शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला.बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील. शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. शाहिद ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत आजी-आजोबांसोबत राहू लागला. मोठा झाल्यानंतर त्याने मुंबई वापसी केली. मुंबईत आल्यानंतर तो कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स अकॅडमीत सहभागी झाला. नव्वदच्या दशकात शाहिदने काही सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर तो म्युझिक व्हिडीओंसहीत काही जाहिरातींमध्येही झळकला. शाहरुख खान, काजल आणि राणी मुखर्जीसोबत केलेली 'पेप्सी'ची त्याची पहिली जाहिरात. यानंतर तो किट-कॅट, ओनिडा टीव्ही वगैरेसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसला होता. सुभाष घई यांनी शाहिदला डान्स करताना पाहिले आणि त्याचा डान्स आवडल्यानंतर त्यांनी 'ताल'मध्ये या आपल्या सिनेमात शाहिदला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून घेतले. ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यात शाहिदने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्स केला. यानंतर २००३ मध्ये आलेला रोमँटिक कॉमेडी ‘इश्क विश्क’ सिनेमातून शाहिदनं ख-या अर्थानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमासाठी शाहिदला फिल्मफेअरच्या 'बेस्ट मेल डेब्यू' अवॉर्डने गौरवण्यातही आले. २००५ मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर आणि फरदीन खानचा 'फिदा' हा सिनेमा आला होता.
या सिनेमाच्या निमित्ताने करीना आणि शाहिद एकमेकांच्या जवळ आले. सुरज बडजात्या यांच्या 'विवाह' सिनेमातील 'प्रेम' या भूमिकेमुळे शाहिदला आणखी लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे शाहिदची वेगळीच प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण झाली. शाहिद आणि करीनाचा 'जब वी मेट' सिनेमाला सिनेरसिकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा सिनेमा सुपर-डुपर हिट ठरला. मात्र, या वर्षी शाहिद आणि करीना यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' सिनेमाने शाहिदची इंडस्ट्रीमधील इमेज बदलली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि सिनेमाला अवॉर्डसही मिळाले. यामध्ये शाहिदने डबल रोल साकारला होता. करीना कपूरसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर शाहिदने मीरा राजपूतसोबत २०१५ मध्ये लग्न केले. शाहिद आणि मीरा या नावाहून त्यांनी आपल्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले. शाहिदने आतापर्यंत जवळपास ७५-८५ सिनेमांमध्ये काम केले आहे. यातील अनेक सिनेमे हिट झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘काठी न् घोंगडं’च हे गाणं शाहीरांनी गायले १९७५ मध्ये. पण त्याचे रेकॉर्डिंग एचएमव्हीने १९७७ साली केले. रेकॉर्डिंग दरम्यान काही केल्या गाण्यात मजा येईना. त्यावेळी एच.एम.व्ही.मध्ये असलेल्या श्रीनिवास खळे यांनी गाण्याच्या सुरुवातीला ‘ओ राम्या राम्या….हं’, अशी हाळी सुचवली. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस ती वापरली आणि गाणे जिवंत झाले.
‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.'इश्क का रंग है सफेद' या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'कॉमेडी सर्कस', 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येच जास्त दिसू लागली होती. छोट्या पडद्यावर मालिकेपासून करिअरला सुरूवात केलेल्या रश्मीनं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तिचे खरे नाव शिवानी देसाई. रश्मीने मुंबईच्या नारसी मॉजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून टूर अँड ट्रॅव्हलमध्ये डिप्लोमा केला आहे. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं.
रश्मी देसाई बिग बॉस 15 मध्ये देखील दिसली होती. तिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री केली होती. इतकंच नव्हे तर ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत रहिली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. श्मीनं अभिनेता आणि तिचा सहकलाकार नंदिशशी गाजावाजा न करता लग्न केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. रश्मी देसाई गुजराती तर नंदिश पंजाबी आहे. 'उतरन' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे.
साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली.
स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.
हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी.
वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच.
नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’.
१९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते.
माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.
वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
http://erasik.com/productdetails/PROD150300028501
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे
राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. मा.राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे मा. राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. मा.राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले. १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. मा.राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. मा.राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत मा.बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. मा.राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. मा.राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''
राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
राजा बढे यांचे कवितासंग्रह
‘हसले मनी चांदणे', ‘माझिया माहेरा जा', ‘क्रांतिमाला', ‘मखमल', ‘मंदिका'.
वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले.
लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.
दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे.
' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे. लीला चिटणीस यांनी त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.
वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. "स्वरमंगेश" ह्या गौरवग्रंथामध्ये "मालक" ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे,
|| मालक ||
"माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही", असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या नि-या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, "तू काय हमालाची बायको आहेस का ?"
आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा सा-या स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !
माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? "यापुढे पान बंद", असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, "जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा" !
एक दिवस मालक, खालूनच "माई, माई", अश्या मोठ्याने हाका मारीत आले. "अहो काय झालं?" मी विचारलं, पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं, म्हणाले, "तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय"! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !
माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला "घाटी" म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, "अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?"
इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुस-याला हसवायचे !
मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभ-याची भाजी फार आवडायची. मटण, मासे,कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत, कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, " काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास कां नाही ? नाही तर ये आणि जेवून जा."
काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, "खाली पडलेल्या नोटा भिका-यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये."
प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्या बरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !
मालाकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी ही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे."माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन."
मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.
मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं तर भगवं धोतर !
मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, "मुलीच कां झाल्या ?" असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलीना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.
श्रीमंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणांत मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका, लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळांनी ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे "तताबाबा" म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, "इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा". मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली, त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्या बरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, "पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील कां ?" काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी, दुस-याला देऊन टाकल्या.
मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही.त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हां केव्हां गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.
नाटक नसलं की, रिकाम्यावेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. व-हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पटाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने, डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !
मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. "हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ," असं सारखे मला म्हणायचे. आपली पाची मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !
मालकांनी पुण्याला घर घेतलं, तेव्हां गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेउन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !
मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, "ते आमचे कुलदैवत आहे," असे ते म्हणायचे !
मालकांनी "बलवंत सिनेटोन" ही चित्रपट कंपनी काढून, "कृष्णार्जुन युद्ध" हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !
सोळा डिसेंबर एक्केचाळीसचा तो दिवस, लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हां मालकांनी आपल्या लताचं गाणं, घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, "माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही". मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, "म्हारा मुजरा". मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
मालकांनी लताचं गाणं ऐकलं पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं......
शब्दांकन : उपेंद्र चिंचोरे
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti