(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रद्धा-योगायोग

    माझ्या वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट. त्यांच्या श्रद्धेची, माझ्या दृष्टीनं योगयोगाची. योग्य सल्लागार भेटण्याच्या योगाची. त्या
    वेळी माझा नुकताच जन्म झालेला होता. वडील कोपरगाव तालुक्यातील राहाता या गावी पाटबंधारे खात्यात मोजणीदार म्हणून

    दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं

    मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून

    नोकरीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला सरकारी नोकरी लागावी, हे काही आश्चर्य नव्हतं; पण यातही माझ्या आई-वडिलांना
    साईकृपेचा साक्षात्कार जाणवत होता. राहाता-शिर्डी यात अंतर फार तर पाच-सहा मैलांचं. शहराचा विचार केला तर
    उपनगरासारखी स्थिती. नोकरी आणि तीही साईस्थानाजवळ. आनंदासाठी आणखी एक कारण. असेच एके दिवशी वडिलांना पत्र
    आलं. सरकारी लखोटा होता तो. वडिलांची नोकरी कायम होण्याची ती सुरुवात होती. कारण त्या पत्रात वैद्यकीय चाचणी करून
    घ्यावी आणि त्याचा अहवाल पाठवावा, असा आदेश होता. जवळचं रुग्णालय म्हणून शिर्डीच्या दवाखान्याचा संदर्भ होता. पूर्वी
    सरकारी नोकरीतही हे सोपस्कार अनेक वेळा खूप विलंबाने पार पाडले जात. काही वर्षेही लोटत त्यासाठी; पण आता पत्र आलं
    तर तपासणी करायला हवी. वडील शिर्डीला गेले.
    तेथल्या वैद्यकीय अधिकार्‍याला पत्र दाखविलं, फॉर्म भरले आणि तपासणी झाली. सायंकाळी अहवाल मिळणार होता. तसा तो
    मिळालाही; पण त्यावर ‘अनफिट’ असा शेरा होता. वडिलांना चष्मा होता. तपासणीत त्यांना ‘मायोपिया’ असल्याचा निष्कर्ष
    होता. ‘अनफिट’ या शब्दानं वडिलांना घेरी यायची वेळ आली. काय करावं हे सुचेना. आता नोकरी जाणार, हे सांगायला कोणा
    ज्योतिष्याची गरज राहिलेली नव्हती. अत्यंत विमनस्क अवस्थेत ते दवाखान्यासमोरच असलेल्या लेंडी बागेत एका बाकड्यावर

    बसले.

    त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की

    जाऊच नये? अशा प्रश्नांची गर्दी झाली. माणूस मुळापासून हादरला, की त्याला देव आठवतो, असं म्हणतात. त्या वेळी वडिलांना
    साईबाबा आठवणं हे स्वाभाविक होतं. त्यांच्या मनात काय चाललं असेल ते तेच जाणोत; पण त्याच वेळी एक माणूस
    त्यांच्याजवळ आला. बसला, काय, कुठले, काय काम काढलं? अशी चौकशी केली. आपल्याला हे वेगळं वाटेल; पण खेड्यात अशी
    चौकशी ही एक साधारण बाब असते. वडिलांनाही त्या वेळी कोणीतरी बोलणारं हवं असावं, काय झालंय, किती मोठं संकट आलंय
    हे कोणाला तरी सांगावं अशीच त्यांची मनःस्थिती असावी. त्यांनी त्या अनोळखी माणसाला झालेली कथा सांगितली. त्यानंही ती
    ऐकून घेतली. तो म्हणाला, ‘‘घाबरू नको. उद्या सकाळी अकराला ये. डॉक्टर एकटेच असतात. त्यांना जी स्थिती आहे ती सगळी
    सांग. तो माणून कनवाळू आहे. तो नक्कीच तुला मदत करील. फार काही विचारलं तर शिर्डीच्या पाटलानं पाठवलं असं सांग.’’
    वडिलांना धीर आला असावा. ते स्थिरावले. तो उठला अन् निघून गेला. आता सूर्यास्त होत होता अन् सकाळपर्यंत वाट पाहायची
    होती. वडील तिथंच झोपले. सकाळी उठल्यावर एकच प्रतीक्षा... अकरा केव्हा वाजतात याची. वेळ झाली. डॉक्टर आल्याचं सहज
    दिसावं एवढ्या अंतरावर वडील होते. शिर्डीच्या पाटलांनी पाठवलंय अशी प्रस्तावना करीत त्यांनी डॉक्टरांना सारी हकिगत
    सांगितली. त्यांच्या हकिगतीनं डॉक्टरांना पाझर फुटला किवा शिर्डीच्या पाटलाचा प्रभाव पडला. डॉक्टरांनी त्यांची फेरतपासणी
    केली आणि चष्म्यासह फिट असा शेरा मारला. दर दहा वर्षांनी तपासणी करून घेण्याची शिफारस केली. वडील इतके भारावून
    गेले होते, की त्यांनी त्या डॉक्टरांचे पाय धरले आणि काही वेळातच साईबाबांच्या समाधीवर डोकं ठेवलं. त्यानंतर ते गावात
    शिर्डीच्या पाटलाचा तपास करीत फिरत होते; पण त्यांना तो पाटील काही भेटला नाही.
    माझे वडील एखाद्या प्रसंगाचं वर्णन खूप तपशिलानं सांगायचे. हा प्रसंग तर त्यांनी अनेक वेळा सांगितलेला. पाटलाची भेट झाली.
    तो माझ्याशी बोलला आणि गुप्त झाला असंही ते म्हणायचे. मी म्हणायचो, ‘‘अहो तुम्हाला मायोपिया. लांबचं दिसत नव्हतं. थोडं
    अंतर गेल्यावर तुम्हाला दिसलं नसेल इतकंच.’’ पण त्यांचा त्यांच्या डोळ्यापेक्षा मनावर अधिक विश्वास असावा. हा प्रसंग ते
    इतक्या श्रद्धेनं सांगायचे, की त्यांच्या दृष्टीनं तो चमत्कारच वाटावा.
    माणसाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा जिथं संपते तिथं चमत्कारांना प्रारंभ होत असावा; पण प्रयत्नांची पराकाष्ठा कोठे संपते, हे तरी
    माणसाला कुठे माहीत असतं? दुसर्‍या दिवशी डॉक्टरांना भेटणं हा माझ्या दृष्टीनं त्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचा भाग होता. तो
    माणूस भेटणं हा योगायोग होता. त्याच्या दृष्टीनं ती साईकृपा होती.
    ते काहीही असो. त्यानंतर निवृत्त होईतो माझ्या वडिलांनी इमानेइतबारे सेवा केली. डोळ्याचं अधूपण कष्टानं जाणवू दिलं नाही.
    आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना साईकृपा पुरली. मुलांची शिक्षणं आणि त्यांचं स्थिरस्थावर होणं त्यांनी पाहिलं. माझं माझ्याजवळ;
    पण त्यांच्या श्रद्धेला साधक बनविण्याचा मला काय अधिकार?

    -- किशोर कुलकर्णी

  • आई

    शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस' आणि `घाण दिसतोस' यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या' हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष' या `लोकमत'च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, ``तू सांग. काय हवं ते लिहून देतो.'' तो म्हणाला, ``आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.'' मी ``हो'' म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.

    मुळात ते आपले आहेत असं वाटतं आपल्याला; पण त्यांचं प्रवाहित होणं हेत त्यांचं उद्दिष्ट असतं. आपण मात्र भविष्यातल्या दुःखांना याक्षणी कवटाळू पाहातो किंवा भूतकाळातल्या आनंदाला वास्तवात आणू पाहतो. ते आहे तिथंच असतात. आपण मात्र आनंदी किंवा दुःखी होतो. हाती आलेला क्षण आपण उपभोगीतच नाही आणि मग ते मला मिळालं नाही म्हणून दुःख करीत बसतो. खूपच तात्त्विक किंवा आधात्मिक होतंय ना हे सारं; पण विषयच काही तरी हरवण्याचा होता. त्यात काय काय सापडतंय हे शोधण्याचा होता. तर सांगायचा मुद्दा असा, की माझं काय हरवलंय हे काही केल्या मला सापडत नव्हतं. आता हे लेखन करण्याच्या काही क्षण ते आठवलं आणि घेतलं लिहायला. माझं हरविलेलं कदाचित तुमचंही असेल किंवा कदाचित नसेलही; पण हे असं आठवणं महत्त्वाचं.

    मी माझ्या घरात थोरला. माझ्यापेक्षा मोठी बहीण. आमचं बालपण गेलं कोपरगाव-शिर्डी भागात. राहाता, दहिगाव ही आयुष्याच्या प्रारंभीची गावं पुसटशी आठवतात. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं. वडील-आई आणि आमचे काका एकत्र असत. गावातल्या आया-बाया-बापे घरी यायचे, संवाद साधायचे. वडील सतत भ्रमंतीवर. स्वाभाविकपणे सर्वाधिक संवाद व्हायचा तो माझ्या आईशी. त्याकाळी वडिलांशी संवाद कमी आणि त्यांच्या अस्तित्वाचा धाकच अधिक असायचा. तर माझ्या आईला माझे काका वहिनी म्हणायचे. ते स्वाभाविकही होतं. आईचं वय त्यावेळी फार तर 24-26 असावं. ती गावातल्या सगळ्यांचीच वहिनी होती आणि वडील होते दादा. वडिलांचा उल्लेख आईकडून अहो किंवा ते नसताना दादा असाच व्हायचा. माझ्यापेक्षा मोठी बहीण-मंगल. तीही आईला वहिनी म्हणे. स्वाभाविकपणे आईची माझी जी ओळख झाली ती वहिनी म्हणनूच. ती माझी आई आहे ही माहीत होतं मला; पण ती माझ्यासाठी वहिनी होती. जसं जसं वय वाढत गेलं, `आई' या शब्दाविषयी ऐकत, वाचत गेलो तसं तसं या शब्दाचा अर्थ कळू लागला; पण `आई' या शब्दाचा जो संस्कार त्या वयात व्हायला हवा होता तो मला वाटतं राहूनच गेला. पायाला ठेच लागली तर `आई गं' असं व्हायचं; पण मनाच्या गाभाऱयात त्या आईचा चेहरा नसायचा. जेव्हा केव्हा मी मित्रांकडे, सहकाऱयांकडे जायचो त्यावेळी त्यांची हाक असायची आई, हे बघ कोण आलंय!' त्यांच्यासारखी, तशीच आई माझीही होती. तिनंही माझ्यासाठी सर्वकाही केलं होतं की जे आई करते; पण माझ्या ओठावर आई नव्हती. आज माझ्या वयाची पन्नाशी पार केल्यावरही जर काही हरविलेपण जाणवत असेल, तर ते `आई' या शब्दाचं.

    तुम्ही तुमच्या आईला आईच म्हणता ना? नसेल, तर आजच मोठ्यानं हाक मारा तिला आई! उद्या माझ्यासारखं हे असं हरविलेलं लिहिण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये.

    -- किशोर कुलकर्णी

  • हसू!

    हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते.

  • मनाशी संवाद

    माणसाचं मन, मन म्हणजे नेमकं काय असावं? कुठे असावं ते? मेंदूत की हृदयात? की कोठेच नाही?

  • सदिच्छा

    सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो.

  • हितसंबंध आणि कर्तव्य

    वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा' हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.' हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे...त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड' होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.

    अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?

    -- किशोर कुलकर्णी

  • मन

    मन. मानवी मन, या विषयावर अनेक विचारवंत, वैज्ञानिक, मनोविश्लेषक, आध्यात्मिक गुरू यांनी विपुल लेखन केले आहे. मनाच्या हिदोळ्यावर कवी, कथाकार, साहित्यकार यांनी अनेक रचना केल्या. मन वढाय, वढाय हे मराठी माणसाला चांगलंच ठाऊक आहे.

  • कविता (१) / प्रोडक्ट कविता

    शब्दांच्या साच्यात
    आम्बट - गोड, कडू - तिखट
    भावनांचा रस ओततो
    आणि तैयार करतो
    फास्टफूड सारखा स्वादिष्ट
    प्रोडक्ट 'कविता'.

    -- विवेक पटाईत

  • चारोळी स्वरूपातला शब्दकोष/ खालिकबारी

    कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्‍या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवाद ही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.

  • संस्कृत भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे

    मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा