यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते.
आज १३ ऑक्टोबर.. आज बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला.
बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते.
निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं. निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.
निरुपा रॉय यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
१९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली.
राहुल देशपांडे यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १० आक्टोबर १९७९ रोजी झाला. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे. राहुल देशपांडे यांच्यावर संगीताचे संस्कार जन्मापासूनच जरी होत असले तरी खरा संगीतप्रवास वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु झाला. सहाव्या वर्षापासून पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे पठडीबाज तालमीला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्या मुलांना शास्त्रीय संगीताचा कंटाळा असतो तसा राहुलना ही होता. त्यावेळी आई-वडील पाठवतात म्हणून क्लासला जायचे असे चालले होते. नंतर गाण्याचा कंटाळा आला म्हणून त्त्यांनी एक वर्ष गाण बंद ठेवले. त्याच सुमारास १९९२ साली कुमार गंधर्वांचे निधन झाले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनी राहुलजींच्या वडीलांनी इंदौरहून कुमारजींच्या भजनाची कॅसेट आणली. एक दिवस घरातले सगळे बाहेर गेले असताना काहीच काम नाही म्हणून राहुलजींनी कॅसेट लावली आणि त्या सुरांनी त्यांना अक्षरशः झपाटून टाकले. दोन दिवसात त्यांनी सगळी भजनं पाठ केली. त्यावेळी पहिल्यांदाच कुमारांच्या गायकी बद्द्ल ओढा त्यांच्या मनात निर्माण झाला.
त्यानंतर उषाताई चिपलकट्टी यांच्याकडे सहा वर्ष शिकायला मिळाले. उषाताईंकडचे शिक्षण आव्हानात्मक होते. विचार तयार करणे हे उषाताईंकडे घडले आणि बुध्दी तयार झाली. त्यानंतर मुकुल शिवपुत्र यांच्याकडे सहा-सात वर्ष शिकायचा योग आला. तिथला अनुभव फ़ारच निराळा होता. ज्याला दिशा देणं म्हणतो ते तिथे झाले. सुरांकडे, रागांकडे बघण्याचा दृष्टीकोन मुकुल शिवपुत्रांनी दिला. राहुलजींच्या मते गुरुंकडे शिकत असताना काय घेतलं हे सांगता येत नाही पण जे मिळतं तो एक अनुभव असतो आणि तो अतिशय व्यक्तिगत असतो. पिंपळखरेबुवांकडे शिकताना पठडीबाज तालमीचा कंटाळा यायचा पण नंतर लक्षात आले की आपण जे काही शिकलो त्यावरच आपण उभे आहोत. आपल्या सांगितीक जीवनात सर्वच गुरुंचे खूप महत्वाचे योगदान आहे असे ते मानतात.
त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी अजून एक व्यक्ती म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंचा फ़ार मोठ पगडा राहुलजींवर होता. पुलं दरवर्षी राहुलजींचे गाणं ऎकायला यायचे. असेच एकदा पुलं आले असताना राहुलजी सगळ्या कुमार गंधर्वांच्या बंदिशी गायले. राहुलजींच्या घरात सगळेच कुमारभक्त होते. पण त्यावेळी राहुलजींची आई, पुलंना म्हणाली की हा कुमार काकांसारखा गातो यात आनंद आहे पण हा बाबांसारखा(वसंतरावांसारखा) गात नाही याची कुठेतरी खंत आहे. तेव्हा पुलं म्हणाले की आत्ता तो कुमारसारखा गातो आहे ना! आवाज फ़ुटू दे!
मग तो आपोआप वसंतासारखा गाईल. आणि झालं ही तसेच. आवाज फ़ुटल्यावर राहुलजींचा आवाज खूप आजोबांच्या जवळ गेला आणि मग ते जे काही गायचे तेव आजोबांसारखे ऎकू यायला लागले. नंतर सुरताल हया कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी वसंतरावाची गाणी बसवली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांनी आजोबांच्या गायकीचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना ते गाणं हळूहळू उलगडू लागले. अजूनही ते संपूर्णपणे उलगडलेले नाही असे त्यांना वाटते. कॉलेजमध्ये असताना CA foundation पास झाल्यावर आर्टिकल्स सुरु असताना ते पुलंना भेटायला गेले. पुलंची तब्येत त्यावेळी बरीच खालावली होती. पुलंनी जवळ बोलावून विचारले की तू असा बारीक का झाला आहेस? तेव्हा राहुलजींनी सांगितले की कॉलेज, क्लास आणि रियाझ या सगळ्या गोष्टी सांभाळताना खूप दगदग होते. तेव्हा पुलंनी विचारले की तू स्टेशनपासून घरापर्यंत जातोस तेव्हा तुला डॉक्टर्स, आर्किटेक्टस, इंजिनीयर अशा खूप पाट्या दिसत असतील पण गायक अशी पाटी दिसते का? नाही ना? मग तुला अशी पाटी लावायची आहे. त्यामुळे तू गाण्याकडे लक्ष दे.
मग राहुलजींनी घरच्यांशी सल्लामसलत केली आणि पूर्णवेळ गाण्यासाठी द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. रियाज हा अतिशय महत्वाचा आहे असे ते मानतात. गाणं ही एक-दोन वर्षात येणारी कला नाही. त्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागतात. पण जसेजसे तुम्ही रियाज करत जाता तसे रियाजच तुम्हाला फ़ळ देतो. सुरुवातीच्या काळात ठराविक वेळ रियाज झाला नाही तर जेवायचे नाही असे बंधन त्यांनी घालून घेतले होते. आजही त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून वेळ काढून ते ठराविक वेळ रियाजासाठी देतात. सुरुवातीच्या काळात ते जेव्हा कुमारजींच्या बंदिशी, भजनं सादर करायचे त्यावेळी नागपूरला त्यांचा कार्यक्रम झाला होता. तिथेही त्यांनी कुमारजींच्या बंदिशी आणि भजनम सादर केली आणि दुसर~या दिवशी पेपरमधे बातम्या आल्या की नातू वसंतरावांचा पण गायकी कुमारांची. त्यावेळी थोडे वाईट वाटले असे त्यांनी सांगितले. पण आता ते वसंतरावांची गायकी लोकांपर्यंत पोहचवत आहेत याचा त्यांना अभिमान आहे. वसंतरावांची गायकी लोकांना आवडते आणि ती त्यांच्यामार्फ़त लोकांपर्यंत पोहचते आहे.
गेली अनेक वर्षे ते वसंतोत्सव हया कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यांचे वडील दरवर्षी वसंतरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रम करायचे. वसंतरावांवर प्रेम करणारे कुमार गंधर्व, भीमसेन, वीणाताई, अभिषेकी असे अनेक कलाकार त्यात गाऊन गेले होते. २५ वर्षे झाल्यावर वडीलांनी सांगितले की मी आता निवृत्त होत आहे. यापुढे तू तुला पाहिजे त्या पध्दतीने कार्यक्रम कर. वसंतरावांचे जसे व्यक्तिमत्व होते त्याला साजेसाच कार्यक्रम व्हावा असे राहुलजींना वाटत होते. नाना पाटेकर आणि वसंतरावांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राहुलजी पाटेकरांना भेटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याचा प्रस्ताव पाटेकरांनी लगेच स्वीकारला आणि कायम पाठीशी उभे राहिले. मा. वसंतराव देशपांडे गझल गायचे चित्रपटातही गाणी त्यांनी गायली आहेत. शास्त्रीय,ठुमरी, नाट्यसंगीत तर ते गायचेच पण लावणीही उत्तम सादर करायचे. पाश्चात्य आणि दक्षिण भारतीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. ते नृत्य शिकले होते. उत्तम अदा करायचे. त्यामुळे राहुलजींनी ठरविले की अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ़क्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम न करता सर्व प्रकारचे संगीत समाविष्ट असलेला कार्यक्रम करावा, त्यामुळे या उत्सवात गझल, फ़्युजन, शास्त्रीय संगीत, जुगलबंदी, लोकसंगीत, सूफ़ी संगीत असे विविध प्रकार लोकांना ऎकायला मिळाले.
युवावर्ग मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाकडॆ आकर्षिला गेला. आजोबांसारखेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले राहुलजी समर्थपणे गेली काही वर्षे हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. कट्यार काळजात घुसली आणि संशयकल्लोळ ही नाटके राहुलजींनी पुन्हा रंगमंचावर आणली. त्याविषयी सांगताना ते म्हणतात की लहान असताना कट्यार मधे छोट्या सदाशिवाचे काम त्यांनी केले होते. पण नंतर नाटकात काम करावे असे कधी वाटले नाही. वसंतोत्सवाच्या निमित्ताने पत्रकार परिषद चालू होती. तेव्हा एका पत्रकाराने विचारले की वसंतरावांनी संगीत नाटकांसाठी एव्हढे मोठे योगदान दिले तर तुम्ही संगीत रंगभूमीसाठी काय करणार? तर राहुलजी म्हणाले की मी दरवर्षी एक नाटक करीन. मग त्यावर विचार सुरु झाला आणि ’कट्यार काळजात घुसली’ करुन पहावे असे ठरले. सुरुवातीला हे आव्हान पेलू शकू की नाही अशी धास्ती होती. पण सगळयांनी प्रोत्साहन दिले आणि तालमींना सुरुवात झाली. सुबोध भावेंनी हे नाटक दिग्दर्शित केले. त्यांनी सल्ला दिला की मुस्लिम व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तू मशिदीत जाऊन बस आणि निरिक्षण कर. त्याप्रमाणे राहुलजींनी केले आणि त्यामुळे मी ती भूमिका प्रामाणिकपणे करु शकलो असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते नाटक ही एक नशा आहे.त्यामुळेच कट्यार नंतर तिथेच न थांबता त्यांनी संशयकल्लोळ करायला घेतलं. त्यावेळी मात्र अनेकांनी हे नाटक करु नकोस असा सल्ला दिला कारण संशयकल्लोळ हे खूप यशस्वी नाटक आधीही नव्हते. पण संशयकल्लोळ यशस्वी ठरले. त्यातील राहुलजींची भूमिकाही रसिकांना खूप आवडली जेष्ठ नागरिकांप्रमाणे युवा पीढीही ह्या नाटकाकडे आकृष्ट झाली.
त्यानंतर आला बालगंधर्व सिनेमा. या सिनेमासाठी रवी जाधवांनी राहुलजींना भूमिका करण्याविषयी विचारले. नाटक आणि सिनेमाचे तंत्र वेगळे असते आणि या चित्रपटात नाट्यगीत चित्रीत करायचे होते. पण सारेगमपच्या चित्रीकरणाचा अनुभव होता आणि त्यामुळे पेशन्स वाढला होता. त्याचा या चित्रपटाच्यावेळी फ़ायदा झाला.या चित्रपटासाठी स्टुडिओमध्ये १०-१५ मिनिटांचे गाणे चित्रीत झाले आणि नंतर एडिट करुन ते तीन मिनिटांवर आणले गेले.सारेगमपच्या वेळी काम करतानाही खूप मजा आली असे ते म्हणतात.
सतत नवीन प्रयोग करत रहाणे हा राहुल देशपांडे यांचा स्थायीभाव आहे.कुठलीही गोष्ट करताना खूप मेहनत घेऊन, अभ्यासपूर्वक करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनी आत्तापर्यंत केलेले विविध प्रयोग पाहिले की जाणवतो.सध्या संगीताचे तंत्र खूपच बदलले आहे. त्यामुळे पठडीबाज शिक्षणाबरोबरच थोडेसे वेगळे प्रयोग आवश्यक आहेत असे त्यांना वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार बनू शकत नाही. तशी गरजही नाही. चांगला कलाकार चांगला समीक्षक असेलच असे नाही तसेच चांगला समीक्षक चांगला कलाकार असेलच असे नाही.
संगीतशिक्षणातून चांगले कलाकार, समीक्षक, संगीतकार तसेच चांगले जाणकार रसिक श्रोतेही निर्माण झाले पाहिजेत. केवळ गाणे आवडते म्हणून ऎकण्यापेक्षा त्याचे शास्त्र माहित झाले की ऎकण्यातली मजा अजून वाढते. राहुल देशपांडे यांनी भारतातल्या जवळजवळ सर्व नावाजलेल्या संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच परदेशातील रसिकांची ही वाहवा मिळवलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार आणि सुधीर फ़डके पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सामान्यतः ज्या वयात कारकीर्दीला सुरुवात होते त्या वयात राहुल देशपांडे यांनी खूप यश मिळविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विराट गर्जना.कॉम
कविता कृष्णमूर्ती हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, उडत्या चालीची हिंदी गाणी ही गातात.
कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला. त्या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. एल. सुब्रमण्यम हे व्हायोलिनवादक आहेत. संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला.
कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम'मधले 'निम्बोडा निम्बोडा' हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते. त्यांनी पतीची 'फ्यूजन म्युझिक'ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमांत त्या त्यांना साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत आणि व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या, संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या. कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. बँड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय ताल वाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत अस्तात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
नाटकाचे वेड असलेल्या, महाराष्ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्याचे खडतर काम सुधीर नांदगावकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतातही फिल्म सोसायटीची चळवळ पसरवली. सुधीर नांदगावकर यांचा प्रवास छापील माध्य्माकडून दृकश्राव्य माध्यमाकडे असा झालेला दिसतो.
साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. 'जहां आरा', 'फर्ज', 'उपकार', 'आया सावन झूम के', 'कारवां' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील मा.अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये मा.अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते.
अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना', 'गरम मसाला' आणि 'दो फूल' या सिनेमांमध्ये काम केले.
'थोड़ा रेशम लगता है', 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मैं शायर तो नहीं' हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती मा.अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. मा.अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.
साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti