(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • डॉ. डी. वाय. पाटील

    डी. वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. त्यामुळे अर्थात त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु होणं सहाजिक होतं आणि झालंही तसेच कोल्हापुरातून डी. वाय. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला.

  • मराठी कादंबरीकार रणजित देसाई

    देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या.

  • नाटककार व साहित्यिक प्रा.दिलीप परदेशी

    प्रा. दिलीप परदेशी यांचा कथा लेखना पासून प्रवास सुरु झाला. प्रा. परदेशी हे विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्गसन्‌ व बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी मराठी नाटकात स्वतःचीच वाट तयार केली. त्यांनी सुमारे तीसहून अधिक नाटक व एकांकिका लिहिल्या.

    राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सांगलीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीने त्यांची अनेक नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर करताना पुरस्कार पटकावले. त्यांच्या "काळोख देत हुंकार' या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक वर्ष तर असे होते, की त्यावर्षी अंतिम फेरीत महाराष्ट्रातील पाच नाट्य संस्थांनी नाटक सादर केले. चंदू पारखी, रिमा लागू, सदाशिव आमरापूरकर या यशस्वी कलावंताना त्यांच्या नाटकांमधून ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या "हम नौजवान' आणि "सच्चे का बोलबाला' या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.

    "सर्वमान्य नाटककार म्हणून प्रा. परदेशी यांनी महाराष्ट्रात लौकिक मिळवला. विदर्भात त्यांच्या नाटकांचा मोठा रसिकवर्ग होता. ते चांगले कवी होते, म्हणूनच नाटककार होऊ शकले. प्रयोगशीलता, व्यक्तीरेखेतील नेमकेपणा आणि प्रभावी संवाद लेखन ही त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये होती. त्यांची ४५ नाटके व ३०० कविता, ४० कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. महाद्वार, फिनिक्स, मन पिंजर्याचे, काळाजपूर्वा ह्या एकांकिका व स्व्पन एका वाल्याचे, काळोख देते हुंकार,गोष्ट तशी जुनींच पण....,तळहातीच्या नाजूक रेषा,मन धुवाधार, निष्पाप,थेंब थेंब आभाळ, अश्या अनेक प्रोयोगीक व व्यवसाईक रंगभुमीवरील नाटकांनी त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली.

    देवआनंद साहेब व दिलीप परदेशी यांचा विशेष स्नेह होता. देव साहेबांच्या हम नौजवान,व सच्चे का बोलाबाला या चित्रपटांच्या कथा व संवाद लेखन प्रा. दिलीप परदेशी यांनी केले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटात भूमिका पण केल्या आहेत. शेक्सपियरचे "ज्युलीयस सिझर' नाटक त्यांना मराठीत वेगळ्या ढंगात आणायचे होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी एका जाहीर समारंभात "मी तुम्हाला उद्याचा वसंत कानेटकर देतो' अशी शब्दात त्यांची ओळख करून दिली होती. प्रा.दिलीप परदेशी ४ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • कविवर्य प्रा.शंकर वैद्य

    वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. 'आला क्षण गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.

    शंकर वैद्य यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नव्या लेखक, कवींबरोबरच विद्यार्थ्यांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असायचा. केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते. शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते. त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. भूतकाळातील काव्य लेखनाचे अनेक किस्से ते साहित्य रसिकांपुढे जसेच्या तसे उभे करायचे. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

    २७ वर्षानंतर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली. शंकर वैद्य यांनी काव्य विश्वात स्वत:चा अमीट ठसा उमटवला होता. शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला..., स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई या त्यांच्या कविता आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कविता, कथांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतेही लिहिली होती.

    "गोष्ट धमाल नाम्याची‘, "चिमणराव गुंड्याभाऊ‘ या चित्रपटांतील गीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. कवी, गीतकार, सूत्रसंचालक, उत्तम वक्ता, समीक्षक, ललित लेखक असे ते बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. मा.शंकर वैद्य यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी सॅन होजे येथील पहिल्या विश्वर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मा.शंकर वैद्य यांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • वस्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर (‌कवी अज्ञातवासी)

    दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच कवी अज्ञातवासी हे कवी, काव्यसंग्रह संपादक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, म्हणून ओळखले जात असत. केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली मात्र मधल्या काळात म्हणजे १९२२ पासून त्यांनी एका खोलीत त्यांनी वस्तू संग्रहालय सुरु केले.

  • पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.

    ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक अॅtरेंजर केरसी लॉर्ड यांच्यासमवेत अनेक चित्रपटांत संतूरची साथ करणाऱ्या पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.

    भारतीय सिनेसंगीत क्षेत्रासाठी रविवार.. १६ ऑक्टोबरची सकाळ झाली; पण उजाडले नाही. कारण या दिवशी ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, अॅलरेंजर आणि जगन्मित्र केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.

    त्यांना सांगीतिक विद्वत्तेचा ‘सूर्य’ म्हणू या, की प्रत्येक कामात परफेक्शनिस्ट असलेले आणि नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहणारे, स्वत:च्या विधानावर ठाम असणारे म्हणून ‘पृथ्वी’ म्हणू या? की चंद्राच्या शीतलतेने सर्व सहकलाकारांवर, चाहत्यांवर प्रेम करणारे म्हणून त्यांना ‘चंद्र’ म्हणू या? नको.. इतके सर्व म्हणण्याऐवजी त्यांना ‘केरसीबाबा’च म्हणू या.

    माझ्यासाठी ते गुरू होते. मोठे भाऊ होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सच्चे मित्र होते. आमच्या कुटुंबासाठी ते केरसीकाका होते. मी नेहमी गमतीने म्हणायचो, ‘केरसीजींची मोठी चूक म्हणजे त्यांनी मला सिने म्युझिशियन असोसिएशन (CMA) च्या ऑडिशनमध्ये पास केले ही होती.’

    १९७४ ची गोष्ट. केरसीजी तेव्हा CMA चे पदाधिकारी होते. ऑडिशन कमिटीत होते. ज्येष्ठ वादक कलाकार परशुरामजी हेही केरसीजींसोबत होते. माझे नाव पुकारल्यानंतर मी संतूर घेऊन आत गेलो. सर्वाना वंदन करून मला जे येत होते ते वाजवायला सुरुवात केली. केरसीजी माझे निरीक्षण करत होते. परशुरामजी माझी उलटसुलट परीक्षा घेत होते. त्यांनी सांगितलेले सर्व म्युझिक पीसेस, अलंकार मी सहज वाजवत होतो. पहिल्या दिवसापासूनच मी बारा सूर मिळवूनच वाजवत असल्याने टय़ुनिंगमध्ये वेळ न घालवता परशुरामजींनी सांगितलेले सर्व स्वरयुक्त स्वरसमूह संतूरच्या काठय़ांतून निघत होते. त्यांना नापास करण्यासारखे काही सापडत नव्हते. तेव्हा बी ग्रुपचे ८५ रुपये व ए ग्रुपचे १०० रुपये मानधन होते. सर्वसंमतीने मला पास करण्यात आले. नवीन असल्याने बी ग्रुप द्यायचे ठरले. तेव्हा केरसीजी ठामपणे माझ्यामागे उभे राहिले. संतूरसारखे वाद्य टॅक्सीशिवाय नेणे शक्य नसल्याने आणि या वाद्याच्या वेगळेपणामुळे मला ए ग्रुपच मिळावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. आणि तेव्हाच मला जाणवले- ते माझे आहेत.. तेव्हापासून मी त्यांचा झालो.

    ते उत्कृष्ट ड्रम्स वाजवत. त्यांनी कॅस्ट्रोनट्स् टेंपल बेल्स, ग्लॉक्स (‘अभी ना जाओ छोड के’ गाण्यात) अशा विदेशी वाद्यांचा वापर पहिल्यांदा केला, हे सर्वपरिचित आहेच. सगळी वाद्ये वाजवणे हा त्यांच्या उजव्या हाताचा मळ असला तरी अॅिकॉर्डियन या वाद्यावर डाव्या हातानेसुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. डाव्या हाताने बेलोचा वापर ते श्वासानुरूप करायचे. डाव्या बाजूला न दिसणाऱ्या छोटय़ा बटणांवर गाण्याच्या हार्मनीप्रमाणे त्यांची बोटे केवळ स्पर्शाने शिताफीने फिरत. ‘आराधना’तील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात केरसींनी वाजवलेला अॅनकॉर्डियनचा पीस पुन्हा कधी ऐकायला मिळेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.
    केरसीजींच्या म्युझिक अॅ रेंजमेंटमध्ये चटकन् ओठावर येणारे गाणे म्हणजे मदनमोहन यांच्या ‘संगीत दिग्दर्शनातील ‘तुम जो मिल गये हो..’मध्ये (‘हॅंसते जख्म’) समुद्राच्या उफाळून येणाऱ्या उत्तुंग लाटांप्रमाणे केलेली व्हायोलिनची रचना ऐकून कधी कधी वाटते की, केरसीजींचे संगीत ऐकून समुद्रही आनंदाने उफाळून लाटारूपी स्वरतुषार आपल्या अंगावर शिडकावतो आहे! त्यांच्या व्हायोलिनचे पीसेस लाटांसारखे असले तरी त्यांनी कोणाचेच संगीत कधी लाटले नाही.
    ते संगीताचे ‘लॉर्ड’ होते हे सिद्ध करणारा सिनेमा म्हणजे ‘साथी’! नौशादजींचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे अॅररेंजर केरसीजी होते. यातली गाणी नौशादसाहेबांच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा वेगळी आहेत. विशेषत: ‘मेरे जीवनसाथी’च्या वेळी केलेला वेगळ्या पीसेसचा वापर, त्याहीपेक्षा ‘हुस्न जाना इधर आ..’ या गाण्यातले गिटारचे दोन स्ट्रोक एका वेगळ्याच हार्मनीचा वापर हिंदी संगीतसृष्टीला बहाल करून गेला. ‘ऑगमेंटेड’ हार्मनीचा वापर गाण्यात यापूर्वी अन् यानंतरही कधी झालेला नाही. असे ऐकले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनीही हे गाणे ऐकल्यावर केरसीजींना फोन करून कौतुक केले होते.

    ‘शालीमार’ चित्रपटाचे केरसीजींनी केलेले टायटल म्युझिक संगीत क्षेत्राला कोंदण देऊन गेले. अकरा मात्रांत रचलेला पीस भल्याभल्यांची झोप उडवून गेला. त्यातला इलेक्ट्रिक गिटारचा पीस, बाकी वाद्यवृंद अॅेरेंजमेंट आणि त्यात अकरा मात्रा.. मोजता मोजता काय होते, ते सभ्य भाषेत सांगणे कठीण आहे!
    पंचमदांचे (आर. डी. बर्मन) ते उजवा हात होते. तसे पंचमदांना बासुदा, मनोहरीदा, मारुतीराव कीर आणि केरसीजी असे चार उजवे हात होते. जसे केरसीजींनी सिंथेसाइझर पहिल्यांदा या क्षेत्रात आणला तसे एकोलाईट मशीनही त्यांनी प्रथम वापरले. म्हणूनच पंचमच्या गाण्यात ‘पंचम पंचम पंचम’ अशा प्रकारचे प्रतिध्वनी येऊ शकले. केरसीजींशिवाय पंचमदांचे रेकॉर्डिग म्हणजे तारांशिवाय पियानो. बदलत्या काळाबरोबर ते स्वत:ला नेहमी ‘अपडेटेड’ ठेवायचे. सिंथेसाइझर असो किंवा कॅमेरा असो, कम्प्युटर असो वा कोणतेही आधुनिक उपकण असो, जगात कोठेही निर्माण झालेली वस्तू दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे असायची. आजच्या तरुणांनाही लाजवील अशी तल्लख बुद्धी त्यांची होती.

    वेस्टर्न म्युझिकचे उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या केरसीजी यशस्वी कंडक्टर म्हणून ओळखले जात. उजव्या हातातल्या काठीने कंडक्ट करताना वादकांना त्यांनी योग्य जागी बसवलं, त्यांच्याकडून हवं ते वाजवून घेतलं आणि संगीत खुलवलं. पाश्चात्य संगीताचा गाढा अभ्यास असल्यामुळे भलामोठा वाद्यवृंद असो, टिंफनी असो, ड्रमसेट असो, फ्ल्यूट असो, पियानो असो; सर्वाना काठीच्या एका इशाऱ्यावर त्यांनी एकत्रित वाजवून घेतलं. त्यांचं स्टाफ नोटेशन लेखन अतिशय सुरेख असल्याने अन् ‘व्हाईसिंग’ (प्रत्येक वाद्यसमूहाचे योग्य संतुलन) योग्य असल्याने सर्व विभागांवर त्यांचे वर्चस्व होते. अंगात मूळचाच ताल असल्याने, त्यातही त्यांचे तबल्याचे शिक्षणही खाँसाहेब इनामअली यांच्याकडे शास्त्रोक्त झाल्यामुळे केरसीजींच्या प्रत्येक रचनेला तालाची, त्याच्या विशिष्ट ‘खंडा’ची झालर असायची.
    माझ्यातल्या कलेला वेगळ्या उंचीवर नेणारा एक प्रसंग आठवतो. ‘टच डाऊन’ नावाची एअर इंडियाची एक डॉक्युमेंटरी होती. त्याचा रिलीज जगभर होता. त्याचे पाश्र्वसंगीत केरसीजींनी केले होते. ८०-९० वादक होते. व्हायोलिन, व्हिओला, चेलो, डबल बेस.. सर्व वाद्यं होती. त्याव्यतिरिक्त ब्रास सेक्शन, ट्रंपेट, सेक्सोफोन वगैरे, सिल्वर फ्लूट, ड्रम, तबला, ढोलक.. साधारण पूर्ण सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. भारतीय वाद्यांत सितार, संतूर होते. निर्माता हैद्राबादचा रईस होता. सर्व वादकांची यादी पाहिल्यावर तो चकित झाला. संतूरला माझे नाव पाहून तो थबकला. (तेव्हा माझे नावही नव्हते अन् आडनावही झाले नव्हते.) त्यांनी केरसीजींना विचारणा केली. ‘‘यह कौन नया लडका है? आप पैसे की चिंता मत करो. जो भी चाहे वो बडे कलाकार को बुलाओ.’’

    केरसीजी म्हणाले, ‘नहीं. मेरा काम उल्हास ही करेगा.’ त्या निर्मात्याला हे चांगलेच झोंबले. केरसीजींनी त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष केलं. फक्त ते निर्मात्याला एवढंच म्हणाले, ‘रेकॉर्डिग के दिन आना और सुनना. बाद मे कहना.’ त्याकाळी ट्रॅक सिस्टीम किंवा डबिंग सिस्टीम नव्हती.

    शेवटी तो रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. पहिलाच पीस मला वाजवायचा होता. सर्व वाद्यवृंदाला आपापले पार्ट दिलेले होते. मला दिलेला पीस साधारण आपल्या जोग रागावर आधारीत होता. सुरुवातीला तो पांढरी दोनमध्ये होता. नंतर इतर वाद्यांच्या वेगवेगळ्या हार्मनीनंतर टायटलच्या शेवटी तोच पीस आता पांढरी एकमध्ये वाजवायचा होता.

    टेक सुरू झाला. सुरवातीला ४-४ च्या तालात मला ५ चा तुकडा वाजवायचा होता. येथे केरसीजी पुन्हा दिसले! पांढरी दोनमध्ये सुरू झालेला पीस संपूर्ण वाद्यमेळानंतर पांढरी एकमध्ये वाजवायचा होता. गुरुजनांच्या कृपेने पहिलाच टेक ओके झाला. केरसीजींनी निर्मात्याला जवळ बोलावले अन् म्हटले,
    ‘‘एक ही टाइम में पहले सफेद दो और आखिर में सफेद एक मे पीस बजाना था. ये काम सिर्फ उल्हास क्रोमेटिक पद्धतीसे बजाता है. उस में ही यह मुमकीन है. और कोई नहीं बजा सकता है, इसलिये उल्हास को ही संतूर के लिये बुलाया.’’ माझ्याकरता ही घटना पुरस्कारासारखीच होती.

    त्यांना चविष्ट खाण्याची आवड होती. ते कधी कधी सर्वासाठी पेडर रोडला कुठून तरी चिकन कटलेट आणि बुरून पाव मागवायचे. त्यांना खाण्यात.. तेही वाटून खाण्यात जास्त समाधान मिळायचे. लॅमिंग्टन रोडला ‘लीलाधर’मध्ये भेजाफ्राय खाणे त्यांना खूप आवडायचे. ‘लीलाधर’मध्ये गेल्या गेल्या वेटरला सूचना असे- ‘मेरे लिये भेजा फ्राय जास्ती रख देना. खतम नहीं होना चाहिये!’

    ‘महान’ सिनेमाच्या पाश्र्वसंगीतासाठी आम्ही चेन्नईला प्रसाद स्टुडिओत पंधरा दिवस गेलो होतो. ते पंधरा दिवस अत्यंत बहारदार होते. मला कॅरेमल कस्टर्ड खूप आवडतं. कोणत्याही हॉटेलात गेलं की मी प्रथम विचारायचो, ‘कॅरेमल कस्टर्ड है ना?’ एकदा केरसीजी इतके वैतागले! ‘अरे, पहले खाना क्या है वो सोच. पहले कस्टर्ड क्यों?’ त्या दौऱ्यात माझे नाव त्यांनी ‘केके’च ठेवलं होतं.

    ..अचानक फोनची बेल वाजली आणि मी गतकाळातून खाडकन् भानावर आलो. कानावर शब्द पडले, ‘‘हॅलो उल्हासजी, संध्याकाळी चार वाजता केरसीजींचे अंत्यदर्शन आणि अंत्यविधी आहे.’

    मनात आठवणींचे काहूर माजले असतानाच आम्ही उभयता वरळीला निघालो. अत्यंत आवडत्या केरसीजींच्या अंत्यदर्शनाला! गर्दीत वाट काढत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. चरणस्पर्श केला. त्या हार्मनीच्या राजाच्या चेहऱ्यावर हार नव्हती, तर सुरांना जिंकल्याचे समाधान होते. जणू तालाचा विचार करता करता आयुष्याची शेवटची सम आली होती.

    त्यांच्या तिन्ही मुली झरीन, परी आणि जास्मीन तिथं उभ्या होत्या. तिघींना भेटून निघताना अश्रू आवरेनासे झाले. जास्मीन म्हणाली, ‘’uncle Don’t Cry. He has gone to a better place.’’

    पं. उल्हास बापट
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • दादासाहेब तोरणे

    त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली. काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. 'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.

    या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. 'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे. 'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. दादासाहेब तोरणे यांचे निधन १९ जानेवारी १९६० रोजी झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सुप्रसिद्ध मराठी गायिका ज्योत्स्ना भोळे

    "बोला अमृत बोला...‘, "आला खुशीत समिंदर...‘ "क्षण आला भाग्याचा...‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणार्‍या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म दि ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती.

    वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले. ‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली.

    १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला. यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे. मा. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38

  • चित्रकार सावळाराम हळदणकर

    १९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मॉहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो. जलरंग व तैलरंगया दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावेत्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले; पण त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.

  • ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे

    ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले.

    संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

    बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.

    संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले. डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट