आज २५ ऑक्टोबर.... नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांची पुण्यतिथी.
त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.
संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे पिताश्री तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते.
संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले.
तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले.
इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारती चे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ. शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.
चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.
कविता कृष्णमूर्ती हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, उडत्या चालीची हिंदी गाणी ही गातात.
कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला. त्या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. एल. सुब्रमण्यम हे व्हायोलिनवादक आहेत. संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला.
कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम'मधले 'निम्बोडा निम्बोडा' हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते. त्यांनी पतीची 'फ्यूजन म्युझिक'ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमांत त्या त्यांना साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत आणि व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या, संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या. कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. बँड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय ताल वाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत अस्तात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
हिंदुस्थानी संगीतातील 'किराणा' घराण्याचे गायक आणि पंडित भीमसेन जोशी यांचे पहिले शिष्य म्हणून माधव गुडी यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे हिंदुस्थानी संगीताची सेवा केली. त्यांना संगीत नृत्य अॅकॅडमीच्या पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ते ख्यातनाम संगीतकार म्हणूनही ते ओळखले जात. भारतात व परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार व मानसन्मानही त्यांनी मिळविले होते. किर्तनाची परंपरा असलेल्या घराण्यात गुडी यांचा जन्म झाला होता. अगदी लहानपणीच ते पं. बसवराज राजगुरू यांच्याकडे गायन शिकू लागले. त्यांच्या आवाजाचा आवाका लक्षात घेऊन पं. राजगुरू यांनीच त्यांना पं. भीमसेन जोशी यांच्याकडे सुपूर्द केले आणि तब्बल पंचवीस वर्षे गुडी यांनी पंडितजींकडे किराणा घराण्याची तालीम घेतली.
शास्त्रोक्त गायनाबरोबरच त्यांची भक्तिगीतेही अतिशय लोकप्रिय आहेत.‘कर्नाटक भीमसेन’ म्हणून माधव गुडी यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर असलेली त्यांची भक्ती हा भारतीय संगीत संस्कृतीमधील एक आदर्श म्हणावा असा अध्याय आहे. जगात फक्त भारतीय संगीतातच नवनवोन्मेषी प्रतिभेला प्रत्यक्ष सादरीकरणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कला सादर करत असताना जे सुचते, ते तिथेच व्यक्त करण्याची मुभा कोणत्याही कलावंतासाठी आव्हानात्मक असते. आपली प्रतिभा सतत जागती ठेवणे आणि तिला सतत वृद्धिंगत करणे हे भारतीय संगीतातील प्रत्येक कलावंताचे कर्तव्यच समजले जाते. त्यामुळेच या कलेच्या प्रांतात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. माधवराव गुडी यांनी आपल्या गुरुच्या चरणी आपले सारे सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे त्यांना संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. सततचे दौरे आणि मैफली यामुळे मैफली गवयांना शिष्य तयार करण्यास वेळ मिळत नाही. समोर बसवून तालीम घेण्याएवढी फुरसत मिळत नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या सहवासातून मिळवावे लागते.
गुडी यांनी भीमसेनजींचे शिष्यत्व पत्करल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. माधव गुडी यांनी भीमसेनी शैलीचा नीट अभ्यास करून ती आत्मसात केली आणि आपल्या गायकीवर भीमसेनी मोहोर उमटविण्यात यश मिळवले. भीमसेनजींनीच ‘शिष्योत्तम’ अशी पदवी देऊन गुडी यांचे कौतुक केले होते. भारतीय संगीतात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा संगीताच्या दोन समांतर परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांना देदीप्यमान असा इतिहास आहे. कर्नाटकात राहून तेथील कर्नाटक संगीत शैलीचे अनुकरण न करता उत्तर हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याची शैली आत्मसात करण्याच्या माधव गुडी यांच्या प्रयत्नांना सवाई गंधर्व, गंगुबाई हनगळ आणि भीमसेन जोशी यांची परंपरा होती. वडील कीर्तनकार असल्याने माधव गुडी यांच्यावर स्वरांचा संस्कार लहानपणीच झाला. भीमसेनजींकडे गायन शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीतील सारे बारकावे सूक्ष्मतेने टिपले आणि आपल्या गळ्यात उतरवले. पंडितजींबरोबर सारा देश हिंडणाऱ्या शिष्यांमध्ये माधवराव अग्रेसर होते.
कर्नाटक कला तिलक, गायन कला तिलक, गानभास्कर, अमृता प्रशस्ती, संगीत साधक, संगीत रत्न, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे अनेक पुरस्कार माधव गुडी यांना मिळाले. भारतातील अनेक संगीत परिषदांमधून त्यांचे सतत गायन झाले. माधव गुडी यांचे २२ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती.
निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्याप नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते.
बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.
ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.
सुरेश हळदणकर यांचा जन्म १८ डिसेंबरला झाला.
सुरेश हळदणकर यांचा जन्म गोमांतकातील. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत.पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘रघुराजा हा माझा विसावा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखखनि तू विमला’, ‘पद्मनाभा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली.
सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराजा हा माझा विसावा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखखनि तू विमला’
‘पद्मनाभा नारायणा’
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला. दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' (NIFW) अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला.
त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
Copyright © 2025 | Marathisrushti