(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे

    ‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे उर्मिलाने कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी तिने प्राप्त केली आहे. ‘श्रृंगारमणी’ हे टायटल सुद्धा मिळालं आहे. अभिनयासोबतच ती क्लासिकल डान्स शिकवण्याचे सुद्धा काम करत असते.

    २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी महेश कोठारे हे नवीन चेहऱ्याचा शोघ घेत होते. त्यासाठी उर्मिला कामासाठी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी महेश कोठारे यांचे चिरंजीव आदिनाथ कोठारे तिच्या प्रेमात पडले. तिची नायिका म्हणून ती पहिली फिल्म होती. व ते त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होते. एकमेकांशी बरीच वर्ष डेट केल्यावर मग २० डिसेंबर २०११ ला ते विवाहबद्ध झाले. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे. झी मराठीवर दाखविल्या गेलेल्या असंभव या मालिकेत तिची महत्त्वाची भूमिका होती. उर्मिला कानेटकरला मला आई व्हायचयं या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार, व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा चित्रभूषण पुरस्कार मिळाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बॉलीवूडमधील मराठी चेहरा रितेश देशमुख

    रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले.

  • अभिनेत्री वैजयंती माला बाली

    एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.

    वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.

    त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.

    वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

    १९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

    देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.

    दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.

    १९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.

    वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-दिव्य मराठी

  • जेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर

    नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे बाबामहाराज सातारकर यांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.

    बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात. बाबामहाराज सातारकर यांची पुरस्कार यादी खूप मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. बाबामहाराज सातारकर यांचे संकेतस्थळ www.babamaharajsatarkar.com

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री स्मिता पाटील

    रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

    स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. 'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.

    वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : ग्लोबल मराठी

  • कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ

    अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला.

    मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले.

    खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते. परंतु त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चार पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले.

    यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली.

    १८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत.

    १९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली.

    खाँसाहेबांना दहाबारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्य म्हणजे त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. मंडळी आहेत.

    अल्लादियाखाँ यांचे १६ मार्च १९४६ रोजी निधन झाले. कोल्हापुरात देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • क्रिकेटपटू सिडने बार्न्स

    सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या

  • चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

    प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे मा.दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला.दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. मा. मा.दिनकर द. पाटील यांचा वडीलांना विद्यापीठ हायस्कूलचे ‘भक्ती ईश्वेराची-सेवा मानवाची’ हे ब्रीदवाक्य इतके आवडले, की त्यांनी दिनकरचे नाव त्याच शाळेत घातले. या शाळेत त्या वेळी मा.विनायक व मा.गजानन जागीरदार हे शिक्षक होते. मा. विनायक विद्यार्थ्यांना देशप्रेमाच्या कविता शिकविताना एखाद्या जहाल देशभक्ताप्रमाणे विलक्षण तेजाने तळपत. त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावली व त्यांच्यावर ‘साहित्याचे संस्कार’ घडविले. त्या काळात शाळा-कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते - वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके. विद्यापीठ हायस्कूलमधील साहित्याने झपाटलेले ‘साहित्यप्रेमी’ दर रविवारी विनायकांच्या घरी जमत. मा. विनायक त्यांना ‘किलरेस्कर’ मासिकात छापून आलेल्या फडके-खांडेकरांच्या कथा वाचून दाखवत. अशा प्रकारे दिनकरमधला साहित्यिक मा. विनायकांनी घडविला. पुढे उच्च शिक्षणासाठी दिनकरने राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे कादंबरीकार ना. सी. फडके व ‘प्रेमाचे शाहीर’ कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन त्यांना शिकवायला होते. त्यांच्या प्रेरणेने दिनकर लिहायला लागला. राजाराम कॉलेजच्या ‘राजारामियन’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. विद्यार्थीदशेतच त्यांनी सेवक, सत्यवादी अशा कोल्हापूरच्या वर्तमानपत्रातून लिहायला सुरुवात केली आणि लवकरच ‘किलरेस्कर’ मासिकाच्या कथास्पर्धेत दिनकरला ‘एरिना’ या कथेसाठी पहिला पुरस्कार मिळून तो मान्यवर लेखक झाला. याच सुमारास दिनकर ‘शारदा मंडळ’ नावाची एक साहित्य संस्था चालवित होते. त्या संस्थेने एकदा मुलींची वक्तृत्व स्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेत मुलींच्या शाळेतली सुमन शिंदे नावाची विद्यार्थिनी पहिली आली. दिनकर ‘शारदा मंडळा’चे प्रमुख असल्यामुळे, त्यांचा सुमनशी परिचय झाला. पुढे तो इतका वाढला, की दिनकर चक्क सुमनच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले. दिनकरच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण समजले, तेव्हा ते चिडले, पण दिनकर आपल्या निर्णयावर ठाम होता, त्यामुळे वडलांनी त्याला घराबाहेर काढले. मा. विनायक यांना हे समजताच त्यांनी दिनकरला बोलावून घेतले व त्यांच्या ‘हंस पिक्चर्स’मध्ये सहायक म्हणून दाखल करून घेतले. तेव्हापासून म्हणजे, सन १९४१ पासून ते विनायकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४७ पर्यंत सुमारे सहा वर्षे दिनकर विनायकांकडे होते. विनायकांच्या ‘हंस पिक्चर्स’ चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले व पुढे नवयुग बंद पडल्यावर, विनायकांनी स्वत:ची ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ ही नवी चित्रसंस्था कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत सुरू केली. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे ‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ’ व ‘चिमुकला संसार’ हे चित्रपट निघाले. दुसर्या् जागतिक महायुद्धामुळे त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने प्रत्येक चित्रपट संस्थेने ‘युद्ध प्रचार’ करणारा चित्रपट काढलाच पाहिजे, असा फतवा काढला. त्या वेळी विनायकांनी ‘बडी माँ’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘भारतमाता ही आपली आई आहे व तिचे रक्षण करताना प्राणार्पण करणे हा तिच्या पुत्राचा धर्म आहे’- असा ‘बडी माँ’चा विषय होता. या चित्रपटाची गाणी इतकी चांगली होती, की त्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीच एका धनिक इसमाने तो प्रचंड किमतीत विकत घेतला. त्या पैशातून मग विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे मुंबईला स्थलांतर केले. ‘प्रफुल्ल’चा सारा स्टाफ विनायकांनी मुंबईला आणला. त्या सर्वांची त्यांनी मुंबईला नाना चौकातील शंकरशेठवाड्यात राहायची सोय केली. दिनकररावही त्यांच्याबरोबर मुंबईला आले. मुंबईत विनायक ‘प्रफुल्ल’चा ‘मंदिर’ नावाचा एक चित्रपट तयार करीत होते. याचवेळी दिनकररावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक अतिशय हृद्य प्रसंग घडला. जुन्या ‘हंस पिक्चर्स’चे व्यवस्थापक वामनराव कुलकर्णी हे विनायकरावांना भेटायला मुंबईला आले होते. तिथे त्यांना दिनकररावसुद्धा भेटले. दिनकररावांची व त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी सहज दिनकररावांना विचारले, ‘तुझ्याकडे एखादी ठणठणीत स्टोरी आहे का?

    ‘खणखणीत म्हणजे’? दिनकररावांनी विचारले.. ‘अरे, खणखणीत म्हणजे बंद्या रुपयासारखी वाजणारी..’ वामनराव. ‘अच्छा.ऽ म्हणजे जिच्यावर चित्रपट धंदा करेल अशी!’ दिनकरराव.

    ‘करेक्ट! नाही तर मग हा धंदा करायचाच कशाला?’ वामनराव.

    दिनकररावांची ‘वाघ्यामुरळी’ नावाची एक ग्रामीण कथा त्या वेळी ‘किलरेस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती वामनरावांना दाखवली. त्यांना ती आवडली. त्यांना त्यांच्या ‘मंगल पिक्चर्स’ या नवीन चित्रसंस्थेसाठी पहिलाच चित्रपट काढायचा होता. या चित्रसंस्थेचे सूत्रधार होते बाबूराव पेंढारकर. त्यांनाही ही कथा खूप आवडली. इतकी की त्यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद दिनकररावांनीच लिहावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिनकरराव त्या वेळी विनायकांकडे ‘मंदिर’च्या कामात व्यस्त होते. त्यांनी विनायकांकडे पंधरा दिवस रजा मागून कोल्हापूरला जाऊन आपल्या ‘वाघ्यामुरळी’ या कथेवरून पटकथा-संवाद लिहून काढले. चित्रपटाचे नाव ठरले - ‘जय मल्हार’.

    बाबूराव पेंढारकरांच्या मनात या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांनीच करावे, असे होते. बाबूरावांनी मग विनायकरावांना भेटून तशी परवानगी मागितली. कारण, दिनकरराव त्या वेळी विनायकरावांकडे काम करीत होते; पण विनायकरावांनी बाबूरावांना स्पष्ट सांगितले - ‘दिनकर माझा सहायक आहे. त्याला दिग्दर्शक मीच करणार!’ नियतीचा खेळच इतका विचित्र असतो, की विनायकरावांचे हे शब्द लवकरच निराळ्या अर्थाने खरे झाले. मंदिर पूर्ण होण्याआधीच विनायकरावांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिलेला ‘मंदिर’ पूर्ण करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकररावांवर सोपवली. आणि अशा रीतीने विनायकरावांनी आपल्या मृत्यूचे मोल देऊन आपला शब्द खरा केला. त्यांनीच दिनकररावांना दिग्दर्शक केले!

    ‘मंदिर’पासून दिनकरराव दिग्दर्शक झाले, तर ‘जय मल्हार’पासून ते कथा-पटकथा-संवाद लेखक झाले. ‘जय मल्हार’पासून मराठीत लावणीप्रधान ग्रामीण चित्रपटांचे युग सुरू झाले. मराठी चित्रपट समीक्षक गमतीने म्हणाले, ‘जय मल्हार’पासून मराठी चित्रपट पाटलाच्या वाड्यात घुसला!’

    दिग्दर्शनाबाबतीत दिनकरराव विनायकरावांचे शिष्य होते. त्या वेळी दिग्दर्शनाच्या बाबतीत - भालजी पेंढारकर स्कूल, व्ही. शांताराम स्कूल व विनायक स्कूल ऐनभरात होते. दिनकरराव दिग्दर्शक म्हणून जरी ‘विनायक स्कूल’चे असले, तरी संवाद लिहिताना त्यांना भालजींची खटकेबाज शैली अनुकरणीय वाटली. दिनकररावांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलेय - ‘अनुकृती हा बाल्याचा, अनुरक्ती हा तारुण्याचा आणि अनुभूती हा प्रौढत्वाचा आत्मा असतो. या न्यायाने आताशा माझी म्हणून एक खटकेबाज संवादाची भाषा तयार झाली आहे. बाबांना (भालजी) ती पसंत पडली असावी. कारण, एकदा ते माझ्या माघारी बोललेले मला कुणी तरी सांगितले, बाबा म्हणाले होते - ‘माझे शिष्यत्व सांगणारे कुणी असोत नसोत; पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल, तर दिनकर पाटीलच!’

    खरी गंमत पुढेच आहे. भालजींनी त्यांच्या स्वत:च्या ‘मायबहिणी’ या चित्रपटाची पटकथा-संवाद दिनकररावांना लिहायला सांगितले. (कथा भालजींची होती) इतकेच नाही, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांवरच सोपवले होते. त्यावर दिनकररावांनी गमतीने लिहिलेय - ‘एकलव्याप्रमाणे बाबांचे शिष्यत्व मी पत्करले होते खरे, माझी तयारी पाहून गुरुदक्षिणेपोटी बाबांनी माझा अंगठाच कापून मागायला हवा होता. पण तसे काही न करता या आधुनिक द्रोणाचार्याने आपले धनुष्यच मला बहाल करून टाकले होते!’ ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून दिनकररावांनी चित्रनिर्मिती सुरू केली. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन (यात दहा अनुबोधपट होते) केले. साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच म्हणावी लागेल. पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर, प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. मा.दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / मा. मधू पोतदार

    दिनकर पाटील यांचे चित्रपट
    वरदक्षिणा
    https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o

    उमज पडेल तर
    http://www.dailymotion.com/video/xv8jdm_umaj-padel-tar_people

    मल्हारी मार्तंड
    http://www.dailymotion.com/video/xv5iza_malhari-martand_shortfilms

    जय मल्हार
    https://www.youtube.com/watch?v=y49H5kUndXU

  • शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

    स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.

  • २ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी

    वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

    त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

    त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

    कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

    त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या.

    त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.
    पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट