(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संगीतकार राम कदम

    मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. असं म्हटलं जाते कि, गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगती करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच! मराठी लावणीचे लावण्या खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. ‘पिंजरा‘ ही संगीतकार राम कदम यांना मिळाली व त्या संधीचे राम कदम यांनी सोने केले. बाजीराव मस्तीनी या चित्रपटातील पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे.
    पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणतात. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती. मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    संगीतकार राम कदम यांची काही गाणी
    अ आ आई, म म मका
    अहो अहो कारभारी हो
    आई उदे ग अंबाबाई
    आज या एकांत काली
    आली आली हो भागाबाई
    आली ठुमकत नार लचकत
    आली बाई पंचिम रंगाची
    आल्या नाचत नाचत
    उठा उठा हो सूर्यनारायणा
    एक लाजरा न्‌ साजरा
    औंदा लगीन करायचं
    कशी नशीबाने थट्टा आज
    कळी कळी उमलते पाकळी

  • अभिनेते सुमीत राघवन

    अभिनेत्यासोबतच ‘महाभारत’, ‘तू तू मैं मैं’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवन यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. मराठी नाटकं, सिनेमांसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुमीत राघवन यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.

  • अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी

    मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.

    प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने पैसा पैसा, लॉस्ट अॅाण्ड फाउड, बायस्कोप ‘मोरया’, ‘मायबाप’, आणि 'पेईंग घोस्ट' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. एक अभिनेत्री आणि कवयित्री असण्यासोबतच स्पृहा जोशीला आता एक नवी ओळख मिळत आहे. स्पृहा आता एक गीतकारही झाली आहे. स्पृहाने काही सिनेमांसाठी गीतलेखन सुद्धा केलं आहे. त्यामुळे ती एक गीतकार म्हणूनही लोकप्रिय होत आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी

    प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी

    प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी झाला.

    तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय बासरी वादक रूपक कुलकर्णी यांनी आपले वडील मल्हार कुलकर्णी यांच्या कडून सुरवातीचे शिक्षण घेतले. रूपक कुलकर्णी हे वयाच्या ९ व्या वर्षी पद्म विभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य झाले. वयाच्या ९ वर्षांच्या पासूनच, कठोर प्रशिक्षण घेत रुपक कुलकर्णी यांनी ध्रुपद, खयाल आणि बासरीच्या तंत्रशैली शैलीत चांगली कामगिरी केली.

    रुपक कुलकर्णी यांचा पहिला एकल बासरी परफॉरमिंग वयाच्या ११ व्या वर्षी दरबार हॉल, बडोदा येथे झाला जिथे सुमारे १५०० संगीत प्रेमींना त्यांनी मंत्रमुग्ध केले होते. पुढे त्यांनी संपूर्ण भारतात आणि परदेशात जवळजवळ सर्व नामांकित संगीत सभाच्या मध्ये आपले बासरी वादन सादर केले आहे. त्यांचा पहिला संगीत अल्बम ‘TENDERLY’ वयाच्या १८ व्या वर्षी तबला वादक पं. अनिंदो चॅटर्जी यांच्या बरोबर आला. पुढे रूपक कुलकर्णी यांनी टाईम्स म्युझिक, एचएमव्ही, नवरस, प्लस म्युझिक, रिदम हाऊस, निनाद, एबीसीएल, सेन्स वर्ल्ड (लंडन), कॉप रेकॉर्ड्स इत्यादी म्युझिक कंपन्यांमार्फत आपले अल्बम प्रसिद्ध केले आहेत.

    रूपक कुलकर्णी यांच्या बासरी मैफिली नियमितपणे आकाशवाणी आणि दूरदर्शन, स्टार टीव्ही, झी टीव्ही आणि सीएनएन-आयबीएन इत्यादी टीव्ही चॅनेलवर होत असतात.

    रूपक कुलकर्णी यांची वेब साईट

    http://www.fluterupakkulkarni.com

    रूपक कुलकर्णी यांची मुलाखत

    https://www.youtube.com/watch?v=ZXSKV4P04Gg

    रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन

    https://www.youtube.com/watch?v=OP9N6GBVvpY

    https://www.youtube.com/watch?v=Z-_-Hdq6-RU

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड

    भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले.

  • नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर.

    मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले.

    साहित्य हा त्यांचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. अखेर जमलं या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर फिल्मिस्तान या संस्थेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली.

    त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला इ. अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

    चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. १९६३ साली दिल्या घरी तू सुखी रहा हे रंगभूमीवर आलेले नाटक खुपच गाजले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली बरीच नाटकं यशस्वी झालीत. शंभराच्यावर त्यांचे प्रयोग झाले.

    स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले उद्याचे जग हे कालेलकरांचे पहिले नाटक. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा. अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. सहज भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे ही नाटकं चित्ताकर्षक ठरली.

    मधुसूदन कालेलकर यांचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ मराठी अभिनेते राजा गोसावी

    आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट मा. राजा गोसावी पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये मा.राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. मा.राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. राजा गोसावींचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के! आपल्या सहजसुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्यावर वावरत असत. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखणा नायक, मध्यमवर्गीय नायिका, तिचे आई-वडील, चित्रपटाचे सुंदर शांत संगीत, गाणी हे सारे काही विलक्षणच असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली. अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटांतून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली. मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील ‘रंगतरंग’ या कार्यक्रमात बोलताना मा.राजा गोसावी म्हणाले होते,‘‘माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी ‘टाळ्या व हशे’ जमा आहेत. म्हणूनच आडनाव ‘गोसावी’असले तरी रसिक मला विनोदाचा ‘राजा’ म्हणतात!’’ चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. मा.विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या मा.राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स मा.राजा गोसावींच्या नावावर आहेत. १९९५ ला झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत. मा.राजा गोसावी यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य केले. मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    राजा गोसावीयांनी अभिनय केलेल्या चित्रपट व गाण्याची लिंक
    रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला https://www.youtube.com/watch?v=qmXHU1m-5SA
    अशी निशा पुन्हा दिसेल का https://www.youtube.com/watch?v=601Fy9v3DVk
    मानसीचा चित्रकार तो https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ
    ‘लाखाची गोष्ट’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=AAXcdz0vg9c
    ‘चिमण्यांची शाळा’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=Yg4f1d87_2s

  • अमीन सयानी

    शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. नंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुध्दा निवेदित केले.

  • चार्ली चॅप्लिन

    चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. त्यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.

    पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • विलक्षण तेजस्वी… देखणा अंगद म्हसकर

    अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय….

    साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर विजूसोबत एक सडपातळ बांध्याचा, निळ्या-घाऱया डोळ्यांचा, हसऱया चेहऱयाचा आणि चेहऱयावर विलक्षण तेज असलेला मुलगा होता. विजूने ओळख करून दिली. फोटोशूट संपल्यावर विजूचे आणि या नुकत्याच भेटलेल्या मुलाचे काही फोटो मी स्टुडिओत टिपले. ही मैत्री इथेच संपली नाही. पुढे नियमित भेटीगाठी झाल्या. या नव्या मुलाचा आणि इंडस्ट्रीत काही करू पाहत असलेल्या कलाकाराचा प्रवास पुढे रंगमंच ते छोटा पडदा आणि नंतर थेट रुपेरी पडदा असा वेगाने होताना मला पाहायला मिळाला. अंगद म्हसकर या तरुणानं अल्पावधीतच आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मोजक्या पण अर्थपूर्ण भूमिका चोख निभावणारा कलाकार म्हणून त्याने आपली ख्यातीच निर्माण केली.

    अभिनयाचा श्रीगणेशा करण्याआधी अंगदने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. नियमित व्यायामाच्या सरावाने त्याने चांगली शरीरयष्टी कमावली. अभिनयाचे वेगळे धडे गिरवले. या सिनेसृष्टीतल्या प्रवासात अंगदला अनेक गुरू भेटले. अनिवाश नारकर यांना अंगद अगदी जवळचा मित्र मानतो. तर कै. मोहन वाघ यांना तो आपले व्यावसायिक गुरू मानतो. तर त्याचे दुसरे व्यावसायिक गुरू म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे. गॉडफादर नितीन सरदेसाई यांच्यामुळे त्याला अभिनयाची वेगळी शिस्तच लागल्याचं तो मानतो. ‘गारंबीचा बापू’ हे अंगदचं गाजलेलं नाटक. याखेरीज ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गिधाडे’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांतून अंगदने रसिकमन जिंकलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘मड्डम सासू दड्डम सून’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तिथे मी’, ‘हृदयी प्रीत जागते’, या महाराष्ट्रभर गाजलेल्या मालिकांत अंगदची महत्त्वाची भूमिका होती. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’ या चित्रपटांत अंगदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘बायोस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या लघुपटात स्पृहा जोशीसोबतची अंगदची भूमिका विशेष गाजली.

    अंगदचं फोटोशूट करण्यासाठी त्याकाळी गाजलेल्या एका मालिकेत त्याची असलेली कॉर्पोरेट प्रतिमा आम्ही लक्षात घेतली आणि याच प्रतिमेला धरून काहीतरी वेगळ शूट करायचं असं आमचं ठरलं. कॉर्पोरेट प्रतिमेला धरून अंगदचा पेहराव ठरवण्यात आला. ब्लेझर लूकमध्ये अंगद फारच सुंदर दिसत होता. स्टुडिओत त्याचं या लूकमधलं एक फोटोशूट केलं. यानंतर या शूटला विरोधाभास वाटेल असं एक शूट करायचं आमचं ठरलं. या शूटसाठी आम्ही थेट एका गॅरेजमध्ये गेलो.

    माझा मित्र दिगंबर यादव याचं अवाढव्य मोठं गॅरेज या शूटसाठी आम्हाला उपलब्ध झालं. इथे मला हवं असलेलं सारं काही होतं. जुन्या मोटारी, त्यांचे पार्टस् तसंच त्याची अवजारं हे सारं काही होतं. सुरुवातीला ब्लेझर घातलेल्या अंगदचे इथल्या जुन्या मोटारींच्या बॅकग्राऊंडला काही फोटो मी टिपले तर यानंतर एक जुनी सायकल आमच्या नजरेस पडली. ही सायकल हातात घेऊन जात असलेल्या अंगदचे काही फोटो टिपले. अंगदचा ब्लेझरमधल्या पेहरावामुळे हवा असलेला विरोधाभास निर्माण करता आला तसंच त्याच्या हातात एक हेल्मेट देऊन आम्ही त्यात आणखी मजा आणण्याचा प्रयत्न केला.
    साधारणपणे पाच ते सहा तास अंगदचं शूट सुरू होतं. या शूटवर अंगद म्हणाला, ‘यातलं लायटिंग आणि ओव्हरऑल एक्स्प्रेशन फारच सुंदर आहेत. माझ्या आयुष्यातलं हे फारच लक्षात राहणारं शूट तर आहेच; परंतु ही कल्पना मुळातच फार सुरेख आहे आणि हे शूट झाल्यानंतर मला असं जाणवलं की हे समाज प्रबोधनासाठीही अत्यंत उपयोगी पडेल. यासाठी की, सध्याच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल हे अत्यंत उत्तम साधन आहे. वाहने चालवताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मग ते कोणतेही वाहन असो आणि माझ्या हातात असलेलं हे हेल्मेट त्यांचं प्रातिनिधित्व करत आहे.’ त्याच्या या विधानाने मी भारावूनच गेलो. अंगद जे करतो त्या प्रत्येक कृतीमागे त्याचा असा एक स्वतंत्र विचार असतो. तो विचार त्याला पटला तर आणि तरच तो पुढचं पाऊल उचलतो. हाच गुण कदाचित त्याचा कलाकृती निवडण्यामागेही असावा आणि म्हणूनच मोजक्या परंतु चोख भूमिका निभावण्यात अंगदचा नेहमीच हातखंडा राहिला आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com