेशन तेच आणि पुढे तर जावंच लागतं...दोंदे सांगतात.

    सारखं नौकेच्या मर्यादित जागेत राहून खुडकायला होत नाही का, या 'बालसुलभ' प्रश्नावर दोंदे सांगतात, जागा कमी असल्याने पायाला व्यायाम होत नाही, हे खरंय, पण बाकी शरीराला, स्नायूंना नेहमीच्या वर्क आऊटपेक्षाही अधिकच व्यायाम मिळतो. शीड बांधायाची चढ-उतार करण्यात भरपूर मेहेनत असते. रात्री सलग सहा-आठ तास झोप मिळाली, असंही क्वचितच घडलं. झोपलं, तरी नौका पुढे जात असतेच, तेव्हा सावध राहावंच लागतं. जेवणासाठी कुकर, गॅस सगळं होतं, कधी वरणभातही करायचो, पण एकटे असताना साग्रसंगीत जेवण करण्याची हौस वाटत नाही. चार बंदरांमध्ये थांबलो, तेव्हाही नौकेची डागडुजी आणि इतर कामांमध्येच वेळ गेला. नऊ मीटरच्या लाटा आणि ताशी शंभर किलोमीटर वेगाचे वारे अशा परिस्थितीत नौकेचं स्टिअरिंग व्हील तुटलं... असा तांत्रिक पेच उभा राहील, हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यात दिवस गेला, पण त्यातून सावरता आलं. असे अनेक प्रसंग होते... माझ्या मनात एकच होतं, मी परिक्रमा पूर्ण करणार, हे नौदलाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंय...त्याच बळावर मी परिक्रमा पूर्ण करू शकलो. आता 'म्हादेई'चा वापर इतरही भावी दर्यावर्दीनी करावा, असं मला वाटतं...दोंदे समुदाकडे पाहत सांगत असतात..

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #CaptainDilipDonde

  • भास्कर काशीनाथ चांदूरकर

    भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.

  • विमल मुंदडा

    महाराष्ट्राच्या विधानसभेत पाचव्यांदा निवडून जातानाच केज मतदारसंघातील आमदार विमल मुंदडा जगण्याशी लढाई देत होत्या. आजारपणामुळे केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरतेच त्यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्या जवळजवळ दुप्पट मतांनी निवडून आल्या, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पत्र घेण्यासही त्या जाऊ शकल्या नाहीत.

    सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या मुंदडा यांच्या निधनाने त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांच्या मोठय़ा सामाजिक परिवारातील सर्वानाच दु:ख होणे स्वाभाविक आहे. मतदारसंघाशी नाळ जुळणे याचा अर्थ विमल मुंदडा यांना समजला होता. सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली, तेव्हा त्या भाजपचे मुंडे यांच्या गटात होत्या. दोन वेळा भाजपकडून त्यांना विजय मिळाला, परंतु मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर तीन वेळा त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या. या काळात १९९९ पासून २००९ पर्यंत त्या मंत्रिमंडळात राहिल्या.

    मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. परंतु त्याहीपलीकडे आपल्या मतदारांचा जो विश्वास त्यांनी कमावला होता, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटण्यासारखा होता. वसुंधरा महिला सहकारी बँक आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान या संस्थांची त्यांनी उभारणी केली. मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

    व्यक्तिगत जीवनातील अनेक धक्के सहन करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र जोमाने सुरू ठेवले होते. राजकीय जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा वादळांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी खंबीरता त्यांच्यापाशी होती. सतत कार्यमग्न राहून मतदारांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद होती. अनुसूचित जातीतून डॉक्टर झालेल्या त्या काळातील अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी राजकीय क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि त्यात काम करता आले, याबद्दल त्या नेहमीच समाधान व्यक्त करीत. त्यांच्या निधनाने एका उमद्या राजकीय व्यक्तीचा अंत झाला आहे.

  • दत्ता पाटील

    पाटील, दत्ता

    विधिमंडळाच्या कामकाजात संसदीय आयुधांचा वापर कोणत्या वेळी आणि कसा करावा, त्यासाठी कोणत्या नियमाचा आधार घ्यावा आणि तो घेताना आपला संदर्भ कोणालाही खोडता येणार नाही याची काळजी घेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांना त्यांची चूक मान्य करायला लावण्याचे कसब दत्ता पाटील यांच्या अंगी होते.

    म्हणूनच १९८७ ते १९८९ या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या रूपाने सतत गाजत राहिले. रायगड जिल्ह्य़ामध्ये फुकटे वकील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांचा कळवळा असलेले व्यक्तिमत्व होते. नारायण नागू पाटील यांच्या या सुपुत्राने वडिलांनी केलेल्या समाजकार्यामध्ये आपल्याही कार्याची ओंजळ ओतली आणि रायगडमधील कष्टकरी आणि शेतकरी यांचे ते तारणहार झाले. वडिलांच्या आग्रहास्तव फौजदारी वकील झालेल्या दत्ता पाटील यांनी गरिबांचे अनेक खटले फुकटात लढविले, म्हणून त्यांना फुकटे वकील म्हणत ते आपुलकीने. रायगडमध्ये एक निष्णात फौजदारी वकील असलेल्या दत्ता पाटील यांनी अनेकांना खटल्यातून सोडविले, याचा उल्लेख शरद पवार यांनी एकदा विधिमंडळात केला होता. दत्ता पाटलांचे वाचन अफाट होते. विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचा अग्रक्रम होता. ज्येष्ठ सदस्य असूनही ते सभागृहात वेळेवर येत आणि सर्वाधिक काळ सभागृहात थांबत. प्रत्येक चर्चेत ते सहभागी होत. त्यांचे वक्तृत्व धारदार, हजरजबाबी होते. त्यांचा आवाज अत्यंत धारदार, मोठा होता. अनेकदा त्यांच्या नुसत्या आवाजानेच समोरच्या मंत्र्याची उत्तर देताना गाळण उडत असे. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एका चर्चेमध्ये उत्तर देण्यासाठी दोन्ही गृहराज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते आणि मंत्रिमहोदय सभागृहात येईपर्यंत सभागृहाचे कामकाज एकटय़ा दत्ता पाटील यांनी बंद पाडले होते, ते संसदीय आयुधांचा आणि नियमांचा योग्य वापर करीत. स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यामुळे ते फटकळ वाटले तरी मनाने अत्यंत साधे होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा सीमा लढा, त्यांत दत्ता पाटील अग्रेसर होतेच; पण गेल्या वर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाने केलेल्या सत्कार समारंभात आपण आजही सीमा लढा लढण्यासाठी तुरुंगात जायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाच्या सभागृहात असो वा बाहेर लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि तसाच पुढाकार त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक होते. मात्र १० वर्षांपूर्वी त्यांना पक्षाने बाहेर काढले तरी त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे टाळले. स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा दबदबा होता. गरीब मुलांसाठी त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटी सुरू केली. संस्थेच्या सर्व पसाऱ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. कुटुंबवत्सल, सार्वजनिक कामाविषयी आस्था असणारा आणि त्यासाठी विधिमंडळाचा योग्य वापर करून गरीब शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा लढवय्या लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपण गमावला आहे.

  • शालिनीताई मोघे

    वंचित वर्गातील मुलांचे शिक्षण तसेच निराधार महिलांच्या उत्थानासाठी पायाभूत स्वरुपाचे कार्य करण्याच्या हेतूने दिवंगत स्वातंत्र्य सेनानी तात्या सरवटे यांनी इंदूरच्या पागनीसपाग्यात सुमारे ६० वर्षांपूर्वी बाल निकेतन संघाची स्थापना केली तेंव्हा त्यांच्या समवेत कन्या शालिनीताई या बिनीच्या शिलेदार होत्या. निव्र्याज सेवेचा वसा वडिलांकडून घेतल्यानंतर तो आजन्म पाळताना शालिनीताईंनी त्याला प्रयोगशिलतेची जोड देऊन समाजहितैषी कामाचा एक मानदंड आखून दिला.

    गुरुवारी वयाच्या ९८व्या वर्षी शालिनीताईंचे निधन झाले तेंव्हा प्रत्येक इंदूरकर हळहळला. इंदूर आणि मध्य प्रदेशच्या शाजापूर, झाबुआ येथील आदिवासी व वंचितांसाठी बाल निकेतन संघाच्या माध्यमातून काम करताना ताईंनी मोठा गोतावळा जोडला. एखाद्याला, विशेषत ज्याला कशाचाही आधार नाही, अशा दुर्बलाला उभे करून आत्मनिर्भर करणे हे मानवसेवेचे कार्य ताई शेवटपर्यंत अथकपणे करीत राहिल्या. रोज शिकत राहा, सचोटीने व्यवहार करा अन् गरजूंना मदतीसाठी तत्पर राहा ही साधीसोपी त्रिसूत्री स्व. तात्या सरवटे यांनी आखून दिली होती, ताईंनी ती जीवनभर एखाद्या व्रतासारखी पाळली. वडिलांप्रामाणे बंधू व्ही. व्ही. सरवटे तसेच पती दादासाहेब मोघे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. बाल निकेतन संघ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर या क्षेत्रातील कामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी ताई त्याकाळी अलीगडच्या विश्व विद्यालयात दाखल झाल्या. बालशिक्षणाच्या प्रणेत्या मादाम माँटेसरी यांच्याकडे कराचीला जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले. हाती घेतलेल्या कामाला त्यांनी प्रयोगशीलतेची जोड दिली. बाल शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींचे भान त्यांना आले होते, आणि म्हणूनच याबाबत नेमके काय करावे याची त्याना जाण होती. बालशिक्षणाच्या बरोबरीने पोषण व दुर्बल घटकातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. गरीब महिलांच्या रोजगारासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविले. लहान मुलांसाठी ‘झुला घर' सुरू करून अनेक भागांत त्यांची साखळी तयार केली. शहरी भागाच्या गरीब वस्त्यांतील आरोग्याचा प्रश्नही आपल्या अंगीभूत कार्यात सामावून घेतला. एकात्मिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक सेवाभावी संस्थांसाठी आर्दशवत ठरले याचे कारण हेच की, या कामासाठी काय काय करावे याबाबतची ताईंची भूमिका स्पष्ट होती व त्याला कृतिशिलतेची जोड होती. शाळा, ग्रंथालये, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथालय, वात्सल्यधाम, शैक्षणिक साहित्य बनवण्याची केंद्रे आदी प्रयोग राबवून त्यांनी समाजातील मोठय़ा घटकाला त्यात सामावून घेतले. निरपेक्ष सेवा हाच त्यांचा मूलमंत्र राहिला. बाल निकेतन संघाच्या कार्याने प्रभावीत झालेल्यांत आचार्य विनोबा भावे, पं जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी आदी अनेक मान्यवरांचा समावेश करावा लागेल. १९६० साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या कार्याचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या ताई शेवटपर्यंत निगर्वी राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आश्वासक अन् प्रेमळ होते की त्यांच्या केवळ दर्शनानेही अनेकजण आश्वस्थ होत असत. त्यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला आपण मुकलो आहेत.

  • रसिका जोशी

    रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.

  • कृष्णदेव मुळगुंद

    मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

  • य. गो. जोशी

    य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.

  • राजमाता विजयाराजे शिंदे

    विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.