नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते.
काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे 150 पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. दिंडीचे भव्य स्वागत कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच या महाकाव्यसम्मेलनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नयना आपटे यांनी केले. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मनसे नेते सदाशिव मते, मनसे प्रमुख संघटक सुनील बसाखेत्रे, माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलंकर, पुण्यनगरीचे राधाकृष्ण नार्वेकर, संपादिका राही भिडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील विविध लेखक, पत्रकार, कवी व कवयित्री देखील आवर्जून उपस्थित होते.
एकदिवसीय असलेल्या या महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांनी संयोजक प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या सहयोगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन जयवंत बामणे व सौ. संगिता शांताराम कारंडे यांनी केले होते. या महाकाव्यसम्मेलनामध्ये प्रत्येकास काव्यवाचनाची संधी देण्यात आली. प्रत्येकास सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. ‘तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन’ असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो.
एका काळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती.
त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली. पण राजाच्या
बगीच्यांतील माळ्यास आपले काम टाकून या उत्सवास जाता येईना. पुढे
त्याला अशी एक युक्ति सुचली की, आपल्या उद्यानात रहाणाऱ्या वानरांच्या
टोळीवर बगीच्याला पाणी देण्याचे काम सोपवून आपण एक दिवस तरी
उत्सवाला जावे.
शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल.
माणूस नेहमीच भौतिक सुखाच्या छत्रचामरांसाठी अविश्रांत धावत असतो. हे कुणीच नाकारू शकत नाही. परंतु या परिश्रमातून खरंच आत्मसुख , आत्मशांती लाभते कां? हा मूल प्रश्न अनुत्तरीत रहातो. सर्व सुखे दारात असूनही समाधानी , सुखाला वंचित असणारी माणसे आहेत. की ज्यांना मन:शांती लाभली नाही. तर दुसऱ्या बाजूला अत्यन्त सामान्य परिस्थितीत देखील स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारी माणसं या जगात आहे.
हा विरोधाभास देखील आपल्याला प्रत्ययास येत असतो. पण अशी माणसं भेटणं हा ही एक भाग्ययोग समजावा.. मला भेटली हे माझे भाग्यच.!!
लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीत देखील अगदी कळतंय अशा वयापासून जो सहवास लाभला तोच सहवास आज जीवन समृद्ध करून गेल्याचे जाणवते. आणि आज ते जणू दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक भासतात.
त्या बालवयात त्यांचे महत्व कळले नाही. पण आज ते सारे जेंव्हा आठवते तेंव्हा मात्र भौतिक सुखाचा विचार न करता केवळ ज्यातून आपल्याला सात्विक , आत्मिक , आत्मसुख मिळेल याचाच विचार करून जे जगले कार्यरत राहिले आणि केवळ वैचारिक , प्रबोधनात्मक समाजकल्याणाची अत्यन्त कष्टप्रदी अशा कर्तव्यतप्तर्तेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ( सर्वांची नांवे मी उद्घृत करत नाही) पण आज आपण त्यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या महदकार्याचा महाकाय वटवृक्ष जेंव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पहातो आहोत तेंव्हा त्या " भौतिक सुखाच्या पल्याड असणारी आत्मशांती आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही.
आज ज्यांच्या उत्तुंग अशा विवेकी दैवी संकल्पनेतून आपल्याला जे जे उत्तुंग दिसते आहे ती एक कल्याणकारी साधना आहे, ती एक तपश्चर्या आहे. हे निर्विवाद. अगदी कौटुंबिक स्तरावर जरी विचार केला तरी आपल्या पूर्वजांनी अगदी आजोबा , पणजोबांनी केलेल्या एखाद्या आम्रवृक्षाचे बीजारोपण आणि त्याचा आपण आपण घेत असलेला उपभोग ही त्या आपल्या पूर्वजांची साधना, तपश्चर्याच म्हणावी लागेल. ही निस्वार्थी तपश्चर्या म्हणजेच आत्मसुख ,आत्मशांती आहे.
विज्ञानयुगात भौतिक सुखाच्या व्याख्येत संस्कारी अध्यात्मिक मनाचे आभाळ कधी रमत नाही. त्या अंतरमनाला खऱ्या आत्मिक सुखाची नितांत गरज असते.
जगात जगताना बेगडी हास्यसुखाचा मुखवटा पांघरून जगणे म्हणजे आपल्या अंतरिक सत्य सुखापासून दुर्दैवाने वंचित रहाणे असते.
म्हणून जगतांना भौतिक सुखाच्या पलीकडे असणारे आत्मानंदी कृतार्थी सुख महत्वाचे असते.
आज जगाच्या दृष्टीने आपल्या भूमिकेतून आपण खूप समृद्ध जीवन जगलो आहोत असे आपल्याला वाटत असते. साऱ्या षड्रिपुंशी आपली ओळख झालेली असते. साऱ्या भौतिक सुखांच्या क्षणिक छत्रचामरात देखील आपण सुखात आहोत याची अनुभूती येते देखील.
पण आपल्या शिशुशैशवातील , बाल्यावस्थेतील निरागसता मात्र हरविलेली असते. मग जेंव्हा अंतर्मुख होतो. तेंव्हा खरे सुख म्हणजे भौतिक वैभवी सुख ? की तो निरागस वात्सल्य प्रीतीच्या मैत्रेय नात्यांचा निर्मोही लडिवाळ सहवास ?
हा प्रश्न मनाला भेडसावत रहातो. हे तितकेच खरे...!!!
म्हणूनच अध्यात्म ( आत्ममुख होणे ) हा भारतीय संस्कार आहे. आणि या संस्कारातूनच मानवाला भौतिक सुखाच्या पल्याड असणाऱ्या त्या चिरंतन दैवी आत्मसुखशांतीची , निर्मल , सात्विक , सोज्वळ प्रीतभावनांची अनुभूती येते.
इती लेखन सीमा
-- वि.ग.सातपुते.
9766544908
२३ फेब्रुवारी २०२२
पुणे .
मराठी माणसाला इतिहासात रमायला नेहमीच आवडतं. त्यातही तो इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा असला, तर बघायलाच नको! वर्तमानातील कठोर वास्तवापासून दोन क्षण का होईना दूर जाता येणं, हा त्यातील बहुधा सर्वात मोठा लाभ असावा. त्यामुळेच कायम गतकालात, इतिहासात रमणार्या व्यक्तीची पलायनवादी अशा शब्दात अनेकदा हेटाळणीही केली जाते. तरीही ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल!’ या पंक्तीवर भरवसा ठेवून असेल कदाचित, मराठी माणूस हा इतिहास आणि पुराणकथांमध्येच रममाण झालेला आढळतो. त्यातही मराठी माणसाचा सर्वात आवडता काल म्हणजे सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांपासून सुरू होणारा आणि पुढे एकोणीसाव्या शतकात पेशवाईच्या अखेरीस येऊन थांबणारा, हे आता सर्वश्रुत झालं आहे. त्यामुळेच मराठीतील अनेक कादंबर्या आणि नाटकं ही याच कालातील गौरवशाली घटनांवर आधारित आहेत.
गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” ………….
‘अनुकरण’ ह्या शब्दावर किंवा त्या शब्दाचा अर्थ काढून त्यावर आपणाला समाजामध्ये वाद-विवाद घालायचा नाही किंवा त्यावरती बाष्कळ चर्चासुध्दा करण्याची आवश्यकता नाही. पण ह्या अनुकरणांमधून समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये किती घातक परिणाम होताना दिसतात, त्यासाठी हा सर्व लिखाण प्रपंच करावा लागत आहे.

शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते!
पिसा येथे, स्क्वायर अॉफ मिरॅकल्स या ठिकाणी, असणाऱ्या तिन्ही वास्तू खरोखरच अप्रतिम ! बांधकाम कलेचे उत्कृष्ट उदाहरण. तीनही पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पासून बनवलेल्या. सभोवतालच्या हिरवळीवर आणि आकाशी अंबराच्या पार्श्वभूमीवर तर या चांदण्यां सारख्या चकाकत होत्या. अशा या सौंदर्यपूर्ण इमारतींना सामावून घेणारा हा चौक म्हणूनच स्क्वायर ऑफ मिरॅकल्स या नावाने ओळखला जातो. एवढ्या विशाल इमारती, त्यावर असणारी शिल्पकला, त्याचे आर्चस् ,त्यावरील अगणित नाजूक दिसणारे असंख्य खांब हे सारं अक्षरशः एखाद्या चमत्कारा सारखंच आहे. बघता क्षणीच या जागेला दिलेले नाव अगदी साजेसं आहे असे लक्षात आले.
बापेस्ट्री,कॅथॅड्रल व लेनिंग टॉवर ऑफ पिसा या संगमरवरी वास्तू लांबून बघितल्या असता, एका सरळ रेषेत असाव्यात असे वाटते. पण जवळ गेल्यानंतर प्रत्येक वास्तू केवढ्या तरी अंतर ठेवून स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या दिसून येतात.
बापेस्ट्री. बापेस्ट्री ,हा चर्च चाच एक प्रकार.पण प्रार्थने शिवाय येथे इतर धर्मियांचे धर्मांतर करून त्यांचा ख्रिश्चन धर्मात समाविष्ट केले जाते,ते ठिकाण.अशी माहिती मिळाली.
संपूर्णपणे गोलाकार असणारी ही वास्तू ,आपल्या कर्नाटकातील विजापूरच्या गोलघुमटाची आठवण करून देते. इटलीमध्ये आर्चस् चे जरा जास्तच महत्त्व आहे असे दिसून आले.या वास्तूला ही भरपूर छोटे-मोठे आर्चस् असून प्रचंड मोठा व्यास असणारी ही वास्तू आहे.तिचे आज किती महत्त्व आहे माहीत नाही, पण इटलीच्या प्राचीन इतिहासात ही अतिशय महत्त्वाची असणार एवढे मात्र नक्की. इतिहासाचा मागोवा न घेता पर्यटनाचा आनंद लुटावयाचा या हेतूने केलेले आमचे पर्यटन मात्र सफल होत आहे हे लक्षात आले.
कॅथेड्रल,आयताकृती रचनेतून साकारलेले पण त्यावर भरपूर आर्चस्, पुतळे असणारे हे चर्च खूपच मोठे आहे.कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ असू देत, मंदिर,मज्जीद ,चर्च किंवा आणखीन कोणतेही तेथे गेले की, ती वास्तू प्रसन्नपणे आपल्याकडे बघून स्मित हास्य करत,आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवत असल्याचा भास होतो.आपले मनही आनंदून जाते.आपल्या डोळ्यात मावणार नाही असे हे कॅथेड्रल कितीतरी लोकांना मन:शांती बहाल करते.
लेनिंग टॉवर ऑफ पिसा, ज्याला आपण पिसाचा झुलता मनोरा असे संबोधतो.सकृत दर्शनी हा मनोरा म्हणजे, कॅथॅड्रल चाच एक भाग असावा असे वाटते. पण जवळून बघितल्या नंतर दोन्ही स्वतंत्रपणे उभे आहेत हे लक्षात येते.इ.स.१११३मध्ये 'बोनॅन्नो पिसानो' नावाच्या अभियंत्याने या मनोऱ्याचे डिझाईन बनवले.जगातल्या सात आश्चर्यांच्या ओळीत बसलेला हा मनोरा नंतर मात्र ओळीतून बाहेर पडला.
एकूण आठ माळ्यात बनलेला हा मनोरा आहे.सर्वच माळे गोलाकार आहेत.तर समान अंतरावर असणाऱ्या एकावर एक चढवलेल्या पिलर्स वर हा मनोरा उभा आहे प्रत्येक पिलर ला जोडणारे आर्चस् अत्यंत रेखीव आणि आकर्षक आहेत. संपूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी पाषाणात बांधलेला हा मनोरा, त्याचे बांधकाम चालू असतानाच साधारण चौथ्या माळ्या पासून झुकत चाललाय हे लक्षात आले. ३.९०अंश ते ५.५०अंशाने मनोरा एका बाजूला झुकल्याचे दिसून येते.जाणकारांच्या मते,या मनोऱ्याचा पाया हा सॉफ्ट ग्राउंड वर बांधला गेला आहे. त्यामुळे वर चढत गेलेले मनोर्याच ओझे हा पेलू शकला नाही. म्हणूनच हा झुकला असावा. या मनोऱ्यावर चढण्यासाठी एकूण २८४ पायऱ्या आहेत.चढावयास ३० मिनिटे लागतात.एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत यात लोकांना आत प्रवेश करता येतो. बाकी सहा महिने मात्र बाहेरूनच बघावा लागतो. आत मध्ये मोठ्या मोठ्या घंट्या ( बेल्स) लावलेल्या आहेत.
पिसाचा हा मनोरा जरी किंचित झुकलेला आहे,तरीही त्याचे सौंदर्य अद्वितीय आहेच. आपल्या डोळ्यांमध्ये तो जास्तीत जास्त साठवून ठेवावा असेच प्रकर्षाने वाटते.शेवटी कॅमेरात कैद केलेले सौंदर्य हे डोळ्यांनी बघितलेल्या सौंदर्यापुढे केंव्हाही गौणच.स्क्वायर आॅफ मिरॅकल्स चा हा नजराणा दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर हटूच नये त्यावरुन असे वाटत रहाते,हे मात्र अगदी खरे!
यानंतर आम्ही उंच टेकडीवरअसणाऱ्या,'पिझ्झाल्ले माईकॅंजेल्लो' या चौकात आलो. येथे भव्य उंचच उंच असा, संपूर्ण उभा असणारा डेव्हीड चा पुतळा आहे. संपूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या पुतळ्याचे अंगावरचे केस अन केस तसेच पोटाच्या आतील अवयवांचा बाहेरुन दिसणाऱ्या खुणांसह एवढा अप्रतिम बनवलेला आहे की तो हुबेहूब डेव्हीडच वाटतो.
इटली हा कला,संस्कृती, इतिहास यांनी संपन्न असणारा देश आहेच. कलेचे माहेरघर आहे. शिल्पकला चित्रकला संगीत क्षेत्रातले खूप नावाजलेले जास्तीत जास्त कलाकार इटलीमध्ये आहेत.
तेथे आपल्याला रस्त्यांवर सुद्धा ठिक ठिकाणी आपली कला सादर करत असणारी कलाकार मंडळी चौका चौकातून दिसतात.
डेव्हिडच्या भव्य पुतळयाला बघितल्यानंतर आम्हाला याच टेकडीवरून फ्लोरेन्स शहराचे दुर्बिणीतून दिसणारे विहंगम दृष्याने मनाला मोहूवून टाकले., कितीतरी टॉवर्स आणि कॅथॅड्रल चे डोंब तसेच सर्वच घरांची लाल रंगाची छतं हे नयनमनोहर चित्र आपल्याला विलक्षण भावते.
दिवसभर केलेल्या इटलीतील या साऱ्या गोष्टींची मनातल्या मनात समाधानाने उजळणी करत करतच आम्ही फ्लॉरेन्स शहरात प्रवेश केला. जवळजवळ युरोपभर किंबहुना, इटलीमध्ये जरा जास्तच प्रमाणावर, हॉटेलिंग करणारे लोक हॉटेलच्या बाहेर टेबल खुर्च्यांवर बसून लंच डिनर वगैरे घेताना दिसून येतात.या लोकांची आवडती जागा किंवा पद्धत म्हणता येईल ही. हॉटेल्सच्या डायनिंग मध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेणारे खूपच कमी लोक असतात तेथे.
फ्लॉरेन्सला रात्रीचा आराम घेत सकाळी नाश्ता आटोपत, आम्ही रोम या राजधानीच्या शहरात प्रवेश केला. येथून उतरलो, आणि 'Rome is not built in a day' ही प्रसिद्ध म्हण आठवली.
व्हॅटिकन सिटी,हा धार्मिक अधिष्ठानावर उभा असणारा एक स्वतंत्र देश. रोम शहरातच वसलेला, पवित्र चर्चेस साठी प्रसिद्ध.सर्वात कमी लोकसंख्या असणारा (केवळ एक हजार) आणि सर्वात कमी क्षेत्रफळ. म्हणून हा जगातील सर्वात लहान असा स्वतंत्र देश आहे.
मुस्लिमांना मक्का मदीना जेवढे पवित्र, तेवढेच ख्रिश्चन लोकांना पवित्र असणारी ही व्हॅटिकन सिटी. छोटा आहे तरीही या देशाला आपली स्वतःची अशी राज्यघटना, राष्ट्रध्वज, चलन,पासपोर्ट या सर्व गोष्टी आहेत. त्यांचे मुख्य धर्मगुरु पोप हेच या देशाचे राजे असतात. त्यांचे वास्तव्य येथे असते.या देशातील चर्च फारच बघण्यासारखी आहेत. एक कोटींपेक्षा जास्त अनुयायी असणारे हे पवित्र ठिकाण आहे.
व्हॅटिकन म्युझियम व सिस्टीन चॅपेल ही दोन्ही ठिकाणे अप्रतिमच. चित्रकलेचा राजा असणाऱ्या मायकेलअँजेलोने काढलेले सुंदर सुंदर पेंटिंग्ज व थक्क करून टाकणारी सिलिंग पेंटिंग्ज बघून,"आ वासून बघणे", म्हणजे काय असते?याचा प्रत्यय येतो. म्युझियम मध्ये चित्रकलेशिवाय शिल्पकला स्थापत्यकला यांच्या एकापेक्षा एक सुंदर सुंदर नमुन्यांचा अक्षरशः भरणा आहे. त्यांची भव्यता दिव्यतेच्या साथीने आपल्याला थक्क करून टाकते.
सिस्टीन चॅपेल हे येथील पोप यांचे निवासस्थान. सिलिंग पेंटिंग या कलेचा आणि त्याचबरोबर चित्रकलेचा कळस गाठणारी ही ठिकाणं. एवढ्या प्रचंड उंचीवर पेंटिंग्ज कशी साकारली गेली असावित? या विचाराने मती गुंग होऊन जाते.केवळ शब्दातीत असणारे हे सौंदर्य बघून आपले डोळे दिपून जातात,हे वेगळे सांगणे नकोच.
पवित्र बॅसिलिका या वास्तूला भेट हा एक अनोखा अनुभव होता. बॅसिलिका म्हणजे एक विशेष प्रकारची डिझाईन केलेली भव्य अशी पवित्र वास्तू. प्राचीन काळात राजकीय आणि कायदेविषयक चर्चा करण्याकरता या वास्तूचा उपयोग व्हायचा.बॅसिलिका म्हणजे मोठ्ठे असे पवित्र कॅथॉलिक चर्च. येथे मुख्य धर्मगुरूंचे वास्तव्य असते. या वास्तूचे पावित्र्य आणि स्टेटस् उच्च स्थानी रहाण्याची परंपरा कायम राखली जाते.बॅसिलिका हे स्थापत्य कलेचे वैभव संपन्न ठिकाण आहे.
रोम शहरातच असणारी पण स्वतंत्र देशाचा दर्जा राखणारी,ही पवित्र नगरी व येथील ठिकाणं आपल्याला आपल्या चार धाम यात्रेच्या पावित्र्याची आणि मांगल्याची आठवण करून देतात हे खरे.
भाग १० समाप्त.
क्रमशः
© नंदिनी म. देशपांडे
तर, त्या वेळी मी पुण्यातल्या राजा धनराज गिरजी शाळेमध्ये शिकत होतो. पाचवी किवा सहावी असेल, पण त्या वेळी वि. कृ. क्षोत्रिय नावाचे मुख्याध्यापक होते. मराठीत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, सुभाषितांचे संग्रह काढले, मुलांच्या मनावर संस्कार घडविले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आचार्य प्र. के. अत्रे यांनीही काम पाहिलं होतं. पुण्याच्या पूर्वभागातील ही शाळा त्या वेळी फारशी प्रख्यात नव्हती. गरिबांची शाळा असंही काही वेळा तिचं वर्णन केलं जायचं; पण शाळेसाठी देखणी इमारत होती, सुसज्ज प्रयोगशाळा होती, शरीराला व्यायाम व्हावा आणि मनाला ऊर्जा लाभावी, असं मैदानही होतं. त्या दिवशी शनिवार असावा. सकाळची शाळा होती. मी वर्गात प्रवेश करणार एवढ्यात उजवीकडे, भितीलगत काहीतरी चमकणारं दिसलं. वेग कमी झाला. मी थांबलो. पाहिले, तिथं एक घड्याळ पडलेलं होतं. उचललं आणि खिशात ठेवलं. घड्याळ ही मौल्यवान चीज आहे एवढं कळण्याजोगं वय होतं माझं. माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी घड्याळ घेतलं त्या वेळी त्या हॅन्री सॅन्डोजच्या घड्याळाला ९० रुपये लागले होते. हे घड्याळ तर भारी दिसत होतं. वर्गात बसलो; पण शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे लक्ष नव्हतं. अर्ध्या चड्डीच्या उजव्या खिशात त्या घड्याळाला मी सतत स्पर्श करीत होतो. या घड्याळाचं काय करावं, हा प्रश्न मला अस्वस्थ करीत होता. तोपर्यंच्या बालसुलभ आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा काही माझा स्थायिभाव नव्हता. शिवाय मोहही खूप होते. शाळेबाहेर बसणारा हिदुस्थानी काजूवाला (शेंगदाणे) चिक्कीवाला, शिवाय चुंबकीय खेळण्याचं नवं विश्वही मला कळलेलं होतं. काय करावं? काय करू शकू? प्रश्नांची मालिका मनात फेर धरीत असतानाच बेल झाली अन् मधली सुटी झाली. माझी तंद्री भंग पावली. मी उठलो, वर्गाबाहेर आलो. शेजारीच मुख्याध्यापकांची खोली होती. पाहिलं अन् सरळ आत घुसलो. श्रोत्रिय सर बसले होते. त्यांच्यासमोर ते घड्याळ ठेवलं. म्हटलं, ‘सकाळी हे घड्याळ सापडलं. माझा तास सुरू होता म्हणून जवळच ठेवलं, हे घ्या. ज्याचं असेल त्याला मिळायला हवं.’ मी हे बोललो. काही खरं होतं, काही खोटं... पण मी घड्याळ परत केलं होतं. का, हे मला आजही सांगता येणार नाही. कदाचित घड्याळासारखी वस्तू विकण्याची, पचविण्याची माझी क्षमता नसावी. सरांनी ते घड्याळ पाहिलं. शाब्बास म्हणाले अन् मी परत वर्गात आलो. आपण जे केलं ते योग्य की अयोग्य याचा वेध घेता येत नव्हता. स्वाभावाकिपणे कोणाला काहीच सांगितलं नाही. कदाचित इतर मुलं वेड्यात काढतील अशी भीतीही असावी. त्यानंतर आठवडाभरानं म्हणजे दुसर्या शनिवारी प्रार्थनेसाठी सर्व वर्ग एकत्र आलेले असताना प्रार्थनेनंतर सरांनी मला पुढे बोलावलं. सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. झालेली घटना सांगितली आणि अशी प्रामाणिक मुलं ही या शाळेचं नाव मोठं करतात, असं काहीतरी सांगितलं. हजार विद्यार्थ्यांच्या समोर आज मी प्रामाणिक विद्यार्थी झालो होतो. शाळेच्या अभिमानाचा विषय झालो होतो. ज्याचं घड्याळ होतं त्यानं मला देण्यासाठी एक पेन दिलं होतं. माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. मी काही केलं नसताना मिळालेला! दोन दिवसांनी घरी पत्र आलं. मी मावशीकडे राहत असे. शाळेचं पत्र पाहून घरचे चकावले; पण पत्र वाचून त्यांनाही आनंद झाला. एका पोस्टकार्डवर श्रोत्रिय सरांनी माझ्या प्रामाणिकपणाला दाद दिली होती. आता घरातही मी प्रामाणिक ठरलो होतो. घरसामान आणताना दोन-पाच पैशाची हेराफेरी करणारा मी प्रमाणित प्रामाणिक ठरलो होतो. त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मला खास प्रमाणपत्र देण्यात आलं. ‘तू प्रामाणिक आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ असं ते प्रमाणपत्र सांगत होतं. जे माझं नव्हतं, जे मला मिळालं, ते मी परत केलं या एवढ्याशा बाबीवरून मी शाळेतला एक विशेष विद्यार्थी झालो होतो. खरोखर मी प्रामाणिक होतो का? मला तरी ठामपणे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता येत नाही. घड्याळाऐवजी पाच-दहा रुपये सापडले असते तर? तर कदाचित माझा प्रामाणिकपणा कधीच पुढे आला नसताही! पण एक मात्र खरं, या घटनेनंतर ज्या ज्या वेळी मोहाचे क्षण आले, त्या त्या वेळी जे आपलं नाही, जे दुसर्याचं आहे; ते आपल्याला नको, हाच आवाज मनानं दिला. मला ती शाबासकी, ते पेन, ते प्रमाणपत्र याचा कधी विसर पडू दिला नाही. मी मुळतः प्रामाणिक होतो की नाही मला माहीत नाही; पण वि. कृ. श्रोत्रिय सरांनी तू प्रामाणिक आहेस, असाच संस्कार केला. तो कायम राहिला हा त्यांच्या विश्वासाचा परिणाम असावा.
-- किशोर कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti