रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. तिचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली.
बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते !
मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा !
इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….
रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….
रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.
त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.
बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले. १९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली.
अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता. रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला. रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.
रीना रॉय यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=3GEFsCLf-vA
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड
January 7, 2018
पंजाबातील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियानवाला हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. त्यामध्ये गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत हजारो भारतीयांच्या हत्येस कारणीभूत कमांडर डायर व जनरल ओडवायर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर या दोहोंचा प्रतिशोध घ्यायची खूणगाठ उधमसिंग यांनी मनात बांधली.
December 28, 2021
१९८६- ८७ च्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज, पाणी व रस्ता आदी लोकांच्या मूलभूत समस्यांसाठी डॉ. महाजन यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यात पायी पदयात्रा काढून जनजागृती केली. या काळात अनेक समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली होती. महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, किसन ताटे व सहकारी यांनी या फळीचे नेतृत्व केले. सेवा दलाच्या चळवळीतून ताटे यांनी तालुकाभर मोठा पुरोगामी विचारांचा समूह निर्माण केला होता.
June 14, 2022
मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. मे.पुं रेगे हे व्यवसायाने 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो.
भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.
मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.
त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2019
‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या.
त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहेजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धामध्ये आपले गुण प्रदíशत करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षाच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. मा.कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा-या यात्रा-जत्रांतील संगीत कार्यक्रमातही यांचा आवाज लोकप्रिय ठरू लागला. एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज मा.अरुण दाते यांच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणा-या संगीत दिग्दर्शक यशवंत देवांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही मा.कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांचे पती मा.मनोहर राय हे पण संगीतकार आहेत. मा. कृष्णा कल्ले यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कृष्णा कल्ले यांची गाजलेली गाणी.
अंतरंगी रंगलेले गीत, अशा या चांदराती, गोड गोजिरी लाज लाजिरी, आईपण दे रे, अशी नजर घातकी बाई, कशी रे आता जाऊ घरी, गुपित मनिंचे राया, चंद्र अर्धा राहिला, चंद्रकळा रुक्मिणी नेसली, तू माझ्या स्वप्नांची कल्पना, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, पुनवेचा चंद्रमा आला घरी, मन पिसाट माझे अडले रे.
अनमोल गाणी कृष्णा कल्ले.
https://www.youtube.com/watch?v=BriN4Xq6JcU
https://www.youtube.com/watch?v=gc0hi_d9sd4
March 18, 2017
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.
वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.
दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले.
लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत.
कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला.
भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट (पुरुष) पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.
बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा: रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्याा आणि ‘सौंदर्य आणि साहित्य ’ ‘वाड्मीयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत. बा.सी.मर्ढेकर यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 1, 2016
ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!
June 27, 2022
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला.
प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या.
१८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे.
अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता.
विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.
May 9, 2019
अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.
त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले. पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.
संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत. प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते. पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.
पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.
दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1
January 4, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti