दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या् डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २० रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.
त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवल कोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.
दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. १९९२ साली डी.डीं नी शेवटचा चित्रपट केला. दत्ता डावजेकर यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता डावजेकर यांची काही गाणी
आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी
कुणि बाई, गुणगुणले, गीत माझिया ह्रुदयी ठसले
गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला
अंगणी गुलमोहर फुलला
गोमू माहेरला जाते हो नाखवा
या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट
बाई माझी करंगळी मोडली
जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे.
सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.
हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने ॲपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला ॲपल-१ हा पीसी लाँच केला. ॲपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे ॲनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या ॲपलच्या सल्लागारपदावर ते परतले. २००७ मध्ये ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला.
२००१ साली ॲपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. ॲपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.
ॲपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी ॲपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स ॲपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार ॲपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव ॲपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले ॲपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.
२००७ वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.
जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. ॲपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
संगीतकार म्ह्णून त्यांची कामगिरी महत्वाची म्हणावी लागेल कारण त्यांनी मराठी,कन्नड,हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील अनेक नाटकांना संगीत दिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘ घाशीराम कोतवाल ‘ या नाटकाला संगीत दिले त्याप्रकारच्या संगीताचा वापर आजही मराठी रंगभूमीवर केला जात आहे.
मी बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत नाही’. साहेबांनी किंचित रागानेच माझ्याकडे पाहिले. ’ सॉरी सर, हे आमच्या कोण्णूर सरांच वाक्य डोक्यात इतक फिट झालं आहे की चुकून तुमच्यासमोर मी ते तसच बोललो’. आपली चूक साहेबांच्या लक्षात आली. पण हे ’मेलं तरी’ त्याना फारस रुचल नव्हत.
कोण्णूर सरांच्या हाताखाली शिकलेल्या एकूण एक हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडात किंवा डोक्यात हे वाक्य असच फिट झाल आहे. कोण्णूर सरांची भाषाच अशी जगावेगळी होती. जरा व्याकरणाकड लक्ष दिल तर SSC ला इंग्रजीत आंद्या परिटाचं गाढव सुद्धा पास होईल, अडचण एवढीच आहे की ते तीन तास एके ठिकाणी बसत नाही. इंग्रजीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गर्दभाच्या असे जवळ उभे करायचे. जशी भाषा वेगळी तसेच विद्यार्थ्यांना मारण्याची पद्धतही वेगळी. डोक्यावर किंवा हाताच्या ढोपराच्या मागे हाडावर डस्टरने खाटकन मारायचे. जीव कळवळायलाच पाहीजे. आणखी अस्त्र म्हणजे एक वेताची छडी होती. हात झणझणण म्हणजे काय ते कोण्णूर सरांची छडी खाल्ल्यावरच कळायचे. मुलींना सुद्धा सर मारायचे हे आम्हाला तेव्हां खूप छान वाटायच.
कोण्णूर सर कोल्हापूरात न्यू हायस्कूलच्या कागलकर वाड्यात इंग्रजीचे शिक्षक होते. अतिशय कडक शिक्षक म्हणून त्याना ओळखले जायचे. पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, खादीचा कुडता त्यावर खादीचेच जाकीट आणि डोक्यावर टोकदार कडक इस्त्रीची गांधी टोपी असा त्यांचा पोशाख असायचा.
चार चौघात पटकन उठून दिसतील असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. शाळेव्यतिरिक्त ते स्वत:चे खाजगी क्लासेस घ्यायचे. कोण्णूर सरांमुळे इंग्रजी सुधारले पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो सरांसारख्या भन्नाट माणसाचा सहवास लाभल्याचा आनंद.
कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील त्यांच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो तेव्हां ती खोली पाहून या खोलीत आम्ही ६५/७० मुले तेव्हां कशी काय बसत असू याचे खूपच आश्चर्य वाटले. मुली खिडकीत बसायच्या. दाटी वाटीने जागा करून देण्यासाठी सर मुलांना बजावयाचे ’जे नुसत हलवल्या सारख करतोयस ते बूड प्रत्यक्ष हलव’. साधी, सोपी, सरळ, नेहमीची भाषा सरांना त्यांच्या आईने शिकवलीच नसावी. वर्गात बसून मागच्या बाजूला कोणी बडबड करायला लागला की सर म्हणायचे ’ए बोडकी, रामाच्या पारावर बसून वाती वळायला आलायस काय ?’ अंबाबाईच्या देवळात राम मंदिराच्या मागे प्रवचन ऐकायला जाणाऱ्या विधवा बायकांसाठी वापरला जाणारा शब्द बोडकी. कोण्णूर सरांनी कुठून कुठून हे शब्द संग्रहात साठवले होते ते कळत नाही.
चहाचे त्यांना अत्यंतिक व्यसन होते. टेबलावर चहाचा एक थर्मास अखंड भरलेला असायचा. आम्हालाच कोणालातरी कपात अर्धाच कप चहा भरायला सांगत. भुरका मारून चहा प्यायचे. थर्मास रिकामा झाला की घरात हाक द्यायचे. सर पूर्वी धूम्रपानही करायचे. पुढे डॉक्टरांनी त्यावर बंदी घातली.
फक्त ५०/६० मिनिटांच्या शिकवणीने इंग्रजी सुधारणार नाही म्हणून घरी सराव करण्यावर त्यांचा भर होता. रोज भरपूर गृहपाठ द्यायचे. म्हणजे जितका वेळ शिकवणे त्यापेक्षा जास्त वेळ वह्या तपासण्यात जायचा. त्या वह्या एका कोनाड्यात रचून ठेवलेल्या असायच्या. एकदा एका बहाद्दराने कोणाची तरी वहीच चोरली. वही गायब झाल्याने चोरी झाल्याचे कळले तरी चोर सापडण्यासारखा नव्हता. त्या दिवशी सरांनी न भूतो न भविष्यति अशा शिव्या हासडल्या. रोज रात्री दोन अडीच पर्यंत जागून सर वह्या तपासायचे याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. सरांचा सात्विक संताप खरा होता. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही सरांना इतके चिडलेले मी कधीच पाहीले नाही.
कोण्णूर सरांचा सारा भर व्याकरण शिकवण्यावर होता. पहिले चार पाच महिने फक्त काळ शिकवायचे. नंतर पाठ्यपुस्तक शिकवतानाही मुख्य भर व्याकरणावर. परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकाची तयारी ज्याची त्याने करावी. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना पोहणाऱ्याला हात द्यावा त्या पद्धतीने शिकवायचे. म्हणजे प्रत्यक्ष पोहण्यासाठी हातपाय तुम्हीच मारले पाहीजेत. इंग्रजी वाक्य घटक पद्धतीने शिकवायचे. घटक दोन प्रकारचे. पहिले जे वाक्यात असलेच पाहीजेत, आणि दुसऱ्या प्रकारात असतीलही. पहिल्या प्रकारातील घटक दोन, कर्ता आणि क्रियापद. ह्या दोनही घटकांशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात कर्ता, क्रियापद, कर्म शिवाय ह्या साऱ्या विषयीची अधिक माहिती सांगणारी विशेषणे इत्यादी.कोणी काही चूक केली की ’शेण खाल्लं’ हे त्यांच आवडीच ठरलेल वाक्य होत. साठ मिनिटात किमान पाच सहा वेळां ते शेणावर घसरायचे. वर्गात दोशी नावाचा मुलगा होता. रोज त्याच्या वाट्याला बुट्टीभर शेण यायच. एकदा तर दोशीच्या वाट्याला जे शेण आलं ते आम्ही कोणीच विसरू शकणार नाही.पाहिजेतच असे घटक कर्ता-क्रियापद. कर्ता-दोशी, क्रियापद – खातो. त्यावर विशेषणे जोडता जोडता अखॆर ते वाक्य इतकं मोठ झाल…. दोशी शेण खातो. दोशी रोज सकाळी म्हशीचे बुट्टीभर, ताजे-ताजे शेण, फोडणी देऊन, मिटक्या मारत चवीने खातो . सरांच्या क्लासमधे शेण या शब्दाशिवाय दिवस उजाडायचा नाही, मावळायचाही नाही.वर्गात उशीराने येणाऱ्या मुलांचे स्वागतही खास शैलीत व्हायचे. ’इतक्या सकाळी उकिरडे फुंकत तरंगत कुठे गेला होतास अशा प्रश्नाबरोबरच वर एक छडी खायला मिळायची. कोण्णूर सरांवर तरीही सर्वांच प्रेम होत. त्यांनी मारलेल्या छड्या, दिलेल्या शिव्या गोडच लागायच्या. कारण त्यांनी आमचे इंग्रजी सुधारण्याची जी जादू आमच्या जीवनात केली होती त्याच्यापुढे या साऱ्या गोष्टी किरकोळ वाटायच्या.
एकदा मात्र सरांनी मारलेली छडी माझ्या हाताबरोबरच मनावरही कायमचा ठसा उमटवून गेली. सर वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांना फारसे प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीच उत्तर देऊ शकले नाही तर मग त्यांच्या मते हुशार मुले जी होती त्यांना शेवटी विचारायचे. सुदैवाने माझा नंबर बहुदा शेवटचा असायचा. खरतर माझ्यापेक्षा जास्त हुशार काही जण होते. पण माझ्या भावाने बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सरांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. मला मारायचेही नाहीत. इतर मुलांची त्याबद्दल तक्रारही असायची. इतकच काय ते मला सरळ कात्रे या नावाने हाक मारायचे बाकी कोणालाही त्यांनी सरळ नावाने हाक मारल्याचे माझ्या स्मरणात नाही. सबनीसला सबन्या, मानेला मान्या, पाटीलला पाटल्या अशीच नावे घ्यायचे. सान्या (साने) तुला सांगतो कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही, हे त्यांच्या आवडीचे विधान होते. कळंबा तलावातून कोल्हापूर शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाई. म्हणजे इंग्रजी शिकण्याच काम कोल्हापूरवाल्यांच नव्हे हे ते खास त्यांच्या स्टाईलने ऐकवायचे ते ऐकायला जाम मजा यायची. तर एकदा त्यांनी काहीबाही प्रश्न विचारला. मी सरांच्या जवळ त्यांच्या स्टूललगत अगदी पायाशीच बसलो होतो. खुर्ची असती तरी स्टूल हे त्यांचे आवडते आसन होते. प्रश्न विचारतच त्यांनी माझ्याकडे पाहीले. याचे उत्तर वर्गात कोणालाही येणार नाही अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे आता बऱ्याच जणांना मार देता येईल असा काहीसा मिष्किल भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आजपर्यंतचा माझा अनुभव असा होता की माझ्यापर्यंत प्रश्न यायचाच नाही. एखाद्याने तरी उत्तर देलेले असायचे. म्हणून मी उत्तर ठाऊक असल्याचा भाव चेहेऱ्यावर ठेवला. वास्तविक मलाही त्याचे उत्तर ठाऊक नव्हते. जवळ जवळ बारा चौदा जणांना हा प्रश्न विचारूनही माझ्या दुर्दैवाने कोणालाच त्याचे उत्तर देता आले नाही. माझ्या चेहेऱ्यावरील भाव प्रदर्शनामुळे शेवटी सर म्हणाले Yes, now you. पण मला उत्तर येतच नव्हते. हे पाहिल्यावर सर जाम भडकले. ’भोसडीच्या, मला फसवतोस ? म्हणत त्यांनी वेताच्या छडीने जी सपकन माझ्या हातावर लगावली की पुढे पूर्ण एक तास माझ्या हातातून झिणझिण्या येत होत्या. आज कात्रेने मार खाल्ला यामुळे सारे सुखावले. चुकीचे भाव नजरेत ठेवून मी त्यापुढे आयुष्यात कधीही आणि कुणाच्याही सामोरा गेलो नाही. असा प्रसंग आला तर मला प्रथम कोण्णूर सरांची आठवण येते. ती छडी आठवते. आणि ती शिवी सुद्धा, भोसडीच्या मला फसवतोस ?
एकदा मी क्लासला थोडा उशीरा पोचलो. पाहतो तर आज क्लास नव्हता. सुट्टी दिली होती. नेहमी वर्गात बनियन किंवा कधीकधी फक्त धोतर नेसून वर उघडेबंब बसणारे सर आज त्यांच्या पूर्ण पोशाखात एकदम टापटीप दिसत होते. मला थांबवून त्यांनी एक पेढा खायला दिला. सर कसला पेढा अस विचारल्यावर माझ्या एकसष्ठीचा अस सरळ उत्तर ते देऊ शकले असते. पण एकसष्ठी असली म्हणून काय झाल ? ते कोण्णूर सरच होते. कसला पेढा या माझ्या प्रश्नावर त्यांनीच मला प्रतिप्रश्न केला ’पेपर वाचतोस की नाही’ ? मी गप्पच. मग त्यांनी पुढारीमधे आलेली बातमीच मला दाखवली. त्यांच्या फोटोखाली त्यांच्या एकसष्ठीची बातमी होती.
भाषांतर हा कोण्णूर सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेतील विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीप्रमाणे व्यक्त करणे ही त्यांची भाषांतराची सोपी सुटसुटीत व्याख्या होती. कुठल्याही वाक्याचा केवळ शव्दार्थ सांगणे म्हणजे भाषांतर नव्हे यावर त्यांचा सतत जोर असायचा. Oh, God ! म्हणजे फक्त हे देवा नव्हे. माणूस परमेश्वराला साद घालताना काय काय म्हणेल ते सगळ लिहायला सांगायचे. उदा: परमेश्वरा, भगवंता, विठ्ठला पांडुरंगा, अरे रामा इ. इ. एकदा त्यांनी भाषांतर करायला सांगितलेले मराठीतील वाक्य खूप लांबलचक होते. एक मुलगा म्हणाला सर खूप मोठ आहे वाक्य. त्यावर म्हणाले घे छोट वाक्य – विद्या विनयेन शोभते किंवा शेणखाऊ गप्प बस. काय भाषांतर करणार ? कोणी चांगल्या मराठीत भाषांतर केले की खूष होऊन शाबासकी द्यायचे. रागावताना भरपूर शब्दांचा वापर करणारे सर शाबासकी मात्र शक्यतो नजरेतूनच द्यायचे. आम्ही त्यावर खूष असायचो.
त्यांनी सांगितलेली एका वाक्याची विविध भाषांतरे माझ्या चांगलीच लक्षात राहीली आहेत. मूळ इंग्रजी वाक्य होते The old man called his son and said my boy I am going to die now यातील I am going to die now चे भाषांतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे असे केले होते. बाळा, मला आता त्याचे बोलावणे आले आहे. मुला, मला आता पैलतीर दिसू लागला आहे. बाबारे, मी म्हणजे पिकले पान, कधीही गळून पडेन. माझे काही आता खरे नाही. आता मी चीरनिद्रा घेणार आहे. मला बाहेर रेडा उभा दिसतो आहे. मृत्यु कुणाला चुकलाय, मी आता चाललो. मृत्यु आता अगदी समीप येऊन ठेपला आहे तो कधीही झडप घालेल. बाबा, मला यमाने निरोप धाडला आहे, आता गेलेच पाहीजे. माझा इहलोकीचा प्रवास संपला, आता मी तिकडे चाललो. माझे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, अगदी ताससुद्धा. गंगेचा टाक आहेना रे घरात ?
कोण्णूर सरांनी नुसते इंग्रजी शिकवले नाही. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. भाषांतराची ही गंमत चाखण्याची चव दिली. मराठी भाषेचा बाज आणि साज दाखविला. अमृताते पैजा जिंकणारी आमची मातृभाषा कशी समृद्ध आहे त्याचे ज्ञान करून दिले.
SSC परीक्षेत माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवाने त्या मी पुऱ्या करू शकलो नाही. माझी अकरावीची परीक्षा झाल्यावर सर स्वत: माझ्या घरी आले होते. माझ्या पेपरची सगळी चौकशी करून मला इंग्रजीत ८१ गुण मिळतील असा त्यांचा अंदाद होता. प्रत्यक्षात ६१ च गुण मिळाले. त्यावेळी माझ्यापेक्षाही कांकणभर जास्तच दु:ख कोण्णूर सरांना झाले हे मी त्यांच्या चेहेऱ्यावर पाहिले.
कोणतीही गोष्ट करण्यामधे एकप्रकारची मनस्विता त्यांनी नेहमी जोपासली. माझ्या काही कविता लिहिलेली डायरी एकदा मी त्यांना पहायला दिली होती.माझी डायरी ’छान आहे’ एवढा ढोबळ शेरा मारून ती ते परत करू शकले असते. पण कोण्णूर सरांच्या ते स्वभावात बसणारे नव्हते. ठलेच
काम त्यांनी Lightly घेतले नाही. माझ्या सगळ्या कविता त्यांनी व्यवस्थित वाचल्या. पुढच्या रविवारी निवांत वेळी मला घरी बोलावले. सरांचा अभिप्राय ऐकायला मी उत्सुक होतो. सर्वसाधारणपणे दहावी अकरावीतला कोणी मुलगा काही तरी लिहितो आहे याच नेहमी कौतुकच व्हायचे. मात्र सर म्हणाले, ’काहीतरी लिहिण्य़ापूर्वी प्रथम खूप वाचल पाहीजे. मग लिहायला लाग’. मी थोडासा नाराजच झालो. पण आज त्या संपूर्ण गोष्टीकडे मी वेगळ्या नजरेने पाहू शकतो. किती मोलाचा सल्ला सरांनी दिला होता. मुख्य म्हणजे माझ्यासाठी भरपूर वेळ काढून अत्यंत आत्मीयतेने मला एक मंत्रच दिला होता.
पुढे कोण्णूर सरांना भेटण्याचा एक दोनदाच योग आला. माझ्या एका मित्राला इंग्रजीमुळे परीक्षेत यश मिळत नव्हते. त्याला तीन चार महिने व्याकरण समजून घ्यायला मदत केली. तो पास झाला. त्या आनंदात पेढे घेऊन मी सरांना भेटायला गेलो होतो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. अचानक कोण्णूर सरांच्या निधनाची बातमी पेपरमधे वाचली. आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वेगळी बाग फुलविणारे, इंग्रजी कशाशी खातात त्याचे ज्ञान करून देणारे, तिरकस आणि शिव्यांनी युक्त भाषा वापरूनही प्रेमाचे झरे पाझरविणारे कोण्णूर सर इहलोकीचा प्रवास संपवून परलोकी गेले. कळंब्याच पाणी वहात वहात हडसन पर्यंत जाऊन मिळाल तरी कात्र्या कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही हे त्यांच वाक्य अजूनही कानात घुमत आहे.
-- श्री.संजय कात्रे
प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकानं त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच.
माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. शाहू मोडक हे ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!
शाहू मोडक प्रवास ... एका देवमाणसाचा
लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
अनुवाद: सुधीर गाडगीळ
विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.
विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते सुरूवातीला केंन्द्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.
लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी विद्यासागर राव करीमनगर जिल्हयातील मेटपल्ली विधानसभा मतदार संघातून आंध्रप्रदेश विधान सभेवर १९८५, १९८९ व १९९४ असे सलग तीनवेळा निवडून गेले. या तिन्ही वेळा ते भाजप सांसदिय मंडळाचे सभागृहातील गटनेते होते.
१९९८ साली विद्यासागर राव करीमनगर मतदार संघातून बाराव्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. १९९९ साली त्यांची आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. १९९९ साली ते तेराव्या लोकसभेवर दुसऱ्यांलदा निवडून गेले. आपल्या सांसदीय जीवनामध्ये त्यांनी लोकलेखा समिती, कामकाज सल्लागार समिती व अर्थविषयक समितीवर सदस्य म्हणून काम केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लामसलत समितीचे देखिल ते सदस्य होते.
करीमनगर येथे त्यांनी सुरूवातीला जनसंघ व नंतर जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखिल काम केले आहे. १९७५ साली त्यांना मिसा खाली अटक झाली व वरंगळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला. विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं.
वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो.
"वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.
अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले.
बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले.
पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले. १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले.
मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्याीच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.
१७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.
खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्यांतना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली.
१७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांूच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले. १७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला.
इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली.
सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्यातला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे २ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे सरांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण
मा. कवी ग्रेस, ह्यांची नि माझी पहिली समक्ष भेट झाली, तो दिवस होता १२ ऑगस्ट २००३ ! पुण्यातील प्रभात रोडवरील स्वरूप हॉटेलमध्ये !
"दुपारी साडेतीन वाजता ग्रेस सरांना भेटा", असा मला मुंबईहून मा. मंगेशकर ह्यांच्या घरून फोन आला ! त्या भेटीचे निमित्त म्हणजे, मा. पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांना कोल्हापूर येथे करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते "भावगंधर्व" ही पदवी बहाल करावयाचा समारंभ होणार होता. त्या सोहळ्यानिमित्त प्रकाशित होणा-या गौरवग्रंथाकरिता कवी ग्रेस सर लेख देणार होते !
आमच्या प्रथम समक्ष भेटीमध्येच मनमोकळ्या सुसंवादाचे रुपांतर, आपुलकीच्या स्नेहात झाले. अन् ते अगदी अखेरच्या क्षणापर्यंत तसेच अबाधित राहिले !
ते मला म्हणाले, "दरवर्षी आपण, दहा मे ह्या दिवशी माझ्या वाढदिवसाला, न चुकता शुभेच्छापत्र पाठविता, त्याचे मला अप्रूप वाटते. आज आपली या निमित्ताने समक्ष पहिली भेट होत आहे"!
"भयाण गारव्यातही, तुझ्या घरात ये सती | चंद्रीकाच मागते, शिवालयात सद्गती", हे शीर्षक असलेला ग्रेस सरांचा अभ्यासपूर्ण लेख त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केला ! "हृदयांतरी " हे शीर्षक असलेल्या गौरवग्रंथामध्ये सदर लेख प्रसिद्ध झाला होता.
पुढे, पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांच्या विविध ठिकाणांच्या कार्यक्रमांच्यावेळी ग्रेस सरांची आणि माझी वरचेवर भेट होऊ लागली. ग्रेस सरांचा चाहता वर्गही आवर्जून अश्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचा !
"ती गेली तेव्हां पाउस निनादात होता, भय इथले संपत नाही" ही लोकप्रिय गाणी सादर झाल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तता व्हायची नाही आणि एके दिवशी, ग्रेस सरांना दुर्धर व्याधीने ग्रासल्याची अशुभ वार्ता कानावर आली. विश्वास बसत नव्हता, पण सत्य समोरच उभे ठाकले होते.
पंडित हृदयनाथजी आणि ग्रेस सरांचा लोभ सर्वश्रुत आहेच ! पुण्याच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात" ग्रेस सर दाखल झाले. त्या व्याधीग्रस्त अवस्थेमध्येही ग्रेस सर, त्यांच्या दूरदूरहून आलेल्या चाहत्यांना आवर्जून भेटायचे. विविध कार्यक्रमांमध्ये रमायचे, सहभागी व्हायचे. त्या सात महिन्याच्या काळात मी हे जवळून बघत होतो. त्यांना भेटण्यासाठी जवळ जवळ रोज, मी दवाखान्यात जात होतो. माझा त्यांच्याशी नित्याचा वार्तालाप होत असे.
भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील पहिले काव्य मी लिहिले होते. ते ध्वनिमुद्रित गाणे, भारत देशाला अर्पण करण्याचा सोहळा पुण्याच्या लोहोगाव विमान तळावरील वायुसेनेच्या कार्यालयात संपन्न झाला होता. एअर चिफ मार्शल प्रदीप व्ही. नाईक सरांनी त्याचा गौरव केला, त्याची बातमी दुसरे दिवशी सर्व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती ! मी रोजच्या सारखा संध्याकाळी दवाखान्यात गेलो, तर, उमद्या मनाच्या ग्रेससरांनी, माझ्याशी हस्तांदोलन करून, माझं मोठ्या जिव्हाळ्याने अभिनंदन केलं होतं !
अश्याच एका संध्याकाळी, पुण्यामध्ये मुसळधार पाउस, सुरु झाला. तो दिवस होता, १५ ऑक्टोबर २०११ ! ग्रेस सर मला म्हणाले, "चिंचोरे सर, माझे काम करणार कां ?" मी म्हणालो, "सर असे काय विचारता, सांगाना, काय हवय"? ग्रेस सर म्हणाले, "बाहेर विजांचा गडगडाट सुरु आहे, धुव्वाधार पडणारा तो पाउस मला पहायचा आहे. लिफ्ट जवळील कॉरीडॉरमध्ये मला घेऊन चलता कां ?" मी तेथील रुग्ण्सेविकांची अनुमती घेतली. झालं, ग्रेस सरांनी आधी माझा हात धरला, आणि नंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, ते व्ह-यांड्यामध्ये हळू हळू चालत आले.
कोसळणारा पाउस पाहून, ग्रेस सर भान हरखून गेले. पावसावर बोलले. बराच वेळ गेला, अन् मग म्हणाले, "चला आता रुममध्ये परत जाऊ", ग्रेस सरांच्या स्नेहाने मी तर चिंब भिजलो होतो . ग्रेस सरांबरोबरचे असे अनेक सुखद क्षण मला अनुभवायाला मिळाले.
एके दिवशी संध्याकाळी मी त्यांना भेटायला जाताच, ग्रेस सर म्हणाले, "अहो, पंडितजींच्यावर मी लिहिलेला तो लेख मला द्याल कां, उद्या दुपारी एक प्रकाशक येणार आहेत. त्यांना तो लेख द्यायचा आहे." मी म्हणालो, "सर आत्ता अर्ध्यातासात घरी जाऊन तो लेख घेऊन येतो", तसे सर म्हणाले, "अहो, आत्ता पुन्हा हेलपाटा नका घेऊ, उद्या आणा".
दुस-या दिवशी, मी दवाखान्यात जाताच, सरांच्या हाती, त्या लेखाची झेरॉक्स प्रत दिली. त्यांना केवढा आनंद झाला. समोरच बसलेल्या प्रकाशकांना त्यांनी तो लेख सुपूर्द केला अन् माझ्याविषयी, त्यांना काही सांगितलं !
असाच एक प्रसंग, रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०११ चा ! निमित्त होतं, पंडित हृदयनाथजींच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या एका घरगुती कार्यक्रमाला, मी मुंबई येथे गेलो होतो. दुस-या दिवशी मी जेव्हां दवाखान्यात गेलो, तेव्हां, ग्रेस सर अधिरतेने मला म्हणाले, "मला आधी कालच्या कार्यक्रमाचे साध्यंत वर्णन सांगा." ते सर्व ऐकतांना, त्यांच्या चेह-यावर, आनंदाचे भाव तरळले होते !
मास्टर दीनानाथांच्या जयंतीनिमित्त, मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या "दीनायन कलापर्व"ने संगीतकार मा. मीनाताई मंगेशकर-खडीकर, ह्यांचा ७ जानेवारी २०१२ रोजी "दशांगुळे उरला" हा कार्यक्रम आयोजित केला होता ! दुपारपासूनच ग्रेस सरांनी मला सांगून ठेवलं होतं, "मला तुम्ही प्रेक्षागृहात घेऊन चला ! मला हा कार्यक्रम समोरून अनुभवायचा आहे." वास्तविक, सरांच्या रुममध्ये असलेल्या टी.व्ही.वरून त्यांना कार्यक्रम बघता आला असता. पण त्यांनी हट्टच धरला. अखेरीस, माझ्या खांद्यावर हात ठेवून ग्रेस सर प्रेक्षागृहामध्ये आले. आम्ही अगदी पुढच्या रांगेमध्ये शेजारी-शेजारी बसलो होतो. मीनाताई ह्यांच्या वक्तव्याला दाद देत त्यांनी कार्यक्रम पाहिला.
"ओल्या वेळूची बासरी" ह्या ग्रेस सरांच्या ललितबंध संग्रहाचे प्रकाशन, मंगळवार, दिनांक १० जानेवारी २०१२ रोजी झाले. हा प्रकाशन सोहळा, "दीनायन कलामंच" आणि पॉपुलर प्रकाशन ने, आयोजित केला होता. ग्रेस सरांच्याच पुस्तकाचे प्रकाशन होत असतांना, सरांनी मंचावर बसण्यास नकार दिला . "प्रेक्षकांमध्येच बसून मी तो कार्यक्रम बघणार", असं त्यांनी आवर्जून सांगितलं. पंडित हृदयनाथ ह्यांच्या हस्ते प्रकाशन झालं . डॉक्टर धनंजय केळकर, ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . पॉप्यूलरचे प्रकाशक रामदास भटकळ, ह्यांची चित्र फीत दाखविण्यात आली. ग्रेस सरांना नामांकित असे कितीतरी विविध पुरस्कार लाभले, पण सर होते, तसेच राहिले. निगर्वी, निर्मळ !
रविवार दिनांक २५ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी, ग्रेस सरांना भेटायला, मी दवाखान्यात गेलो तेव्हां माझा जीव उडून गेला, सा-या रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. सोमवारी २६ मार्चला ग्रेस सरांना देवाज्ञा झाली. आजही त्या प्रदीर्घ आठवणीचा पट डोळ्यासमोर फेर धरू लागतो अन् मन सुन्न होतं .
आज दहा मे, ग्रेस सरांची जयंती ! त्यांच्याच लेखणीतून प्रकटलेले वास्तव मनाला सांगत आहे, "भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते" !
-- उपेंद्र चिंचोरे
Copyright © 2025 | Marathisrushti