नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे. निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम म्हणजे त्या कोळ्याच्या ( Spider च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल.
…. मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.
आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी साजरा करतो. यानिमित्ताने सर्व रेगे कुटुंबिय एकत्र जमतो, देवाची यथासांग पूजा पार पडते, हास्यविनोद घडतो, चार दिवस मजेत घालवून आम्ही मुंबईला परततो. देवाची पूजा झाल्याने मन शांत होतं, प्रसन्न होतं. मुंबईचे ताणतणावाचे दिवस सहन करण्यासाठी आम्ही पुन्हा सिद्ध होतो.
गावी पोहोचल्यानंतर प्रथम गणपतीची तयारी सुरु होते. पहिलं काम देवखोली साफ करण्याचं. विहिरीवरुन पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते, स्वच्छ केली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्याची यादी करुन त्या बाजारातून आणव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडच आहे. मुख्य बाजार भरतो तो शिरोडयाला अथवा वेंगुर्ल्याला. गणपतीच्या दोनतीन दिवस आधी या दोन्ही बाजारांमध्ये आजूबाजूच्या गावांतले हजारो लोक जमतात. गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळं, बुंदीचे लाडू, खाजं, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमा महेशाच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, नाडापूडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालविण्यासाठी भजी आणि चहाचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.
घरी परतल्यावर प्रथम देवखोली सजविण्याचं काम सुरु होतं. गणपतीच्या मूर्तीच्या वर काठयांची चौकट लटकत असते. तिला माटवी म्हणतात. आंब्याचे टाळ आणि विविध रंगांची फळं व भाज्या अडकवून ही माटवी सजवली जाते. त्यानंतर चमचमत्या छोटया दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदांच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. आत स्वयंपाकघरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालीकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक असतो. हरतालीकेला गुळाच्या पातोळ्यांचा नैवेद्य असतो. चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य, पंचमीला साखर भात असा ठरलेला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यादिवशी पंचखाद्यपण करायचं असतं. आरतीनंतर प्रसाद काय वाटायचा याबाबत सगळ्यांची मतं घेतली जातात. हरतालीकेच्या आदल्या दिवशी कडधान्य भिजत घालणं, नंतर भाज्या चिरण्याचं काम अशी कामं सुरुच असतात.
सर्व तयारी सिद्ध झाल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं घरात आगमन होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरु होतो!
चतुर्थीच्या दिवशी सकाळी भटजी बुवा घरी येतात. घरातल्या पुरुषांपैकी कुणीतरी एक सोवळं नेसून तयार बसलेला असतो. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांच्या घणघणीत उच्चारांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्या. अथर्वशिर्ष अकरा वेळा म्हंटल्याने एक एकादष्णी पूर्ण होते. घरातल्या मंडळींनी अशा एकादण्या आंगवलेल्या असतात. याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. आम्ही लहान असताना जवळजवळ तासभर हा एकादष्ण्यांचा कार्यक्रम रंगत असे. आता भटजींची पूजा सांगतानाच घाई उडालेली असते. एका घरची पूजा आटोपून त्यांना दुसऱ्या दहा घरी धावायचं असतं. सहाजिकच एकादण्या हा प्रकार मागे पडला. रीत म्हणून आमच्या आम्हीच एखाददुसरी एकादष्णी म्हणतो आणि गणपतीची पूजा सिद्ध होते. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लालकुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आरासांनी उजळलेलं श्रीगणपतीचं हे प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.
गावातल्या अन्य रेगे कुटुंबियांच्या पूजा उरकल्या की एकत्रित आरत्यांचा जल्लोष सुरु होतो. कोकणातल्या आरत्यांच्या चाली मुंबईतील प्रचलित चालींहून वेगळ्या आहेत. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ही स्पर्धा मग रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ. एकूण पाच घरात अशा आरत्या रंगतात. आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली. 'तन्नोदंती प्रचोदयाऽऽत' च्या गजराने या आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्यांची पाने मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरु होते.
सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांच्या भजनाची गडबड सुरु होते. संपूर्ण गावातले गावकरी एकत्ररित्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं म्हणतात भजनाला तबलापेटीची साथ असते. टाळ आणि झांजाच्या गजरात भजन सुरु होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात भजनं सादर केली जातात. भान हरपून मी या भजनांचा आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. मी उत्स्फूर्तपणे गांवकऱ्यांच्या भजनात सामील होतो.
पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्याली खुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती आपल्या गावाला जायला निघतो व सर्वांचे डोळे पाणावतात. जगातलं विज्ञान काहीही सांगो, पण यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावरही खरोखरच नाराजी उमटते. 'पुनरागमनायचं' च्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं. देवखोलीतला चौरंग खळ्यात येतो. बाहेर गावातले सर्वांच्याच घरातले गणपती विसर्जनाला निघतात. 'मोरयाऽऽऽ मोरयाऽऽऽ'च्या ललकाऱ्या गावभर उमटत असतात. रांगेने गावातले सर्व गणपती तळ्याच्या वाटेने निघतात. शेतातल्या बांधातून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातल्या पिकांतून वाट काढत गावातले शंभरएक गणपती तळ्यावर पोहोचतात. तिथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. संपूर्ण गावाच्या वतीने गाऱ्हाणं घातलं जातं. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तीसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात.
'नवल होत आहेऽऽ आरतीऽऽ देवाधिदेवा ऽऽ ऽऽ' भजनाने विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो. गावातले तरणेताठे गडी भराभर मूर्ती पाण्यात शेळवतात. गणपतीचा उत्सव संपतो. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.
- सुनील रेगे
जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ ही तिचे महत्व अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिंबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो.
घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?
वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.
३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.
वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.
३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.
थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.
मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.
१ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.
१ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.
- सुनील रेगे
राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी ते दुमजली घर होते.
ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा शब्दिक कीस काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली.
जगावर राज्य कुणाचे ? जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे ?
Copyright © 2025 | Marathisrushti