नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.
May 22, 2022

“आपला गालिचा फारचं खराब झालाय. जेव्हां जेव्हां एखादा पाहुणा येतो, तेव्हां मला या गालिचाची लाज वाटते.” सौ. मालिनी घाडगे म्हणाल्या.
आपल्या बायकोला नेहमी खूष पाहू इच्छिणारे, तिच्याशी जमवून घेणारे श्रीयुत घाडगे गालिचाकडे पहात म्हणाले, “नव्या गालिचाची किंमत साधारण .....” त्यांच वाक्य पत्नीने पूर्ण करावं अशी अपेक्षा करत ते थांबले.
सौ. घाडगेनी ते वाक्य पूर्ण केलं, “फक्त पांचशे रूपये. मी हिशोब केलाय. सामंतांच्या दुकानांत चाळीस फूट लांबीचं दहा रूपये फूट प्रमाणे चारशे रूपयाला गालिचाच कापड मिळेल. त्याला किनार वगैरे लावायला थोडा खर्च येईल. किनार लावण्याचे काम मी स्वत:च करीन.”
“फक्त पांचशे रूपये!” श्री घाडगे गालिचाकडे नजर टाकत म्हणाले.
तो गालिचा गेली पांच वर्षे त्यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होता.
त्यांना तो अजूनही छान दिसत होता.
नवा जर पन्नास-शंभर रूपयांना मिळत असता तर त्यांनी सहजपणे तो काढून टाकला असता पण पांचशे म्हणजे जरा जास्तच वाटत होते.
दर वर्षी सांसारिक जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि वस्तुंच्या किंमतीही. जमा आणि खर्च यांचा मेळ घालणे त्यांना दिवसेंदिवस कठीण होत होते.
ते अशा विचारांत मग्न असतांना सौ.घाडगे म्हणाल्या, “अहो, तुम्हाला माहित आहे कां, पुढल्या आठवड्यात माझी मावसबहिण शालिनी आपल्याकडे येणार आहे. आता मला कांही तिला छानछौकीने सजवलेलं घर दाखवायचं नाही पण असं ऐकते कीं तिचा नवऱ्याचं उत्पन्न सतत वाढतयं, ते श्रीमंत होताहेत. आपले विवाह साधारण एकाच वेळी झाले. निदान आपण होतो त्यापेक्षा गरीब झालोय असं तिला वाटायला नको. हा गालिचा पण आपण बदलू शकत नाही, असा तिचा समज व्हायला नको.”
निर्णय घ्यायला आता आणखी सबळ कारणांची आवश्यकता नको होती.
श्री घाडगेंनी एका कपाटांत सहाशे रूपये जमवून ठेवले होते.
त्यांनी आपल्या एका मित्राकडून घेतलेली हजार रूपयांची उधारी त्यांना लौकरांत लौकर फेडायची होती.
त्यानी हे पैसे जमवून ठेवलेत, हे सौ. घाडगेंना माहित होतं.
ते काटकसर करून कष्टाने कशाकरता जमवलेत हेही त्यांना ठाऊक होतं.
घरात अचानक आलेल्या आजारात ती उधारी घेणं भाग पडलं होतं.
जसजशी ती रक्कम उधारी फेडायला लागणाऱ्या आकड्याकडे सरकत होती, तसंतसं श्री घाडगेंना बरं वाटत होतं.
त्यांना ती उधारी प्रथम फेडणं गरजेचं वाटत होतं पण आतां ते शक्य नव्हतं.
मावसबहिण शालिनी येणार आहे, हे कारण निर्णय घ्यायला खूप होतं.
शालिनीला गालिचा छान दिसला पाहिजे, ह्याबद्दल ते पत्नीपेक्षा थोडे अधिकच आग्रही होते.
मग मावसबहिणीच्या डोळ्यांना सुखविण्यासाठी दिवाणखान्यांत नवा गालिचा आणला गेला.
जुना वर एका शयनकक्षात गेला.
गालिचाला शोभतील अशा इतरही कांही वस्तु घ्याव्या लागल्याच.
त्यांत श्री घाडगेनी कर्जफेडीसाठी कष्टाने जमवलेली संपूर्ण रक्कम खर्च झाली.
