कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा.
अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.
मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.
पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही त्यांचा तजेलदार चेहरा, नीटनेटका पोशाख, मुख्य म्हणजे गळय़ातली टाय नजरेत भरते.
‘‘टेलिफोन बिझनेसमध्ये टाय लावायला शिकलो.’’ सव्वीसाव्या मजल्याच्या छोटेखानी टेरेसवर फोटोशूटसाठी संपूर्ण सहकार्य करत दीपक कुलकर्णी क्षणार्धात गप्पांच्या मूडमध्ये शिरतात. ‘‘टेलिफोन पुसत असताना ओळखी होत गेल्या. ‘ब्ल्यू डायमंड’चे पी. एल. किलरेस्कर म्हणाले, ‘तू ताजला का नाही जात? मी चिठ्ठी देतो, तुझं काम होईल.’ मी गेलो. हातात किलरेस्करांची चिठ्ठी. अंगावरचा वेश गबाळा. हाफ बुश शर्ट, बिनइस्त्रीची बेलबॉटम, पायात स्लीपर्स. दरवाजातच अडवलं. गुरख्यासाठी पेहेरावाचं इम्प्रेशन अधिक महत्त्वाचं होतं. पुन्हा किलरेस्करांसमोर उभा राहिलो. त्यांनी तिथल्या तिथे शंभर रुपये काढून दिले. म्हणाले, ‘आजपासून स्वच्छ इस्त्रीची पॅण्ट. फुल शर्ट, पायांत बूट, चप्पल विसरायची आणि टाय वापरायची. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखा वेश हवा. कुणी अडवणार नाही.’१९७१-७२ ची ही गोष्ट असावी. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून आजतागायत टाय लावला आहे. मधल्या काळात काढला होता. १९८० साली बिल्डर झालो, तेव्हा पांढरा सफारी चढवला. टिपिकल बिल्डरचा ड्रेस. गळय़ात गोफ एकदम झकपक. सलमान खानच आम्ही जणू. मग माझ्या लक्षात आलं, आपण लोकांपासून दूर जातोय. नाइलाज म्हणून लोक येतायत, धंदा होतोय, पण लोकांना आपलेपणा वाटत नाहीय. पुन्हा जुन्या पेहेरावावर आलो.’’
आज कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दीपक कुलकर्णी यांनी सुरुवात कशी व कुठून केली? त्यांचा पहिला बिझनेस कोणता? कुलकर्णी तपशीलवार सांगू लागतात.
‘‘वडील पोलिस खात्यात. आई शिक्षिका.
आई बिचारी दिवसभर कष्ट करायची. आम्ही तीन भाऊ, आमची एक बहीण. आमची आई सकाळी निघायची, आमचा पूर्ण स्वयंपाक करून. शिकवण्या, शाळा, पुन्हा शिकवण्या. घरी येताना बेतलेले कपडे घेऊन यायची. आमच्याकडे हप्त्यावर घेतलेलं शिलाई मशीन होतं. बेतलेले कपडे म्हणजे लहान मुलांच्या चड्डय़ाबिड्डय़ा. त्या शिवून दिल्या की, डझनाला सहा आणे मिळत. तिचा दिवस कष्टात निघून जायचा. आम्ही म्युनिसिपल शाळेत. पंचवीस नंबरची शाळा. आमचं घर म्हणजे जेमतेम दीड खोली. शाळा सकाळ-दुपार शिफ्टमध्ये, उरलेला वेळ मित्रांसोबत.
माझ्या मित्रांच्या वडिलांचे छोटे-मोठे व्यवसाय होते. एकाची चन्यामन्या फुटाण्याची गाडी होती. दुसरा सुगंधी सुपाऱ्यांच्या पुडय़ा भरत असे. मग मी एकासोबत चन्यामन्याची गाडी लावायचो, शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेसमोर आणि दुस-याला सुपारीची परात भरायला मदत करायचो. माझ्या दोन्ही मित्रांचे वडील महिन्याला दोन-तीन रुपये देत.
अशा प्रकारे मला दरमहा पाच ते सहा रुपये मिळू लागले. दिवाळीत आमचे वडील आम्हा चार भावंडांना मिळून पाच रुपयांचे फटाके आणत. आम्ही त्याची वाटणी करत असू. मग मी म्हणायचो, ‘दादा, माझेपण सात रुपये आहेत. पाच रुपयांचे तुम्ही फटाके आणा. सात रुपयांची आपण घरासाठी एखादी छान वस्तू आणू.’ तो आनंद वेगळा होता.’’
सोळाशे कोटींचं साम्राज्य असणाऱ्या दीपक कुलकर्णीच्या डोळय़ांत सात अधिक पाच रुपयांचा ‘तो’ आनंद चमकून जातो.
‘‘मी पेपर टाकण्याची लाइन निवडली. ही माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची
नोकरी. पाच किंवा दहा रुपये महिन्यावर (आता नक्की आठवत नाही) मी पेपरवाला पोऱ्या झालो. १९५८-५९ सालची गोष्ट सांगतोय मी. एकदा कधी तरी मी साडेपाचऐवजी सव्वासहाला पोहोचलो. मालकाने खाडक्न माझ्या मुस्काटीत मारली. ‘ही काय यायची वेळ झाली? माझं गिऱ्हाईक गेलं.’ त्या दिवशी माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली. मुस्काटीत खाल्ली. अपमान झाला. माझी स्वत:ची पेपर लाइन काढली. तो माझा पहिला व्यवसाय.
होलसेलवर पेपर घ्यायचो, कमिशन मिळायचं. पूर्वी अकरावी (मॅट्रिक) चा रिझल्ट पेपरमध्ये छापण्याची पद्धत होती. मॅट्रिकचा रिझल्ट सायकलला बांधला. कॅम्पात जाऊन एक आरोळी ठोकली की, दहा मिनिटांत चटणीसारखे पेपर संपायचे. चार आण्याचा अंक बारा आण्याला विकला जात असे. त्या दिवशी ‘प्रीमिअम’ काय असतं, ते लक्षात येत असे. आम्ही त्या दिवसाची वाट बघत असू.
एका वर्षी पायजम्याच्या दोन्ही खिशात मिळून ऐंशी रुपये होते. सगळी चिल्लर, मी दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. त्यापुढे आजचे आठ की सोळा की बत्तीसशे कोटी रुपये फिक्के आहेत.’’
दीपक कुलकर्णी थांबतात. आज मागे वळून पाहताना, व्यवसायात मिळालेला टर्निग पॉइंट त्यांना नेमका कोणता वाटतो? ठराविक एखादा प्रसंग किंवा घटना, ज्यामुळे त्यांचा
भविष्यातला मार्ग सुकर झाला.
‘‘ एम. एस. कॉलेजला प्री-डिग्री (किंवा एफवाय)ला असताना आम्हा विद्यार्थ्यांना सुट्टीत दीड-दोन महिन्यांकरिता एखाद्या कारखान्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंगला पाठवत. मला ‘किलरेस्करऑइल इंजीन’मध्ये पाठवण्यात आलं. तळमजल्यावर त्यांचं टेलिफोन एक्सचेंज होतं. मोठे लाकडी बोर्ड, जाड सुतळीच्या वायर्स, कानाला भलेमोठे ‘इअरफोन्स.’ सोनपट्टी नावाचे इन्चार्ज होते. म्हटलं, ‘मला शिकवाल का?’ पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्या तोंडाजवळ (इअरफोनसकट) माईक धरला आणि मी तोंड वळवत हाताने तो ढकलून दिला. त्याला डेटॉलचा उग्र वास येत होता. दर तीन मिनिटाला ऑपरेटर बदलला जात असे आणि टेलिफोन पुसून आत डेटॉलचा बोळा ठेवण्यात येई. माझ्या मनात विचार आला की, डेटॉलऐवजी यात अत्तराचा बोळा ठेवला तर?
माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं. मैत्रीण म्हणजे जिच्यावर मी प्रेम केलं आणि विसाव्या वर्षी जिच्याशी लग्न केलं ती, माझी मैत्रीण- (पत्नी) ज्योती. तिने माझी कल्पना उचलून धरली. एफवायला आमचं प्रेम जमलं. तिची आर्थिक परिस्थिती बिकट.आम्ही गुपचूप लग्न केलं. मी माझ्या घरी परत आलो आणि ती नारायण बागेतल्या महिलाश्रमाच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मी सेकंड इअर बीकॉमला. मला नोकरी नाही. पेपरची लाइन टाकणं हा काही बिझनेस होऊ शकत नव्हता. मी कोणत्या तोंडाने आई-वडिलांना सांगणार होतो? त्यातून माझ्या मोठय़ा भावाचं आणि मुख्य म्हणजे मोठय़ा बहिणीचं लग्न व्हायचं होतं.
टेलिफोनची आयडिया मी माझ्या पत्नीला सांगितली आणि आज इतक्या वर्षानी मी उघडपणे सांगू शकतो की, तिने ती आयडिया डेव्हलप करून पूर्णत्वाला नेली. भांडवलाची आवश्यकता होती. ६५ ते ७० रुपये आणायचे कुठून? तिच्या वडिलांनी तिला कानातले इअरिंग्ज दिले होते, तिच्यापाशी ट्रान्सिस्टर होता.
