(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • प्रसिद्ध हिंदी गीतकार हसरत जयपुरी

    प्रसिद्ध हिंदी गीतकार मा. हसरत जयपुरी यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी हे जयपुरचे. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. कॉलेज मधे असताना शेरोशायरी चा जबरदस्त नाद लागला आणि हसरत जयपुरी या टोपण नावाने प्रसिध्द झाले.

    हसरत जयपुरी हे जयपुरहून मुंबईत आल्यावर उदर निर्वाहासाठी बेस्टमधे कंडक्टर ची नोकरी स्विकारली. ते ऑपेरा हाऊस समोर खेळणी विकत असत. एके दिवशी म्युनिसीपालटीने त्यांची गाडी जप्त केली. अश्या अनेक अडचणीला तोंड देत असताना हिम्मत हारली नाही. कवी संमेलन, मुशायरा यात भाग घेतच राहीले. असाच एक मुशायरा असताना त्या ठिकाणी पृथ्वीराज आणि राजकपूर आले होते. हसरत यांची शायरी ऐकून प्रभावित झालेल्या पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या नाटक कंपनीत यायचे आमंत्रण दिले. इथे त्यांचे राजकपूर बरोबर सूर जुळले. राजकपूरच्या पहिल्या सिनेमात आग मधे त्यांना गाणे लिहायला मिळाले नाही. पण बरसात मधे त्यांची गाणी सर्वप्रथम सिनेमात आली. त्याचे पहिले गाणे जीया बेकरार है रेकॉर्ड झाले तेव्हा ते सुपर सिनेमात बुकिंग क्लँर्क होते. बरसात पासून शैलेंद्र, हसरत, शंकर, जयकिशन अशी विलक्षण चौकट जमली आणि राजकपूर चा परिस स्पर्श लाभला आणि ही चौकट रसिकांच्या मनात घट्ट बसली. बरसात ते कल आज और कल पर्यंत आर.के.फिल्म च्या प्रवासात शैलेंद्र आणि हसरत यांची घनीष्ट मैत्री शैलेंद्र च्या जाण्यापर्यंत अतूट होती. शंकर जयकिशन ते राहूल देव बर्मन पर्यैत असंख्य रोमँन्टीक रचना त्यांनी केल्या .त्यांचे सुपुत्र अख्तर जन्मल्यावर त्यांना पहायला गेले असताना अख्तर च्या डोळ्याकडे पाहून त्यांना सुचलेले तेरी प्यारी प्यारी सुरतको कितीतरी वर्षे रसिकांच्या ओठावर होते. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरवताना आलेल्या अडचणी मुळे तिला नैराश्य आले. तिला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी लिहीले सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी, कॉलेज मधे असताना राधा नावाच्या हिंदू प्रेयसीला लिहीलेले यह मेरा प्रेमपत्र पढकर गीत संगम मधे आले. मा. हसरत जयपुरी यांनी ६५ पेक्षा अधिक संगीतकारांबरोबर काम केले. मा. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला

    हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली. जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसत असे याचा. जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले.

    हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    हसरत जयपुरी यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=6yruKPUqlno&vl=hi
    https://www.youtube.com/watch?v=obQogKMYn0c
    https://www.youtube.com/watch?v=CmK-CaDdQRI

  • किराणा घराण्याचे गायक अच्युत अभ्यंकर

    अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेले अनेक वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठीसृष्टी

  • पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

    गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

  • कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

    प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

    कलाक्षेत्राची प्रदीप कबरे यांना सुरुवातीपासून आवड होती. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘वेटिंग फॉर घासलेट’ ही पहिली एकांकिका केली होती. ती ‘आयएनटी’मध्ये सादर झाली होती. व या एकांकिकेसाठी ‘आयएनटी’चं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्याच सुमारास त्यांनी ‘कोंडी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातही काम केलं. ‘आयएनटी’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा. या नाटकात सतीश दुभाषी, गणेश सोळंकी वगैरे तगडी स्टारकास्ट होती. रमेश पवार यांनी पिसाट खुनी रामन राघवच्या जीवनावर ’वरचा कानून’ हे नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये रामन राघवनची भूमिका अशोक सराफ करत होते. तर रमेश पवार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते. प्रदीप कबरे यांनी या नाटकात हवालदाराची विनोदी भूमिका केली होती. व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आलेकी स्वत:ची नाटय़संस्था स्थापन करावी.

    स्वत:ची नाटय़संस्था स्थापण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही. कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकीर्द जोरात धावू लागली होती. कमलाकर सारंग यांच्या ‘खोल खोल पाणी’, ‘सखारम बाईंडर’ आणि ‘जोडीदार’ या नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या. ‘माऊली प्रॉडक्शन’ची ‘कार्टी प्रेमात पडली’,‘ देखणी बायको दुस-याची’ आणि ‘दांडेकरांचा सल्ला’ ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली. बाळ कोल्हटकर लिखित ‘लहानपण देगा देवा’चं दिग्दर्शन त्यांनी केलं आणि याबद्दल कोल्हटकरांकडून दादही मिळवली. याच काळात सुधीर कवडी यांनी लिहिलेलं ‘बोल बाबी बोल’ हे नाटक प्रदीप कबरे यांच्या वाचनात आलं. यातली बॉबीची मध्यवर्ती भूमिका खूप सशक्त होती. प्रदीप कबरेंना ती आवडली, पण इतर कुठल्याही निर्मात्याने हे नाटक केलं असतं तर त्याने ती त्यांना दिली नसती. या बद्दल कबरे त्याचं कारण सांगताना म्हणतात, ‘‘त्यावेळी मी काही नावाजलेला नव्हतो. मला कुणाचं पाठबळ नव्हतं.

    माझ्याकडे एखादा ग्रुप नव्हता. त्यामुळे ते मीच करायचं ठरवलं. तत्पूर्वी हे नाटक मी माझा मित्र कमलाकर सारंगला वाचायला दिलं. कमलाकर माझ्यामागे उभा राहील, अशी मला आशा होती. त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं. आणि १९८७ मध्ये प्रदीप कबरे यांनी ‘गुरू प्रॉडक्शन’ची स्थापना केली. हे नाटक प्रेक्षकांना आवडलं. सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्यावर्षीचं राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनाचं पारितोषिक मिळालं.’’

    या नाटकाने कबरे यांना आर्थिक फायदा करून दिला नसला तरी लोकप्रियता भरपूर मिळवून दिली. त्यांच्या मध्यवर्ती भूमिकेचं कौतुक झालं. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘धांदलीत धांदल’ या दुस-या नाटकाची निर्मिती केली. राजा मयेकर, शेखर विश्वासराव, सुषमा तेंडुलकर, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर यांच्या भूमिका या नाटकात होत्या. बाबा पार्सेकर, कमलाकर केळुसकर, गिरिधर मोरे, प्रदीप रांजणकर, उल्हास सुर्वे, शरद विचारे यांच्या साथीने ‘गुरू प्रॉडक्शन’ची वाटचाल सुरू राहिली. ‘मनात माझ्या’ हे ‘गुरू’चं तिसरं नाटक. ते कबरे यांनीच लिहिलेलं. ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या इंग्रजी नाटकाचं ते रूपांतर होतं. या नाटकावरून ‘हाय मेरा दिल’ हे हिंदी नाटक आलं होतं. त्याच्या लेखकाकडून रीतसर परवानगी घेऊन कबरे यांनी त्याचं मराठी रूपांतर केलं होतं. स्मिता जयकरने या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘‘या नाटकाचे ५० प्रयोग झाले. आर्थिक गणित यावेळीही चुकलं तरी या नाटकाने मला बरंच काही शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाने प्रदीप कबरे यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी तिहेरी ओळख दिली.’’

    ‘गुरू’च्या वाटचालीत ‘हँडस अप’ आणि ‘चाफा बोले हा’ ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली. ‘हँडस अप’ नाटकाचे आजवर २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या.
    प्रदीप कबरे यांच्या ‘गुरू प्रॉडक्शन’ने आत्तापर्यंत नऊ नाटकांची निर्मिती केलीय.

    ‘गुरू प्रॉडक्शन’ ने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिलाय. ‘एप्रिल फूल’ या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलंच नाटक होतं.

    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या "मराठी नाट्य कलाकार संघा‘च्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेत्री एलिझाबेथ टेलर

    लिझ टेलरचे सौदर्य हाही एक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळी चर्चेचा विषय होता. ‘ ‘ क्लियोपात्रा ‘ मधील गालिच्यांमधून होणारी तिची ‘ एन्ट्री ‘ आजही कोणीही जाणकार विसरू शकत नाही.

  • एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे

    महाराष्ट्रातल्या एकपात्री प्रयोग करणाऱ्या प्रमुख पाच-सहा नावांमध्ये डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची गणना होईल. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए., पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

    १९८० ते २००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात विविध विषयांवर चर्चासत्र, शिबिर त्यांनी आयोजित केली. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द होती. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. डॉ. देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. . ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.

    लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड..'च्या सुमारे २८०० प्रयोगांतून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच; पण या नाटकाला खरोखरीच सातासमुद्रापार लंडनला नेलं होतं. अफाट उर्जा आणि दर्जेदार अभिनयानं एक अख्खं कथानक ते सहजगत्या उभं करायचे. 'लंडनला शिकायला गेल्यावर तिथ जुडीच्या प्रेमात पडलेला काशीनाथ', 'मला बोलीलं का बाप्पा', असं सारखं बोलून बाप्पाला भंडावून सोडणारा बबन्या, 'मायवं हे बुईंग वर गेलं आनी पल्डं तंर', असे प्रश्न करीत विमानात सगळ्यांच्या छातीत धस्स करणारी अनेक कार्टी, 'वंस, सासूबाई, सून यांच्यातील रुसवे फुगवे', हे असं सारं म्हणजे थोडक्यात गावच्या भाषेत ज्याला आपण 'बारदान' अं म्हणतो ते अख्ख मराठवाड्याचं गाव आणि जोडी इंग्रजीची फोडणी देणारे ज्युडी, जानराव या सगळ्यांना घेऊन डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्यरसिकांना प्रचंड हसवलं, रडवलंही.

    ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री नाटय़प्रयोगाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यांनी नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे या नाटक सध्या संदीप पाठक करत आहे. त्यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि नागपूर या संस्थेवर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.

    १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या अपना उत्सव या राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात त्यांनी कला दिग्दर्शन केले. १९८७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात समन्वयक म्हणून कार्यरत होते. १९८८ मध्ये झोपडपट्टी भागात साक्षरतेचे वर्ग घेण्यात ते आघाडीवर होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत औरंगाबादेत कला आणि नाटय़ प्रदर्शनाद्वारे साक्षरता अभियानात संचालक म्हणून कार्यरत. केंद्र शासनाच्या नाटय़ विभागातर्फे कलावंत निवडण्याच्या समितीत सदस्य म्हणून सहभाग. ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९९९ मध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित पहिल्या राष्ट्रीय थिएटर महोत्सवात ते सहभागी होते.

    'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' ने गौरव केला होता. स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, बेंडे स्मृती पुरस्कार, पुणे महानगरपालिका पुरस्कार, पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार, मुंबईत उत्तुंग पुरस्कार, मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार. छत्रपती शाहू महाराज पुरस्कार. अखिल भारतीय नाटय़संमेलन ठाणे आणि नाशिक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकांकिका महोत्सवात पुरस्कार, मुंबई आकाशवाणीतर्फे पुरस्कार, सजाजीराव महाराज पुरस्कार (बडोदा) , कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार, नाटय़ क्षेत्रात केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

    प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक
    https://www.youtube.com/watch?v=atIEn0ODN5k
    https://www.youtube.com/watch?v=hVEu5uWb18E

  • संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमदखान पठाण उर्फ डॉ. यु. म. पठाण

    संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे.

  • जेष्ठ संगीतकार गुलाम मोहम्मद

    बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांना साधत असे. जसा अगदी आगगाडीच्या शिट्टीचा वापर त्यांनी पाकीजा मध्ये कल्पकतेने वापर करून घेतला होता. “चलते चलते” या गाण्याच्या शेवटी, किंवा “मौसम है आशिकाना” गाण्याच्या आधीचा पक्षांचा तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.

    ते नौशाद यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर मा.गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती इतकीच काय ती जमेची बाजू. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी त्या पैकी मिर्जा गालिब आणि पाकीझा हे चित्रपट खूप गाजले. पाकीझा चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. त्याची अनेक वेगवेगळी कारणे होती पण या चित्रपटासाठी संगीत दिलेले मा.गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले. या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली तरी या कापलेल्या गाण्यांची HMV कंपनीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. पण मिर्जा गालिब च्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रचंड गुणवत्ता आणि जीव ओतून घेतलेल्या मेहनतीला यशाने दरवेळी दिलेल्या हुलकावणीचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल. पाकिजाचे चित्रपटाचे वास्तविक संगीत मा.गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी मा.गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.

    गुलाम मोहम्मद यांचे निधन १७ मार्च १९६८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेली काही गाणी.
    ये दुनिया है यहां प्यार करना किसको आता है.
    किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ.
    अखियां मिलाके जरा बात करो जी
    जिंदगी देनेवाले सून
    मोहब्बत की धून
    चल दिया कारवां
    शिकायत क्या करू दोनो तरफ गमका फसाना है.
    आपसे प्यार हुआ जाता है.
    दिल गमसे जल रहा है जले पर धुआँ न हो.
    चलते चलते
    मौसम है आशिकाना

    गुलाम मोहम्मद व लता मंगेशकर भाग १ ते ३
    https://youtu.be/4ECx3z4I4JI

    https://youtu.be/QRtbmXkIr-I

    https://youtu.be/maQGsGB_3v4

    मिर्झा गालीब मधील गाणी.
    https://youtu.be/_BJcfx8EiDY

  • बंडखोर लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडूलकर

    विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.

    प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका - अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या. वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. 'तो राजहंस एक' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी 'बेबी', 'एक हट्टी मुलगी', 'सखाराम बाईंडर', 'कन्यादान', 'कमला', 'गिधाडे', 'फुलराणी' आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या 'कळी एक फुलत होती' या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चतर्जींनी तिला 'रजनी' या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी 'प्रिया तेंडूलकर टॉक शो' सुरू केला. या 'शो'त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर 'अडोस-पडोस', 'जिंदगी', 'खानदान', 'बॅ. विनोद', 'हम पाँच', 'दामिनी' यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.

    श्याम बेनेगल यांना १९७४ साली 'अंकुर' चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. 'गोंधळात गोंधळ', 'माळावरचं फूल', 'मायबाप', 'देवता', 'राणीने डाव जिंकला', 'मुंबईचा फौजदार', 'माहेरची माणसं', 'सस्ती दुल्हन महँगा दुल्हा', 'कालचक्र', 'माझं सौभग्य', 'हे गीत जीवनाचे', 'और प्यार हो गया', अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.

    आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. 'जगले जशी', 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जावे तिच्या वंशा' आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.

    प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखिका रोहिणी निनावे

    दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच.