नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..!
भिवंडी, चेंबूर, सातारा, बडोदे येथे काही कार्यक्रम करून आयोजक दिनेश केळकर यांच्या रोटरी क्लबसाठी मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर केला. 'आनंद भारती' या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त 'शंभर संगीतकारांची शंभर गाणी' असा अभिनव कार्यक्रम आखण्यात आला. संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार होता. सलग आठ तास होणाऱ्या या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार होती. अनेक कलाकारांबरोबर या कार्यक्रमात मी नऊ गाणी गायली. यानंतर आयोजक किशोर कर्नावट यांच्यासाठी एक कार्यक्रम महाबळेश्वरला केला. ठाण्यातील ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांच्याकडे लहानपणी मी आईबरोबर गाणे शिकायला जात असे. त्यांच्या म्युझिक अॅकॅडमीला पन्नास वर्षे पूर्ण होत होती.
माझे जे दोन शिष्य आज अनेक कार्यक्रम करत आहेत, त्यांचाच कार्यक्रम मी यानिमित्ताने करणार, असे ठरवून लीलाताईंनी माझा आणि शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक सुरेश बापट यांचा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या गुरूने तुमचा सन्मान करणे यापेक्षा मोठे जगात काय असू शकते? सुरेश आणि माझ्यासाठी हा कार्यक्रम भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. डिसेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आले. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकर कलावंतांचा कार्यक्रम नरेन्द्र बेडेकर यांनी सादर केला. या कार्यक्रमात मी गायलो. या संमेलनामध्येच 'इंडियन मॅजिक आय' या कंपनीने झी मराठी चॅनलसाठी 'मराठी संगीत रजनी आयोजित केली. या कार्यक्रमातही मी गाणी सादर केली. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, विनायक जोशी, नंदेश उमप, अनघा ढोमसे, अतुल परचुरे आणि सुबोध भावे हे कलाकार होते. माझा रेकॉर्डिस्ट मित्र प्रमोद कैलास या वेळी 'इंडियन मॅजिक आय' या कंपनीत काम करत होता. 'गाऊ विठोबाचे नाम' या माझ्या पहिल्या अल्बमपासून माझी अनेक गाणी त्याने रेकॉर्ड केली होती. या कार्यक्रमाच्या मध्यंतरात प्रमोदने माझी भेट घेतली. “अनिरुद्ध, माझे एक महत्त्वाचे काम तुझ्याकडे आहे. आम्ही लातूर फेस्टिव्हल- २०११ चे आयोजन करत आहोत. यामध्ये एक मोठी सुगम संगीत स्पर्धा घेतली जाणार आहे. यात अंतिम फेरीच्या स्पर्धकांची निवड झाल्यावर त्यांच्यासाठी आम्ही उत्तम गाणे सादर करण्यासाठी चार दिवसांची कार्यशाळा घेणार आहोत. तुझ्याकडे इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. तेव्हा हे काम तू करावेस आणि या अंतिम स्पर्धेचा परीक्षक म्हणून देखील असावेस असे मला वाटते." प्रमोद म्हणाला. "मी हे काम नक्की करेन प्रमोद !” मी उत्तरलो. एकूण २०१० हे वर्ष मला एक नवीन काम देऊन जात होते.
लातूर फेस्टिव्हल २०११ साठी मी ४ जानेवारी २०११ रोजी लातूरला निघालो. मराठवाड्यात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण तेथील माणसे अत्यंत प्रेमळ होती. सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन अजय पांडे यांच्याकडे होते. हा माणूस हिंदू, उर्दू आणि मराठी गझलचा निस्सीम चाहता होता. स्वतः ते गझलच्या रचनाही करत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या अनेक स्पर्धकांना सुगम संगीताचे शिक्षण मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी ही कार्यशाळा गरजेची होती. सलग चार दिवस मी त्यांच्यावर मेहनत घेतली. त्यांच्यात खूपच फरक पडला आणि तो अंतिम स्पर्धेच्या त्यांच्या गायनातून दिसला. या स्पर्धेचे माझ्याबरोबरचे दुसरे परीक्षक संगीतकार मिलिंद जोशी होते. त्यांनी हा फरक बोलूनही दाखवला. ही सुगम संगीत स्पर्धा आणि एकूणच लातूर फेस्टिव्हल २०११ यशस्वीरीत्या पार पडले.
घरी परतल्यावर 'गीत जगमगाएँ रागोंके' हा शास्त्रीय रागांवर आधारित हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम बेडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह थोरले बाजीराव पेशवे सभागृहात मी सादर केला. निवेदन भाऊ मराठे यांचे होते. या कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाद मिळाली.
यानंतर आमच्या स्वर - मंच म्युझिक अॅकॅडमीच्या सुशोभिकरणाचे काम आम्ही सुरू केले. आचार्य बिल्डींग येथे स्वर-मंचची दुसरी ॲकॅडमी उभी रहात होती. कुशल इंटिरिअर डेकोरेटर गणेश अंबिके यांनी हे काम केले. काही महिन्यातच या ॲकॅडमीचे उद्घाटन आमदार एकनाथ शिंदे आणि अरुण सोनाळकर यांच्या हस्ते झाले.
-अनिरुद्ध जोशी

मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते.
माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून

पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये एफवाय बीए करणाऱ्या सोनालीला ट्रेकिंगचे वेड होते, पण आई बाबांचा तिच्या या छंदाला सक्त विरोध होता. मनिष आणि जयश्री या सुखवस्तू दांपत्याची ती एकुलती एक मुलगी. इतर मुलांसारखं तिने यूपीएससी करावं किंवा एनडीएची परीक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते भरपूर खर्चही करायला तयार होते.
सोनालीचे सगळे मित्र पाचवीपासूनच बिझी झाले होते, कुणी आयआयटीची कसून तयारी करीत होता तर कुणी एम्स आणि मेडिकल साठी झटत होता. यशने तर सीएचा अभ्यास अकरावीपासूनच सुरू केला होता, त्याला लवकरात लवकर त्याचे सीए संपवून लॉ सुद्धा करायचे होते. तोरलचं लग्नं कुठल्यातरी बिझनेसमन फॅमिलीमध्येच करायचे असे घरून नक्की झालेले होते त्यामुळे तिने एमबीए एंट्रन्स कॅट इत्यादींची तयारी सुरू केली होती.
सोनालीला तिची फिरण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती, तिच्या आवडीचं काहीच तिला तिच्या अभ्यासक्रमात सापडलं नव्हतं. तिला मराठी इंग्रजीमध्ये रस होता, पण नुसतीच भाषा शिकणं कोणत्याच प्रोफेशनल कोर्सला पुरेसं नव्हतं. तिच्या आवडी निवडीला साजेसा कोणताच विषय तिला अभ्यासक्रमात सापडत नव्हता. सोनाली हा आई वडिलांच्या डोक्याला ताप झालेला होता, तिचं वागणं त्यांच्या सोसायटीतल्या नात्यातल्या ओवी संदेश सुरभी नेहा प्रीतम या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं होतं आणि अभ्यासातही सगळाच आनंद होता.
एकदा आई वडिलांना न कळवताच ती एका ग्रुप बरोबर साठवलेले पैसे भरून राजगड ट्रेकला गेली. ती त्या ग्रुपलीडरच्या मागे नकळत चाललेली होती, पण तिचे खरे लक्ष इकडच्या वाटेने जाऊन बघ, तिकडच्या दरीत डोकावून बघ, पलीकडे उतरून पहा, झाडाच्या फांद्यांना लटक, खोडांच्या बेचक्यात उभं राहून फोटो काढ असेच होते. तिथे तिला गावातला शंभू भेटला. शंभू फारसा शिकलेला नसला तरीही त्याला जंगलांची बऱ्यापैकी माहिती होती. कोणती फुलं पावसाळ्यात येतात, उन्हाळ्यात कोणत्या गवताला मोठं मोठे तुरे फुटतात, कोतवलाची घरटी काटे सावरीवर का असतात? अशा त्याच्या कडून मिळालेल्या माहितीमुळे ती खूपच उत्साहित झाली आणि मी पुन्हा आल्यावर संपूर्ण जंगल फिरवून आणण्याची कबुली तिने त्याच्याकडून घेतली आणि नंतरच तिने तो ट्रेक व्यवस्थित पूर्ण केला. ती एक महिन्याभराने परत राजगडला आली, यावेळी शंभू आणि ती विंझर मधून सिंहगडवर जाण्यास निघाले, त्यांना शंभुचा मित्र शंकऱ्या भेटला. शंकऱ्याला सुद्धा जंगलाची प्राण्यांची आणि डोंगरदऱ्यांची बरीचशी माहिती होती पण ते दोघेही फारसे फिरलेले नव्हते. त्यांची मजल जेमतेम आठ दहा किलोमीटर्सच्या परिसरापूरतीच होती. तिने त्या दोघांना चालत रायगडला जाण्याचा प्रस्ताव दिला. ते दोघेही सुरुवातीला नकोच म्हणत होते पण शेवटी खाली कोंकणात उतरण्यास तयार झाले. मधल्या वस्त्यांमध्ये त्यांना प्रमिला आणि प्रसाद भेटले आणि त्या सर्वांनी मिळून भटकंती करायचं निश्चित केलं. पुण्याची सुरभी खरेतर युपीएससी आणि एमपीएससी सिरियसली देत होती, पण ती दुसऱ्या परीक्षेत खाली राहिली, तिला आता नव्याने तयारी सुरू करायची होती, फ्रेश होण्यासाठी म्हणून ती या चांडाळ पंचकात सामील झाली.
जंगल प्राणी वनसंपदा हेच आपल्या आवडीचे विषय आहेत, हे आता सोनालीच्या लक्षात येऊ लागले होते. स्थानिक लोकांना उपयुक्त अशी जंगली वनस्पतींची लागवड आपण जंगलात वनखात्याच्या परवानगीने सुद्धा करू शकत नाही, हे तिच्या लक्षात आले. सुगंधी गवतं औषधी तेल देणाऱ्या करंज्या सारख्या वनस्पती अशा अनेक वनस्पती तिला माहिती झाल्या होत्या पण त्याच्यासाठी ती काहिही करू शकत नव्हती. जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना त्याची माहिती करून देऊन रोजगार उपलब्ध करता येईल असे तिला वाटत होते, पण जंगल फक्त नांवाला आपले असते, त्याची खरी मालकी सरकारचीच असते, हे तिच्या लक्षात आले. आपण आपल्या जंगल संवर्धनासाठी काय करू शकतो? हा विचार ती करू लागली. तिने यासंबंधी कोणते कोर्सेस आहेत? याची युनिव्हर्सिटी मध्ये चौकशीही केली, पण समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. झूलॉजी आणि बॉटनी शिकण्यासाठी तिला पुन्हा बारावी सायन्स मधून करावे लागणार होते, पण तशी सोय उपलब्ध नव्हती.
फॉलिएज किंवा पगमार्कस् सारख्या संस्था, गाईडचे कोर्सेस आयोजित करतात, त्यामध्ये ते फोटोग्राफी आणि टुरिस्टस् ना आवश्यक तेवढी जंगलांची माहिती देतात, असे सोनालीला समजले, तिने चौकशी केली, त्यांच्या कोर्सच्या किंमती शंकर शंभू प्रसाद आणि प्रमिलाला परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्यांचे कमी शिक्षण आणि तोकडे इंग्रजीचे ज्ञान त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या आड येत होते. बीए पूर्ण झाल्यामुळे तिचे आईवडील आता लग्नासाठी तिच्या मागे लागले होते, तिला स्थळंही येऊ लागली होती.
सोनालीला तिची आवड तर समजली आहे, तसे मित्रही मिळाले आहेत, सरकार दरबारी मदत करायला यूपीएसी करणारी मैत्रीण तिला येऊन मिळाली आहे. ती तिचे प्रश्न सोडवू शकेल का? तिला कायद्यात राहून प्रश्न सोडवायचे नाहीत, तर प्रश्न सुटण्यासाठी कायद्यात सुयोग्य बदल हवेत, अशीच तिची धारणा आहे. अयोग्य कायद्यांमुळे बऱ्याच अडचणी जटिल होऊन बसतात, असे तिला वाटते.
ती हि लढाई लढेल? का ती लग्नं करून संसाराला लागेल? जशा जशा या चांडाळ पंचकाच्या छोट्याशा विश्वात घटना घडतील तशा तशा मी तुम्हाला सांगत राहीन.
कोणत्याही विषयांत पारंगत व्हायचं असेल तर त्या विषयाला प्रत्यक्षामध्ये भिडणे आवश्यक असते. प्रत्यक्ष जागेवरच्या प्रश्नाचे भान आपल्याला शाळेतले विषय जास्त समजावून सांगू शकते. आजकाल मुलं आयुष्याशी दोन हात करताना दिसत नाहीत, ते फक्त शाळा क्लासेस आणि परीक्षेच्या तयारीमध्ये मश्गुल असतात. आज अनेक इंजिनियर्स घरे बांधू शकत नाहीत, किंवा अनेक सीए कंपनीची प्रत्यक्षातील परिस्थिती समजून घेऊ शकत नाहीत. आयुष्याशी भिडत दोन हात करत पुढे जायला शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
आजच्या सिस्टीम मध्ये मला अनेक प्रश्नांची आणि अनेक स्तरातील समाजाची वेगवेगळ्या प्रकारे होणारी पिळवणूक दिसली. शिक्षणाने आणि कायद्याने नागरिक नाकर्ते बनविले आहेत, काहीही करण्याचा अधिकार फक्त राजकारणी आणि सरकारी नोकरांनाच आहे. हे दारुण पारतंत्र्य अजूनही लोकांच्या लक्षात येत नाहीये.
माझे जंगल असून मी त्याचं भलं करू शकत नाही आणि वन्यजीव माझे मित्र असून मी त्यांच्याशी जवळीक साधू शकत नाही. आज जे कोणी उत्तम काम केलेले जंगलप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी आहेत, कायद्याने दुर्लक्ष केल्याने ते मोठे झाले आहेत. राजकारण्यांच्या प्रत्येक झाडावर आणि मातीच्या कणावर राज्य करण्याच्या हव्यासामुळे आपली परिस्थिती दारुण झालेली आहे.आणि त्यात बुरसटलेल्या सामाजिक चालीरीतींनी भर घालून ठेवलेली आहे. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे छोटेसे कथानक लिहावे असे मला वाटले.
-- विनय भालेराव.

रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.
आवाज कि दुनिया के दोस्तो’…हा आवाज आमच्या पिढीने रेडिओ सिलोन वर अनेक वेळा ऐकला आहे तो आवाज.
आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद”
दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं.
Copyright © 2025 | Marathisrushti