छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणत, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.
राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले.
राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर होते. राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः १६९० मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता.
स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
१६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराज यांचे ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.
अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती.
‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला.
डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५ मध्ये एका गावापासून झाली.
आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे.
या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली डॉ.राजेंद्रसिंह यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ.राजेंद्रसिंह यांची वेबसाईट. http://tarunbharatsangh.in/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले.
विजय कोंडके यांच्या ‘माहेरच्या साडी’ने तर अनेक बाबतीत विक्रम केला होता. अण्णांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवले. या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी संवादांनी घराघरातल्या स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही काळजाला हात घातला होता.
आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. “निळा सावळा नाथ’, “कळीदार कपुरी पान’, “सहज सख्या एकटाच’ ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि “शुक्रतारा मंदवारा’ या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला.
बहुप्रसव लेखक राजा राजवाडे यांचा जन्म १ जानेवारी १९३६ रोजी देवरूख जवळच्या निवे बुद्रुक येथे झाला. राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए झाले. त्यावेळी नोक-यांचा सुकाळ होता.
राजा राजवाडे यांनी‘एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदवलं. तिथून त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. तोपर्यंत ते गिरगावात राहायला आले होते. १९६५ च्या सुमारास राजा राजवाडे यांनी लेखन सुरू केले. १९६२ साली‘ स्त्री’ मासिकात ‘उन्हातलं घर’ ही कथा पहिल्यांदा आली. ते गिरगावात राहात असल्याने, मुंबईतलं साहित्यिक क्षेत्र जवळपासचं. तिथून साहित्य संघ, मौजचं ऑफिस, मॅजेस्टिकचं ऑफिस सर्व जवळपास. त्यामुळे अनेक नावाजलेल्या लेखक-कवींची पायधूळ त्यांच्या गिरगावच्या घराला लागलेली. या साहित्यिकांमध्ये ठळकपणे आरती प्रभू, वसंत सावंत, केशव मेश्राम, श्रीपाद भागवत, मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे अश्या अनेक साहित्यिक येथ असत.
राजा राजवाडे यांचि पहिली कादंबरी चांदण्यातलं ऊन. जवळपास १३ वर्षे महानगरपालिकेत नोकरी केल्यानंतर, त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा, चिकाटी, उत्साह पाहून त्यांचे स्नेही वैद्य यांनी ‘सिडको’ या गृहनिर्माण संस्थेसाठी नोकरी करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी म्हणजे १९७३ला ते ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ म्हणून सिडकोत रुजू झाले. त्यावेळी त्यांचं ऑफिस नरिमन पॉइंट, निर्मल भवन येथे होते. वास्तविक पाहता सिडको ही गृहनिर्माण संस्था होती. आपल्या अधिकाराचा वापर करून, त्यांना एखादा मोठा फ्लॅट मिळवता आला असता, पण आयुष्यात जवळपास १९८६ पर्यंत ते गिरगावात त्या जुन्या खोलीत राहत होते.
एकतर त्यांना गिरगावातील साहित्य संस्कृती मनापासून आवडत होती. १९८०च्या सुमारास, त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘सायाची पाने’ हा प्रसिद्ध झाला. त्याचे प्रकाशक होते त्यांचे मित्र वामन देशपांडे. राजा राजवाडे हे खूप भावुक होते. म्हणूनच ‘सायाची पाने’ या शीर्षकाची कविता त्याचं भावविश्व उलगडून दाखवते.
गरगरत पडतात सायाची पाने
कोरीत वर्तृळे दाटलेल्या धुक्यावर
तसेच आहेत हे आलेख कोरलेले
स्मृतीने एखाद्या व्याकूळ मनावर
याच कवितासंग्रहात ‘उन्मादक अभंग’ आहेत. राजा राजवाडे यांनी जवळपास शंभर असे अभंग लिहिले. त्यातील काही अभंग सायाची पाने यात आहेत.
उदाहरण द्यायचे तर..
तुझ्या अंगातला
गाभुळला ऋतू
जातो आहे ऊतू
अंगोपांगी
सुचतात मला
कोयलाची गाणी
तुझी न्हाणी-धुणी
पाहताना..
वास्तविक राजा राजवाडे हे विचाराने संपूर्णपणे कम्युनिस्ट होते. तरुण भारत’मध्ये तर संपूर्ण एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस राजा राजवाडे यांनी‘उतरती उन्ह’ हे सदर चालवलं. तसेच ‘ललित’मध्ये ‘उदंड झाली अक्षरे’, ‘सोबत’मध्ये ‘सप्तरंग’ त्याचप्रमाणे मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाइम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांनी सदर लेखन केलं.
त्याचं कथालेखन हे रोजच्या दैनिक घटनांवर आधारित त्यांच्या कथा असायचे म्हणजे रस्त्यावर झोपणा-या माणसांपासून ते कोकणातल्या घरापर्यंत त्याचं लेखन सर्वत्र भ्रमण करायचं. अगदी उल्लेखण्याजोग्या कादंब-या म्हणजे धुमसणारं शहर (१९७५), कार्यकर्ती (१९७९), अस्पृश्य सूर्य (१९७८), दुबई-दुबई (१९८०) ह्या आहेत.
राजा राजवाडे यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ.म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या व्यक्तिचित्रण संग्रहात त्यांनी आरती प्रभू, नारायण सुर्वे, रमेश मंत्री, वसंत सावंत, श्याम जोशी, मधु मंगेश कर्णिक या मित्रांबद्दल खूप प्रभावीपणे लिहिले आहे. आपल्या जवळच्या मित्रांचं आजारपण किंवा मृत्यू ते सहन करू शकत नव्हते. मला आठवतं कधी वसंत सावंत, रुग्णशय्येवर होते, तेव्हा आपल्या या मित्राला भेटायला जायची हिंमत ते करू शकले नाहीत. पण हॉस्पिटलमध्येच कविवर्य सावंतांना ‘कोकण साहित्यभूषण’ पुरस्कार देण्यासाठी धावपळ करण्यासाठी ते आघाडीवर होते. एवढे मित्रांच्या बाबतीत हळवे होते.
साहित्य व्यवहारात त्यांनी आपली मते खूप परखडपणे मांडली, म्हणजे विंदांनी गणपतीवर एक विरूपिका लिहिली. ती विरूपिका राजा राजवाडे यांना सहन झाली नाही. त्यांनी ‘सोबत’ या मासिकातून झोड काढणारा लेख लिहिला. कोमसापच्या अलिबागच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना श्री. ना. पेंडसे यांनी इंग्रजीची वाखाणगी करणारं आणि मराठीची अवहेलना करणारे भाषण केले. त्यावेळी कोमसापचे पदाधिकारी असूनही त्यांनी श्री.नांच्या भाषणावर आक्षेप घेत आपला जाहीर निषेध नोंदविला.
त्याचप्रमाणे गोविंदराव तळवलकरांनी एका भाषणात, ‘आपण मराठीतलं साहित्य वाचत नाही..’ असं म्हटलं. तेव्हा राजा राजवाडे यांनी गोविंदरावांना जर तुम्ही मराठीतलं काही वाचत नाही तर मराठीतल्या एका प्रमुख वृत्तपत्राचे संपादक म्हणून राहण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? असा प्रश्न केला. याच गोष्टीची चिड येऊन १९९६च्या हिवाळीत बाबांनी ‘मराठी बाणा’ हा दिवाळी अंक संपादित केला. त्यात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे किती तरी लेख नामवंत लेखकांकडून लिहून घेतले. त्यात दुर्गा भागवत, माधव गडकरी, प्रा. मं. वि. राजाध्यक्ष, प्रा. कोडोलीकर, डॉ. सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक यांचे लेख होते. नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ साली, आचार्य अत्रे यांची जन्मशताब्दी असल्याने, आचार्य अत्रे यांच्या जीवनावर व साहित्यावर हिवाळी विशेषांक बाबा संपादित करणार होते. पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
१९९६ साली बाबा नोकरीतून निवृत्त झाले. त्याचवेळी कोमसाप जोरदारपणे कोकणात कार्य करत होती. श्री अरुण आठल्ये यांच्या निधनानंतर कोमसापच्या मुंबई जिल्हय़ाच्या अध्यक्षपदी बाबांची निवड झाली. कोमसापच्या अंतर्गत त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. कोमसापचं त्रमासिक ‘झपूर्झा’च्या संपादनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. राजा राजवाडे "३० कांदबऱ्या, १४ विनोदी कांदबऱ्या, ८ कथासंग्रह, ९ विनोदी कथासंग्रह, ४ कविता संग्रह, १ व्यक्तिचित्रणपर तर ३ ललितगद्य,व २ चित्रपट पटकथा (वऱ्हाडी झटका पुणेरी फटका, शंभू गबाळे) इतके विपुल लेखन केले. तर सलग ३५ वर्षे १८ नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले. राजा राजवाडे यांचे चिरंजीव म्हणतात बाबा नावाप्रमाणेच राजा होते. एक ‘राजा लेखक’ आणि ‘एक राजा माणूस’.. राजा राजवाडे यांचे २१ जुलै १९९७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/डॉ. माधव राजवाडे
वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.
झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. उस्ताद अल्ला रक्खा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti