आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त यांनी मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती.
यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली.
दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला.
अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९०० पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता. त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते.
नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २० ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता.नंतर नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेत नील आर्मस्ट्राँग १९७१ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सिनसिनाटी विद्यापीठात अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले.
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते. बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. या तीन दिवसांत काय होणार याच्या उत्सुकतेने तमाम पृथ्वीवासीयांच्या हृदयाचे ठोके चुकत होते.
१९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी याच दशकात अमेरिका माणसाला चंद्रावर उतरवून सुखरूप परत आणेल, असे आश्वासन दिले होते. रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात त्यामुळे अमेरिकेचा हा मोठा विजय ठरला.
नील यांच्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्यांचा सहकारी अल्ड्रिनही चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सुमारे २ तास ३२ मिनिटांचा काळ व्यतित केला होता. चंद्रावर अमेरिकी झेंडा फडकावून, काही दगड सोबत घेऊन आणि शास्त्रीय प्रयोगांची सुरुवात करून हे दोघे अंतराळवीर यानात परतले होते. परतल्यानंतर रेडिओद्वारे नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले ‘हे एका माणसाचे छोटेसे पाऊल आहे. पण अखिल मानवजातीसाठी खूप मोठी झेप आहे,’ हे वाक्य अजरामर झाले आहे.
चांद्रमोहीम आणि अंतराळवीर असे वलय असूनही नंतर ते अत्यंत साधेपणानेच आयुष्य जगले.
नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.
जन्म:- १४ फेब्रुवारी १९३५
केरसी लॉर्ड यांची माहिती
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा.लॉर्ड कॉवस हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. मा.केरसी लॉर्ड यांचे संपूर्ण कुटुंब संगीत या विषयात होते. १९३१ साली प्रदर्शित झालेल्या 'आलम-आरा' पासून १९९० सालापर्यंतच्या विविध संगीतकारांकडे लॉर्ड कुटुंबीयांनी वेगवेगळी भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यं वाजविली आहेत. सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक म्हणून मा.केरसी लॉर्ड यांनी काम केले होते. केरसीजींनी कास्टनेट्स, ग्लॉकेनस्पिल, चायनीज टेंपल ब्लॉक्स अशी विदेशी वाद्ये व त्यांचा विविध चित्रपटगीतांमध्ये वापर केलेला होता. संगीत क्षेत्रात डीडी म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. त्याची गोष्ट सांगताना मा केरसी लॉर्ड दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल , याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ' पंचमदां ' कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत. डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर मा.केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. आर.डी बर्मन हे वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी आर.डी ची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड यांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असत. केरसी लॉर्ड व त्यांचे बंधू बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ मिळाला होता. मा. केरसी लॉर्ड यांनी लता मंगेशकर यांचा एक किस्सा सांगितला होता. लता मंगेशकर यांनी हौसेने सेंकड हँड गाडी घेतली होती. त्या गाडीच्या दोन चाकांवर व्हिलकॅप नव्हती. त्यांचा ड्रायव्हर जयसिंग त्या विकत घेण्यासाठी सकाळीच चोर बाजारात गेला. तेथील माणसाने गाडीचा मेक व इतर माहिती घेतल्यावर, ‘आप यही रूको, अभी मैं व्हिलकॅप लेके आता हूँ ’ असे म्हणत पाच मिनिटांत दोन नव्या व्हिलकॅप आणल्या. जयसिंग त्या पॅक करून पैसे देऊन घरी आला. दुपारी तो त्या कॅप चाकांना बसवायला गेला, पाहतो तर काय, पहिल्या दोन्ही चाकांच्या व्हिलकॅप गायब! चोरबाजारातील त्या अनोळखी माणसाने गाडीच्या (लतादीदींच्या) दोन व्हिलकॅप्स काढून त्या जयसिंगलाच विकल्या होत्या!
मा.केरसी लॉर्ड यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला.
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
१९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.
१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.
तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.
थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्विंकल खन्नाचा जन्म २९ डिसेंबर १९७४ रोजी पुणे येथे झाला. राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्नाची जन्मतारीख एकच २९ डिसेंबर.
प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ट्विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत लग्न केले. काही निवडक चित्रपट केल्यानंतर ट्विंकलने २००१ मध्ये फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आणि इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तसेच लेखीका म्हणून नाव कमवले. ट्विंकल खन्नाय यांनी लिहिलेल्या मिसेस फनीबोन्स या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे ती २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरली. मिसेस फनीबोन्स या तिच्या पुस्तक प्रकाशनानंतर तिने आता गृहसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह बाजारात आणलेला आहे. तो 'द व्हाईट विन्डो' या ब्रॅँन्डने प्रसिद्ध आहे.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अक्षय कुमार व ट्विंकलची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते, की ट्विंकलचा मेला हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे मेला हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. जर मेला हा चित्रपट त्यावर्षी हिट ठरला असता, तर आज अक्षय-ट्विंकल पती पत्नी नसते. जानेवारी २००१ मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे.
'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे. मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले.
अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला.
सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या मा.फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख.
फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या सूरपूरवरून फय्याज यांचं कुटूंब सोलापूरला आलं. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्मल्या, वाढल्या. फय्याज यांचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकिरण प्रशालेत झालं. खरं तर लहानपणी फय्याजना गायिका किंवा अभिनेत्री असं काही बनायचं नव्हतं. सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न वगैरे करून संसार करायचा, असंच त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बाराव्या-तेराव्या वर्षी त्यांना मेळ्यात-कलापथकात काम करावं लागलं. गाण्याची-नृत्याचीआवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालीहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम गाण्यासाठी लावली; तर नृत्यासाठी मास्टर हसन (कथ्थक) आणि कट्टीबंधू (भरतनाटयम) यांच्याकडे पाठवलं.
नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फय्याज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कुणाची सोलापुरात मैफल असली की, फय्याज यांचा जीव तुटायचा, पण तिकीटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत. एकदा शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानमळ हायस्कूलमध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफल मात्र दुरून का होईना, ऐकता आली. त्यांच्या जादूई सुरांनी फय्याज भारावून गेल्या. बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या बारा-तेराच्या वर्षीच त्या स्वत:लाच विचारू लागल्या.
मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कलाराधना थांबवली; पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत, हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकले होते. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचे आणि मुंबईला जायचे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. फय्याज १९६५ साली मुंबईत आल्या तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल, असा होरा तर होताच; पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. मात्र, काम करायचे ते मनाला पटले तरच, हा पीळ मात्र फार लहानपणापासूनच त्यांच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना "गीत गायिले आसवांनी' या नाटकात पहिले काम मिळाले. त्यात फय्याज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. खरं तर मुस्लिम धर्मातील एक मुलगी नाटकात काम करते, हे तेव्हा फारसं रुचणारं नव्हतं, पण फय्याज यांनी मागे एका मुलाखतीत बोलताना संगितलं होतं की, त्यांना प्रवाहाविरुद्ध जायला आवडतं.
म्हणूनच अनेक मर्यादा असूनही त्या अभिनायाच्या क्षेत्रात उतरल्या. ‘गीत गायले आसवांनी’ मध्ये त्यांनी मंझरची भूमिका केली होती. आपल्यात पहिल्याच नाटकात त्यांनी आपल्या आवाजाची अशी काही जादू दाखवली की, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं. फय्याज यांचे हे पहिलेच नाटक खूप गाजले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ आवाज यामुळे पहिल्याच नाटकात त्यांची विशेष दखल घेतली गेली. नाट्यसृष्टीत फय्याज यांचा प्रवेश झाला आणि पहिल्याच नाटकात हे वेगळे पाणी आहे, हेदेखील जणू त्यांच्या क्षेत्रातील मंडळींच्या लक्षात आले. त्याच वर्षीची मा.मोहन वाघ आणि मा.प्रभाकर पणशीकर यांनी एकत्रितपणे "मदनाची मंजिरी' या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातील मंजिरीची भूमिका फय्याज यांनी साकारली आणि मग हा यशाचा सिलसिला सुरू झाला. "अश्रूंची झाली फुले' मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या.
याशिवाय "वीज म्हणाली धरतीला'मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. "तो मी नव्हेच', "मी मालक या देहाचा', "अंधार माझा सोबती', "कट्यार काळजात घुसली'ही "नाट्यसंपदे'ची आणि "पंडितराज जगन्नाथ', "मत्स्यगंधा', "संत गोरा कुंभार', "बावनखणी', "गुंतता हृदय हे', "सूर राहू दे' ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात "तो मी नव्हेच'चे हजार प्रयोग झाले होते. "अश्रूंची झाली फुले'चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर "कट्यार'चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. "कट्यार' हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता. "या नाटकाने आणि त्यातील दिग्गजांनी मला खूप काही शिकवले,' असे फय्याज सांगतात. ""गाणे किती गावे आणि कुठे संपवावे, हे अभिषेकीबुवांनी आम्हाला शिकवले. गाण्यातील भावना गळ्यात आणण्यासाठी ती भावना आठवायची आणि मग ते गळ्यातून व्यक्त करायचे, अशी बुवांची शिकवण होती. ती अंगीकारण्याचा मी कायमच जिवापाड प्रयत्न करायचे.''
कोणतीही नवी गोष्ट शिकायची आणि ती स्वतःच्या शैलीत उतरवायची, अशी सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली. आज फय्याज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वेगळेपण रसिकांना जाणवते ते बहुधा त्यामुळेच. "वेट अंटिल डार्क' या चित्रपटावर बेतलेल्या "अंधार माझा सोबती' या नाटकात ज्योती या अंध मुलीची भूमिका फय्याज यांनी केली होती. फय्याज यांच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका. अभिनेत्री म्हणून या भूमिकेने त्यांना एक वेगळा आयाम दिला. या भूमिकेत फय्याज यांनी अक्षरशः जीव ओतला. भूमिका जगणे म्हणजे काय ते फय्याज यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आंधळ्या मुलीचे नेमके बेअरिंग यावे, तिचे जगणे कळावे यासाठी दिग्दर्शक कांती मडिया त्यांना रोज अंधशाळेत घेऊन जात. मग तिथून परतल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून अभिनय करवून घेत. ""हा सराव करत असताना मी कितीतरी वेळा धडपडले. मार लागला, गुडघे फुटले; पण त्यामुळेच ती भूमिका मी समरसून साकारू शकले,'' फय्याज सांगतात.
"तो मी नव्हेच'मध्ये फय्याज यांनी साकारलेली चन्नक्का बघून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना "वटवट'मध्ये भूमिका दिली. ""या नाटकात नाट्यसंगीत होते, लावणी होती आणि पुलंबरोबर एक द्वंद्वगीतही होते. पुलंमुळेही "पॉझ' कसे घ्यायचे, "पंचेस' कसे घ्यायचे, अशा अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, त्यांची भर मी माझ्या पुढच्या प्रत्येक कामामध्ये घालत राहिले,'' असे फय्याज नोंदवतात. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मास्तर या उत्तुंग माणसांनी फय्याज यांना घडवले. वसंतराव त्यांना कौतुकाने आपली लाडकी शिष्याच म्हणत असत. इतरही अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मात्र कोणाचेही थेट अनुकरण करण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही.
नाटयगीतांबरोबर गझल, ठुमरी, लावणी असा प्रवास केला. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' किंवा "चार होत्या पक्षिणी त्या' किंवा माडगूळकरांची "जोगिया' ही फय्याज यांची गाणी इतर दिग्गज गायिकांइतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशोक रानडे यांच्याबरोबर बैठकीची लावणी साजरा करण्यात त्यांचा सहभाग होता. प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते. बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकता आलं नाही, तरी ब-याच जणांकडून बरंच काही शिकल्याची कबुली त्या आजही न विसरता देतात.
नृत्यकलाही जणू फय्याज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या "संत तुकाराम' आणि "होनाजी बाळा' या दोन नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते. त्यात फय्याज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, "ही मुलगी एवढे चांगले नृत्य करू शकते, तर ते सोडून ती गाण्यातच का गुंतून पडली आहे?' प्रत्येक काम त्या इतके जीव ओतून करायच्या, की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचे की फय्याज यांनी याच क्षेत्राला वाहून घेतले पाहिजे. दादा कोंडकेंबरोबर त्यांनी ‘विच्छा माझी पूर्ण करा’चे अडीचशे प्रयोग केले, तर ‘मित्र’मध्ये डॉ. श्रीराम लागूंबरोबर भूमिका केली. मा.फय्याज यांनी "महानंदा', "पैंजण', "एक उनाड दिवस', "वजीर' अशा काही वेगळ्या चित्रपटांमधूनही अभिनय केला.
ऋषिकेश मुखर्जींच्या "सबसे बडा सुख' या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय "धरतीपुत्र', "चॉंद का टुकडा' अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. "शेष रात्री' या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम केले. इंग्रजीत स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ही भूमिका साकारली होती. "बावर्ची', "प्रेमपर्बत', "आलाप', "रंगबिरंगी' या हिंदी चित्रपटांसाठी मा.फय्याज यांनी पार्श्वगायनही केले. फय्याज यांना बोरीवली नाटय परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, ‘चंद्रलेखा’तर्फे दिला जाणारा शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, माणूस पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
श्री.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
फय्याज यांनी केलेली नाटकं आणि त्यातील त्यांच्या भूमिका
गीत गायिले आसवांनी (मंझर), अंधार माझा सोबती (ज्योती), अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा), कटयार काळजात घुसली (झरीना), किनारा (जीजी), गुंतता हृदय हे (कल्याणी), संत गोरा कुंभार (संता), तो मी नव्हेच (चनक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार), पंडितराज जगन्नाथ (लवंगिका), पेइंग गेस्ट (सुनंदा), प्रीत राजहंसी (मेहजबीन), बावनखणी (चंद्रा), भटाला दिली ओसरी (नटी), मत्स्यगंधा (सत्यवती), मदनाची मंजिरी, मित्र (नर्स), मी मालक या देहाचा (सिस्टर), वटवट (अनेक भूमिका), वादळवारं (अम्मी), वीज म्हणाली धरतीला (जुलेखा), वेडयाचं घर उन्हात, संत तुकाराम (रंभा), सूर राहू दे, होनाजी बाळा (गुणवती).
फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास, बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti