नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे, काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला.
बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी.
परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे.
परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, त्यांचे नातेवाईक, मेडिकलचे विद्यार्थी, नर्सेस या सर्वांचीच रस्त्यावर लगबग असे. धन्यासोबत बैलघोडा हॉस्पिटलकडे जाणारी जनावरेही अधूनमधून दिसत. सकाळी अगदी सातपासून चाळीपुढच्या फूटपाथवर रहदारी सुरु होई.
समोरच्या वाडिया हॉस्पिटलचे मॅटरनिटी हॉस्पिटल आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असे दोन विभाग होते. या हॉस्पिटलचे घुमट दूरवरुन नजरेत येत. हॉस्पिटलच्या मागल्या बाजूस नर्सेस क्वार्टर्स आणि नर्सेसच्या जेवणाखाण्यासाठी एक मेस होती. संपूर्ण परळमध्ये हा परिसर मात्र अगदी शांत भासे. शाळेत असताना आम्ही अनेकदा अभ्यासासाठी या मेसच्या आवारात जात असू. गंमत म्हणजे तिथे जाण्यास आम्हाला कधीच कोणी अटकाव केला नाही. उलट तिथल्या सिनिअर सिस्टर्स आम्हाला प्रेमाने चहापाणीही देत असत. शाळेचे दिवस आठवले की तो मेसचा परिसर आणि त्या प्रेमळ सिस्टर्स लगेचच आठवतात. परळच्या या हॉस्पिटल्समध्ये सुखसुविधांची वानवा असतानाही गोरगरीब रोग्यांना उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असे. साहजिकच या हॉस्पिटल्समध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर बाहेरगावातील पेशंटसचीही रीघ लागलेली असे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर वामनराव महाडिक, विजय पर्वतकर असे अनेक कार्यकर्ते रोग्यांची देखभाल करण्यासाठी या हॉस्पिटल्समध्ये आवर्जून फेरी मारत आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी परळ लालबागमधील जनतेच्या मनात आपुलकीचं नातं जोडलं गेलं. शिवसेनाला परळ लालबागमध्ये जम बसविण्यात हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला हे इथे आवर्जून नमूद कारवंसं वाटतं.
हॉस्पिटलप्रमाणे परळमध्ये देवळेही बरीच होती. आमच्या घराच्या थोडं पुढे दत्ताचं देऊळ होतं. याच देवळात मारुतीचंही छोटं देवस्थान होतं. शाळेत परीक्षांच्या दिवसात आमची या देवळातली फेरी ठरलेली. दत्ताच्या देवळाच्या थोडं पुढे जयकरांचं विठ्ठल मंदिर होतं. संपूर्ण परळभर हे मंदिर जयकरांचं देऊळ म्हणूनच ओळखलं जाई. मनवमीच्या दिवशी या देवळात मोठा उत्सव भरत असे. या उत्सवात रामासाठी पाळणाही सजवीत असत. सोहळा संपल्यानंतर सुंठवडयाचा प्रसाद हातावर पडे. त्या सुंठवडयाची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेच आहे.
परळमधील कामगार मैदान व नरे पार्क या दोन मैदानंचीही आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. आर.एम. भट हायस्कूलसमोरील कामगार मैदान आणि शिरोडकर हायस्कूलच्या मागील बाजूस असलेलं नरे पार्क या मैदानांनी अनेक राजकीय उपथापालथी अनुभवल्या. परळ लालबागसारख्या कामगार वस्तीत कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण सभा या मैदानांवरच गाजल्या. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड देसाई अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या घणाघाती भाषणांनी या मैदानांचं नाव सर्वतोमुखी झालं. मात्र पुढे याच मैदानात सभा घेऊन शिवसेनेने आपलं बस्तान बसविण्यास सुरुवात केली व प्रचलित सामाजिक परिस्थितीमुळे त्यात त्यांना यशही लाभलं. अर्थात या सभा संध्याकाळनंतर होत. दिवसभर मात्र या मैदानांवर मुलांचा धुडगूस चाले. कामगार मैदानात संध्याकाळी चार नंतर लाऊडस्पिकरवरुन गाणीही वाजविली जात. येऊ कशी कशी मी नांदायला, गेला हरी कुणा गावा, चल ग हरिणी तुरु तुरु अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली ती या कामगार मैदानावरील जाहीर प्रसरणांमुळेच.
परळच्या आठवणी सांगताना तिथल्या काही लोकप्रिय उपहारगृहांविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाही. दूध आणि मिठाईचे पदार्थ यांसाठी परळच्या नाक्यावरील सांडू आणि धूपकरांची दुकानं सर्वमान्य ठरली होती. या दुकानांतील दुधी हलवा- आणि गुरुवारी घरच्या देवांसमोर दाखविण्यासाठी -पेढे- यांना मोठी मागणी लाभत असे. तेच भाग्य अर्थातच पियुषलाही लाभलं होतं. मुंबईत उडप्यांनी संसार उघडला तेव्हा वाडिया हॉस्पिटलसमोरील मिनाक्षी भुवन दाक्षिणात्य पदार्थांची फौज सर्वप्रथम परळमध्ये उतरवली. उपमा, इडली, मसाला डोसा या पदार्थांची ओळख मिनाक्षी भुवननेच प्रथम परळच्या मराठमोळ्या कामगारांना घडविली. परळच्या नाक्यावरलं फिरदोसी हे इराणी रेस्टॉरंट मुंबईच्या तमाम इराणी हॉटेल्सचं प्रतिनिधित्व परळमध्ये करी. ब्रून मस्का, बन मस्का, प्लमकेक, पुडिंग, ऑम्लेट या पदार्थांची रेलचेल असलेलं हे हॉटेल निरुद्योगींच्या गप्पटप्पांचं माहेरघर मानलं जाई. याशिवाय के.इ.एम. हॉस्पिटलच्या रस्त्यावर मेडिको डायनिंग या नावाची एक गुजराथी खानावळ होती. या खानावळीत गुजराथी थाळी अगदी माफक दरात मिळे. या थाळीतील गरमागरम पुलके आणि अप्रतिम चवीची डाळ यांनी अख्ख्या परळला वेड लावलं होतं. याशिवाय काही मोजक्या हॉटेल्समध्ये मालवणी मांसाहारी पदार्थांनी संबंधीतांशी जिव्हाळ्याचं नात जोडलं होतं. एकदोन मुलतानी हॉटेल्समधील खिमा, चिकन आणि नान परळच्या घराघरात पोहोचले. गौरीशंकर छितरमल मिठाई वाल्याकडील बंगाली मिठाई आणि काही दूधवाल्यांकडची जिलेबी यांनीही परळच्या रहिवाशांच्या घरात मानाचं पान पटकावलं होतं.
परळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि प्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने राहात. चित्रा सिनेमाच्या जवळ मुसलमानांची वस्ती होती, हिंदमाता सिनेमाजवळ ख्रिश्चन धर्मियांचं प्रशस्त चर्च होतं आणि त्यांची सोसायटीही होती. बच्चूभाई हॉस्पिटलजवळ अनेक चाळींमध्ये ज्यू बांधव राहात. गुजराथी मंडळी तर जवळजवळ प्रत्येक चाळीत स्थिरावली होती व त्यांची मुलं अस्खलीत मराठी बोलत. जवळजवळ प्रत्येक चाळीखाली एका मारवाडयाचं दुकान असे व दुकानातच आतल्या बाजूस संसारही थाटून राहात असे. शिरोडकर हायस्कूल शेजारीच ख्रिश्चन समाजातील एका विशिष्ट गटाचं प्रार्थना मंदिर होतं. या हॉलवरील 'ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला' ही पाटी परळमधील सर्व रहिवाश्यांना परिचित होती.
सुमारे तीसएक वर्षांपूर्वी आम्ही परळ सोडलं आणि उपनगरात आलो. आता कधीतरी काही निमित्ताने परळला फेरी होते. या फेरीत परळचा चेहरामोहरा बदलत असल्याचं जाणवतं. सांडूंच्या उपहारगृहाजागी आता कपडयाचं दुकान आलं आहे. नाक्यवरला इराणी आता ग्रिटिंग कार्डस विकतो तर के.इ.एम. समोरच्या इराण्याने औषधांचं दुकान थाटलं आहे! सूर्या सिनेमाच्या जागी आता भव्य इमारत उभी राहिली आहे तर हिंदमाता सिनेमा शॉपिंग मॉल बनला आहे. परळच्या बाह्य रुपात अनेक बदल घडत आहेत. लालबागला आता चाळींच्या जागी गगनचुंबी इमारती येत आहेत. काही वर्षांत तोच प्रकार परळमध्ये सुरु होईल. आमचेही परळशी असलेले ऋणानुबंध आता तुटले आहेत. शिवसेनेच्या भाषेत सागायचं तर आम्ही परळमध्ये आता उपरे झालो आहोत. परंतु परळच्या रस्त्यांवरुन पुढे जाताना जुनं परळ डोळ्यांसमोर येतं. या आमच्या परळचा चेहरामोहरा तोच असतो. ओळखीचा. त्या परळच्या अंतरंगात कुठेतरी आमचाही चेहरा लपलेला असतो. आम्ही सर्वार्थाने परळमय होऊन गेलेलो असतो...
कायमचेच!
-सुनील रेगे
बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे.
त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे. निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम म्हणजे त्या कोळ्याच्या ( Spider च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल.
…. मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.
आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी साजरा करतो. यानिमित्ताने सर्व रेगे कुटुंबिय एकत्र जमतो, देवाची यथासांग पूजा पार पडते, हास्यविनोद घडतो, चार दिवस मजेत घालवून आम्ही मुंबईला परततो. देवाची पूजा झाल्याने मन शांत होतं, प्रसन्न होतं. मुंबईचे ताणतणावाचे दिवस सहन करण्यासाठी आम्ही पुन्हा सिद्ध होतो.
गावी पोहोचल्यानंतर प्रथम गणपतीची तयारी सुरु होते. पहिलं काम देवखोली साफ करण्याचं. विहिरीवरुन पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते, स्वच्छ केली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्याची यादी करुन त्या बाजारातून आणव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडच आहे. मुख्य बाजार भरतो तो शिरोडयाला अथवा वेंगुर्ल्याला. गणपतीच्या दोनतीन दिवस आधी या दोन्ही बाजारांमध्ये आजूबाजूच्या गावांतले हजारो लोक जमतात. गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळं, बुंदीचे लाडू, खाजं, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमा महेशाच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, नाडापूडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालविण्यासाठी भजी आणि चहाचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.
घरी परतल्यावर प्रथम देवखोली सजविण्याचं काम सुरु होतं. गणपतीच्या मूर्तीच्या वर काठयांची चौकट लटकत असते. तिला माटवी म्हणतात. आंब्याचे टाळ आणि विविध रंगांची फळं व भाज्या अडकवून ही माटवी सजवली जाते. त्यानंतर चमचमत्या छोटया दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदांच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. आत स्वयंपाकघरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालीकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक असतो. हरतालीकेला गुळाच्या पातोळ्यांचा नैवेद्य असतो. चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य, पंचमीला साखर भात असा ठरलेला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यादिवशी पंचखाद्यपण करायचं असतं. आरतीनंतर प्रसाद काय वाटायचा याबाबत सगळ्यांची मतं घेतली जातात. हरतालीकेच्या आदल्या दिवशी कडधान्य भिजत घालणं, नंतर भाज्या चिरण्याचं काम अशी कामं सुरुच असतात.
सर्व तयारी सिद्ध झाल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं घरात आगमन होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरु होतो!
चतुर्थीच्या दिवशी सकाळी भटजी बुवा घरी येतात. घरातल्या पुरुषांपैकी कुणीतरी एक सोवळं नेसून तयार बसलेला असतो. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांच्या घणघणीत उच्चारांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्या. अथर्वशिर्ष अकरा वेळा म्हंटल्याने एक एकादष्णी पूर्ण होते. घरातल्या मंडळींनी अशा एकादण्या आंगवलेल्या असतात. याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. आम्ही लहान असताना जवळजवळ तासभर हा एकादष्ण्यांचा कार्यक्रम रंगत असे. आता भटजींची पूजा सांगतानाच घाई उडालेली असते. एका घरची पूजा आटोपून त्यांना दुसऱ्या दहा घरी धावायचं असतं. सहाजिकच एकादण्या हा प्रकार मागे पडला. रीत म्हणून आमच्या आम्हीच एखाददुसरी एकादष्णी म्हणतो आणि गणपतीची पूजा सिद्ध होते. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लालकुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आरासांनी उजळलेलं श्रीगणपतीचं हे प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.
गावातल्या अन्य रेगे कुटुंबियांच्या पूजा उरकल्या की एकत्रित आरत्यांचा जल्लोष सुरु होतो. कोकणातल्या आरत्यांच्या चाली मुंबईतील प्रचलित चालींहून वेगळ्या आहेत. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ही स्पर्धा मग रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ. एकूण पाच घरात अशा आरत्या रंगतात. आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली. 'तन्नोदंती प्रचोदयाऽऽत' च्या गजराने या आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्यांची पाने मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरु होते.
सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांच्या भजनाची गडबड सुरु होते. संपूर्ण गावातले गावकरी एकत्ररित्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं म्हणतात भजनाला तबलापेटीची साथ असते. टाळ आणि झांजाच्या गजरात भजन सुरु होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात भजनं सादर केली जातात. भान हरपून मी या भजनांचा आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. मी उत्स्फूर्तपणे गांवकऱ्यांच्या भजनात सामील होतो.
पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्याली खुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती आपल्या गावाला जायला निघतो व सर्वांचे डोळे पाणावतात. जगातलं विज्ञान काहीही सांगो, पण यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावरही खरोखरच नाराजी उमटते. 'पुनरागमनायचं' च्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं. देवखोलीतला चौरंग खळ्यात येतो. बाहेर गावातले सर्वांच्याच घरातले गणपती विसर्जनाला निघतात. 'मोरयाऽऽऽ मोरयाऽऽऽ'च्या ललकाऱ्या गावभर उमटत असतात. रांगेने गावातले सर्व गणपती तळ्याच्या वाटेने निघतात. शेतातल्या बांधातून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातल्या पिकांतून वाट काढत गावातले शंभरएक गणपती तळ्यावर पोहोचतात. तिथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. संपूर्ण गावाच्या वतीने गाऱ्हाणं घातलं जातं. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तीसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात.
'नवल होत आहेऽऽ आरतीऽऽ देवाधिदेवा ऽऽ ऽऽ' भजनाने विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो. गावातले तरणेताठे गडी भराभर मूर्ती पाण्यात शेळवतात. गणपतीचा उत्सव संपतो. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.
- सुनील रेगे
जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ ही तिचे महत्व अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिंबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो.
घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?
Copyright © 2025 | Marathisrushti