(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • चतुरस्त्र तरुण – पराग सावंत

    आवड असली की सवड मिळते असं म्हणतात; मात्र आवड असली की शिक्षणही मिळतं हे आता पराग सावंतकडे पाहिल्यावर कळतं. बीएससी झाल्यावर इंटरनेटलाच आपला गुरू मानून नृत्य, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, एडिटिंग यांचं शिक्षण घेतलं.

    आवड म्हणून बाबांनी त्याला कॅमेरा आणून दिला. त्यावेळेस तो एका एशियन हार्ट कार्डिकमध्ये कंपनीत नुकताच कामाला लागलेला. बीएससी झाल्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला होताच; मात्र मनात कुठेतरी रुखरुख सुरू होती.

    कॅमेरा हातात आल्यावर इतर नवख्या फोटोग्राफर्ससारखं तोही मिळेल ते कॅप्चर करत जायचा. अर्थात ते सारं काही नवीन होतं. ऑटोमॅटिक मोडवर कॅमेरा ठेवून तो फोटो काढायचा. कधी कधी अगदी उत्कृष्ट फोटो यायचे. मित्रांची वाहवा मिळायची. त्यातून अधिक प्रेरणा मिळत गेली. त्यातून ओळखी वाढत गेल्या.

    तेव्हा एका फोटोग्राफर मित्राने एक लाख मोलाचा संदेश दिला, खरा फोटोग्राफर असशील तर कॅमेरा ऑटोमॅटिक मोडवरून काढ आणि मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात कर. तेव्हापासून त्याने मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात केली आणि तेव्हापासून फोटोग्राफीमधले अनेक बारकावे तो शिकला. फोटोग्राफीमधलं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यानं घेतलं नव्हतं; मात्र आवड म्हणूनच तो या क्षेत्रात वळला. खरं पाहायला गेलं तर तो एक उत्तम डान्सर आहे.

    महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. तेव्हा त्याचा नृत्याचा क्लासही होता. डान्स शिकवता शिकवता तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डान्स स्वत:ही यू-टय़ूबवर शिकत असे. कालांतराने त्याने क्लास बंद केला आणि एका एशियन हार्ट कार्डिक कंपनीत कामाला लागला. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला. त्याचं शिक्षण बीएससीचं, डान्सचं कौशल्य आणि फोटोग्राफीची आवड अशा त्रिकोणात तो जगतो.

    डान्स असो वा फोटोग्राफी, सारं काही तो अनुभव आणि इंटरनेट या दोन माध्यमांतून शिकला. कोणत्याही प्रकारचा क्लास नाही, की कोणाकडे मार्गदर्शन नाही. चालता बोलता स्वत:च्या निरीक्षणाने शिकेल तेवढंच त्याचं शिक्षण. मात्र आज त्याचे यू-टय़ूब आणि फेसबुकवर हजारो फॉलोअर्स आहेत.

    फोटोग्राफीची आवड जोपासता जोपासता त्याला व्हीडिओ तयार करण्याचंही वेड लागलं. तयार केलेल्या फोटोंचे सुंदर व्हीडिओ तो बनवू लागला. फोटोंना अधिकपणे खुलवू लागला. त्याचंही शिक्षण त्यानं इंटरनेटवरच घेतलं. सकाळी फोटोग्राफी झाली की, रात्री कामाला जायचा. मात्र नंतर नंतर त्याला फोटोग्राफीतच पूर्ण वेळ झोकून घ्यावं असं वाटलं. आयुष्यात रिस्क घ्यावी का, असा प्रश्न पडला.

    शेवटी त्याने ती रिस्क घेतली. आपल्या जॉबला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ व्हीडिओग्राफी, फोटोग्राफीकडे वळला. डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म तयार करू लागला. ओळखींच्याच्या लग्नात जाऊन तिथे व्हीडिओग्राफी केली. त्या व्हीडिओ एडिट करून त्याला योग्य दिग्दर्शन केलं. या लग्नाच्या व्हीडिओ तो यू-टय़ूबवर टाकतो. जवळपास लाखो व्ह्यूवर्स या व्हीडिओजना आहे.

    फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर या व्हीडिओ प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियामुळे मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असं तो अभिमानाने म्हणतो. त्याचसोबत या काळात योग्य मित्रांची संगत लाभली. कोणी सृजनशील तर कोणी कॅलिग्राफी करण्यात हुशार. यामुळे त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेलं.

    बाप्पाविषयी त्याचं एक वेगळं आकर्षण आहे. गेल्या तीन वर्षात गणेशोत्सवादरम्यान त्याने खूप व्हीडिओ आणि फोटो काढलेत. मुंबईत गाजणाऱ्या प्रत्येक सणांवर त्याची एक तरी व्हीडिओ यू-टय़ूबवर आहेच. या काळात त्याने अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. त्यात त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणीने गेल्यावर्षी स्पर्धा भरवली होती. त्यातही त्याने पहिला क्रमांक मिळवला.

    अनेक ऑनलाईन स्पर्धामध्येही तो पहिला राहिला आहे. २६/११ला झालेल्या हल्ल्याबाबत केलेल्या शॉर्टफिल्मलाही पारितोषिक मिळालं. कोणतंही शिक्षण नसताना, मार्गदर्शक नसताना केवळ स्वत:च्या आवडीच्या जोरावर आणि इंटरनेटच्या साहाय्याने त्याने एवढं यश मिळवलं आहे. पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगून असलेला पराग म्हणतो की, आता मला प्रोफेशनली सिनेमॅटोग्राफीकडे वळायचं आहे. स्वत:चा चित्रपट तयार करायचा आहे.

    -- स्नेहा कोलते

  • बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

    बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.

    विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला.

    समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले.

    'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

    साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कवी मनोहर ओक

    ‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबऱ्या’ प्रकाशित झाल्या आहेत. ओक यांच्या निधनानंतर त्यानंतर ३ वर्षांनी ज्येष्ठ कवी व समीक्षक चंद्रकांत पाटील आणि तुळसी परब यांनी ओक यांच्या कवितांचे संपादन करून ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ हा संग्रह तयार केला.

  • ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे

    माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.

  • आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर

    व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली.

  • डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता

    अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
    खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
    गालात हासून, ओठात बोलून...
    हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
    जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
    सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
    रांगत रांगत, हअम डौलात...
    गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
    फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
    कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
    झेप झेपावून, तोल सावरून...
    नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
    काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
    माझ्या जीवाचं, सुख दाटलं...

  • मोगली व ‘जंगलबुक’चा कर्ता रुडयार्ड किपलिंग

    वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही.

  • मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले

    बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म१७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

    शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.

    त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो. भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६ मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो. चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते. पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते. भास्करबुवा बखले यांचे ८ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

  • प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर

    केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.

  • गीतकार आणि शायर शकील बदायूँनी

    ‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.

    त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी). वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते.

    शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.

    शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याा उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे सलग तीन वर्षे (१९६१ ते ६३) फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मा.शकील बदायूँनी यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शकील बदायूँनी यांची काही गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=vAF6-xX5-MA

    https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w

    https://www.youtube.com/watch?v=q3k_pI8MSbM