(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

    “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.

  • सुलेखनकार अच्युत पालव

    पॅरिसमधील एका भव्य व्यावसायिक संकुलाची सजावटीत जगभरातील सात सुलेखनकाराच्या बरोबर अच्युत पालव यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून देवनागरी लिपीला पॅरिसमध्ये पोहोचवली आहे.

  • प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे

    साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले.

  • सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर

    सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्यात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत असत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले.

    मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले. १९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली.

    ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले. १९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले.

    तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखननिर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले. कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते.

    १९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टच्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले.

    चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली. १९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले.

    भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.शरद मेहेत्रे.

  • लेखक गोनीदां ऊर्फ गोपाल नीलकंठ दांडेकर

    गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.

  • विख्यात व्हायोलीन वादक व गायक पं गजाननबुवा जोशी

    विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला.

    ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे.

    हातचे राखून न ठेवता आपल्याकडचे सारे शिष्यांना देणाऱ्या गुरूंपैकी गजाननबुवा एक होते. संगीताचा विद्यार्थी म्हणूनच जगायचे, वावरायचे हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणूनच वावरले, जगले व शिकत राहिले. दौऱ्याहून परतल्यानंतर आपले अनुभव सांगतील म्हणून सगळे उत्सुक असायचे, पण बुवा खिशातून एखादा कागदाचा कपटा काढून त्यावर लिहून आणलेली बंदीश शिकविण्यात दंग होऊन जायचे. वाळूतून तेल निघेल एवढी मेहनत घेणाऱ्यांपैकी गजाननबुवा एक तालिया होते. स्वरांचा सच्चा असलेला हा माणूस व्हायोलिन केवळ वाजवतच नसे, तर त्यांचे व्हायोलिन गात असे. गाणे बोलायचे नाही तर ते गाण्याशी बोलायचे, असा हा आदळआपट न करणारा महान तालिया होता.

    गजाननबुवा जोशी यांचे २८ जून १९८७ निधन झाले. गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग इंटरनेटवर उपलब्ध आहे.

    http://www.gajananbuwajoshi.com

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • रमाबाई पंडिता

    रमाबाई पंडिता यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.

    रमाबाई पंडिता या स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी!

    परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत.

    रमाबाई पंडिता यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १५-१६ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
    मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून-विशेषतः आईकडून-संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.

    बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. परदेशातील वास्तव्यात त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या व त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक काऱ्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या.

    भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ ज्यू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले. ११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

    अशा या थोर विदुषीला १९१९ साली ‘कैसर-ए-हिंद’ सुवर्णपदक मिळाले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व काऱ्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवला होता.

    पंडिता रमाबाई यांचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे पंडिता रमाबाई यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • पत्रकार, संपादक अरुण टिकेकर

    स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले.

  • भारतीय जॅझ संगीताचे पितामह लुईस बँक्स

    `मिले सूर मेरा तुम्हारा…’ या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक ॲ‍रेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची.

  • कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव

    कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला.

    कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.

    कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.

    'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले. मा.मायदेव यांना आदरांजली.
    मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता

    गाई घरा आल्या

    गाई घरा आल्या । घणघण घंटानाद
    कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

    गाई घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
    घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

    गाई घरा आल्या । वासरे हंबरती ।।
    कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

    गाई घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
    काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

    गाई घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
    हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।

    गाई घरा आल्या । पाडसास हुंगीतात
    माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

    गाई घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
    राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

    गाई घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
    माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

    गाई घरा आल्या । दूधवाट राहियेली
    कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

    गाई घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
    आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

    गाई घरा आल्या । लावियेली सांजवात
    बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।

    गाई घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
    राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.