गिरीश कर्नाड म्हटलं की 'तुघलक' आणि 'हयवदन' ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. कर्नाड कुटुंबिय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली.
गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्. एल्. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे. कर्नाड यांची १९६१ नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.
कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते. गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गिरीश कर्नाड यांनी १९७४-७५ मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषिवले आहे. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.
गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. 'युनेस्कोअ' तर्फे जागतिक रंगभूमीच्याश राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चितामण गणेश कर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे मध्ये तर उच्चशिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठात त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश प्रकल्पात ते काम करू लागले. डॉ. केतकरांसारख्या चतुरस्र, विद्वान, बुद्धिवंतांच्या सहवासात कोश संपादनाचे पहिले धडे कर्वे यांनी गिरविले आणि त्यांनी ज्ञानकोशाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले. सर्व समावेशक दृष्टी ठेवून अनाग्रही विचाराने तसेच काळाप्रमाणे वृद्धिगत होत जाणाऱ्या ज्ञानाच्या कक्षांचा विचार करून कोशकार्य करायचे असते ह्या डॉ. केतकरांच्या विचारातले मर्म लक्षात घेऊन कर्वे यांनी ज्ञानकोशाच्या कामाचा भार उचलला.
ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर आपल्या काही सहकार्यांसह त्यांनी महाराष्ट्र शब्दकोश १ ते ७ खंड याचीही निर्मिती केली. तसेच महाराष्ट्र वाकसंप्रदाय कोश भाग १ व २ आणि शास्त्रीय परिभाषा कोश इ. महत्त्वाचे कोशग्रंथ प्रसिद्ध केले. यातील ‘शब्दकोश’ हा मराठी भाषेत तयार केलेला पहिला सर्वसमावेशक, व्यापक स्वरूपाचा कोश आहे. या कोशासाठी त्यांनी मराठी भाषा ज्या ज्या प्रांतात बोलली जाते म्हणजेच वर्हाडी, बागलाणी, खानदेशी, कोकणी त्या त्या बोलीभाषेतील शब्दसंग्रह आवर्जून गोळा केले. या शब्दकोशाच्या रूपानी भाषाभिवृद्धींचे संस्मरणीय आणि चिरस्थायी स्वरूपाचे मोठे काम करून ठेवले आहे. कर्वे यांनी काही कोश स्वतंत्रपणे संपादित केले. त्यात सुलभ विश्वकोश भाग १ ते ६, संयुत्त* महाराष्ट* ज्ञानकोश खंड १ आणि २, महाराष्ट्र परिचय इ. कोशनिर्मिती, समाजजीवन, उद्योगधंदे, देवदेवता-पंथ, व्यापार, स्थलदर्शन, शिल्पकला इ. विस्तृत माहिती दिली आहे. कोशवाङ्मयाखेरीज ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्र’, ‘सुबोधन आणि धर्मचितन’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ आणि ‘कोशकार केतकर’ इ. ग्रंथलेखनाचा समावश होतो.
लोकसाहित्य हा देखील त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. त्यामुळे लोकसाहित्याचाही त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होता. १९५६ साली महाराष्ट्र शासनाने लोकसाहित्य समितीची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी शासनाने कर्वे यांची सन्माननीय नियुक्ती केली होती. ज्ञानोपासक, ज्ञानसंग्राहक असलेल्या कर्व्यनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य त्यांनी केले. चितामण गणेश कर्वे यांचे १६ डिसेंबर १९६० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले.
इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची "आयर्न लेडी" म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत "सर्वात आवडती (admired) स्त्री" म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा जन्म तेंव्हाच्या रशियामध्ये (आता युक्रेन) झाला. त्या लहान असताना वडील नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला गेले आणि लवकरच त्यांनी आपल्या कुटुंबाला तिथे बोलवून घेतले.
गोल्डा अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरातील ज्युईश वसाहती मध्ये मोठी होऊ लागल्या. माध्यमिक शाळा संपल्यावर गोल्डा यांना उच्च माध्यमिक शिक्षणाकरता मात्र आईवडीलांकडून विरोध व्हायला लागला. लग्न करुन मुलीनं घर वसवावं अशी आईवडीलांची इच्छा तर पुढे शिकून शिक्षक व्हावं ही गोल्डा यांची इच्छा! शेवटी कंटाळून त्या आपल्या मोठ्या बहिणीकडे डेन्व्हरला पळून गेल्या. तिथे त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून उच्च्माध्यमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथ पर्यंत गोल्डा यांचा राजकारणाशी, प्रखर ज्युईश धर्मियांशी फारसा संबंध आला नव्हता, पण बहिण आणि तिच्या नवर्याचकडे ज्युईश अभ्यासक, धर्माभिमानी लोक येऊन चर्चांच्या, गप्पांच्या मोठ्या फैरी झडायच्या. त्यांचं बोलणं ऐकून, हळूहळू चर्चांमध्ये सहभागी होऊन गोल्डा झायऑनिझम कडे जास्त आकृष्ट होऊ लागल्या. डेन्व्हर मध्ये असताना त्या मॉरिसच्या, प्रेमात पडली. त्या काळात १९१७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखाली पॅलेस्टाईनची घोषणा केली.
जगभरातील 'ज्यू लोकांसाठी त्यांची एक जागा / घर' अशी ह्या पॅलेस्टाईनची संकल्पना होती (National Home for the Jewish people). त्यानंतर महिन्याभरातच लग्न झाल्यावर पॅलेस्टाईनला रहायला जायचं ह्या अटीवर गोल्डा यांनी मॉरिसशी लग्न केले. १९२१ साली दोघही पॅलेस्टाईनला रवाना झाले आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये खडतर रितीने जात होते. गोल्डा हळू हळू छोट्या पातळीवर झायॉनिझम आणि त्यासंदर्भातील कामांमध्ये स्वतःला व्यस्त करत होत्या. काम, दोन मुले, संसार ह्यामध्ये गोल्डा पारंपारीक ज्युईश पद्धतीने घर चालवायचा प्रयत्न करत होत्या. मॉरिस आधीपासूनच फार पारंपारिक ज्यू नव्हता. खटके उडायला लागले.
१९२८ मध्ये गोल्डा मुलांसकट कामाकरता तेल अविवला रवाना झाली आणि हळू हळू लग्न संपुष्टात आले. ह्यापुढे मात्र गोल्डा ज्युईश कष्टकरी लोकांकरता काम करणार्याह "Histadrut" ह्या संघटनेत झटपट एक एक पायरी चढत त्यांच्या पॉलिटीकल विभागची प्रमुख बनल्या. त्याकाळात दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. वर्ल्ड झायॉनिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये गोल्डा यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाकरता एकट्या अमेरिकेतून ५० मिलीयनपर्यंत देणग्या जमा केल्या. प्रखर धर्माभिमानी, देशभक्त आणि तेवढीच प्रभावी वक्ती अशी त्यांची प्रतिमा होती.
पुढे १९४८ साली इज्रायलची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान बेन-गुरीयन यांच्या मंत्रिमंडळात 'मिनिस्टर ऑफ लेबर' म्हणून गोल्डा यांची निवड झाली. स्वतंत्र झाल्या झाल्या शेजारी अरब राष्ट्रांनी इज्रायल वर हल्ला चढवला. ह्या धामधुमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात वेशांतर करुन सरहदी पलिकडे जॉर्डनच्या किंग अब्दुल्लला युद्धात भात घेऊ नका म्हणून विनवणी करायला गोल्डा गेल्या. नवीन सैन्याला लढायला शस्त्रास्त्र आणि पैशांची गरज होती तेंव्हा ती मागणी करायला गोल्डा तडक अमेरिकेला पोहोचल्या. १९५६ साली परराष्ट्र मंत्री म्हणून गोल्डा यांची नेमणूक झाली. इतर राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, मिलिटरी क्षेत्रात सहकार्याने काम करणे इत्यादी बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. १९६६ साली गोल्डा यांनी निवृत्ती पत्करायचे ठरवले.
शांत आयुष्य जगणे, कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करणे, तब्ब्येतीकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टींकरता ही निवृत्ती आवश्यक होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. १९६९ झाली त्यावेळच्या पंतप्रधानांचे निधन झाले आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तिच्या पक्षाने पंतप्रधानपदाकरता त्यांची निवड केली. ही त्यांची राजकीय कारकिर्दीची परमावधी होती. त्या लोकांची आवडती पंतप्रधान होती. देशात राजकीय स्थैर्य येत होते तेवढ्यात १९७३ मध्ये इजिप्त आणि सिरियाने इज्रायल वर अनपेक्षितपणे हल्ला चढवला (योम किप्पूर वॉर). निकराने प्रतिकार परत इज्रायलने हल्ला परतवला आणि शेवटी त्यांचा विजय झाला, त्यात २७०० इज्रायली सैनिक धारातिर्थी पडले. एका छोट्या राष्ट्रकरता ही जबर किंमत होती. स्वत:च्या मनचे ऐकण्यापेक्षा मिलिटरीचे ऐकून सैन्य आधीच सीमेपाशी न हलवल्याचा गोल्डा यांना प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ गेली होती. सगळे देशवासी आता तिच्याविरुद्ध झाले होते. सैनिकांच्या मृत्यूंचे खापर तिच्यावर फोडले गेले आणि १९७४ साली गोल्डा यांनी राजीनामा दिला.
योम किप्पूरच्या युद्धमुळे झालेले सर्व दु:ख आणि पश्चाताप, लोकांनी नाकारल्यामुळे झालेला अपमान आणि उपमर्द ह्यामुळे खचलेली गोल्डा शेवटच्या काही वर्षात मात्र परत समाधानाने जगू शकली. काळ लोटला लोकांचा प्रक्षोभ कमी झाला आणि आधीच अतिशय लोकप्रिय असलेल्या गोल्डाला लोकांचे उदंड प्रेम मिळले. गोल्डा मायर यांचे ८ डिसेंबर १९७८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.
प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही.
आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण अमरे यांनी काम केले आहे. त्यांच्या पुढील मोसमासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीताची तालीम जयमाला शिलेदार यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून घेतली. टेंबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेषांतर’ या नाटकामधून शिलेदार यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर आपल्या अभिनय आणि गायनानं रंगभूमी गाजवून सोडली. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२६ रोजी झाला. प्रमिला जाधव हे त्यांचं माहेरचं नाव.
संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांच्याबरोबर भूमिका केल्याने गंधर्वसुरांची शिलेदारी जतन करणारी गायिका अशीच जयमाला शिलेदार यांची ओळख होती. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर हे दोघं विवाहबद्ध झाले. विवाहानंतर या दोघांनीही आपल्याला संगीत रंगभूमीसाठी वाहून घेतलं. या दोघांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ आदी नाटकांची निर्मिती केली.
१९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले.
नाटकांच्या निर्मितीबरोबरच जयमाला शिलेदार यांनी त्या काळातील बहुतेक सर्व गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये काम केलं. ‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ आदी नाटके त्यांनी गाजविली होती. रसिकांच्या प्रेमाबरोबरच विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
बालगंधर्वांच्या चाहत्या असणार्याय जयमालाबाईंना त्यांच्या नावाचा पुरस्कार तब्बल तीन वेळा मिळाला होता. २००६ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड झाली होती. जयमाला शिलेदार यांचे ८ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .
अर्जुन चंदीरामानी हे सी. अर्जून यांचे नाव. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. सी.अर्जुन म्हणजे बुलो सी रानी या सिंधी संगीतकाराचा सहायक. वडील गायक त्यामुळे घरचं वातावरण संगीताला पोषक. सी. अर्जून १९६० सालापासुन चित्रपट सृष्टीत कार्यरत होते. १९६० साली रोड नं. ३०३ या चित्रपटाने त्यांची सुरुवात झाली. ‘पास बैठो तबीयत मचलं जायेगी’ १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुनर्मिलन’ चित्रपटातील हे त्यांचे सर्वात गाजलेले गाणे. पुनर्मिलन मधील तशी सर्वच गाणी उत्तम होती. परंतु बी ग्रेड चित्रपटामुळे या चित्रपटाला मर्यादित लोकप्रियता लाभली. त्यानंतर त्यांचा आला ‘सुशीला’ नावाचा चित्रपट १९६६ साली. यातील रफी व तलतच्याही आवाजातील गीत ‘गमकी अंधेरी रात में दिलको न बेकरार कर सुबह जरुर आयेगी सुबह का इंतजार कर’ ऐकताना निराश मनाला उभारी कशी येते ते आपण अनुभवले असेलच.
सी. अर्जुन यांनी उत्तरार्धात ‘जय संतोषी मॉं’ चित्रपटातील आरती, ‘मैं तो आरती उतारूँ रे’ हे गाणे अजरामर केले. सी. अर्जुन त्या चित्रपटाचे संगीतकार होते. ‘मैं अभी गैर हूं, मुझको अभी अपना ना कहो..’ हे मुकेश-आशाचं, ‘मैं और मेरा भाई’ मधील ही पण गाणी गाजली. हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी काही गुजराथी व एका सिंधी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. मा. सी. अर्जून यांचे ३० एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सी. अर्जून यांची काही गाणी
आये हो तो जाना का
मैं तो आरती उतारूँ रे
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
ग़म की अंधेरी रात में
खाप्रुमामा ना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.
लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti