नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.
आमच्या बालपणी कधी आम्ही पिकनीकला गेलो नाही किंवा पर्यटनस्थळाला गेल्याचे फारसे आठवत नाही. अनेक जणांच्या तोंडून पर्यटनस्थळांची वेगवेगळी नावं मात्र ऐकली होती. मेळघाट्,लोणावळा, चिखलदरा,म्हैसमाळ ही नावं ऐकून त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायची पण, आमचे फेवरेट पर्यटन स्थळ म्हणजे गावचा हालोबाचा माळ.
लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे 'छत्रपती शिवाजी', 'पावनखिंड', 'नेताजी पालकर', 'मोहित्यांची मंजुळा', 'मराठा तितुका मेळवावा' हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!!
१८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले व पुणे गाठले. पुण्यातील 'केसरी'मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. 'केसरी'चे जुने अंक व ग्रंथालयातील इतर अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांच्यातल्या लेखकावर संस्कार झाले. या काळात त्यांच्यावर वि. दा. सावरकर व बाबाराव सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ते कोल्हापूरला परतले.
त्यांनी देशप्रेमावर सहा नाटके लिहिली. नाटकात भूमिकाही केल्या. 'बकंभट' या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर सरस्वती सिनेटोनच्या 'श्यामसुंदर' या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते ही आघाडी सांभाळली. या चित्रपटाने पहिला ऐतिहासिक रौप्यमहोत्सव होण्याचा मान मिळवला.
यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, शालिनी सिनेटोन, सरस्वती सिनेटोन, अरूण पिक्चर्स अशा अनेक चित्रसंस्थांच्या चित्रपटांची दिग्दर्शन अथवा पटकथा संवादाची जबाबदारी सांभाळली. भालजींच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'बहु असोत सुंदर ...' हे महाराष्ट्र गीत असायचेच. १९३४ च्या 'आकाशवाणी' पासून १९८६ च्या 'शाबास सूनबाई' पर्यंत भालजींनी ४० कृष्णधवल व २ रंगीत अशा ४२ चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
१९४५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीं राजाराम महाराजांनी तेरा एकरचा जागा भारतींना दिली. तिथे स्टुडिओ उभारुन त्याचे 'जयप्रभा स्टुडिओ' असे नामकरण केले. १९४८ साली गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत स्टुडिओ जळाला. या आगीत 'मीठ भाकर' व 'मेरे लाल' या दोन चित्रपटांची राख झाली. भालजींनी सर्वांची देणी भागवून पुन्हा शून्यातून 'मीठ भाकर' चित्रपटाची निर्मिती केल्यावर या चित्रपटाने व्यवसायही चांगला केला.
भालजींनी ऐतिहासिक बरोबर सामाजिक विषयही चित्रपटासाठी हाताळले. 'साधी माणसं' हा चित्रपट लोहार व त्याच्या रणरागिणी पत्नीच्या सरळसाध्या जीवनावर बेतलेला होता. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सरकारची अकरा पारितोषिके मिळाली. सूर्यकांत, चंद्रकांत हे मांढरे वंदू, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, अनुपमा व दादा कोंडके अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांना त्यांनी घडविले.
दादा कोंडके 'विच्छा माझी पुरी करा'च्या प्रचंड यशानंतर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणार होते, बाबांनी त्यांना 'सोंगाड्या'च्या निर्मितीस प्रोत्साहन दिले...आणि दादांनी स्वतःच्या अनेक सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे युग निर्माण केले.
बाबा असेपर्यंत 'जयप्रभा स्टुडिओ'तून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती होत होती. काही कारणाने बाबांनी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकरकडे गेली. जिने बाबांच्या चित्रपटांतून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले, तिनेच बाबांना क्लेश दिले.
भालजींना ९६ वर्षांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६६ च्या 'साधी माणसं' व १९७० च्या 'तांबडी माती' या दोन चित्रपटांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आज भालजींची १२५वी जयंती. शेकडो वर्षांतून एखादी अशी युगप्रवर्तक व्यक्ती जन्माला येते. जसे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण राहिलो तसेच... बाबा, होते म्हणून आपल्याला चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज समजले...
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!
- सुरेश नावडकर २-५-२३
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
“बाळ श्रावणा", आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?"
“हा काय तुझ्या जवळच आहे", श्रावण म्हणाला.
“असा जवळ ये बरं", आई म्हणाली.
“हा आलो, काय पाहिजे आई तुला?" श्रावणाने विचारले.
आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी....' “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.' श्रावण म्हणाला.
आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..
“पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही." - श्रावण म्हणाला.
“तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.
“त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.
“अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.' “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.
ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.
याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.
लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि "आई ग!" अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
“कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” - दशरथाने विचारले.
“मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.
“मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.
“झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने "आई! बाबा!” करीत प्राण सोडला.
दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, "बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत."
तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.
त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, "कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.
ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा...' दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!
[ 'बालसुधा', पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]
शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.
फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत. कामे करीत असताना त्यांना आपोआपच व्यवहारज्ञानही प्राप्त होई; आणि त्यांची शरीरे सुदृढ बनत. धौम्य ऋषींच्या आश्रमातील सर्व शिष्यांत उपमन्यू, वेद आणि आरुणी हे तीन अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक शिष्य गुरुजींचे फार आवडते होते.
म्हातारी कमरेत पार वाकली होती .
काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती .
चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते .
त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती .
म्हातारा नवरा , मुलगा , सून , नातवंडं मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यावर , त्या देहाकडे बघताना , खाचा होत चाललेल्या डोळ्यांतलं पाणी केव्हाच आटून गेलं होतं .
ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच आक्रसून गेला होता .
पाण्यानं ते सडलेले मृतदेह धुण्याचं तिचं काम सुरूच होतं
समोर बघ्यांची गर्दी , हातातल्या मोबाईलवर त्यादृश्याचा व्हिडीओ काढण्यात गर्क होती .
चॅनलवाले शूटिंग करीत होते. म्हातारीचा बाईट घेण्यासाठी धडपडत होते .
त्यांचे प्रश्न तयार होते .
- या बॉडी कडे बघताना आता मनात काय भावना आहेत ?
- नातवंडं कशी ओळखली ?
- घर गाडलं जात असताना , त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही ?
- समाजाला काय सांगाल ?
एक ना दोन , अनेक प्रश्न तयार होते , पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती .
त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता .
रिकामटेकडे बघे मात्र चर्चा करीत होते .
थोड्या वेळाने म्हातारीने एक पितळी डबा हाती घेतला . त्याच डबक्यातल्या पाण्याने धुतला . आणि उघडून बघ्यांच्या गर्दीतल्या सर्वांसमोर धरला .
त्यात पाचशेच्या दहाबारा नोटा होत्या .
एक सोन्याचं मंगळसूत्र होतं . आणि चांदीचे चार वाळे होते .
" हे घ्या सोनं , चांदी आणि होते नव्हते ते पैसे . तुम्हाला या मदतीची गरज आहे ! यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल , प्रसिध्दी मिळेल आणि फेसबुक की कायसं असतं ना , त्यावर टाकता येईल . हे घ्या . मला आता याचा उपयोग नाही . टिव्ही वाल्यांना पण द्या . "
म्हातारीनं सगळ्यांसमोर डबा ठेवला . पाठी वळली .
गर्दीतल्या बघ्यांच्या माना खाली झुकल्या होत्या . मोबाईल बंद झाले होते. चॅनल वाल्यांचे बूम बंद पडले होते . आणि कॅमेरा वाल्यांनी अँगल बदलला होता .
आता मात्र खाली झुकलेल्या प्रत्येकाला जाणवत होतं...
- आपले पाय मातीनं जरा जास्तच बरबटले आहेत ...!
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
--------
कथा नावासह शेअर करायला माझी काहीच हरकत नाही .
मात्र कथेतील आशयावर चिंतन जरूर करा .
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती
पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला. उपप्लव्य नावाच्या एका नगरामध्ये ते उघडपणे वास करू लागले. कृष्ण आणि बलराम द्वारकेहून तेथे आले. मित्रमंडळ व आप्तेष्ट आले. या सर्वांच्या उपस्थितीत अर्जुनपुत्र अभिमन्यूचे विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी मोठ्या थाटात लग्न पार पडले.
Copyright © 2025 | Marathisrushti