तिने दोन्ही गोष्टी विकल्या. ७२ रुपये मिळाले. ते आमचं पहिलं भांडवल. आमचा पहिला बिझनेस सुरू झाला. ‘टेलिफोन क्लिनिंग सव्र्हिस’- ‘टेलिस्मेल.’ तो कमालीचा क्लिक झाला. पुण्यात एकमेव ‘टेल्को’ वगळता बाकी सर्व इंडस्ट्रीत आम्ही जात होतो. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडली, तर सगळय़ा बँकांच्या शाखांचे टेलिफोन आम्ही पुसत होतो.
अत्तराचा वास, सात दिवस टिकत असे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून चार वेळा एक फोन पुसायचे आम्हाला तीन रुपये मिळत. फोन जास्त असतील, तर दोन ते अडीच रुपये. दिवसाला दीडशे फोन आम्ही दोघं मिळून सहज पुसत असू. आमचा टर्नओव्हर होता दिवसाला सरासरी पंच्याहत्तर ते शंभर रुपये . महिन्याला सरासरी दोन हजार रुपये. दोन हजारांत नेट प्रॉफिट होता बाराशे ते चौदाशे रुपयांचा.
मी १९७० सालातली गोष्ट सांगतोय. बँकेचा मॅनेजरदेखील तेव्हा दरमहा हजार-अकराशे रुपये कमावत होता आणि मी बीकॉमच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी. बाराशे रुपये कमावत होतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे झोपही छान लागत होती.’’
बिल्डर व्यवसायात शिरण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण झाली?
‘‘गरजेपोटी मार्ग सापडत जातात. मला ऑफिस हवं होतं. स्वस्तात कुणी टेबलस्पेस देईल का, या शोधात होतो. अलका टॉकीजशेजारी एका ऑफिसमध्ये टेलिफोन पुसायला जात होतो. त्या मालकाला विचारलं- तो म्हणाला, ‘जागेला रंगबिंग लाव, इंटिरिअर कर. मग तू बस.’ इंटिरिअर डिझायनरचे पैसे परवडेनात. मग मीच रंगाचं कॉण्ट्रॅक्ट घेतलं. ६६ रुपयांत काम झालं. कॉण्ट्रॅक्टरने स्क्वेअर फूटच्या हिशेबाने घेतले असते १०० रुपये. जवळपास चाळीस टक्के फायदा. मी या धंद्यात शिरलो. ‘पेंट ऑल’ ही माझी कंपनी होती. एकदा किलरेस्करांचा बंगला रंगवताना डोक्यावरचं छप्पर गळायला लागलं. (फॉल्स सीलिंग) त्यांचे इंजिनीअर वगैरे आले. मला म्हणाले, ‘दहा दिवसांनी या, आधी सीलिंग नीट होऊ दे.’ म्हटलं, भविष्यात आपण वॉटर प्रुफिंग करून द्यायचं. अनेक ठिकाणी रंगाऱ्यासह ठरलेल्या तारखेला उपस्थित राहिलो की, फ्लॅटमालक सांगणार, ‘पुढल्या आठवडय़ात या.
अजून फर्निचर व्हायचंय.’ रंगाऱ्यांची मजुरी घरबसल्या अंगावर पडू लागली. मनाशी ठरवलं, आपणच फर्निचर करायचं. वॉटर प्रुफिंग, प्लम्बिंग, जुनी फरशी बदलून देणं (फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी मी करू लागलो. १९७३ ते १९८० घरातला कोपरा न् कोपरा दुरुस्त करू लागलो, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, लोकांनी बिघडवलेलं घर दुरुस्त करण्यात आपली ताकद घालवतोय. त्याऐवजी स्वत:च घर बांधू लागलो तर? आणि ८० साली मी बिल्डर झालो. ‘अर्बन लॅण्ड सीलिंग’ होतं.
३३०, रास्ता पेठ. मी विकत घेतलेला पहिला वाडा आजही माझ्या डोळय़ांसमोर आहे.’’ बोलता बोलता दीपक कुलकर्णी थांबतात. त्यांना पुढच्या अडीच तासांत कफ परेडहून पुणे गाठण्याची घाई असते. ‘‘एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नाही आलात, तर मी पंक्तीला बसणार नाही.’ ही माझी कमाई आहे. फ्लॅटहोल्डर्स मला ‘आपले’ वाटतात. त्यांच्या घरी जातो, बसतो, कांदे-पोहे खातो. एरवी बिल्डर आणि फ्लॅटहोल्डर्स यांचा काडीचा संबंध उरत नाही, म्हणूनच आजच्या मंदीचा आमच्याशी काही संबंध नाही.
आमचा अलिखित नियम आहे- ‘इन्व्हेस्टर्स- ब्रोकर्स नॉट अलाऊड.’ ब्रोकर्सना आम्ही फ्लॅट विकत नाही. बिझनेसच्या चौकटीबाहेर खूप गोष्टी करायच्या आहेत. मला लेखन करायचंय, मला (ओल्ड) महाबळेश्वरला जाऊन लेखन करायला आवडतं. चालणं हा माझा छंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माझी भक्ती आहे. विज्ञानावर निष्ठा आहे.
अगदी माझा पहिला खरेदी केलेला रास्ता पेठेतला वाडा, अपशकुनी म्हणून इतर बिल्डर्स नाकारत होते, मी घेतला तोही विज्ञानाच्या निष्ठेपोटी. दोन इच्छा प्रबळ आहेत. अमेरिकेतलं ‘मॅन हॅटन’ म्हणजे आम्हा बिल्डर लोकांची काशी, पंढरी. तिथे दीडशे मजल्यांची बिल्डिंग बांधायची आहे. ऑलरेडी न्यू जर्सीपर्यंत पोहोचलोय आणि दुसरी इच्छा म्हणजे मला पेढी काढायचीय- ‘दीपक सखाराम आणि मंडळी, सोन्या-चांदीचे व्यापारी’ अशी बाहेर पाटी हवी. मला छान तलम धोतर नेसायचंय, जुन्या काळातला डगला शर्ट घालायचाय, डोक्यावर टोपी घालून पेढीवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचंय.’’ क्षणभर पॉझ घेतात, डोळे मिचकावून मिश्कीलपणे म्हणतात, ‘‘आणि सध्या मी पुण्याला निघालोय. शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाला, नाही तर त्याला वाईट वाटेल.’’ सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक, चालक, सर्वेसर्वा एका शेतकऱ्याचं मन राखण्याकरिता म्हणून पुण्याच्या वाटेने भरधाव सुटला. हीच ओळख कायम राहावी याकरिता कायम झटत असतात आणि घरापेक्षा घरपण राखलं जावं म्हणून जिवापाड मेहनत करतात पुण्याचे दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.
हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.
मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांनी पुढे स्वतःच्या लेखनकौशल्यावर , स्वतःच्या प्रतिभेवर रेडिओसाठी कार्यक्रम लिहावयास सुरवात केली. तिथे यशवंत देव , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली. रेडिओवर त्यांची ‘ मास गीत ‘ ह्या कार्यक्रमात गाणे लागे . ‘ मास गीत ‘ म्हणजे एकच गाणे महिनाभर दर रविवारी लागायचे. त्यावेळी त्यांची तेथे खूप गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आकाशवाणीवर प्रसारितही झाली. त्यावेळी कॅसेट्स नसायच्या किंवा आजच्यासारख्या डी.व्ही.डी. ही नसायच्या . त्यावेळी रेकॉर्ड्स असायच्या , ध्वनिमुद्रिका असायच्या. त्यांच्या खूप खूप ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड झाल्या.
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.
१९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले.
ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला.
आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं.
त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे.
ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.
वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.
गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.
याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.
ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.
केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.
केशवराव भोळ्यांचे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो. बा.र. देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली.
केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.
बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे डोळसपणे तालीम घेतली.
गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.
ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.
लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली.
रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.
ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली.
मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते. ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग. रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.
ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग. रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत.
त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग. रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.
ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते.
खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.
ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.
ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.
पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ नावाचा कार्यक्रम आयोजित करते. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ वंदना खांडेकर
आज १३ ऑक्टोबर
आज लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत 'वैनुडी वैनुडी' करत कुहूची भूमिका करणारी अभिनेत्री व कवीयीत्री स्पृहा जोशीचा वाढदिवस.
जन्म १३ ऑक्टोबर १९८९
बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा ‘बालश्री २००३’ पुरस्कारही मिळाला होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने ‘मोरया’, ‘मायबाप’, 'बायोस्कोप' आणि 'पेईंग घोस्ट' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. आपल्या समूहातर्फे स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भः लोकसत्ता
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या् डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २०रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.
त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवल कोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. १९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला.
दत्ता डावजेकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.
दत्ता डावजेकर यांची काही गाणी
आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी
कुणि बाई, गुणगुणले, गीत माझिया ह्रुदयी ठसले
गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला
अंगणी गुलमोहर फुलला
गोमू माहेरला जाते हो नाखवा
या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट
बाई माझी करंगळी मोडली
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत.
स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. वडील खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत.
१९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले. साने गुरुजींचे 'श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले, ते १९३५ साली. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई’ या पुस्तकातून केले आहे. श्यामची आई` हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्यामच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले. 'श्यामची आई` ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्याग अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ`च होते.
स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे,` असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या सार्याेच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र` असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. साने गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti