(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • लेखक,कवी वि.स.खांडेकर

    वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वि.स. खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता.

    श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्याप्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही वि.स. खांडेकर यांनी लिहिल्या.

    शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्यां तून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

    भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांंवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. वि.स.खांडेकर यांचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    वि.स. खांडेकर यांची ग्रंथसंपदा : हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्या . कालची स्वप्ने, नवा प्रात:काल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला,स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पकता इत्यादी लघुनिंबधसंग्रह. याशिवाय काही रुपकथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता,रंकाचे राज्य हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ.

  • अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक कर्तारसिंग दुग्गल

    अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

  • ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव जगन्नाथ परांजपे

    सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.

  • ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

    शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

  • ज्येष्ठ हार्मोनिअम वादक, गायक विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख

    उत्तम दर्जाचे हार्मोनिअम संगतकार म्हणूनही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल व भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना विठ्ठलरावांनी समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत.

  • जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

    बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला. पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक होते. पं.तुळशीदास बोरकर यांच्या घरापासून जवळच नवदुर्गेचं देऊळ होतं. त्या वेळी ते बरेचदा त्या देवळांमध्ये जाऊन बसत असत. भजन, कीर्तनावर तिथले हार्मोनियमवादक सुंदर साथ करत असत. पण त्या सुरांनी त्यांना आकर्षून घेतलं होतं. काही काळानंतर त्यांचे वडील अचानक वारल्याने गोव्याहून पुण्याला यावे लागले.

    पं.तुळशीदास बोरकर यांची मोठी बहीण, उत्तम कलागुण असलेली अभिनेत्री होती. त्यांना छोटा गंधर्वानी ‘कलाविकास’ मध्ये बोलावून घेतलं. ते त्यांच्या बरोबर तालमींना जात असत. कंपनीचे ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी विचारलं, ‘‘काय रे तुला हार्मोनियम शिकायची आहे का?’’ आणि त्यांनीच हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात त्यांचा नागपूरला दौरा होता. तिथे जबरदस्त थंडी होती. एक दिवस वष्ट गुरुजींनी पहाटे चार वाजता त्यांना उठवलं आणि म्हणाले, ‘‘चल शिकायला बस.’’ त्यांचीच लहानशी पेटी होती. त्यावर सात शुद्ध स्वर कसे वाजवायचे ते शिकवलं. तेव्हा सलग चार तास त्यांनी रियाज केला. मग नऊ वाजता म्हणाले, ‘‘ऊठ. चहा वगैरे घेऊन दहा वाजता परत ये.’’ त्यानंतर पुन्हा चार-पाच तास शिकायला बसले. म्हणजे त्या पहिल्याच दिवशी त्यांनी १२ ते १४ तास रियाज करून घेतला.

    काही वर्षानी ‘कलाविकास’ बंद पडली. या कंपनीचे पाच-सहा मालक होते. छोटा गंधर्व, केशवराव कुंटे, शंकर आपटे, हंसराज कोरडे, नागेश जोशी, दिगंबर भुमकर. त्यापैकी दोन-तीन जणांनी मिळून १९४९-५० दरम्यान ‘श्री.कलाविकास’ ही नवीन संस्था सुरू केली. त्यात छोटा गंधर्व आणि नागेश जोशी नव्हते. ‘देवमाणूस’ हे संगीत नाटक करायचं होतं. कुंटे यांनी या कंपनीसाठी गानू मास्तरांना ऑर्गनवादक म्हणून घेतलं.

    पंधरा दिवस झाले तरी त्यांच्या हातात ती गाणी बसेनात. मग कुंटे म्हणाले, ‘‘तुळशीदास तू ही गाणी ऐकलीयेस. बघ जरा, बस साथीला.’’ पं.तुळशीदास बोरकर म्हणाले ‘‘मला दोन्ही हातांनी वाजवता येत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘चालेल, एका हाताने वाजव.’’ ते एका हाताने ती गाणी वाजवली. त्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा मुलगा हे काम निभावू शकेल. मग त्यांनी ऑर्गनची बाजू पं.तुळशीदास बोरकर यांच्या वर ढकलली. या नाटकाच्या साथीसाठी २५ रुपये महिना पगार मिळाला होता. तेव्हापासून ते जो ऑर्गन वाजवू लागले तो कायमचा. त्यानंतर साधारण १९५२ साली छोटा गंधर्वानी पं.तुळशीदास बोरकर gov 'यांच्या कडून ‘संगीत सौभद्र’ची १२-१३ गाणी बसवून घेतली. गोपीनाथ सावकारांची संस्था होती. मग दर आठवडय़ाला ते पुण्याहून मुंबईला यायचे.

    पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा. छोटा गंधर्वानी त्यांना रागदारी संगीत शिकवले. पण छोटा गंधर्व नाटकात गायलेले असल्यामुळे शास्त्रीय संगीत जगतात त्यांचं फारसं नाव नव्हतं. वास्तविक पाहता छोटा गंधर्व हा अतिशय हुशार माणूस. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. पण शास्त्रीय संगीत गाणारी मंडळी संगीत नाटकातल्या गायक-नटांना दुय्यम मानत असत. त्यामुळे छोटा गंधर्वाचं शास्त्रीय संगीत गायक म्हणून फारसं नाव झालं नाही. त्या दरम्यानच त्यांना ‘मंदारमाला’ नाटकात ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. चाळीस रुपये बिदागी मिळत होती. तिथे पं. राम मराठेंचा त्यांना सहवास लाभला. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत या दोन्हींवर त्यांची हुकूमत होती. लोक त्यांना मानत होते. ते त्यांच्या गायकीचा अभ्यास करत होते आणि त्यांना गुरू मानू लागले.

    पुढे पं.तुळशीदास बोरकर यांनी पी. मधुकर (मधुकर पेडणेकर) यांच्या कडे शिक्षण घेतले. तसेच पं. एस. सी. आर भट, पं. के. जी. गिंडे यासारख्या अनेक मातब्बरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

    पं.तुळशीदास बोरकर मल्लिकार्जुनजी यांची आठवण सांगताना म्हणतात, १९७८-८०च्या दरम्यान मल्लिकार्जुन मन्सुरांचा सत्तरावा वाढदिवस पु. ल. देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली पाल्र्याच्या टिळक मंदिरात साजरा केला जाणार होता. त्या वेळी मल्लिकार्जुन मन्सुरांची हार्मोनियम मी टय़ून करून दिली होती. पु.ल. आणि मल्लिकार्जुनजी बेंगेरी आडनावाच्या गृहस्थांकडे गप्पा मारत बसले होते. तेवढय़ात मी आणि पन्नालाल घोष यांचे शिष्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर तिथे गेलो. पुलंनी मल्लिकार्जुनजींना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘अण्णा, मुंबईचे जे दोन-चार ऑर्गनवादक आहेत, त्यांच्यात या पोराचा हात मला आवडतो.’’ त्याबरोबर मल्लिकार्जुन लगेच म्हणाले, ‘‘अरे, मग आज याला साथीला बसू दे.’’ पण त्या कार्यक्रमासाठी बबनराव मांजरेकरांना आधीच बुक केलं होतं. त्यामुळे मी साथ करण्याचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत सगळे मातब्बर कलाकार बसले होते. प्रेक्षकांची तुफान गर्दी होती.

    पुलंच्या प्रास्ताविकाने छान माहोल तयार झाला आणि त्यानंतर मल्लिकार्जुनांचं गाणं होतं. मध्यांतरापर्यंत कार्यक्रम उत्तम झाला. पण बबनराव मांजरेकर डोंबिवलीला राहत असल्याने त्यांना दुस-या दिवशीच्या आकाशवाणी डय़ुटीसाठी लवकर निघावं लागणार होतं. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते थांबू शकत नव्हते. त्याबरोबर मल्लिकार्जुन मन्सुरांनी मला त्यांच्या साथीला बसायला सांगितलं. मला दरदरून घाम फुटला. लोकांकडेही बघायची माझी हिंमत नव्हती. पण मन्सुरांची आज्ञा होती. त्यामुळे मी साथीला बसलो आणि कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. तो संपल्यावर मन्सुरांना तबला साथ करणारे निझामुद्दिन खान मला म्हणाले, ‘वाह बोरकर!’ मला आनंद झाला. बेंगेरीसाहेबांनी मला बिदागी दिली. घरी येऊन देवासमोर ठेवल्यानंतर बघतो तर त्या लिफाफ्यात ५०० रुपये होते. त्या काळात ५०० रुपये बिदागी म्हणजे खूपच मोठी किंमत होती. तसंच एकदा किंग जॉर्ज शाळेत ‘मानापमान’चा प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या आधी ‘दे हाता या शरणागता’ या गाण्यातल्या अंत-याच्या ‘संपदा चपलचरणा’ या ओळीवर मी टाळी घेऊन दाखवेन, असं त्यांनी प्रयोगाच्या आधी सांगितलेलं. त्याप्रमाणे त्यांनी एक भलीमोठी हरकत घेतली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तीच हरकत मी हार्मोनियम वर जशीच्या तशी वाजवली आणि त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकातल्या संगतकाराला अशी टाळी मिळणं फार दुर्मीळ. असाच आणखी एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एकदा शोभा गुर्टूबरोबर मी लंडनला गेलो होतो.

    पाच-दहा प्रोग्रॅम्सचा दौरा होता. शेवटच्या कार्यक्रमाच्या वेळी पं. रविशंकर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी पं. रविशंकर यांना कार्यक्रमातल्या कलाकारांचा सन्मान करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘बेटे, अच्छी संगत करते हो, बहुत अच्छे!’’ ज्या रविशंकरांना कार्यक्रमां मध्ये खूप ठिकाणी ऐकलं. पण त्यांना जवळून बघता येईल का, असा मी विचार करत असे, त्या रविशंकरांनी मला आशीर्वाद दिल्यानंतर मी धन्य झालो. पं. तुळशीदास बोरकर यांनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पंडिता गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. पं.तुळसीदास बोरकर यांनी प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शन केले होते.

    पं. तुळशीदास बोरकर यांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’, ‘गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार’, ‘मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती गुणगौरव पुरस्कार’, गोवा सरकारच्या सांस्कृतिक कलासंचनालयाचा राज्य पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा ‘पं. रामभाऊ मराठे पुरस्कार’, ‘चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केल आहे. संवादिनी वादनाकरिता सन्मानित केले जाणारे ते पहिले आणि मराठी मातीतले म्हणूनही ते एकमेव वादक होते. पं.तुळशीदास बोरकर यांचे निधन २९ सप्टेंबर २०१८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे

    ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ रोजी मुंबई येथे झाला.

    एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्याव लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जात. मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म झाला. माहेरच्या त्या पुष्पा सरकार. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध होत्या. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती त्या मुळे पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या राहिल्या होत्या. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.

    संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पा भावे यांनी लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पा भावे यांनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून काम केले होते. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पा भावे सतत अग्रभागी असत.
    साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅुण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. त्यापैकी ‘अभिरूची:ग्रामीण आणि नागर’ (संपादक – गो. म. कुलकर्णी, ‘मराठी टीका’ (संपादक – वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ इ. ग्रंथांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. या शिवाय विविध ज्ञानविस्तार लेख सूचीचे संकलनही त्यांच्या नावावर आहे.

    ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचाही पुष्पा भावे यांनी मराठी अनुवाद केला आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर आधारस्तंभ राहिलेल्या पुष्पाताईंना समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना मराठवाडय़ातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात होते.

    पुष्पा भावे यांचे निधन ३ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • लोभस व्यक्तिमत्त्वाच्या कलाकार नलिनी जयवंत

    हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. लहानपणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच मा.वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. “राधिका’ या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत “अनोखा प्यार’मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती. नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला.

    हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर त्यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले “समाधी’, “सरगम”, “मिस्टर एक्सु’, “काफिला’, “मुकद्दर’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या “कालापानी’ या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. "कालापानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या उत्कृष्ट सहअभिनेत्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले. मा.नलिनी जयवंत यांच्याशी अशोक कुमार यांचे संबंध असल्याचे सांगण्यात येत असे. १९५० साली हे दोघे एका चित्रपटात काम करीत असताना या अफवांना अधिक ऊत आला होता. अर्थात मधुबाला यांच्याप्रमाणेच चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर या दोघांमधील अंतर वाढले. त्याच काळात त्यांच्या भूमिकांमुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

    शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!

    लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.

    पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता.

    संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे.

    कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

    तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा!

    थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

    मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.

    सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी गायक, संगीतकार राम फाटक

    मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला.

    शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.

    पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.

    १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले. रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.

    राम फाटक यांचे २६ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    राम फाटक यांचे संगीत असलेली काही गाणी
    अणुरेणिया थोकडा
    अंतरीच्या गूढ गर्भी
    अधिक देखणें तरी
    अबीर गुलाल उधळीत