शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.
शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.
शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ janasampark.com
शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com
डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला. त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात.
‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प, नाट्यीकरण प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवले होते. राज्य विश्वकोश मंडळाची अध्यक्षा म्हणून त्या काम बघत असताना त्यांनी तेव्हा सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे २० खंड माहितीच्या महाजालात (इंटरनेटवर) आणले. त्यामुळे १०५ देशातील लाखो वाचकांपर्यंत विश्वकोश पोहोचण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यातील शाळा-शाळांमधून ‘विश्वकोश वाचन स्पर्धा’ आयोजित केल्या. ‘बालकोश’, ‘कुमारकोश’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विश्वकोश, कुमार कोश ‘बोलका’ (ऑडिओ स्वरूपात) केला.
आपल्या मुली वाढविताना, दहावी आता बिनधास्त, निबंधरचना तंत्र आणि मंत्र, गप्पागोष्टी, घर अंगण, गृहविष्णू आणि इतर कथा, मनमोर, मी वेणू बोलतेय..., प्रिय हा भारत देश, सावित्रीच्या लेकी, सय, उत्तम शिक्षक होण्यासाठी..., विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर, झंप्या झिम्माडे, आपली माणसं, बाल निसर्गायन, बिट्टीच्या बारा बाता, छोटुली छोटुली गाणी, डॅनी डेंजर, ढ, दिव्याचे दिव्य, किंजल, क्षणिका, मनाची उभारी, निरभ्र आणि श्रीगणेशा, ओजू एंजल, टिंकू टिंकल, तिसरी घंटा, आपली मुलं, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड या त्यांच्या कन्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.
अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली.
शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते.
श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत.
विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते.
दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली.
काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. 'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. 'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता.
कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे. 'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट!
त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. दादासाहेब तोरणे यांचे निधन १९ जानेवारी १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजकपूरने तिला पाहिले, त्यावेळी तो एका मुलीच्या शोधात होता बरसात या चित्रपटासाठी . त्याने निम्मीला तिचे नाव विचारले तेव्हा निम्मीने आपले नाव सांगितले नवाब बानो . आठ-दहा दिवसानी मेहबूब स्टुडिओंमधून बोलावणे आले , तयार रहा तुझी स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे.
नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.
या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती.
Copyright © 2025 | Marathisrushti