शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी हैदराबाद येथे झाला.
शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ३१ डिसेंबर १९८४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामने खेळत एकूण २२ शतके झळकवली, श्रीलंकेविरुद्ध १९९ सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. ४५ च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले. ३०० एकदिवसीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला.
१९८०च्या मध्यावर निवृत्त होत गेलेल्या काही मातब्बर फलंदाजांची उणीव अझरने भासू दिली नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी ४७ कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीन बऱ्यापैकी यशस्वी ठरला, तरी ते यश अझरच्या नेतृत्वगुणांचे नक्कीच नव्हते. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मॅच-फिक्सिंगमध्ये तो गुंतल्याचे आढळल्यानंतर अझरची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. २००९ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.
१९८६ मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. १९८७ मध्ये अझरुद्दीन यांनी नऊरीन यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांनी नऊरीन बरोबर घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. अझरचे संगीता बिजलानी बरोबरही २०१० साली घटस्फोट झाला.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली. बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते ! मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा ! इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….
रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….
रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.
त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.
बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले.
१९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता.
रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला.
रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.
रीना रॉय यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=3GEFsCLf-vA
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड
पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. जोग, एस. सी. आर. भट, चिन्मय लाहिरी अशा संगीताभ्यासात बरेच पुढे असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संगीत अध्ययनात प्रगती करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गिंडे यांनी संगीताच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केली होती व माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. हळूहळू पं. गिंडे रातंजनकरांच्या मदतनीसाची भूमिका निभावू लागले. त्याच जोडीला त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान व उमजही वाढत होती.
त्यांनी आकाशवाणीवर व वेगवेगळ्या संगीत महोत्सवांत आपल्या गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली. तसेच आपले सहाध्यायी व शिक्षक एस. सी. आर. भट यांच्या जोडीने ते ध्रुपद शैलीत जुगलबंदीही करू लागले. १९५१ मध्ये त्यांनी मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांची भारतीय शास्त्रीय संगीताविषयीची सप्रात्यक्षिक व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होती. पं. गिंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
त्यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त आयोजित समारंभास पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व व पु. ल. देशपांडे अशा संगीत साहित्य क्षेत्रातील प्रभृतींनी आपली उपस्थिती लावली होती. के. जी. गिंडे १३ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…
आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं.
इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले. मा.अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.
१९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाझशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते."मी हिंदी मुलखातला,माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही" असे म्हणणार्याु अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. इ.स.२०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्याा मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. मा.अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव वाटव्यांचे शिष्य आहेत.अरुण दाते यांनी "शतदा प्रेम करावे" या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अरुण दाते यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=uB8jKp6Ixkg
https://www.youtube.com/watch?v=W8baLzpGMtA
त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी मा.माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकिपीडीया
किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत.
कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या.
ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका कलापिनी कोमकली यांनी आपल्या आई बद्दल व्यक्त केलेल्या या भावना..
आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. माझे वडील पं. कुमार गंधर्व हे आकाशाएवढे मोठे असले, तरी त्यांना आणि आम्हा मुलांना बांधून ठेवणारी वसुंधरा ही भूमी असते. माझ्यासारखे पोर आकाशात जेव्हा चिमणी होऊन उडण्याचा प्रयत्न करते किंवा घार होऊन विहंग करण्याची मनीषा बाळगते, त्या आकाशाची वैचारिकदृष्टय़ा लांबी-रुंदी जाणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा शेवटी भूमीवरच येऊन विसावते. वसुंधरा कोमकली ही माझी आई सदैव माझ्यासाठी वसुंधरा या नावाप्रमाणेच भूमी राहिली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व शब्दातीत आहे. जशी ती माझी जन्मदात्री आई तशी माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये मार्गदर्शन करणारी गुरूही. त्यामुळेच तिच्याशी माझे नाते हे महत्त्वाचे आणि वेगळी उंची गाठलेले होते.
संगीत क्षेत्रात मी जी काही आहे किंवा माझी ओळख आहे ती केवळ आईमुळेच आहे. माझे स्वत:चे उभे राहणे हे केवळ वसुंधरा कोमकली यांच्यामुळेच आहे. अगदी व्यक्तिगत पातळीवर सांगायचे, तर कुमारजी गेल्यानंतर वसुंधराताई ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळेच मी उभी राहू शकले आणि कलाकार म्हणून घडू शकले हे वास्तव आहे. वसुंधराताईने कोलकाता येथे पतियाळा घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. ती मुंबईला प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेण्यासाठी आली. तेथे तिचा पं. कुमार गंधर्व यांच्याशी परिचय झाला. देवधरसरांच्या तालमीमुळे ती उत्तम गायिका झाली. पण, बाबांच्या संगीताने ती भारावली गेली. कुमारजींशी विवाह झाल्यानंतर १९६२ मध्ये देवास येथे घरी पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर कुमारजींशी सर्वस्वी एकरूप झाली. नव्हे स्वत:ला विसरून ती कुमारजींशी समरस झाली. आधीचे संगीत शिक्षण बाजूला ठेवत तिच्या गायकीमध्ये बाबांच्या शैलीचा रंग चढला. कुमारजींचा सांगीतिक विचार आणि त्यांची शिकवण तिने आत्मसात केली. ते आपल्या गायकीतून मांडण्याचे तिचे कसब वाखाणण्याजोगे होते. पं. कुमार गंधर्व या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले आणि नंतर त्यांची धर्मपत्नी झाली असली, तरी वसुंधरा ही त्यांची शिष्याच राहिली. सदैव शिकत राहण्याचा हा गुण तिने जीवनाच्या अखेपर्यंत जपला. ही तिची विद्यार्थी असण्याची दशा आहे त्याचे मला सर्वात कौतुक वाटते आणि आश्चर्यही वाटते. आताच्या काळामध्ये थोडे काही येत असेल, तर कलाकार स्वत:ला मोठे समजू लागतात. त्या पाश्र्वभूमीवर आईच्या विद्यार्थी असण्याची नवलाई मलादेखील जोपासावी असे वाटते.
गुरू म्हणून कुमारजी अतिशय कडक होते. त्यांच्याकडून शिकत असतानाही त्यांच्या गायकीप्रमाणेच अवघड वाटायचे आणि तसे ते अवघड असायचेही. पण, आईची शिकवण्याची पद्धत ही थोडी निराळी होती. एखादी तान शिकविताना ती अशा पद्धतीने घोटून घ्यायची की ती समजायला सुगम वाटायची. अर्थात ती तशी सुगम नाही हे नंतर मला गात असताना कळायचे. पण, तालीम घेताना आई ही तान सुगम आहे, असा भास निर्माण करायची. अर्थात आईने शिकविलेले मी किती आत्मसात करू शकले हे मला सांगता येणार नाही. पण, तिची गायन शिकविण्याची हातोटी कदापिही विसरता येणार नाही.
आई म्हणून वसुंधराताईने किती धीर दिला असे सांगायचे म्हटले, तरी नेमकेपणाने सांगता येणार नाही. एक परिपूर्ण गायक कलाकार म्हणून तिची इच्छाशक्ती दांडगी होती. मी आणि भुवनेश असे आम्हाला घडवून घेण्यासाठी ही इच्छाशक्ती तिला केवळ उपयोगी पडली असे नाही तर तिने ही इच्छाशक्ती आमच्यामध्येही संप्रेषित केली. प्रसंग आनंदाचा असो, दु:खाचा किंवा कसोटी पाहणारा, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे कसे सामोरे जायचे हे तिने शिकविले. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’ ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणा’ असे स्वतंत्र निर्मिती असलेले हे कुमारजींचे कार्यक्रम वसुंधराताईंशिवाय होऊच शकले नसते. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात ती अर्धागिनी तर होतीच पण त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही ती अविभाज्य अंग झाली. एरवी संगीतामध्ये जुगलबंदी असते. पण, कुमारजी यांच्यासमवेत तिच्या संयुक्त गायनाला तोडच नव्हती. दोन प्रतिभावान कलाकारांमध्ये असे सुरेल आणि अप्रतिम सामंजस्य आढळणं अवघड आहे. हे सामंजस्य कुमारजी असेपर्यंत होतेच. पण, नंतर हा गुण तिने आमच्यामध्येही संक्रमित केला.
कुमारजी काय किंवा वसुंधराताई काय, ही पिढीच अशी घडलेली होती की ती सहजासहजी शिष्याची पाठ थोपटणारी नव्हती. तिने कधी तोंडदेखले कौतुक केल्याचे मला आठवत नाही. पण, कधी नाउमेदही केले नाही. एखाद्या मैफलीचे ध्वनिमुद्रण मी ऐकविल्यानंतर स्वर चांगला लागला, आवाज उत्तम आहे, रागमांडणी व्यवस्थित झाली याविषयी ती आई म्हणून थोडेसे कौतुक करायची. पण, त्याच क्षणी तिच्यामधील गुरू जागा व्हायचा. गायनामध्ये काय घडले नाही किंवा कसा स्वर लावला असता तर आणखी उत्तम झाले असले हे कधीही नमूद करायला तिने कमी केले नाही. मी कितीही चांगला प्रयत्न केला, तरी गुरू म्हणून तिची शाबासकी मिळवू शकले नाही. जेवढे म्हणून पिरगळता येतील तेवढे कान पिरगळावेत अशीच बहुधा त्या पिढीची धारणा असावी. जेणेकरून शिष्याच्या हातून काही चांगले घडू शकेल. वसुंधराताईंच्या या शिकवणीमुळेच मी गायिका म्हणून घडू शकले. स्वरांच्या आभाळात उडण्यासाठी सज्ज झाले आहे. पण, विहंग करून झाल्यानंतर स्थिरावण्यासाठीची आणि मनापासून सामावून घेणारी माझी भूमी म्हणजे माझी आई वसुंधरा कोमकली आपल्यामध्ये नाही हे सत्य स्वीकारणे जेवढे अवघड, तेवढेच ते पचविणेही अवघड.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
Copyright © 2025 | Marathisrushti