अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.
विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली.
दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली.
सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.
‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे‘ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल‘चे रुपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स‘ या एकांकिकेचे अनुवादित रुप ‘खुर्च्या‘ या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चाकत्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत‘ असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग मूळ व/वा रुपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले.
‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं.
मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला.
गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत.
विजया मेहता यांनी ‘एन.सी.पी.ए‘ च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती पहाता, मराठी साहित्य कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळनिर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणाऱ्या ठणठणपाळाने त्यांचे ‘विजयोस्की मेहतोविच‘ असे नामकरण केले.
‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
तसेच
बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास.
विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे आणखी एक पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. बाईंची गॅंग या नावानं ओळखले जाणार्या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले.
जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले.
त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. त्यांनी ज्युली, घर घर की कहानी, थोडीशी बे वफाई, दिल आखीर दिल है,गांधी अशा चित्रपटातुन १९९० च्या दशकापर्यंत विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.
सई परांजपे यांनी सांगीतलेली मा.जलाल आगा यांची F.T.I मधील आठवण.
उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला.
जलाल आगा यांचे ५ मार्च १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता.... त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......
"जगणं विसरू नकोस...."
"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....
तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...
त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... १
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...
कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... २
तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...
काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ३
रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....
रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ४
तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....
ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ५
स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्. एम्. आय्. एस्.) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय ‘ला एडनजवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या एच्. एम्. आय्. एस्. ‘खैबर’ या फ्लीट माइन स्वीपरची अधिकारसूत्रे स्विकारली. दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे. २६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर नेमले जाणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. तसेच जून १९४७ मध्ये पहिले भारतीय अधिकारी म्हणून कॅप्टन या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. १९४९ मध्ये एच्. एम्. आय्. एस्. ‘जमुना’ या युद्धनौकेचे ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यानंतर ७ ऑक्टोबर १९५१ रोजी इंडियन नॅव्हल शिप खख (आय्. एन्. एस्) ‘दिल्ली’ या नौसेनेच्या त्यावेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशाखापटनम् येथील आय्. एन्. एस्. ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.
भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर-इन-चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर या पदावर पदोन्नती मिळाली. एप्रिल १९६० मध्ये त्यांची फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) या पदावर नियुक्ती करण्यात आली. फोसिफ झाल्यावर सोमणांनी सर्वप्रथम आय्. एन्. एस्. ‘म्हैसूर ‘चा कार्यभार सांभाळला. त्यामुळे ते फोसिफ म्हैसूर या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर पदोन्नती मिळून ते स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख झाले (५ जून १९६२). तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भारतीय नौसेनेला १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावता आली नाही. जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले.
सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले. सोमण यांचे निधन ८ फेब्रुवारी १९९५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : पित्रे शशिकान्त /मराठी विश्वकोश
राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या 'थर्ड अंपायर' या पुस्तकातून सारांशरूपाने!
बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ?
होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !!
याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने इराणी कप मुंबईच्या हातून कसा पळवला ते! एक मुंबईचा खेळाडू मला सांगत होता, "अरे, तो फलंदाजीला जातानाच बरोबर बेडिंग, कपडे, टूथब्रश वगैरे घेऊन गेलाय, असं वाटत होत. त्या सामन्यात लक्ष्मण अप्रतिम खेळला, पण द्रविडचं अस्तित्व हा त्या विजयाचा पाया, ढाचा, कळस वगैरे सर्व होतं. मी तेव्हा त्याला फोनवर म्हटलं होतं, "आईकडून दृष्ट काढून घे. आपल्याकडे क्रिकेटमध्ये दृष्ट फार लवकर लगते."
त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागून चालणार नव्हतं.
सचिन-राहुल हे भारतीय संघाचे श्वास होते. दोघेही एक-एक नाकपुडी! एक चोंदली तर दुसरी प्राणवायू पुरवते. एकेकाळी सचिन गेला कि श्वास कोंडायचा. द्रविड असला की श्वास कोंडणार नाही, असं वाटायचं. २००३ च्या विश्वकपात सचिन बल्ल्याने काव्य लिहून जायचा, पण शेवटी निबंध कोणीतरी लिहावा लागतो. ती जबाबदारी राहुल पूर्ण करायचा.
हे पद्य आणि गद्य हेच आपल्या क्रिकेटचं अभिजात साहित्य आहे. तेच दोघांनी प्रसवलं.
बरं, द्रविड पूर्वीप्रमाणे बसची वाट पाहावी तसा एखाद्या धावसंख्येवर पुढच्या धावेची वाट पाहात ताटकळत उभा राहात नाही. धाव ही कष्टाने मिळणारी बस नाही. ती वाट पाहात उभी असलेली कॅब आहे आणि तरीही त्याच्या फलंदाजीएवढी शाश्वती भारतीय संघात कुणाचीही देता येत नाही. द्युतात धर्मराजाने राहुलची विकेट लावली असती तर शकुनी हरला असता... धर्मराज नाही. त्याची फलंदाजी हा ट्रान्समध्ये जाण्याचा प्रकार आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असं त्याची आई सांगते. 'अभ्यासाला बस' असं राहुलला म्हणे कधी सांगावचं लागलं नाही. 'राहुल द्रविड स्क्वेअर कट मारतो तशी त्याच्या गालावर कधी मारायला लागलीय का?' माझ्या गालावरच्या जुना जखमा आठवून मी त्याच्या बाबांना विचारलं. ते म्हणाले, ''साधी रागावण्याची वेळसुद्धा त्याने कधी येऊ दिली नाही. तो क्रिकेट खेळायला लागल्यावर सुद्धा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. त्यामुळे क्लास मिळवायचा.'' बारावीत राहुलने त्याच्यासमोर असलेले अनेक शैक्षणिक पर्याय टाळून क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं. तिथंही 'क्लास' मिळवला. आपण कधीतरी अधून मधून द्रविड जास्त बचावात्मक झाला की वैतागायचो. त्याच्या आई-बाबांना काय वाटत असेल? ते म्हणाले, ''आम्ही वृत्तीने सर्वच शांत आहोत. राहुलचं शतक झालं की आनंद होतो, पण हुरळून जात नाही किंवा अपयश फार मनाला लावून घेत नाही. कधीतरी मी त्याला विचारतो 'त्यावेळी असा का शॉट खेळलास? असा खेळायला हवा होतास'. तो फक्त हसतो. पण मला माहीत असतं तो यशापयशाचा अभ्यास करतो. ही त्याची अभ्यासू वृत्ती लहानपणापासूनच पाहिलीय. आजही तो विवेकानंद वाचत असतो.''
काही दोन-चार क्रिकेटर्सचा अपवाद सोडला तर इतरांना विवेकानंदांच्या फोटोखेरीज त्यांच्या बद्दल इतर माहिती नसावी.
राहुलच्या पेशन्सची एक गोष्ट. राहुलच्या आईने सांगितलेली. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की लग्न हे साग्रसंगीत व्हावं. कारण त्याची मुंज साग्रसंगीत झाली होती. मुंजीत त्याला सोन्याचं जानवं सुद्धा घातलं होतं. पण राहुलचा आधी अशा विधींना विरोध होता. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तेवढं माझ्यासाठी ऐक. हे विधी चार दिवस चालले होते. पण राहुल या खेळपट्टीवरून देखील हलला नाही.
कळलं तुम्हाला त्याचा पेशन्स कुठून आला?
मी आयुष्यात स्वतःच्या लग्नाचा अल्बम सोडून फक्त राहुलच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहिलाय. एरवी लग्नाचा अल्बम म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. त्या अल्बममध्ये मात्र फोटोफोटोत मला राहुलच्या पेशन्सच्या खुणा दिसत होत्या. शेवटी मैदानावरही लग्नच असतं. ते धावांशी असतं. मुंडावळ्यांऐवजी पॅड्स, ग्लोव्हज असतात. उलट मैदानावरचे विधी पेशन्सची जास्तच परीक्षा घेतात.
द्वारकानाथ संजगिरी
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
यावर्षी सुब्रमण्यम यांनी चित्रपट सृष्टीतील पाच दशकांची कारकिर्द पूर्ण केली. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना SPB किंवा बालू असेही म्हणतात. चाळीस हजाराहून अधिक गाणी गायल्याबद्दल त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद आहे. त्यांना सहावेळा राष्ट्रीय पुरस्कारासह पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने ही सन्माबनित करण्यात आले आहे. १९६६ मध्ये त्यांनी गायक म्हणून पदार्पण केले. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्यासाठी मिळाला आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, उत्कृष्ट पुरुष गायकाचा सहा वेळा पुरस्कार आणि नंदी पुरस्कार मध्ये तेलगू सिनेमासाठी 25 वेळा मिळाला आहे. मेन प्यार किया, हम आपके हैं कौन, एक दूजे के लिए अशा चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे राजदूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
व्हायोलिन हे मूळचे भारतीय वाद्य नसले, तरी आज ते देशातील मैफलींच्या मध्यभागी विराजमान झाले आहे. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कलावंतांमध्ये प्रामुख्याने लालगुडी जयरामन यांचे नाव घेतले जाते. दाक्षिणात्य संत परंपरेतील महान संगीतकार त्यागराज यांच्या वंशात जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने घराण्याची परंपरा वेगळ्या उंचीवर नेली, त्याचबरोबर जगभरातील संगीत क्षेत्रात भारताचाही सन्मान वाढवला. व्ही. आर. गोपाल अय्यर या कर्नाटक संगीतातील दिग्गज कलावंताच्या पोटी जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनवादक म्हणून आपली संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली.
तीव्र आकलनशक्ती, अवतीभवतीचे संवेदनशीलतेने टिपण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी कर्नाटक संगीतातील बारकावे आत्मसात केले आणि स्वतःची शैली विकसित केली. प्रचंड मेहनत आणि संगीतावरील निष्ठेमुळे अल्पावधीत ते नामवंत व्हायोलिनवादक म्हणून नावारूपाला आले. व्हायोलिनच्या आत्म्याशी तादात्म्य पावून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त ठरणारे तंत्र निर्माण केले, जे 'लालगुडी वाणी' म्हणून ओळखले जाते. राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्याचे अद्भुत मिश्रण असलेल्या त्यांच्या संगीताने जगभर चाहतावर्ग निर्माण केला. काव्यात्म तरलतेने रसिकांसमोर येणारी वाद्यप्रतिभा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळेच नामवंत गायकांना साथ-संगतीसाठी लालगुडी जयरामनच हवे असत.
कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिन वादनाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे ते पहिले कलावंत होते. वीणा आणि बासरीशी व्हायोलिनला जोडण्याचा अलौकिक प्रयोग त्यांनी १९९६ मध्ये केला आणि त्याला विशेष दादही मिळाली. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम झाले. १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवात प्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेनूहिन हे लालगुडी यांच्या तंत्राने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपले इटालियन व्हायोलिन त्यांना सप्रेम भेट दिले. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांचा उल्लेख करावा लागेल. मा. लालगुडी जयरामन यांचे २२ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा
दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.
"आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.
१९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.
दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.
मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.
'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti