पी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. एवढंच नव्हे, पीएच.डी. केली आहे.
July 31, 2021
सलील अंकोला यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर ते अभिनयाकडे वळले.आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला.
March 1, 2024
१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
१९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले.
मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले.२०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 8, 2017
नटसम्राट हा चित्रपट गेल्यावर्षी १ जानेवारीला नाना पाटेकरांच्या वाढदिवशी प्रदर्शीत झाला होता.
नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही.
यशाच्या अत्तुच्य शिखरावर पोहोचल्यानंतर, वृद्धापकाळात तेच यश एक शाप ठरावे अशी गाथा असलेल्या कलाकाराची भूमिका वठावणे हे एक शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. नाना पाटेकरांनी साकारलेले गणपतराव वयाच्या साठीत कलेच्या ४० वर्ष सेवेतून निवृत्त होतात. एक असा नट ज्याने हॅम्लेट, सिजर, ओथेल्लो आणि अशी बरीच मात्तबर पात्रे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. नाना पाटेकर कलाकार म्हणून महान आहेच. पण आज महेश वामन मांजरेकर यांच्यातला दिग्दर्शक जिंकला असे वाटते. एखादी महान कथा हाताळणे म्हणजे शिवधनुष्य! त्यातूनच नाना पाटेकर यांचा सारखा कलाकार ! लहानपणी डॉ.लागूं चे नाटक पहिले होते. तत्कालीन कलाकार हे फक्त कलेला वाहून घेणारे होते. त्यांना व्यवहारज्ञान नव्हतेच. मग ते काल्पनिक गणपतराव बेलवलकर असोत, किंवा बालगंधर्व , दादासाहेब फाळके या सर्व लोकांनी जी कला लोकांसमोर सादर केली याची तोड नाही.असो ! एक सर्वोत्कृष्ठ चित्रपट सहकुटुंब पाहून वर्षाची सुरुवात छान झाली.
खूप खूप आपल्या रडवतो हा चित्रपट !
अगदी नाना च्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं... वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्याा आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! विक्रमजी गोखले आणि नाना पाटेकर कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावादिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना पाटेकर वेगळ्याच उंचीवर नेतात, नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना पाटेकर यांनी लीलया रंगवली आहेत. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे.
"कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय"
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 1, 2018
जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आणि नाटके पाहिली तर मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यात दिसतात.
August 28, 2021
भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
July 21, 2021
कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा.
अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.
मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.
पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही त्यांचा तजेलदार चेहरा, नीटनेटका पोशाख, मुख्य म्हणजे गळय़ातली टाय नजरेत भरते.
‘‘टेलिफोन बिझनेसमध्ये टाय लावायला शिकलो.’’ सव्वीसाव्या मजल्याच्या छोटेखानी टेरेसवर फोटोशूटसाठी संपूर्ण सहकार्य करत दीपक कुलकर्णी क्षणार्धात गप्पांच्या मूडमध्ये शिरतात. ‘‘टेलिफोन पुसत असताना ओळखी होत गेल्या. ‘ब्ल्यू डायमंड’चे पी. एल. किलरेस्कर म्हणाले, ‘तू ताजला का नाही जात? मी चिठ्ठी देतो, तुझं काम होईल.’ मी गेलो. हातात किलरेस्करांची चिठ्ठी. अंगावरचा वेश गबाळा. हाफ बुश शर्ट, बिनइस्त्रीची बेलबॉटम, पायात स्लीपर्स. दरवाजातच अडवलं. गुरख्यासाठी पेहेरावाचं इम्प्रेशन अधिक महत्त्वाचं होतं. पुन्हा किलरेस्करांसमोर उभा राहिलो. त्यांनी तिथल्या तिथे शंभर रुपये काढून दिले. म्हणाले, ‘आजपासून स्वच्छ इस्त्रीची पॅण्ट. फुल शर्ट, पायांत बूट, चप्पल विसरायची आणि टाय वापरायची. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखा वेश हवा. कुणी अडवणार नाही.’१९७१-७२ ची ही गोष्ट असावी. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून आजतागायत टाय लावला आहे. मधल्या काळात काढला होता. १९८० साली बिल्डर झालो, तेव्हा पांढरा सफारी चढवला. टिपिकल बिल्डरचा ड्रेस. गळय़ात गोफ एकदम झकपक. सलमान खानच आम्ही जणू. मग माझ्या लक्षात आलं, आपण लोकांपासून दूर जातोय. नाइलाज म्हणून लोक येतायत, धंदा होतोय, पण लोकांना आपलेपणा वाटत नाहीय. पुन्हा जुन्या पेहेरावावर आलो.’’
आज कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दीपक कुलकर्णी यांनी सुरुवात कशी व कुठून केली? त्यांचा पहिला बिझनेस कोणता? कुलकर्णी तपशीलवार सांगू लागतात.
‘‘वडील पोलिस खात्यात. आई शिक्षिका.
आई बिचारी दिवसभर कष्ट करायची. आम्ही तीन भाऊ, आमची एक बहीण. आमची आई सकाळी निघायची, आमचा पूर्ण स्वयंपाक करून. शिकवण्या, शाळा, पुन्हा शिकवण्या. घरी येताना बेतलेले कपडे घेऊन यायची. आमच्याकडे हप्त्यावर घेतलेलं शिलाई मशीन होतं. बेतलेले कपडे म्हणजे लहान मुलांच्या चड्डय़ाबिड्डय़ा. त्या शिवून दिल्या की, डझनाला सहा आणे मिळत. तिचा दिवस कष्टात निघून जायचा. आम्ही म्युनिसिपल शाळेत. पंचवीस नंबरची शाळा. आमचं घर म्हणजे जेमतेम दीड खोली. शाळा सकाळ-दुपार शिफ्टमध्ये, उरलेला वेळ मित्रांसोबत.
माझ्या मित्रांच्या वडिलांचे छोटे-मोठे व्यवसाय होते. एकाची चन्यामन्या फुटाण्याची गाडी होती. दुसरा सुगंधी सुपाऱ्यांच्या पुडय़ा भरत असे. मग मी एकासोबत चन्यामन्याची गाडी लावायचो, शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेसमोर आणि दुस-याला सुपारीची परात भरायला मदत करायचो. माझ्या दोन्ही मित्रांचे वडील महिन्याला दोन-तीन रुपये देत.
अशा प्रकारे मला दरमहा पाच ते सहा रुपये मिळू लागले. दिवाळीत आमचे वडील आम्हा चार भावंडांना मिळून पाच रुपयांचे फटाके आणत. आम्ही त्याची वाटणी करत असू. मग मी म्हणायचो, ‘दादा, माझेपण सात रुपये आहेत. पाच रुपयांचे तुम्ही फटाके आणा. सात रुपयांची आपण घरासाठी एखादी छान वस्तू आणू.’ तो आनंद वेगळा होता.’’
सोळाशे कोटींचं साम्राज्य असणाऱ्या दीपक कुलकर्णीच्या डोळय़ांत सात अधिक पाच रुपयांचा ‘तो’ आनंद चमकून जातो.
‘‘मी पेपर टाकण्याची लाइन निवडली. ही माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची
नोकरी. पाच किंवा दहा रुपये महिन्यावर (आता नक्की आठवत नाही) मी पेपरवाला पोऱ्या झालो. १९५८-५९ सालची गोष्ट सांगतोय मी. एकदा कधी तरी मी साडेपाचऐवजी सव्वासहाला पोहोचलो. मालकाने खाडक्न माझ्या मुस्काटीत मारली. ‘ही काय यायची वेळ झाली? माझं गिऱ्हाईक गेलं.’ त्या दिवशी माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली. मुस्काटीत खाल्ली. अपमान झाला. माझी स्वत:ची पेपर लाइन काढली. तो माझा पहिला व्यवसाय.
होलसेलवर पेपर घ्यायचो, कमिशन मिळायचं. पूर्वी अकरावी (मॅट्रिक) चा रिझल्ट पेपरमध्ये छापण्याची पद्धत होती. मॅट्रिकचा रिझल्ट सायकलला बांधला. कॅम्पात जाऊन एक आरोळी ठोकली की, दहा मिनिटांत चटणीसारखे पेपर संपायचे. चार आण्याचा अंक बारा आण्याला विकला जात असे. त्या दिवशी ‘प्रीमिअम’ काय असतं, ते लक्षात येत असे. आम्ही त्या दिवसाची वाट बघत असू.
एका वर्षी पायजम्याच्या दोन्ही खिशात मिळून ऐंशी रुपये होते. सगळी चिल्लर, मी दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. त्यापुढे आजचे आठ की सोळा की बत्तीसशे कोटी रुपये फिक्के आहेत.’’
दीपक कुलकर्णी थांबतात. आज मागे वळून पाहताना, व्यवसायात मिळालेला टर्निग पॉइंट त्यांना नेमका कोणता वाटतो? ठराविक एखादा प्रसंग किंवा घटना, ज्यामुळे त्यांचा
भविष्यातला मार्ग सुकर झाला.
‘‘ एम. एस. कॉलेजला प्री-डिग्री (किंवा एफवाय)ला असताना आम्हा विद्यार्थ्यांना सुट्टीत दीड-दोन महिन्यांकरिता एखाद्या कारखान्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंगला पाठवत. मला ‘किलरेस्करऑइल इंजीन’मध्ये पाठवण्यात आलं. तळमजल्यावर त्यांचं टेलिफोन एक्सचेंज होतं. मोठे लाकडी बोर्ड, जाड सुतळीच्या वायर्स, कानाला भलेमोठे ‘इअरफोन्स.’ सोनपट्टी नावाचे इन्चार्ज होते. म्हटलं, ‘मला शिकवाल का?’ पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्या तोंडाजवळ (इअरफोनसकट) माईक धरला आणि मी तोंड वळवत हाताने तो ढकलून दिला. त्याला डेटॉलचा उग्र वास येत होता. दर तीन मिनिटाला ऑपरेटर बदलला जात असे आणि टेलिफोन पुसून आत डेटॉलचा बोळा ठेवण्यात येई. माझ्या मनात विचार आला की, डेटॉलऐवजी यात अत्तराचा बोळा ठेवला तर?
माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं. मैत्रीण म्हणजे जिच्यावर मी प्रेम केलं आणि विसाव्या वर्षी जिच्याशी लग्न केलं ती, माझी मैत्रीण- (पत्नी) ज्योती. तिने माझी कल्पना उचलून धरली. एफवायला आमचं प्रेम जमलं. तिची आर्थिक परिस्थिती बिकट.आम्ही गुपचूप लग्न केलं. मी माझ्या घरी परत आलो आणि ती नारायण बागेतल्या महिलाश्रमाच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मी सेकंड इअर बीकॉमला. मला नोकरी नाही. पेपरची लाइन टाकणं हा काही बिझनेस होऊ शकत नव्हता. मी कोणत्या तोंडाने आई-वडिलांना सांगणार होतो? त्यातून माझ्या मोठय़ा भावाचं आणि मुख्य म्हणजे मोठय़ा बहिणीचं लग्न व्हायचं होतं.
टेलिफोनची आयडिया मी माझ्या पत्नीला सांगितली आणि आज इतक्या वर्षानी मी उघडपणे सांगू शकतो की, तिने ती आयडिया डेव्हलप करून पूर्णत्वाला नेली. भांडवलाची आवश्यकता होती. ६५ ते ७० रुपये आणायचे कुठून? तिच्या वडिलांनी तिला कानातले इअरिंग्ज दिले होते, तिच्यापाशी ट्रान्सिस्टर होता.
तिने दोन्ही गोष्टी विकल्या. ७२ रुपये मिळाले. ते आमचं पहिलं भांडवल. आमचा पहिला बिझनेस सुरू झाला. ‘टेलिफोन क्लिनिंग सव्र्हिस’- ‘टेलिस्मेल.’ तो कमालीचा क्लिक झाला. पुण्यात एकमेव ‘टेल्को’ वगळता बाकी सर्व इंडस्ट्रीत आम्ही जात होतो. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडली, तर सगळय़ा बँकांच्या शाखांचे टेलिफोन आम्ही पुसत होतो.
अत्तराचा वास, सात दिवस टिकत असे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून चार वेळा एक फोन पुसायचे आम्हाला तीन रुपये मिळत. फोन जास्त असतील, तर दोन ते अडीच रुपये. दिवसाला दीडशे फोन आम्ही दोघं मिळून सहज पुसत असू. आमचा टर्नओव्हर होता दिवसाला सरासरी पंच्याहत्तर ते शंभर रुपये . महिन्याला सरासरी दोन हजार रुपये. दोन हजारांत नेट प्रॉफिट होता बाराशे ते चौदाशे रुपयांचा.
मी १९७० सालातली गोष्ट सांगतोय. बँकेचा मॅनेजरदेखील तेव्हा दरमहा हजार-अकराशे रुपये कमावत होता आणि मी बीकॉमच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी. बाराशे रुपये कमावत होतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे झोपही छान लागत होती.’’
बिल्डर व्यवसायात शिरण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण झाली?
‘‘गरजेपोटी मार्ग सापडत जातात. मला ऑफिस हवं होतं. स्वस्तात कुणी टेबलस्पेस देईल का, या शोधात होतो. अलका टॉकीजशेजारी एका ऑफिसमध्ये टेलिफोन पुसायला जात होतो. त्या मालकाला विचारलं- तो म्हणाला, ‘जागेला रंगबिंग लाव, इंटिरिअर कर. मग तू बस.’ इंटिरिअर डिझायनरचे पैसे परवडेनात. मग मीच रंगाचं कॉण्ट्रॅक्ट घेतलं. ६६ रुपयांत काम झालं. कॉण्ट्रॅक्टरने स्क्वेअर फूटच्या हिशेबाने घेतले असते १०० रुपये. जवळपास चाळीस टक्के फायदा. मी या धंद्यात शिरलो. ‘पेंट ऑल’ ही माझी कंपनी होती. एकदा किलरेस्करांचा बंगला रंगवताना डोक्यावरचं छप्पर गळायला लागलं. (फॉल्स सीलिंग) त्यांचे इंजिनीअर वगैरे आले. मला म्हणाले, ‘दहा दिवसांनी या, आधी सीलिंग नीट होऊ दे.’ म्हटलं, भविष्यात आपण वॉटर प्रुफिंग करून द्यायचं. अनेक ठिकाणी रंगाऱ्यासह ठरलेल्या तारखेला उपस्थित राहिलो की, फ्लॅटमालक सांगणार, ‘पुढल्या आठवडय़ात या.
अजून फर्निचर व्हायचंय.’ रंगाऱ्यांची मजुरी घरबसल्या अंगावर पडू लागली. मनाशी ठरवलं, आपणच फर्निचर करायचं. वॉटर प्रुफिंग, प्लम्बिंग, जुनी फरशी बदलून देणं (फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी मी करू लागलो. १९७३ ते १९८० घरातला कोपरा न् कोपरा दुरुस्त करू लागलो, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, लोकांनी बिघडवलेलं घर दुरुस्त करण्यात आपली ताकद घालवतोय. त्याऐवजी स्वत:च घर बांधू लागलो तर? आणि ८० साली मी बिल्डर झालो. ‘अर्बन लॅण्ड सीलिंग’ होतं.
३३०, रास्ता पेठ. मी विकत घेतलेला पहिला वाडा आजही माझ्या डोळय़ांसमोर आहे.’’ बोलता बोलता दीपक कुलकर्णी थांबतात. त्यांना पुढच्या अडीच तासांत कफ परेडहून पुणे गाठण्याची घाई असते. ‘‘एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नाही आलात, तर मी पंक्तीला बसणार नाही.’ ही माझी कमाई आहे. फ्लॅटहोल्डर्स मला ‘आपले’ वाटतात. त्यांच्या घरी जातो, बसतो, कांदे-पोहे खातो. एरवी बिल्डर आणि फ्लॅटहोल्डर्स यांचा काडीचा संबंध उरत नाही, म्हणूनच आजच्या मंदीचा आमच्याशी काही संबंध नाही.
आमचा अलिखित नियम आहे- ‘इन्व्हेस्टर्स- ब्रोकर्स नॉट अलाऊड.’ ब्रोकर्सना आम्ही फ्लॅट विकत नाही. बिझनेसच्या चौकटीबाहेर खूप गोष्टी करायच्या आहेत. मला लेखन करायचंय, मला (ओल्ड) महाबळेश्वरला जाऊन लेखन करायला आवडतं. चालणं हा माझा छंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माझी भक्ती आहे. विज्ञानावर निष्ठा आहे.
अगदी माझा पहिला खरेदी केलेला रास्ता पेठेतला वाडा, अपशकुनी म्हणून इतर बिल्डर्स नाकारत होते, मी घेतला तोही विज्ञानाच्या निष्ठेपोटी. दोन इच्छा प्रबळ आहेत. अमेरिकेतलं ‘मॅन हॅटन’ म्हणजे आम्हा बिल्डर लोकांची काशी, पंढरी. तिथे दीडशे मजल्यांची बिल्डिंग बांधायची आहे. ऑलरेडी न्यू जर्सीपर्यंत पोहोचलोय आणि दुसरी इच्छा म्हणजे मला पेढी काढायचीय- ‘दीपक सखाराम आणि मंडळी, सोन्या-चांदीचे व्यापारी’ अशी बाहेर पाटी हवी. मला छान तलम धोतर नेसायचंय, जुन्या काळातला डगला शर्ट घालायचाय, डोक्यावर टोपी घालून पेढीवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचंय.’’ क्षणभर पॉझ घेतात, डोळे मिचकावून मिश्कीलपणे म्हणतात, ‘‘आणि सध्या मी पुण्याला निघालोय. शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाला, नाही तर त्याला वाईट वाटेल.’’ सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक, चालक, सर्वेसर्वा एका शेतकऱ्याचं मन राखण्याकरिता म्हणून पुण्याच्या वाटेने भरधाव सुटला. हीच ओळख कायम राहावी याकरिता कायम झटत असतात आणि घरापेक्षा घरपण राखलं जावं म्हणून जिवापाड मेहनत करतात पुण्याचे दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.
March 12, 2017
सामाजिक सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मैलाचा दगड बनलेले गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला. हे नाटक रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास घडवला. बालिका-जारठ विवाहांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येला वाचा फुटली. या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या विवाहाच्या किमान वयाचा कायदा करावा लागला. तो आजतागायत लागू आहे.
या नाटकातील अनेक पदे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. `म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान' हे पदविनोदाचा एक मैलाचा दगड मानले जातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 15, 2018
मूकचित्रपटाचे नायक भाऊराव दातार यांचा जन्म १४ जानेवारी १९०३ रोजी सातारा येथे झाला. कृष्णाजी विश्वनाथ दातार ऊर्फ भाऊराव दातार यांचा जन्म एक श्रीमंत कुटुंबात झाला पण काही कारणाने त्यांच्या वडीलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि त्यांना नाशिकला जाण्यास भाग पाडले. तेथे त्यांच्या वडिलांनी विजयनंद थिएटरच्या जवळ एक चहाचे दुकान सुरु केले. आपल्या वडिलांना चहा देण्यासाठी मदत करताना, भाऊराव दातार यांनी मास्टर दीनानाथ आणि बाल गंधर्व यांच्यासारख्या नामवंत कलावंतांचे अभिनय बघीतले आणि ते अभिनयाकडे आकर्षित झाले आणि त्यातून ते अभिनयनाचा पहिला धडा शिकला. अभिनय शिकता शिकता ते व्यायामशाळेत जाऊ लागले आणि लवकरच एक पहेलवान बनले आणि नाशिक मध्ये त्यांनी अनेक पदके जिंकली. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने त्यांना दादासाहेब फाळके यांच्या स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांनी सुमारे ११९ चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेते म्हणून उल्लेखनीय योगदान दिले.
दातारांनी आपला चित्रपट मूकपटांच्या युगात सुरू केला. ते फाळके स्टुडिओशी निगडित होते आणि ११९ चित्रपटांपैकी ८० मूकपट मराठी चित्रपट, २० मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात काम केले.
दादासाहेबांच्या ११९ चित्रपटांपैकी १९१८ ते १९२८ दरम्यान ८० चित्रपट तयार झाले होते. ८० चित्रपटांपैकी ६० चित्रपटांमध्ये भाऊराव दातार विविध भूमिकेत होते. नानासाहेब सरपोतदार, मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकासह त्यांनी मूक आणि बोलपटांच्या चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी मूकपटांमध्ये अभिनय केला, दादासाहेब फाळकेच्या कंपनीला सोडल्यानंतर ते नानासाहेब सरपोतदारांची पुणे येथे असलेली आर्यन कंपनीत काम करण्यास सुरवात केली. तेथे त्यांनी २० पैकी १५ चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. राजकुमार ठकसेन मध्ये 'ठकसेन' म्हणून त्यांची भूमिका, समशेर बहादूर मधील समशेर, गुड बाय विवाहमधील डॉ. मदन, भवानी तलवार इ. मधील रामदास यांची अत्यंत प्रशंसा झाली. ललिता पवार यांच्याबरोबर त्यांनी दशरथ्री राम, सुभद्रा हरण, चतुर सुंदरी, ठाक़ुई माशी, समशेर बहादूर आणि पृथ्वीराज संयोगिता अशा अनेक मूकपट केले. त्यांनी नंतर 'दुनिया ची क्या' आणि 'नेताजी पालकर' मध्ये एकत्र काम केले. १९३३ साली त्यांनी मुंबईच्या चित्रपट उद्योगाच्या जगात प्रवेश केला. अर्देशर इराणी यांच्या ईम्पीरियल फिल्म कंपनीत गेले. तेथे नानासाहेब सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी तेथे त्यांनी रुक्मिणी हरण, चलता पुतला, पृथ्वीराज संयुक्ता आणि देवकी सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. चलता पुतला मधील त्यांची खलनायकाची भूमिका प्रसिद्ध झाली. त्यांनी चिमुकला संसार, धर्मवीर, माझे बाळ, नेताजी पालकर या मराठी चित्रपटात काम केले.
भाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली. ते सर्वात लोकप्रिय मेकअप कलाकार होते आणि त्यांनी प्रसिद्ध 'साधना कट' बनविला होता. भाऊराव दातार यांच्यावर त्यांचे नातू भरत कान्हेरे यांनी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनविली आहे. भाऊराव दातार यांचे १५ सप्टेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 15, 2018
आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार मा.पुलंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. मा.बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.
बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर मा.ना. ग. गोरे व मा.पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.
तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti