(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर

    सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव का नाम ससुराल, हमारा नाम दामाद, पोंगा पंडित, जिसने लाहोर नही देखा या सारख्या असंख्य नाटकांद्वारे त्यांनी रंगमंचावर अक्षरशः राज्य केले.

    "जहरीली हवा' हे भोपाळ विषारी वायू पीडितांवरील त्यांचे नाटकही कमालीचे गाजले. पद्मश्री, पद्मभूषण या सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले व राज्यसभा सदस्य होण्याचा मान मिळालेले तन्वर यांची नाट्य क्षेत्रातील अभिरुची उच्च कोटीची होती. प्रयोगशीलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायिभाव होता. याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. हबीब तन्वर यांचे निधन ८ जून २००९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जॉर्ज हॅरिसन

    ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.

    बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून मा.जॉर्ज हॅरिसन यांनीआंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले.

    बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला.

    हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ विकिपीडीया

  • गायक शब्बीरकुमार

    ब्बीर कुमार यांनी सर्व मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आणि अमिताभ बच्चन ते अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासाठी गाणी गायली. देशभरात नवरारात्रीत कायम गायले जाणारे ‘मर्द’ चित्रपटातील ‘माँ शेरों वाली’ हे प्रसिद्ध गाणे शब्बीर कुमार यांनी गायले होते

  • प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

    त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते.

    नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले.

    त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

    सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म.

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय.

    एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या.

    पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

    अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजीनी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

    पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या.

    पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्‍या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्तीसुद्धा होती.

    १९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

    जितेंद्र अभिषेकी यांचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2AJq1VvaCGw

    https://www.youtube.com/watch?v=BZVAfYiqsjk

    https://www.youtube.com/watch?v=tZol6tvKek8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw&index=2

    https://www.youtube.com/watch?v=mB9uW1I28EM&index=4&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=kmGeigOguMg&index=8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=t0XLyce4HQM&index=9&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=er5W9FLyPKA

  • नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य

    एकीकडे अगदी नाचणं जीवावर येत असलेल्या सन्नी देओल, आणि अजय देवगणसारखे हिरो गणेशकडून धडे घेणं पसंत करतात; तर दुसरीकडे हृतिक रोशन सारखे नृत्यनैपुण्य असलेले लोकही त्याला पसंती देतात. माधुरीपासून ते कतरीना पर्यंत सगळ्यांसाठी तो नृत्य बसवतो. आपल्या सव्वाशे किलोच्या शरिराचा कसलाच अडथळा न होऊ देता नृत्य, अगदी एकेक स्टेप करून दाखवतो आणि आपल्या मुंबईय्या भाषेत समजावूनही सांगतो!

  • भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय

    राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्याथ स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणाऱ्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.

  • वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

    आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

    मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

    उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’
    दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.
    जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!
    गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!
    अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.
    सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!
    - अनिल गोविलकर

  • सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

    विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.

  • महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव

    सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्‌संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले (१९२८). ‘भारतीय चरित्रकोश मंडळ’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे त्यांनी भारतवर्षातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींचे तीन कोश संपादून ते प्रसिद्ध केले (१९३२, १९३७, १९४६). त्यातील भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोशाच्या सुधारलेल्या हिंदी आवृत्तीस (१९६४) अहिंदी प्रांतांत प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट हिंदी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले (१९६७). अथर्ववेदाचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे. यांशिवाय पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्यशब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायीचा व गणपाठाचा शब्दकोश हे ही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्राचीन भारतीय स्थलकोश ते संपादित असून त्याचा प्रथम खंड प्रकाशित झाला आहे (१९६९). पुरीच्या श्री शंकराचार्यांकडून ‘महामहोपाध्याय’ (१९५७) व चिदंबरम्‌च्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधि’ अशा उपाध्याही त्यांना प्राप्त झाल्या आहेत. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींचे संस्कृत सन्मानपत्र त्यांना मिळाले (१९६५). त्यांच्या विद्वत्कार्याच्या गौरवार्थ रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह यीअर्स हा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रपतींच्याच हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६७). पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानपदवी त्यांस दिली (१९६९). १९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. प्राच्यविद्यांच्या प्रसारार्थ त्यांनी केलेले ज्ञानकार्य चिरंतन स्वरूपाचे असून ते सर्व अभ्यासकांना प्रेरक ठरणारे आहे. सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे ६ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विश्व कोष

  • बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान

    स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्या आधी स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत असत. पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.

    स्नेहप्रभा प्रधान यांना १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.

    नंतर त्यांची घट्ट मैत्री जुळली ती डॉ. शिरोडकर यांच्यासोबत. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. स्नेहप्रभा प्रधान मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या. शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्‌मुखपणे व शांतपणे व्यतीत केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन, पहिली मंगळागौर ,सजनी, सिव्हिल मॅरेज, सौभाग्य या चित्रपटात कामे केली.
    स्नेहप्रभा प्रधान यांचं आत्मवृत्त "स्नेहांकिता‘ वाचण्यासारखे आहे. ७ डिसेंबर १९९३ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.

    स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके
    पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
    रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
    सर्वस्वी तुझाच (नाटक)
    स्नेहांकिता (आत्मचरित्र).

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट