(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • संगीतकार श्रीकांत ठाकरे

    श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.

  • गीत एक – आठवणी अनेक : “आएगा आनेवाला”

    संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus "आएगा आनेवाला"

    *1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी "महल" चित्रपट लिहीला.

    * त्यातलं "आएगा आनेवाला" हे गाणं सात मिनीटं लांबीचं होतं. ते प्रेक्षकांना कंटाळवाणं होईल म्हणून पिक्चरमधून काढून टाका, अश्या सूचना अशोककुमारनी दिल्या . पण खेमचंदजींच्या आग्रहाखातर हे गाणं पिक्चर मध्ये राहिलं व त्याने इतिहास घडवला. हे गाणं रद्द करू नये म्हणून नवोदित गायिका लता मंगेशकर हिने अशोककुमार यांची भेट घेतली होती.

    * त्या काळात रेकॉर्डवर गायकाचं नाव छापायची पध्दत नव्हती . त्या व्यक्तिरेखेचं चित्रपटातलं नाव छापलं जात असे . त्यामुळे या रेकॉर्डवर लताचं नाव नसून "कामिनी" असं नाव आहे. त्यामुळे या गाण्याच्या रॉयल्टीसाठी लताला अनेक वर्ष झगडावं लागलं.

    * या गाण्याच्या वेळी खेमचंदजी गंभीर आजारी होते. आपला मृत्यू जवळ आला आहे असं त्यांना वाटायचं. रिहर्सलसाठी ते गाडीच्या मागच्या सीटवर झोपून येत असत. त्यांच्या या भावावस्थेमुळे गाण्याला असलेली गूढतेची किनार अधिकच गडद झाली .

    * हे गाणं पहिल्यांदा रेडिओ सिलोन वरुन प्रसारित झालं. तेव्हा 'ही गायिका कोण ?' असा प्रश्न विचारणा-या पत्रांचा पाऊस रेडिओ सिलोनवर पडला. त्यांनी मुंबईला HMV कडे चौकशी करून गायिकेचं नाव "लता मंगेशकर" असल्याचं जाहीर केलं.

    * पुढच्या वर्षी (1950) खेमचंद प्रकाश निधन पावले. त्यांचं वय होतं फक्त 43. त्यांना मूलबाळ नव्हतं . एका अनाथ मुलीला त्यांच्या पत्नीने सांभाळले होते व तिला स्वतःची मुलगी मानले होते . तिचे लग्न करुन दिले . मात्र शेवटची काही वर्षे खेमचंदजींच्या पत्नीला विपन्नावस्था आली. काही दिवस रेल्वे स्टेशनवर भीक मागून काढावी लागली. कालांतराने, Indian Performance Right Society ही संस्था, गायक व संगीतकार यांची जी गाणी रेडिओवर वाजतात त्याची राॅयल्टी वसूल करू लागली. "आएगा आनेवाला" या गाण्याच्या रॉयल्टीपोटी तब्बल 50 लाख रुपये बँकेत जमा झाले . परंतु खेमचंद प्रकाश यांना कोणीही वारस नसल्यामुळे ते तसेच पडून राहिले . त्यांच्या मानलेल्या मुलीचेही निधन झाले होते . 2001 च्या सुमारास तिच्या मुलाने ( कथ्थक शैलीचे प्रसिद्ध डान्सर राजकुमार झाबरा ) या 50 लाखासाठी कोर्टात दावा लावला . ( त्याचे पुढे काय झाले ते माहिती नाही)

    * आणि या गाण्याबाबतचा हा सुप्रसिद्ध किस्सा : वर्ष 1949. उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब आपले स्वरमंडल जुळवीत बसले होते. अचानक घरातल्या कोणीतरी ग्रामोफोनवर एक रेकॉर्ड लावली. आएगा आनेवालाचा पहिला भाग - खामोश है सितारे चुपचाप है जमाना

    सर्वसाधारणत: आेळीची सुरुवात करताना गायकाला एखाद्या वाद्यावर सूर दिला जातो व मग गायक आपला स्वर त्यात मिसळतो.

    परंतु इथे उलटाच प्रकार होता. लता प्रत्येक आेळीची सुरुवात कोणत्याही आधाराविना करत होती व मग वाद्ये त्यात आपले स्वर मिसळत होती. आणि तरीही स्वर संपूर्णपणे निर्दोष होते .

    खाँ साहेब अवाक झाले. त्यांनी स्वरमंडल बाजूला ठेवले. वारंवार ती रेकॉर्ड त्यांनी एेकली आणि चकीत होऊन उद्गारले.. " ये ससुरी तो कभी बेसुरी होती ही नहीं "

    या गाण्याने लता masses मध्ये लोकप्रिय झाली व classes मध्ये मान्यता पावली .

    माहिती संकलन : धनंजय कुरणे
    9325290079

  • अंपायर डेव्हिड शेफर्ड

    भरदार शरीरयष्टीच्या शेफर्ड यांनी १९८३ ते २००५ या एका तपाच्या कारकिर्दीत ९२ कसोट्या अन १७२ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पहिले. याशिवाय तब्बल १४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ग्लूस्टरशायरचे प्रतिनिधित्वही केले.

  • गझलसम्राट मेहंदी हसन

    गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थान येथे झाला. मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टार मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझलगायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. "गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे "फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपटगीत होते.

    "पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, "अब के हम बिछडे‘, "रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, "तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या. अब के बिछडे आणि पत्ता पत्ता बुटा बुटा या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय होत्या. मेहंदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहंदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    मेहंदी हसन यांच्या गाजलेल्या काही गझला
    https://www.youtube.com/watch?v=K-92Z3OXWZQ
    https://www.youtube.com/watch?v=_52zfKw5KoE&t=526s

  • प्रभात बँडचे संस्थापक मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर

    मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला.

    बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित नागेश खळीकर यांच्याकडे गायकी अंगाने वादनाचे धडे गिरवले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली लयकारी आणि मिंड यांतील बारकाव्यांचा अभ्यास केला. या दिग्गजांकडे मिळालेल्या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी क्लॅरोनेटसारख्या पाश्चात्त्य वाद्याला आपलेसे करीत ते जनमानसात पोहोचवले. परंपरावादी पुण्यात पाश्चात्त्य वाद्यांविषयी उत्सुकता निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी यानिमित्तानं केली. पाश्चात्त्य वाद्यातून भारतीय स्वर काढण्याचे कौशल्य त्यांना साध्य झाले होते. एकल वादनाच्या मैफलीतून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलीच होती. कुंदगोळ आणि पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवासारख्या मोठ्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी सातत्यानं वादन केले.

    प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात काम करताना ‘माणूस’सारख्या चित्रपटातही क्लॅरोनेट वाजवले होते. तसेच राम कदम, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, वसंत देसाई आदी संगीतकारांसह काम केले. ‘गुळाचा गणपती’, ‘बाळा जो जो रे’, ‘माहेरची साडी’, ‘राम लखन’ आदी अनेक चित्रपटांसाठीही वादन केले. एकल वादनातून मोठी लोकप्रियता मिळत असतानाही त्यांनी बँडकडे दुर्लक्ष केले नाही. उलट, या दोन्हीत योग्य तो समन्वय राखत त्यांनी दोन्ही गोष्टी जनमानसात पोहोचवल्या.

    प्रभात बँडने अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या बँडपथकाने मिरवणुकीमध्ये ब्रास असलेल्या वाद्यांवर मराठी गीतांचे वादन ही प्रथा सुरू केली. क्लॅरोनेटवादक म्हणून ख्याती असलेले बंडोपंत सोलापूरकर हे सॅक्सोफोन, ट्रम्पेट अशा ब्रासच्या वाद्यवादनासह अनेक वर्षे गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायचे. त्यांच्या कष्टांमुळे बँडसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळाली. बँडबरोबर राहात त्यांनी लग्नसमारंभ, गणेशोत्सवातही उत्साहाने वादन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मिरवणुकीत त्यांचे वादन हा आकर्षणाचा विषय असे. एखाद्या गायकाला महोत्सवांत सातत्याने गाण्याची संधी मिळते; पण बंडोपंतानी गाणगापूर आणि कुंदगोळच्या महोत्सवात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विनाखंड वादन करून अलिखित विक्रमच नोंदवला. त्यांच्या या संगीतसेवेसाठी अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. या पुरस्कारांबरोबरच त्यांना रसिकांच्या प्रेमाची दादही मिळाली.

    बंडोपंत सोलापूरकर यांचे २३ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.

  • कवी गंगाधर महांबरे

    गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. पुढे ते पुण्यास राहू लागले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

    उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत.

    त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे. सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे.

    चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २३ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता

    माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९३० रोजी साली रंगून, बर्मा येथे झाला. ब्रिटीश नौकेदाराकडून ते माउथ ऑर्गन वाजवण्यास शिकले. जपानी भाषा लिहिता आणि लिहिता यावे म्हणून भानू यांनी १२ व्या वर्षी जपानी सैन्यात इंग्लिश दुभाषी म्हणून काम केले. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब रंगून हून कोलकता येथे आले. कोलकातामध्ये त्यांनी तेल तंत्रज्ञान अभ्यास केला आणि नंतर काल्टेक्स कंपनीमध्ये नोकरीही केली. कोलकात्यात असताना भानू नाईटक्लब मध्ये माउथ ऑर्गन वाजवत असत. अखेरीस १९५९ साली मध्ये नऊ वर्ष कोलकाता येथे राहल्यानंतर भानू मुंबईसाठी रवाना झाले.

    संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या पैगाम चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. लवकरच त्यांनी बिपीन दत्ता आणि सलील चौधरी यांच्या बरोबर काम करण्यास सुरवात केली. व लोकप्रिय हिंदू माउथ ऑर्गन वादक अशी ओळख मिळवली. (त्या काळात ख्रिश्चन माउथ ऑर्गन वादक खूप होते.) पुढे ते गिटार पण शिकले, व त्यांनी आर.डी. बर्मन यांच्या कडे गिटारवादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यांनी अनु मलिक, नदीम श्रवण आणि बप्पी लाहिरी यांच्यासाठी माउथ ऑर्गन वादक व गिटारवादक म्हणून काम केले होते.

    भानू गुप्ता हे आर, डी,बर्मन यांचे जिवलग मित्र व सहकारी होते. त्यांनी शोले चित्रपटातील माऊथ ऑर्गन ची थीम वाजवली होती. भानू गुप्ता यांचे २८ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    https://www.youtube.com/watch?v=g6RDGEIY9Yo

  • सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

    विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.

  • ग. त्र्यं. माडखोलकर

    स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते.

    मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला. १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले.

    १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.

    बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ ग्लोबल मराठी वेब

  • ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे

    मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.

    संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले.

    डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट