दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.
लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे मा.एन. दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. ‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. दत्ताजींचा स्वभाव विनम्र व भिडस्त असल्याने त्यांनी अशा गोष्टीचं भांडवल करून चालींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
‘टॅक्सी ड्रायव्हर’पासून एस.डी. बर्मन यांचे दुसरे साहाय्यक बनलेले जयदेव मात्र परखड स्वभावाचे असल्याने अशा गोष्टी ते स्पष्टपणे बोलून दाखवत. ‘बुजदिल’ व ‘जाल’ या चित्रपटांचे निर्माते असलेल्या फत्तेचंद यांनी एन. दत्तांची प्रतिभा ओळखली होती म्हणूनच १९५५ साली राज खोसला दिग्दर्शित ‘मिलाप’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. एन. दत्तांनी फत्तेचंद यांचा विश्वास सार्थ ठरवीत पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. या चित्रपटातील ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां’ ही लता मंगेशकर व हेमंतकुमारने वेगवेगळी गायलेली गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहां’, ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’ व ‘चाहे भी जो दिल तो जाना न वहां’ ही सोलो गाणी व रफीबरोबर गायलेलं ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ या युगुलगीताने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.
बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशा भोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते.
एरवी दोन गाण्यांतलं साधम्र्य सहजासहजी लक्षात येणार नाही अशी बहारदार सुरावट व ऑर्केस्ट्रेशनची ट्रीटमेंट एन. दत्तांनी या गाण्याला दिली आहे. कोरसचा कल्पक वापर, महेंद्र कपूरचं ‘हमिंग’, लता मंगेशकरांचे उन्मनी आलाप व लडिवाळ तानांची आतषबाजी मन मोहून टाकते. अंतऱ्यात एके ठिकाणी साहिरच्या ‘परछाईंयां’ या दीर्घ काव्यातल्या काही आशयघन ओळी ‘रवां है छोटीसी कश्ती.’ जेव्हा डोकावतात तेव्हा एन. दत्तांमधला संगीतकार ज्या हळुवार व तरल अंदाजात त्यांना स्वरात गुंफताना दिसतो, ते पाहून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. ‘दीदी’ (१९५९) या चित्रपटातली एन. दत्ता यांची ‘बच्चों तुम तकदीर हो कलके हिंदूस्तान की’ व ‘ मेरे भैया को संदेसा पहंचाना’ ही गाणी कमालीची गाजली. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.
१९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. ते राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव आहे.
एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 12, 2018
कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे
हा सूर्य सोडवीत होता...
पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ग्रेस यांचे कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)
ललितबंध संग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)
ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
https://youtu.be/pM3eOOP786w
भय इथले संपत नाही.
https://youtu.be/x88r7JI4ljU
तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
https://youtu.be/e_-9GiAMInY
May 10, 2017
बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाहीत, असे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होते. त्या काळात ‘सेव्ह’ नव्हतं. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की, बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंद गडे घडाघडा पाठ म्हटली जाते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणा-या वा-यावर, दशदिशांत आणि जगात सुद्धा आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते, याची ही कविता म्हणजे साक्ष आहे.
बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो .नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते. फ़ुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात.
"हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फ़ुलराणी ही खेळ्त होती"
बालकवी ठोंबरे यांचे निधन ५ मे १९१८रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.
February 28, 2022
भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत.
August 31, 2021
नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला.
नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच... कारण तो अभिनयसुद्धा करतो... आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर...
चुड़ैल हा कथासंग्रह असो किंवा बालगंधर्व'सारखी एका अवलिया कलावंताचा विशाल जीवनपट असलेली कादंबरी असो किंवा आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागल्या वास्तवाचं भीषण दर्शन घडवणारी 'एट एनी कॉस्ट' ही कादंबरी....
भडकमकर यानी लेखक म्हणून एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालायाचे स्नातक असलेले भडकमकर सतत कुठल्या ना कुठल्या 'लेखन' प्रयोगात व्यस्त असतात. पछाडलेला या चित्रपटा मध्ये "समीर" ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.
आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटाना अभिराम भडकमकरची पटकथा आहे. अभिराम भडकमकर यांनी आम्ही असू लाडके हा मराठी चित्रपट दिग्दर्शोत केलेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
http://www.abhirambhadkamkar.com/
January 7, 2019
सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
January 13, 2022
संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे.
January 15, 2019
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी झाला. मराठी चित्रपट सुष्टित संतोष जुवेकर यांना एक डैशिंग हीरो समजले जाते. या गोजिरवाण्या घरात'मधला शेखर असो, किंवा 'वादळवाट'मधला शैलेश, टीव्ही मालिकांतल्या संतोष जुवेकरच्या या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
संतोष जुवेकर यांनी त्यानंतर काही सिनेमे केले, नाटकातही तो चमकला. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 30, 2019
कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.
पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. मा.पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती.
एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.
पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.
‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti