(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कंट्रोलर

    त्या वेळी मी नुकताच जपान दौर्‍याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो.

    ‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या वेळी मी पुण्यापासून वीस किलोमीटरवर निगडी येथे राहत असे अन् रोज बसने प्रवास करीत असे. पुण्याच्या पालिका बस स्टॅन्डवरून पिंपरी-चिंचवड-निगडीसाठी बस निघत. तर, असाच एकदा निगडीला जाण्यासाठी म्हणून बस स्टॉपवर आलो. बरीच मोठी रांग होती, पण बस डबलडेकर होती, ती मिळण्याची शक्यता अधिक होती... पण तसे व्हायचे नव्हते. दहा-बारा प्रवाशांसह मला खालीच थांबावे लागले. आता किमान वीस मिनिटांची प्रतीक्षा होती. एकूणच बस स्टॅन्डही काहीसा आळसावलेला होता. हालचाली कमी होत्या; कारण एवढ्यातच सर्व बस मार्गस्थ झालेल्या होत्या. बस स्टॅन्डवरच्या दुसर्‍या रांगेत मी होतो. तोंडात पान चघळत होतो. अचानक माझ्या समोरच्या रांगेतल्या एका प्रवाशानं काही हालचाल केली अन् बस स्टॉपवर, जिथं बस उभी राहते तिथं एक लांबलचक लालभडक पिचकारी आकाराला आली. त्या प्रवाशानं त्याच्या रंगत जाणार्‍या पानाचा मुखरस स्वतःच्या कौशल्यानं रेखाटावा तसा बाहेर फेकला होता. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर लालभडक पानाची पिचकारी आकाराला आली होती. दिसायला ते फारच विचित्र दिसत होते, पण त्या प्रवाशाला किवा इतरांना त्यात वेगळे असे काही वाटत नव्हते. स्टॅन्डवर जो कंट्रोलर असतो तो बहुधा या सार्‍या घटना त्याच्या छोट्याशा खोलीतून पाहत असावा. हे सारं झाल्यानंतर तो बाहेर आला. त्यानं त्या संभावित प्रवाशाकडे एक कटाक्ष टाकला अन् वळला. बाजूला गेला. तो प्रवासी क्षणभर हबकला, पण नंतर मनाच हसला. मी मात्र तोंडात पान असल्यानं उगाचच वरमलो. तो कंट्रोलर बाजूला गेला, जिथं बसमध्ये पाणी घालण्यासाठी झार्‍या ठेवलेल्या असतात तिथून त्यानं एक झारी घेतली. ती पाण्यानं भरून काढली अन् ती झारी घेऊन तो जिथं रंगारंग झालेलं होतं तिकडे चालू लागला. स्वच्छतेची आच असली की माणूस काय करू शकतो, असा भाव तोवर प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांच्या मनात आला असावा. पण, तो जवळ येऊन थांबला, त्यानं ती झारी तिथंच ठेवली, पुढे येऊन म्हणाला, ‘‘ओ, मिस्टर, या पुढं. घ्या ती झारी अन् साफ करा ते सारं.’’ हे त्या प्रवाशाला आणि आम्हालाही अपेक्षित नव्हतं; पण घडलं. मी पिचकारी मारली नाही, असं रेटून बोलण्याची संधीही त्या कंट्रोलरनं दिली नाही. तो प्रवासी निमूटपणे पुढे आला. हातात झारी घेऊन त्यानं स्वतःच्या मुखरसानं रंगलेला रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अवघ्या दहा मिनिटातला हा सगळा प्रसंग, पण त्या प्रवाशाला त्याची चांगली अद्दल घडली होती. कधी काळी पान खाऊन तोंड रंगवणार्‍या मलाही ‘आपण किती पाण्यात’ याची जाणीव झाली होती. बस स्टॉपवरचा प्रत्येक माणूस त्या कंट्रोलरकडे अत्यंत आदरानं, विस्मयानं पाहत होता. तो प्रवासी मात्र आता बस लवकर येऊ देत, अशी प्रार्थना करीत असावा.

    हे सारं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. आजच्या वृत्तपत्रात एक वाचकाचं पत्र वाचलं. एका वृद्धानं लिहिलंय ते. पत्रातच त्यांनी स्वतःचं वयही दिलंय. ते म्हणतात, ‘‘पुण्यात किवा महाराष्ट्रात हेल्मेटची सक्ती करण्याचा कायदा झाला. त्यावर आंदोलनं झाली, तरीही कायदा अस्तित्वात आला. काही दिवस कारवाईच्या बातम्या येत असत. आता त्याही बंद झाल्यात. पुण्यातील हेल्मेटसक्ती रद्द झाली आहे का, कृपया संबंधित खात्यानं खुलासा करावा.’’ हे पत्र वाचताना पुण्यात हे असं पत्र येणारच असं मनात येत होतं; पण हेल्मेटच्या सक्तीसाठीचं या वृद्धानं दिलेलं कारण आणखीही ज्ञानात भर टाकणारं होतं. पत्रात म्हटलं होतं, की हेल्मेट वापरणार्‍या व्यक्तीला दुचाकीवर बसून पान, तंबाखू किवा अशीच पिक मारता येत नाही. स्वाभाविकपणे माझ्यासारख्या वृद्धाचे कपडे रंगण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यताही आता हेल्मेट वापराचं प्रमाण संपल्यानं मावळली आहे. ते असंही म्हणतात, की मी मोपेड वापरतो. या वयात तेच सोईचं पडतं, पण अशात कोणी पिक मारली, तर वेगानं जाऊन त्याची गच्ची पकडण्याची क्षमताही आता नाही; तेव्हा हेल्मेटचा हाही एक लाभ होता.

    या वृद्धानं व्यक्त केलेलं मत पुण्याशी संबंधित असलं तरी गावाचं नाव कोणतंही टाका, वास्तव तेच असेल, अशा प्रकारचं आहे. माझ्या जपान दौर्‍याला पंधरा-वीस वर्षे झाली. बदल खूप झाले, पण माणसं आणि त्यांचं हे असं वागणं कायम आहे. हे पत्र वाचताना ही जाणीव मला सातत्यानं होत होती खरंच, पीएमटीच्या त्या कंट्रोलरसारखे जागोजागी निर्माण झाले तर?तुम्हाला काय वाटतं?

    -- किशोर कुलकर्णी

  • श्रद्धा-योगायोग

    माझ्या वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट. त्यांच्या श्रद्धेची, माझ्या दृष्टीनं योगयोगाची. योग्य सल्लागार भेटण्याच्या योगाची. त्या
    वेळी माझा नुकताच जन्म झालेला होता. वडील कोपरगाव तालुक्यातील राहाता या गावी पाटबंधारे खात्यात मोजणीदार म्हणून

    दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं

    मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून

    नोकरीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला सरकारी नोकरी लागावी, हे काही आश्चर्य नव्हतं; पण यातही माझ्या आई-वडिलांना
    साईकृपेचा साक्षात्कार जाणवत होता. राहाता-शिर्डी यात अंतर फार तर पाच-सहा मैलांचं. शहराचा विचार केला तर
    उपनगरासारखी स्थिती. नोकरी आणि तीही साईस्थानाजवळ. आनंदासाठी आणखी एक कारण. असेच एके दिवशी वडिलांना पत्र
    आलं. सरकारी लखोटा होता तो. वडिलांची नोकरी कायम होण्याची ती सुरुवात होती. कारण त्या पत्रात वैद्यकीय चाचणी करून
    घ्यावी आणि त्याचा अहवाल पाठवावा, असा आदेश होता. जवळचं रुग्णालय म्हणून शिर्डीच्या दवाखान्याचा संदर्भ होता. पूर्वी
    सरकारी नोकरीतही हे सोपस्कार अनेक वेळा खूप विलंबाने पार पाडले जात. काही वर्षेही लोटत त्यासाठी; पण आता पत्र आलं
    तर तपासणी करायला हवी. वडील शिर्डीला गेले.
    तेथल्या वैद्यकीय अधिकार्‍याला पत्र दाखविलं, फॉर्म भरले आणि तपासणी झाली. सायंकाळी अहवाल मिळणार होता. तसा तो
    मिळालाही; पण त्यावर ‘अनफिट’ असा शेरा होता. वडिलांना चष्मा होता. तपासणीत त्यांना ‘मायोपिया’ असल्याचा निष्कर्ष
    होता. ‘अनफिट’ या शब्दानं वडिलांना घेरी यायची वेळ आली. काय करावं हे सुचेना. आता नोकरी जाणार, हे सांगायला कोणा
    ज्योतिष्याची गरज राहिलेली नव्हती. अत्यंत विमनस्क अवस्थेत ते दवाखान्यासमोरच असलेल्या लेंडी बागेत एका बाकड्यावर

    बसले.

    त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की

    जाऊच नये? अशा प्रश्नांची गर्दी झाली. माणूस मुळापासून हादरला, की त्याला देव आठवतो, असं म्हणतात. त्या वेळी वडिलांना
    साईबाबा आठवणं हे स्वाभाविक होतं. त्यांच्या मनात काय चाललं असेल ते तेच जाणोत; पण त्याच वेळी एक माणूस
    त्यांच्याजवळ आला. बसला, काय, कुठले, काय काम काढलं? अशी चौकशी केली. आपल्याला हे वेगळं वाटेल; पण खेड्यात अशी
    चौकशी ही एक साधारण बाब असते. वडिलांनाही त्या वेळी कोणीतरी बोलणारं हवं असावं, काय झालंय, किती मोठं संकट आलंय
    हे कोणाला तरी सांगावं अशीच त्यांची मनःस्थिती असावी. त्यांनी त्या अनोळखी माणसाला झालेली कथा सांगितली. त्यानंही ती
    ऐकून घेतली. तो म्हणाला, ‘‘घाबरू नको. उद्या सकाळी अकराला ये. डॉक्टर एकटेच असतात. त्यांना जी स्थिती आहे ती सगळी
    सांग. तो माणून कनवाळू आहे. तो नक्कीच तुला मदत करील. फार काही विचारलं तर शिर्डीच्या पाटलानं पाठवलं असं सांग.’’
    वडिलांना धीर आला असावा. ते स्थिरावले. तो उठला अन् निघून गेला. आता सूर्यास्त होत होता अन् सकाळपर्यंत वाट पाहायची
    होती. वडील तिथंच झोपले. सकाळी उठल्यावर एकच प्रतीक्षा... अकरा केव्हा वाजतात याची. वेळ झाली. डॉक्टर आल्याचं सहज
    दिसावं एवढ्या अंतरावर वडील होते. शिर्डीच्या पाटलांनी पाठवलंय अशी प्रस्तावना करीत त्यांनी डॉक्टरांना सारी हकिगत
    सांगितली. त्यांच्या हकिगतीनं डॉक्टरांना पाझर फुटला किवा शिर्डीच्या पाटलाचा प्रभाव पडला. डॉक्टरांनी त्यांची फेरतपासणी
    केली आणि चष्म्यासह फिट असा शेरा मारला. दर दहा वर्षांनी तपासणी करून घेण्याची शिफारस केली. वडील इतके भारावून
    गेले होते, की त्यांनी त्या डॉक्टरांचे पाय धरले आणि काही वेळातच साईबाबांच्या समाधीवर डोकं ठेवलं. त्यानंतर ते गावात
    शिर्डीच्या पाटलाचा तपास करीत फिरत होते; पण त्यांना तो पाटील काही भेटला नाही.
    माझे वडील एखाद्या प्रसंगाचं वर्णन खूप तपशिलानं सांगायचे. हा प्रसंग तर त्यांनी अनेक वेळा सांगितलेला. पाटलाची भेट झाली.
    तो माझ्याशी बोलला आणि गुप्त झाला असंही ते म्हणायचे. मी म्हणायचो, ‘‘अहो तुम्हाला मायोपिया. लांबचं दिसत नव्हतं. थोडं
    अंतर गेल्यावर तुम्हाला दिसलं नसेल इतकंच.’’ पण त्यांचा त्यांच्या डोळ्यापेक्षा मनावर अधिक विश्वास असावा. हा प्रसंग ते
    इतक्या श्रद्धेनं सांगायचे, की त्यांच्या दृष्टीनं तो चमत्कारच वाटावा.
    माणसाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा जिथं संपते तिथं चमत्कारांना प्रारंभ होत असावा; पण प्रयत्नांची पराकाष्ठा कोठे संपते, हे तरी
    माणसाला कुठे माहीत असतं? दुसर्‍या दिवशी डॉक्टरांना भेटणं हा माझ्या दृष्टीनं त्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचा भाग होता. तो
    माणूस भेटणं हा योगायोग होता. त्याच्या दृष्टीनं ती साईकृपा होती.
    ते काहीही असो. त्यानंतर निवृत्त होईतो माझ्या वडिलांनी इमानेइतबारे सेवा केली. डोळ्याचं अधूपण कष्टानं जाणवू दिलं नाही.
    आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना साईकृपा पुरली. मुलांची शिक्षणं आणि त्यांचं स्थिरस्थावर होणं त्यांनी पाहिलं. माझं माझ्याजवळ;
    पण त्यांच्या श्रद्धेला साधक बनविण्याचा मला काय अधिकार?

    -- किशोर कुलकर्णी

  • आई

    शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस' आणि `घाण दिसतोस' यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या' हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष' या `लोकमत'च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, ``तू सांग. काय हवं ते लिहून देतो.'' तो म्हणाला, ``आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.'' मी ``हो'' म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.

    मुळात ते आपले आहेत असं वाटतं आपल्याला; पण त्यांचं प्रवाहित होणं हेत त्यांचं उद्दिष्ट असतं. आपण मात्र भविष्यातल्या दुःखांना याक्षणी कवटाळू पाहातो किंवा भूतकाळातल्या आनंदाला वास्तवात आणू पाहतो. ते आहे तिथंच असतात. आपण मात्र आनंदी किंवा दुःखी होतो. हाती आलेला क्षण आपण उपभोगीतच नाही आणि मग ते मला मिळालं नाही म्हणून दुःख करीत बसतो. खूपच तात्त्विक किंवा आधात्मिक होतंय ना हे सारं; पण विषयच काही तरी हरवण्याचा होता. त्यात काय काय सापडतंय हे शोधण्याचा होता. तर सांगायचा मुद्दा असा, की माझं काय हरवलंय हे काही केल्या मला सापडत नव्हतं. आता हे लेखन करण्याच्या काही क्षण ते आठवलं आणि घेतलं लिहायला. माझं हरविलेलं कदाचित तुमचंही असेल किंवा कदाचित नसेलही; पण हे असं आठवणं महत्त्वाचं.

    मी माझ्या घरात थोरला. माझ्यापेक्षा मोठी बहीण. आमचं बालपण गेलं कोपरगाव-शिर्डी भागात. राहाता, दहिगाव ही आयुष्याच्या प्रारंभीची गावं पुसटशी आठवतात. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं. वडील-आई आणि आमचे काका एकत्र असत. गावातल्या आया-बाया-बापे घरी यायचे, संवाद साधायचे. वडील सतत भ्रमंतीवर. स्वाभाविकपणे सर्वाधिक संवाद व्हायचा तो माझ्या आईशी. त्याकाळी वडिलांशी संवाद कमी आणि त्यांच्या अस्तित्वाचा धाकच अधिक असायचा. तर माझ्या आईला माझे काका वहिनी म्हणायचे. ते स्वाभाविकही होतं. आईचं वय त्यावेळी फार तर 24-26 असावं. ती गावातल्या सगळ्यांचीच वहिनी होती आणि वडील होते दादा. वडिलांचा उल्लेख आईकडून अहो किंवा ते नसताना दादा असाच व्हायचा. माझ्यापेक्षा मोठी बहीण-मंगल. तीही आईला वहिनी म्हणे. स्वाभाविकपणे आईची माझी जी ओळख झाली ती वहिनी म्हणनूच. ती माझी आई आहे ही माहीत होतं मला; पण ती माझ्यासाठी वहिनी होती. जसं जसं वय वाढत गेलं, `आई' या शब्दाविषयी ऐकत, वाचत गेलो तसं तसं या शब्दाचा अर्थ कळू लागला; पण `आई' या शब्दाचा जो संस्कार त्या वयात व्हायला हवा होता तो मला वाटतं राहूनच गेला. पायाला ठेच लागली तर `आई गं' असं व्हायचं; पण मनाच्या गाभाऱयात त्या आईचा चेहरा नसायचा. जेव्हा केव्हा मी मित्रांकडे, सहकाऱयांकडे जायचो त्यावेळी त्यांची हाक असायची आई, हे बघ कोण आलंय!' त्यांच्यासारखी, तशीच आई माझीही होती. तिनंही माझ्यासाठी सर्वकाही केलं होतं की जे आई करते; पण माझ्या ओठावर आई नव्हती. आज माझ्या वयाची पन्नाशी पार केल्यावरही जर काही हरविलेपण जाणवत असेल, तर ते `आई' या शब्दाचं.

    तुम्ही तुमच्या आईला आईच म्हणता ना? नसेल, तर आजच मोठ्यानं हाक मारा तिला आई! उद्या माझ्यासारखं हे असं हरविलेलं लिहिण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये.

    -- किशोर कुलकर्णी

  • हसू!

    हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते.

  • मनाशी संवाद

    माणसाचं मन, मन म्हणजे नेमकं काय असावं? कुठे असावं ते? मेंदूत की हृदयात? की कोठेच नाही?

  • सदिच्छा

    सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो.

  • हितसंबंध आणि कर्तव्य

    वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा' हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.' हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे...त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड' होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.

    अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?

    -- किशोर कुलकर्णी

  • मेघमल्हार. . .

    आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!!

  • कोडी

    माणसाच्या आयुष्यात सतत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कोडी येत असतात. त्यातली काही सोडविता

    येतात तर काही नाही. वृत्तपत्रातल्या कोड्यांचं तसं नसावं. एक तर ती सहजी सुटतात. आपल्यालाही कोडी सोडविता येतात, हा

    विश्वास बळावतो अन् मग तो पुन्हा नव्या कोड्याची प्रतीक्षा करीत राहतो. ही कोडी सोडविताना वास्तवातल्या कोड्यांचं काय, हा

    प्रश्न मनात अजूनही कायम आहे. पाहा, तुम्हाला उत्तर सापडतंय का?

  • वडे

    त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.' तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे

    वडील आले. त्यांनाही हा

    पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
    झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना

    केली. त्या साऱयाचं सूत्र एवढंच होतं, `तुम्हाला धंदा जमत नाही. तुम्ही रडे आहात. काही लाज वाटत असेल तर जा आणि वडे विकून या.' आमची परिस्थिती समजावून घ्यायला ते तयार नव्हते. त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती नव्हे, तर राग होता. आम्ही डबे उचलले बाहेर पडलो. मी त्या वेळच्या मिनर्व्हा थिएटरवर गेलो, तर माणिक आर्यनला. सिनेमाच्या इंटरव्हलला वडे विकण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्या स्पर्धकांची जागांवरून कशी मारामारी होऊ शकते, याचा अनुभव आला; पण गेला बाजार चार-चार वडे विकले गेले. आता काय? त्यानंतर जवळच्या विजयानंद थिएटरवर गेलो. तिथंही थोडं यश ळालं. दुपारची संध्याकाळ झाली होती. अखेरीस मंडईत येऊन स्थिरावलो. परिसरात हिंडलो. `वडे।़ गरम वडे' अशी हाळी दिली. आणखी चार वड्यांना ग्राहक मिळाले. सायंकाळच्या साडेसातचा मध्यंतर करायचा ठरवून दोघेही पांगलो. आठला परत आलो तेव्हा सर्व मिळून 40 वडे विकले गेले होते. घरी जाण्याचा धीर आला होता. माणिक म्हणाला, `तुझ्याकडे किती पैसे आहेत.' मी म्हणालो, `दोन रुपये,' तो म्हणाला, `दे इकडे.' त्यानं दोन रुपये घेतले.
    स्वतच्या खिशातून आणखी दोन रुपये घेतले आणि वड्यांच्या गल्ल्यात टाकले. आता आपण चार-चार वडे खाऊ शकतोय. मला तर खूप भूक लागलीय, सं म्हणून तो वडे खाऊ लागला. मीही घेतले. चार वड्यात पोट भरलं होतं. शांतपणे घरी आलो. एकूण अठ्ठेचाळीस वडे विकले होते (आम्ही घेतलेले आठ). तरीही डबा जड होता. तो मावशीकडे दिला. आमचा अनुभव सांगितला. आता वडील खूष होते. मी परिस्थितीपुढे हार स्वीकारली नव्हती. आम्ही प्रयत्न केले होते आणि फार नाही पण यश तर मिळालंच होतं. वडील आणि मावशी यांच्या कौतुकानं पोट आणखी भरलं होतं. आपणही काही करू शकतो, हा विश्वास मनात रुजू लागला होता. छान वाटत होतं. एवढ्यात मावशीनं आम्हा दोघांना हाक मारली, म्हणाली, `पोरं रोज कष्ट घेतात. वडे विकतात, पण त्यांच्या तोंडी काही जात नाही. चला रे आज आपण पोटभर वडे खाऊ.' मावशी आम्हाला आग्रह करून वडे वाढत होती. आम्ही एकमेकांकडे पाहत ते संपविण्याचा प्रयत्न करीत होतो. आज हे सारं आठवलं की गंमत वाटते. आता मावशी किंवा वडील हयात नाहीत; पण मावशीचं प्रेम आणि वडिलांची शिकवण विसरू शकत नाही. परिस्थिती बदलते, अडचणी येतात; पण त्यापासून मागे फिरणाऱयाला रड्या म्हटलं जातं. मी रडा नाही, हे त्या वेळी मनावर बिंबलं. आजही ते ताजं आहे. वड्यांइतकंच गरमागरम आहे.

    -- किशोर कुलकर्णी