नवा गालिचा आल्यावर दिवाणखाना सौ. घाडगेंच्या मनासारखा होईल असे त्यांना वाटत होते पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
नव्या गालीच्यामुळे आता वेताच्या खुर्च्या, मेज, भिंतीवरचा रंगीत कागद, इ. सर्व शालिनीला जुनं व विशोभित दिसेल असं सौ. घाडगेंना वाटू लागलं.
आधी कधी त्यांना खिडक्यांना बसवलेल्या व्हेनेशियन ब्लाईंडच्या पट्ट्या जुनाट वाटल्या नव्हत्या.
पण आतां त्यांना त्या डोळ्याला खुपू लागल्या.
दुसऱ्या दिवशी त्या पतिराजांना म्हणाल्या, “ह्या पट्ट्या फारच विचित्र दिसताहेत. काही ठीकाणी तुटल्या आहेत. त्या कितीला आणल्या होत्या आपण? कांही आठवतंय?”
पतिराज म्हणाले, “१०० रूपयांना आणल्या होत्या.”
सौ. घाडगे म्हणाल्या, “इतक्या महाग!”
श्री घाडगे म्हणाले, “होय, शंभर रूपये. मला पक्क आठवतंय.”
कमी खर्चात आपलं उद्दीष्ट साध्य करता यावं या विचाराने सौ. घाडगे म्हणाल्या, “समजा ह्यातच आपण कांही नव्या पट्ट्या बसवून आणल्या तर किती खर्च येईल?”
“फार नाही खर्च येणार त्यासाठी.” श्री घाडगे म्हणाले. “मग आपण तसं करूया कां?” सौ. घाडगेंनी विचारलं.
पत्नीच्या निर्णयाला मान डोलावणारे श्री घाडगे म्हणाले, “करूया ना!”
सौ. घाडगे म्हणाल्या, “मग आजच तुम्ही त्या दुकानात जाऊन त्याला ह्या काढून न्यायला सांगा. आवश्यक नव्या पट्ट्या लावून लवकर द्यायला सांगा. येत्या बुधवारी शालिनी येईल.”
श्री घाडगे कामावर जातांना प्रथम त्या दुकानांत जाऊन त्याला काम सांगून आले.
नंतर ते आपल्या कचेरीत आले.
तिथे त्यांच्या टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती.
ज्या मित्राने हजार रूपये दिले होते, त्याची ती चिठ्ठी होती.
“प्रिय मित्रा, जर शक्य असेल तर मी तुला उधार दिलेले हजार रूपये परत करशील का? तू जर उद्यापर्यंत ते परत केलेस तर माझ्यावर मोठेच उपकार होतील. मला एक मोठी रक्कम चुकती करायचीच आहे आणि अचानक मला यावयाच्या मोठ्या रक्कमेचा एक चेक परत आलेला आहे.”
श्री घाडगेंच्या मन:स्थितीने अचानक वाईट वळण घेतले.
दिवाणखान्यात केलेल्या सुधारणांमुळे पत्नीला सुरूवातीला झालेल्या आनंदाचा त्यांनाही थोडा संसर्ग झाला होता पण आता त्या आनंदाची जागा दु:खद पश्चात्ताप आणि आत्मनिर्भत्सना यांनी घेतली.
सुमारे दोन तासांनी श्री घाडगेंनी मित्राला उत्तर पाठवलं.
दोन तास ते नुसताच फोल विचार करत होते की एवढे पैसे कसे उभे करता येतील! त्यांना पगारातून आगाऊ रक्कम मागता आली असती पण एक तर अशी आगाऊ रक्कम त्यांना त्यांच्या कंपनीत मिळणं कठीणच होतं आणि त्यानंतर ते पुढील महिन्याचा घरखर्च कसा भागवणार होते?
शेवटी अत्यंत दु:खी मन:स्थितीत त्यांनी मित्राला आपण उधारी एवढ्यांत परत करू शकत नसल्याबद्दल क्षमायाचना करणारे आणि लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारे उत्तर लिहिले.
त्यांनी आपली चिठ्ठी मित्राला पाठवल्यानंतर थोड्याच वेळांत मित्राने रागारागाने लिहिलेली एक चिठ्ठी त्यांना आली.
“तू मैत्रीला चांगला जागलास! तू उधारी परत करण्यासाठी जी मुदत मागितली होतीस ती तर केव्हाच संपून गेलीय. मी सभ्यपणे वाट पहात होतो पण मी अडचणीत असतांना, घरी नवा गालिचा आणि फर्निचर खरेदी करणारा पण माझी उधारी द्यायला नकार देणारा गृहस्थ माझा मित्र असूच शकत नाही.”
श्री घाडगेंनी ती कडवट शब्दातील चिठ्ठी दोनदां वाचली व पुन्हा घडी घालून खिशांत ठेवली. त्यानी सौ. घाडगेंना त्याबद्दल कांही सांगितलं नाही.
सौ. घाडगेंचे आपल्या नव्या गालिच्याचे गुणगान सतत त्यांच्या कानावर येत होते व त्यांच्या कमकुवत स्वभावामुळे पत्नीच्या लहरीला मान तुकवल्याची त्यांना आठवण करून देत होते. नीट विचार करून निर्णय घेण्याऐवजी त्यांनी तिला खूष ठेवण्यासाठी निर्णय घेतला, हे आता त्यांना चुकीचे वाटत होते.
ते जरी पत्नीला कांही म्हणाले नाहीत तरी त्यांचे कांहीतरी बिनसले आहे, हे पत्नीला उमगले परंतु कशामुळे ते त्रस्त आहेत, ह्याचा तिला अंदाज आला नाही.
शेवटी शालिनीच्या भेटीचा दिवस आला. व्हेनिशियन ब्लाईंडज् अजून आणून बसवल्या नव्हत्या.
आणखी एक आठवडा तरी त्या मिळण्याची शक्यता नव्हती.
उघड्या खिडक्यांमुळे दिवाणखाना भकास वाटत होता.
उनही आत येत होते. सौ. घाडगेनी तात्पुरते कापडाचे जुने पडदे वापरण्याच्या विचार केला पण त्यांनाच तो पटला नाही कारण नव्या गालिचाची शोभा त्यांनी घालवली असती.
सौ. घाडगे पतिराजांना म्हणाल्या खिडक्यांवर कांही तरी लावायला हवे नाही तर शालिनीला आपण तिचं योग्य स्वागत केल्यासारखं वाटणार नाही.
श्री घाडगे म्हणाले, “शालिनीचं स्वागत आपण आपुलकीने करू. खिडक्या सजवून आणि गालिचाने नाही.”
ज्या पध्दतीने श्री घाडगेनी हे उत्तर दिले त्यामुळे सौ.घाडगे थोड्या आश्चर्यचकीत झाल्या. आपल्याला पतिराजांनी चापल्यासारखे त्यांना वाटले.
तरी त्या म्हणाल्या, “खिडक्यांना कांहीतरी दुसरं आणू कां?”
श्री घाडगे निश्चयी सुरात म्हणाले, “नाही. आपण आधीच बराच खर्च केला आहे.”
सौ. घाडगेना पतीचे वागणे फारसे आवडले नाही.
त्या दु:खी झाल्या.
थोडा वेळ कुणी कांहीच बोललं नाही.
सौ घाडगे शालिनीला कसा दिवाणखाना ओकाबोका वाटेल ह्याचा विचार करत राहिल्या तर श्री घाडगे मित्राचे कर्ज, मित्राचा राग आणि मित्र तुटणे, ह्याचा विचार करत होते.
अनेक दिवसांनंतर पती-पत्नीत थोडी अस्वस्थता निर्माण झाली होती.
दुसऱ्या दिवशी शालिनी आली. ती कांही सौ. मालिनीच्या घरी पहाणी किंवा तपासणी करायला आली नव्हती किंवा तिला आपल्या परिस्थितीची आणि मावसबहिणीच्या परिस्थितीची तुलनाही करायची नव्हती.
ती प्रेम आणि आपुलकीने त्या दोघांना भेटायला आली होती.
तिला नेहमीच वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या मालिनीबद्दल ओढ वाटत आली होती आणि मधल्या दूर रहाण्यामुळे ती ओढ अधिकच वाढली होती.
परंतु तिचा भेटीचा आनंद लगेचच मावळला होता.
निदान शालिनीला तरी तसे जाणवले.
पहिला दिवस संपेपर्यत तिच्या लक्षात आले की मालिनीची सतत आपल्यावर छाप पाडण्याची धडपड चालली आहे.
तिचा आणि श्री घाडगे यांचा संसार कसा उत्तम आर्थिक स्थितीत आहे, हे पटवून देण्याची धडपड मालिनी करते आहे.
तिला आपलं मन उघडं करण्यात रस नाही.
समजा मालिनी शालिनीला भेटायला आली असती तर शालिनीने क्षणभरही तिच्या स्वागतासाठी कांही तयारी करण्याचा विचारच केला नसता.
तिने जे कांही स्वागत केलं असतं तें हृदयापासून केलं असतं.
शालिनीला आपली मावसबहिण, जिच्याबरोबर तिने लहानपणी अनेक वर्षे आनंदात, मजेत घालवली होती, ती आताही तशीच हवी होती.
त्यावेळची सर्व गोष्टीत लहान मुलीच्या उत्सुकतेने भाग घेणारी बहिण आता व्यवहारी, दिखाऊ वाटली.
आता तिला मालिनीच्या सहवासाचा कंटाळा येऊ लागला.
दोघी दूर गेल्यापासून शालिनी अनेक नव्या भल्याबुऱ्या प्रसंगाना सामोरी गेली होती. आपल्या सर्व नव्या अनुभवांबद्दल तिला आपल्या मालिनीला भरभरून सांगायच होतं.
तसंच मालिनीकडून तिला मनसोक्त ऐकायचं होतं पण मालिनी तर बाह्य देखाव्यात अडकली होती.
शालिनीला मालिनीच्या दिवाणखान्यातील फर्निचरशी कांही देणं घेणं नव्हतं.
कां असावं?
मालिनी सतत त्या व्यावहारीक दिखाव्याचे संदर्भ देत होती.
पूर्वी भावना, विचार आणि स्वप्नं बोलून दाखवणारी व आता अनुभव आणि वय यांनी अधिक परिपक्व मैत्रिणीसारखी मालिनी ही बहिण भेटेल असं वाटत असतांना, जी मालिनी तिला भेटली तिने शालिनीच्या मनांतील तिची मूर्ती भंग पावली.
हाय! हाय! तिच्या डोळ्यांतली पूर्वीची ती चमक मंद झाली होती.
शेवटी जाण्याच्या दिवशी सकाळी जेव्हां सौ. घाडगेनी तिच्याकडे चाळीसाव्या वेळी खिडकीच्या वेनिशियन ब्लाईंडस न आल्याचे व त्यामुळे आपल्याला मरणप्राय दु:ख होत असल्याचे म्हटले, तेव्हा शालिनी तिला म्हणाली, “माले, मी तुला कडकडून भेटायला आले होते. तुझं फर्निचर पहायला नाही. मी तुझ्या हृदयात डोकावायला आले होते, माझं हृदय तुझ्याकडे उघडं करायला आले होते. तुझ्या घरातील फर्निचर पहायला नव्हते आले. मला तुझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारायच्या होत्या. आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हंसायचं होतं. नंतरच्या आयुष्यातले अनुभव सांगायचे होते. पूर्वी जसं आपल्यांत कांही गुपित नसे व आपण मनसोक्त बडबडत असू तसं बोलायचं होतं. माझं इतर गोष्टीकडे लक्षच गेलं नसतं. मला परत गेल्यावर तुझी परिस्थिती कशी आहे म्हणून कोणी विचारलंच असतं तर मी त्यांना असंच सांगितलं की माझी मावसबहिण आपल्या संसारात रमली आहे. खरं तर हे बोलायचं नव्हतं मला पण मी बोलून गेले. आता कांही शब्द परत घेतां येत नाहीत.”
सौ. घाडगेंना नुसतंच वाईट वाटलं असं नाही तर कोणी तरी फटकारल्यासारखं वाटलं आणि स्वाभिमानाला ठेंच पोहोचवल्याचं दु:ख झालं.
त्यांनी ते लपवायचा खूप प्रयत्न केला पण प्रत्यक्षात त्या आणखीच कोरड्या वाटल्या. त्यांना जाणवलं की आपला व शालिनीचा एकत्र झालेला प्रवास लग्नानंतर संपून ती दूर गेली होती.
सुदैवाने पुन्हां त्या दोघी थोडा काळ एकत्र आल्या होत्या पण आता मात्र त्या कायम दूरच रहाणार होत्या.
आणखी कांही तासांनी शालिनी त्यांचा निरोप घेऊन निघाली.
शालिनी येताच त्या दोघी ज्या आवेगाने भेटल्या होत्या तो आवेग आता दोघींमधेही नव्हता. सौ. घाडगेंना निरोप घेतल्यावर फार दु:ख झालं.
स्वत:बद्दल असमाधान वाटलं.
त्यांच्या मैत्रिणीने आयुष्यात जी विचारांची परिपक्वता मिळवली होती, ती त्यांना मिळवता आली नव्हती.
परंतु ह्यापेक्षाही अधिक दु:ख तिच्या वाट्याला यायचं होतं.
पतिराजांच्या कोटाच्या खिशांतली, त्यांच्या जुन्या मित्राने रागाने लिहिलेली ती चिठ्ठी तिच्या हाती आली व तिच्या दु:खाला पारावार राहिला नाही.
आपली बहिण आपल्या सुंदर नव्या गालिचाबद्दल प्रशंसेचे उद्गार काढेल असे वाटले होते, ते तर झाले नव्हतेच.
ती तर नाराज होऊन दूर गेलीच होती पण तिच्या पतिराजांनीही त्या गालिचापायी एक जुना, जवळचा मित्र गमावला होता आणि पतिराज आता मनातल्या मनांत कुढत होते.
कमकुवत मनाच्या सौ. घाडगेनी हा गालिचा घ्यायचा हट्ट करून आनंद मिळवायचा प्रयत्न केला होता व प्रत्यक्षात दु:खी होऊन बसल्या होत्या.
अशा विचारांच्या दडपणांनी स्तब्ध होऊन त्या बसलेल्या असतानाच त्यांची एक शेजारीण त्यांना भेटायला घरांत आली व दिवाणखान्यात येऊन दाखल झाली.
शेजारीण म्हणाली, “किती छान गालिचा आहे. कुठून आणला?”
शेजारीण खरे कौतुक करत म्हणाली. “अशाच नक्षीचे आणखी गालिचे असतील ना त्याच्याकडे?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “नाही, हा त्यातला शेवटचाच होता.”
शेजारणीला वाईट वाटले.
तिला तो इतका आवडला होता की अशाच गालिचासाठी तिची शहरातील सर्व दुकानं शोधायची तयारी होती.
सौ. घाडगेंना अचानक मनांत आलं आणि त्यांनी विचारलं, “हा हवा कां तुम्हाला? तुम्ही नेऊ शकता. मी आणला पण माझ्या यजमानांना फारसा आवडला नाही. तुमचा दिवाणखाना अगदी एवढाच आहे. आम्ही ह्याची किनार वगैरे लावलेली आहे. आम्ही हा पांचशे रूपयांना घेतला. सगळा खर्च त्यातच आला. तुम्ही तेवढेच द्या आणि घेऊन जा.”
शेजारणीने विचारलं, “मनापासून सांगताय हे तुम्ही?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “अगदी मनापासून सांगत्येय.”
शेजारीण म्हणाली, “मग ठरलं तर!”
सौ. घाडगे म्हणाल्या, “ठरलं!”
शेजारीण म्हणाली “केव्हां नेतां येईल मला?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “जमिनीवरून काढला आणि गुंडाळला की केव्हांही.”
शेजारीण म्हणाली, “मग तुम्ही काढायला सुरूवात करा. तुम्ही गुंडाळी करायच्या आत मी पांचशे रूपये घेऊन परत येते बघा.”
आणि तसंच झालं.
सौ. घाडगेंनी तो गुंडाळायच्या आधीच शेजारीणीने पाचशे
रूपये आणून दिले. व्यवहार पूर्णही झाला.
सौ. घाडगे गालिचावाचून रिकाम्या जमिनीकडे पहात होत्या.
पण त्यांच्या हातात शंभरच्या पांच नोटा होत्या आणि ह्या क्षणी त्यांना ते अशा डझन गालिचापेक्षा भारी वाटत होते.
फार वेळ विचार करत बसायला त्यांना वेळ नव्हता.
जुनं कार्पेट वरून आणून परत दिवाणखान्यात घालायचं होतं.
ती ते करत असतानाच खिडक्यांच्या ब्लाईंडस घेऊन दुकानाचा माणूस आला व नव्या पट्ट्या बसवलेल्या ब्लाईंडस लावून गेला.
संध्याकाळी श्री घाडगे परत आले.
दिवाणखान्यात पाऊल ठेवतांच ते आश्चर्याने म्हणाले, “हे काय? नवा गालिचा कुठे गेला?” तिने त्यांना अधिक आश्चर्यात टाकत हातातल्या पाच करकरीत नोटा दाखवल्या.
तिच्या डोळ्यात पाणी तरळत होते.
ते म्हणाले, “हे कुठून आले? कसे आले?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “शालिनी येऊन गेली. ह्या गालिचाची तिच्यावर कांही छाप पडली नाही. तेव्हांच माझ्या दृष्टीने तो सुंदर राहिला नाही. मी त्याचा शेजारणीबरोबर सौदा केला व विकून टाकला. त्याचेच हे पाचशे रूपये. हे तुम्ही घ्या आणि मित्राचे देणे प्रथम देऊन टाका.”
श्री घाडगे म्हणाले, “मालिनी, तू छान केलंस! त्या गालिचाने कदाचित आपल्या घरातलं सुख आपण गमावून बसलो असतो. माले, लक्षात ठेव. ह्यापुढे आपण आपल्या नजरेनेच पहायचे. लोकांच्या नजरेला कसं दिसेल, लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, ह्याचा विचार करायचा नाही. आपण कसे आहोत, हे आपल्यालाच सर्वांत जास्त माहित असते. फक्त सुंदर सजावटीतून घरात आनंद नांदत नाही तर आपण योग्य गोष्टी केल्याच्या समाधानातून तो लाभतो. आपलं मन स्वच्छ ठेवू या आणि आपलं जीवन आपोआप छान होईल. दुर्गुणी लोकांच्या महालांपेक्षा, जिथे गुण नांदतात त्या साध्या घरात खरं सुख आणि शांती नांदते. हा विचार फार फार जुना व अनुभवी लोकांनी मांडलेला आहे पण प्रत्येकाला तो समजायला आयुष्यांत एखादी तशी घटीका येते. आपल्या जीवनांत ती आता आली आहे.”
तसा आनंद त्यांच्या जीवनात आला.
ह्या लहानशा घटनेने त्यांचे विचार बदलले आणि पुढील संपूर्ण आयुष्याला त्यांना नवे वळण देतां आले.
अशी चूक त्यांनी पुन्हा केली नाही.
आणखी तीन वर्षे त्यांच्या जुन्या गालिचाने त्यांचा दिवाणखाना सजवण्याचं काम पार पाडलं.
मग त्यांनी तो बदलला.
तो बदल त्यांनी स्वत:च्या नजरेने केला होता, दुसऱ्यांच्या नजरेने नाही.
-- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - अदर पीपल्स आईज्
मूळ लेखक - टी. एस. आर्थर (१८०५-१८८५)
August 10, 2022
तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं... टाइमपास करत.
कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?
इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
तुला पाहणार नाही.
तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
तिच्या काचा थंड पडल्या.
काळजीने धुरकट झाल्या.
हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
भीतीने तिच्या काचा तापल्या.
कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”
“उद्या माझा मेकओव्हर आहे!
यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
“काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
“गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”
“अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
“नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
“म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
“रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
“अगं मला नीट समजेल असं सांग गं..”
“उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”
“व्वा! आणखी काय-काय होणारे?”
“तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
एकदम कू।़।़ल!! ”
“मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
काळजी घे स्वत:ची..”
“ताई तू म्हणतेस ते खरंय!
मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”
हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”
हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
यातूनच दुसरी काय ते समजली!
-राजीव तांबे.
July 2, 2015
सर्वप्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं.
August 28, 2023
रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते.
“अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.”
“काय यार मम्मी पण, संडे असून आजही झोपून देत नाही.” माझा मुलगा एका कुशीवरून दुसर्या कुशीवर होत बोलला.
“खूप झालं आता. दोघेही उठा.” म्हणत खेचून पांघरुणे गुंडाळायलाच काढल्यावर नाईलाजाने उठावे लागले. हिचं किचनमध्ये काहीतरी चालूच होतं. ब्रश आणि अंघोळ उरकून खिडकीतून खाली पहात बसलो. आमच्या बिल्डिंगच्या मागेच दुसर्या एका इमारतीचे बांधकाम चालू होते. रविवारी तर डोके उठवणारा कर्कश आवाज असतो. पण त्यादिवशी बहुतेक सुट्टी असावी. एका माणसाशिवाय कोणीही दिसत नव्हते.
त्याच्या अंगात खादीचा बनियन आणि कमरेखाली धोतर होते. दोन्ही वस्त्रे कमालीची मळलेली होती. कुठूनतरी स्लॅबसाठी लागणार्या फळया आणून तो मोकळया जागेत ठेवत होता. खूप सकाळीच कामाला लागलेला असावा कारण बराच मोठा ढीग झाला होता.
इमारतीखाली बनवले जाणारे काँक्रिट वर नेण्यासाठी एका सरळ रेषेत केलेली बांबूच्या स्कॅफ फोल्डींगची व्यवस्था बघत बसलो हातो. त्या माणसाचे फळया टाकायचे काम बहुतेक झाले असावे कारण इमारतीच्या आवारात असणार्या बोअरींगची मोटर चालू करून त्याने पाईपच्या साहाय्याने इमारतीवर पाणी मारायला सुरवात केली.
इतक्यात बायकोने बटर लावलेली गरमागरम सँडविच समोर आणून ठेवली. सँडविच हा बंड्याचा वीक पॉईंट आहे. वाऊ करून तो त्यावर तुटून पडला. मी मात्र “हा ब्रेकफास्ट?” म्हणून उगाचच तिच्यावर वैतागलो. दोन दिवस ऑफिसच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ब्रेकफास्टसाठी सँडवीचच होती. त्यामुळे मी त्यांना कंटाळलो होतो. नेमके ते सोडून काहीतरी वेगळे मला पाहिजे होते. पण त्या बिचारीला काय ठाऊक! एखाद्या रविवारी तरी किचनमध्ये नेहमीसारखा पसारा नको म्हणून तिने पटकन नाष्ता बनवला होता.
माझ्या अचानक चिडण्यावर काहीच न बोलता ती तिथेच खाली मान घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आल्यावर मी वरमलो. बायकोचा हा अवतार मी कधी पाहिला नव्हता. असे काही झाले की ती नेहमी भांडायच्या मूडमध्ये असते. अचानक हिला काय झाले ते मला समजेना. मी प्रचंड गोंधळलो.
आपल्या ऑफिसला किमान रविवारी तरी सुट्टी असते पण बायकोला कधी सुट्टी असते का हा विचार मी कधी केलाच नव्हता. अजून वादावादी नको म्हणून गुपचूप सँडविच खायला लागलो. माझं लक्ष खिडकीतून मघाशी त्या पाणी मारणार्या माणसावर गेलं.
त्याने चालू पाण्याचा पाईप बांधकामावर तसाच बाजूला ठेऊन एका ग्लासमध्ये पाणी घेतले. तिथेच बाजूला ठेवलेल्या त्याच्या सामानातून त्याने कसलेतरी पॅकेट काढले. पॅकेट कसले, बिस्किटचा पुडा होता तो! नुकत्याच टाकलेल्या फळ्यांच्या ढीगाला टेकून तो आरामात बसला आणि पुडा फोडून त्यातली बिस्कीटे एकेक करून पाण्यात बुडवून खाऊ लागला.
बंड्या सँडविच उडवण्यात दंग होता. मी आणि बायकोने एकाचवेळी त्या माणसाला पाहिलं. ती काही बोलली नाही पण दोन क्षणांपुरता का होईना तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष माझ्यावर टाकला आणि किचनमध्ये निघून गेली. अचानक काय झाले कळले नाही पण माझ्या तोंडातल्या सँडविचची चव झटकन बदलली आणि त्याबरोबरच्या गरमागरम कॉफीने तर मूडच बदलून टाकला.
सुखाचे संदर्भ चुकले की आयुष्यातले समाधान हरवून जाते हे त्यादिवशी मला नव्याने उमजले.
©विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog
July 31, 2018
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
March 24, 2019
आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग, लाल, गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात.
July 22, 2021
बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश.
July 27, 2022
बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला , सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांनी टी पॉय वर पाय ताणले आणि टीव्ही ऑन करून न्युज चॅनल लावला. पण त्यांचे लक्ष टी व्ही कडे नव्हते.हॉस्पिटल मधुन बाहेर पडता पडता त्यांच्या नजरेस पडलेले दृष्य आता निवांत बसल्यावर डोळ्यासमोर तरळू लागले.
August 16, 2022
मी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली . पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू . मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे . आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call . कारण तुला skype download करायचा कंटाळा . ” जमलय ” अशी तुझी दिलखुलास दाद . . .आणि मग तू प्रत्यक्षात म्हणायच्या आधीच माझ्या काना – मनात घुमनार तुझे वाक्य . . . जवळ असतीस तर . . . ” हे वाक्य नाही रे पाठ सोडत . . .
February 5, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti