(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • नामांतर

    ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक करणारी भाषणं होत होती. पत्रकारितेत तसा मी जुना झालो नव्हतो. भाषणांनी भारावून गेलो होतो. एका सदस्यानं सांगितलं, ``आपण इतिहास घडविला आहे; पण आज आपण सर्वांनी मराठवाड्यात जाण्याची गरज आहे. तेथील जनतेला शासनाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, भूमिका सांगण्याची गरज आहे.'' कौतुकाच्या भाषणात हे आवाहन, हा इशारा मागे पडला. त्याच दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं. मी पुण्यात येऊन माझ्या कामाला लागलो.
    त्यानंतर मराठवाड्यातून येणाऱया बातम्या पहात होतो. त्या भागात कमालीची अस्वस्थता होती. सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. दोन दिवसांतच त्याला उग्र रूप आलं आणि सारा मराठवाडाच पेटला आहे की काय, असं वातावरण निर्माण झालं. माझी अस्वस्थता वाढत होती. माझ्यातला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी थेट संपादकांना भेटलो. त्यांना म्हणालो, ``मला मराठवाड्यात जायचं आहे. रोज प्रत्यक्ष माहितीवर वृत्तांत पाठवीन.'' आजच्यासारखी त्या वेळी संवादसाधने विपुल नव्हती. फोन, तार, टेलेक्स असा तो जमाना होतो. संपादक म्हणून त्या वेळी श्री. ग. मुणगेकर होते. ते म्हणाले, ``तू जाऊ नयेस. ते धोक्याचं आहे. स्वतंत्र गाडी घेऊन जाणं अधिकच धोक्याचं आहे. स्थानिक पातळीवर आपले वार्ताहर आहेत, ते पाठवतील त्या बातम्या चांगल्या वापरा. वृत्तसंस्थांच्या बातम्या आहेतच.'' मी नाराज झालो; पण निराश नव्हे. मी म्हणालो, ``मला आठवडाभराची रजा द्या. मी बातम्या पाठवीन त्या वापरा. दुर्दैवानं काही घडलच, तर ती माझी जबाबदारी असेल. मी सुखरूप परत आलो, तर माझा दौरा अधिकृत समजा.'' माझ्या या प्रस्तावावर संपादक अधिक नाराज झाले. म्हणाले, ``तुम्ही तुमच्या जिवावर उदार झाला म्हणून काय झालं. माझ्याही काही जबाबदाऱया आहेत. तुम्हाला परवानगी देता येणार नाही.'' मी परतलो. त्या दिवशी रात्री झालेली घटना पत्नीला सांगितली. मी जावं, असंच तिलाही वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजले असतील. माझा एक सहकारी घरी आला होता. त्या वेळी घरात फोन नव्हता. तो म्हणाला, ``तुला मराठवाड्यात जायला संपादकांनी परवानगी दिलीय. तुझ्या सोयीनं तू जा. हा दौरा अधिकृत असेल.'' आनंद आणि उत्साह कशाला म्हणतात, त्याचा अनुभव घेतला मी अन् औरंगाबादकडे पहाटेच रवाना झालो. मजल-दरमजल करीत औरंगाबादेत पोहोचलो. परिस्थिती वाटत होती त्यापेक्षा गंभीर होती. महामार्गावर ठिकठिकाणी पूल कापण्यात आले होते. तारा बांधून रस्ता बंद करण्यात आला होता. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या. आंदोलनाचा वणवा वाढत होता. औरंगाबादेत माझी भेट झाली `टाईम्स'चे प्रतिनिधी पडियार यांच्याशी. आज ते हयात नाहीत; पण अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार. मला एकट्यानं नांदेडपर्यंत जाणं कठीण होतं. एसटी वाहतूक बंद होती. टॅक्सीही नव्हत्या. त्या वेळी औरंगाबादेत शहा नावाचे एक एजंट होते. त्यांची एक गाडी नांदेडकडे अंक नेण्याचा प्रयत्न करणार होती. त्यात मुंबईच्या मोठ्या दैनिकाचे म्हणून पडियार यांना नेण्याचं ठरलं होतं. मोठ्या हिकमतीनं पडियार यांना चिकटलो आणि आमचा दौरा सुरू झाला. घटना मोठी होती. टाईम्सनं स्वतंत्र फोटोग्राफरही दिला होता. टाईम्स या इंग्रजी दैनिकाची आणि आमच्या दैनिकाची स्पर्धा नाही, असं सांगत मी त्या छायाचित्रकाराकडून फोटो मिळण्याची व्यवस्था केली. त्या वेळी औरंगाबादेत नागनाथ फटाले नावाचे ज्येष्ठ पत्रकार काम पहात होते. आमच्यासाठीही ते बातम्या पाठवत. विशेष म्हणजे, एसटीच्या हमाल संघटनेचे ते अध्यक्ष होते. याचाच अर्थ, माझ्या अंकात फोटो प्रसिद्ध होण्यासाठी सायंकाळपर्यंत तरी ते औरंगाबदला पोहोचणे आवश्यक होते. पुढची जबाबदारी फटालेंची होती. काम सुरू झालं. वृत्तांत, मुलाखती, घटना, प्रतिक्रिया, असा रोजच्या रोज मजकूर जमा होत होता आणि फोन-तार या माध्यमातून जातही होता. टाईम्सचा फोटोग्राफर खऱया अर्थानं व्यावसायिक छायाचित्रकार होता. त्याचे फोटो उत्तम असत. ते मी पाठवीत होतो आणि आश्चर्य म्हणजे, माझ्या दैनिकात ते फोटो रोजच्या रोज ठळकपणे प्रसिद्ध होत असत. तेच फोटो टाईम्समध्ये दुसऱया दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध होत असत.
    वृत्तपत्रात मग ते कोणत्याही भाषेतलं असो, स्पर्धा ही असतेच. आजही आहे; पण त्या काळी अत्यल्प साधनसामग्रीत टाईम्सच्या आधी ठसठशीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा मान माझ्या वृत्तपत्राला मिळाला आणि समाधान मला मिळालं.
    मी जे काही केलं ते योग्य की अयोग्य, असा प्रश्न त्या वेळीही मला कोणी केला नाही. आज तो कोणी करील, अशी स्थिती नाही.
    म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!
    तसंच काहीसं हे असावं

    -- किशोर कुलकर्णी

  • सगळ्यांना पॅक करू!

    हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते.

  • शिकण्याचं वय!

    ही गोष्ट आहे भगवान रजनीश यांची. ओशो यांची. मानवाला प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या आध्यात्मिक गुरूंची. खरंतर
    त्यांचं विपुल साहित्य जगात सर्वत्र उपलब्ध आहे. त्यांच्या कॅसेट आणि व्हिडिओ, सीडीच्या माध्यमातून त्यांचं चालणं, बोलणं
    पाहता, ऐकता येतं. तरीही त्यांची ही गोष्ट पुन्हा एकदा सांगाविशी वाटतेय.
    ओशो एकदा समुद्र प्रवासाला निघाले होते. प्रवास मोठा होता आणि काही दिवस जहाजावरच राहायचे होते. वाचन, संवाद आणि
    डेकवरची भ्रमंती हा त्यांचा छंद किवा त्यावेळी वेळ घालविण्याचं साधन. डेकवरनं फिरत असताना अनेक देशांचे, विविध
    वयोगटांतील आणि भाषेची माणसं भेटायची. काहींशी बोलणं व्हायचं तर काही केवळ स्मितहास्यानंच संवाद साधायचे. डेकवरच
    एका बाजूला एक वृद्ध गृहस्थ एका टेबलाशी बसलेला असायचा. काहीवेळा त्याचं वाचन सुरू असायचं, तर काही वेळा तो लिहीत
    असायचा. त्याचं लिहिणं म्हणजे एका पुस्तकात पाहायचं अन् लिहायचं असं होतं. समाधी लागावी अशी त्याची ती स्थिती
    असायची. जवळपास कोणी आहे, नाही, आवाज येत आहेत या कशाचंही भान नसायचं त्याला. भगवान रजनीश तेव्हा एवढे
    सर्वदूर ख्यातकीर्त झालेले नव्हते. त्या वृद्धाशी बोलावं असं त्यांना वाटे; पण त्याची समाधी पाहून ते पुढे जात. एके दिवशी मात्र
    त्या वृद्धाशी संवाद साधायचाच असं त्यांनी ठरविलं. ते त्या वृद्धाकडे पाहातच आपली शतपावली करीत होते. त्याला त्रास होणार
    नाही, अशा अंतरावर थांबून त्याच्याकडे पाहात होते. अखेरीस एका क्षणी त्यानं मान वर केली अन् रजनीश म्हणाले, ‘‘माफ

    करा, पण मी इथं तुमच्यासमोर बसू शकतो का?’’ त्यानं मानेनंच होकार भरला. रजनीश बसले. आता संवाद

    साधायचा होता.

    भगवान

    म्हणाले, ‘‘मी काही दिवस झाले तुमच्याशी बोलू इच्छितोय. तुम्ही हे नेमकं काय करातय?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘मी

    चिनी भाषा शिकतोय.’’ चिनी भाषा शिकायला खूपच अवघड हे रजनीश जाणून होते. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला लिहिता येते?’’ तो
    वृद्ध म्हणाला, ‘‘ नाही, अजून नाही; पण आता मला कोणी बोललं तर ती कळते. काही शब्द मी बोलूही शकतोय; पण लिहिणं,
    शिकायला वेळ लागेल अन् भाषेवर प्रभूत्व मिळवायला त्याहूनही अधिक काळ लागेल.’’ ‘‘किती दिवस झालेत तुम्ही ही भाषा
    शिकायला लागून?’’ रजनीशांनी प्रश्न केला. ‘‘तीन वर्षे झालीत. आणखी वर्ष-दोन वर्षांत लिहायला शिकेन. मग आणखी दोन
    वर्षांत त्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचीन. मग मला खर्‍या अर्थाने चिनी भाषा अवगत होईल, असं वाटतं.’’ रजनीशांनी त्या
    वृद्धाकडे पाहिलं... पंचाहत्तरी तर नक्कीच पार केलेली असावी त्यानं अन् तो आणखी पाचेक वर्षांचं भाषा शिकण्याचं नियोजन
    करीत होता.
    रजनीशांना राहावलं नाही. त्यांनी विचारलं, ‘‘माफ करा; पण तुमचं वय काय असेल?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘ऐंशी!’’ भगवान
    आश्चर्यचकित झाले व म्हणाले,‘‘भाषा अवगत व्हायला आणखी पाच वर्षे लागणार. म्हणजे, जेव्हा तुम्ही या भाषेवर प्रभूत्व
    मिळवाल तेव्हा तुमचं वय पंच्याऐशी असेल.’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘हो, खरंय ते,’’ भगवान म्हणाले, ‘‘इतकी वर्षे शिकल्यानंतर
    त्या शिक्षणाचा वापर किती वर्षे करू शकाल असं तुम्हाला वाटतं?’’ आता तो वृद्ध सावरून बसला, म्हणाला, ‘‘बरोबर आहे तुमचा
    प्रश्न. मी किती वर्षे त्याचा वापर करू शकेन? तुम्ही विद्वान दिसता. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझा जन्म झाला तेव्हा मला
    कोणीही सांगितलं नव्हतं, की मी ऐंशी वर्षे जगणार आहे. आजही मला कोणी ठामपणे असं सांगत नाहीये, की मी पाचच वर्षे
    जगणार आहे. मी किती जगेन हे तुम्ही सांगा. मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन.’’ भगवान रजनीश म्हणाले, ‘‘मी तुम्हाला
    पाहात होतो. तुमच्याबद्दल खूप उत्सुकताही होती; पण एक वृद्ध माणूस म्हणून मी तुमच्याकडे पाहात होतो. आता मला कळलं,
    की तुम्ही वृद्ध नाही आहात. तुम्ही मॅच्युअर्ड यंग आहात!’’
    शिकण्याला वय नसतं आणि तारुण्याला वयाची तमा नसते, याची शिकवण ओशोंच्या या अनुभवावरून सहजी येते. स्वतः
    ओशोंनी हा अनुभव याच आशयासह लिहून ठेवलेला आहे. या विश्वामध्ये माणूस हा विद्यार्थी आहे अन् आयुष्य ही त्याची शाळा.
    अनुभव हे शिक्षण आणि अनुभवातून शिकत जाणं हेच उत्तीर्ण होणं अन्यथा एकाच इयत्तेत ठाण मांडून बसलेले अनेक आपण
    पाहातोच की! एका अनुभवानंतर त्याच त्या चुका करीत नशिबाला दोष देणारे आपण पाहतोच की! आयुष्याच्या शाळेत सतत
    नवनवीन धडे गिरविण्याची तुमची उर्मी कायम राहो आणि तुमचं वर्णनही कोणीतरी ‘मॅच्युअर्ड यंग’ अशा शब्दात करो, हीच
    सदिच्छा!

    -- किशोर कुलकर्णी

  • बहिणीची भेट

    मी आणि व्यवस्थापकीय विभागातला एक सहकारी असे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होतो. कोपरगाव, राहता, संगमनेर, श्रीरामपूर हा तर माझ्या खूपच परिचयाचा असा परिसर. या भागातून माझ्या लहानपणी अनेकवार फिरलो होतो. काही वर्षे कोपरगावात शिकलो होतो. मित्रांचा परिवारही या भागात होता. एका अर्थानं माझ्या दृष्टीनं हा माहेरचा दौरा होता. राहता येथे एक कार्यक्रम होता. तो आटोपायला अकरा वाजले. नंतर शिर्डीला जावं असं ठरलं. त्यावेळी साईबाबाचं दर्शन इतकं अवघड नव्हतं. दुपारी बाराच्या आरतीलासुद्धा सहज जाता यायचं. कोपरगाव ते शिर्डी असं सायकलनंही अनेकवेळा आलेलो होतो. बाबाचं दर्शन झालं. आता इथंच जेवणं अन् पुढे जाणं असा विचार सुरू होता. मी माझ्या सहकार्‍याला म्हटलं. इथनं अवघ्या दहा किलोमीटरवर माझ्या बहिणीचं शेत आहे. शेतावरच घर करून ती राहते. तिथं जाऊ आपण. घरचं जेवण होईल आणि बहिणीला भेटणंही होईल. या प्रस्तावावर वाद होण्याचा प्रश्न नव्हता. आमची गाडी बहिणीच्या वस्तीकडे निघाली. माझी बहीण, दोन वर्षांनी मोठी. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षे लग्न झालं तिचं. तिचे पती शेती करायचे. सगळं आयुष्य मातीतलंच. अचानक काही झालं आणि त्यात मेहुणे वारले. माझी बहीण एकटी पडली. पदरी मुलांचा गोतावळा; पण हिंमत नाही हरली ती. कोपरगावातलं घर बदलून ती इथं शेतात आली. आधी झोपडी बांधली आता दोन खोल्यांचं घर होतं. मुलांची शिक्षणं करायची. राबायला हात नाहीत; पण तिचा संघर्ष चालू होता. तिच्या कष्टाच्या आठवणी मनात दाटत असतानाच आमची गाडी तिच्या वस्तीजवळ पोहोचली होती. ऑफिसची मोठी-थोरली गाडी तिथं बांधाला उभी करून नांगरलेलं रान तुडवत आम्ही तिच्या घराकडे निघालो. ऊन रणरणत होतं. त्यावेळी शेतावर मोठी गाडी येणं हेही वेगळंच होतं. आसपासच्या लोकांचं लक्षही वेधलं जात होतं. आम्ही बहिणीच्या घराजवळ पोहोचलो. तेव्हा ती

    ी कोण आलंय? हे उत्सुकतेनं

    पाहात होती. तिनं ‘या’ म्हणून आत घेतलं. बसायला एक खाट होती. शेजारी चार-सहा धान्यांची पोती होती. तो काळ भारतातल्या जागतिकीकरणाचा प्रारंभीचा काळ होता. शेती हा दुर्लक्षित भाग होता अन् मनमोहनसिंग यांचा अर्थसंकल्प चर्चेचा, स्वागताचा विषय होता. आम्ही बसलो. पाणी प्यायलो. मी म्हटलं, ‘‘आम्ही जेवणार आहोत.’’ ती काय करायचं याची तयारी करायला लागली. मी आतल्या खोलीत तिच्यासोबत बसलो. प्रारंभीच खुशालीचं बोलणं झालं आणि अचानक चर्चेची गाडी राजकारणावर आली. राज्याच्या, देशाच्या धोरणावर आली. बहीण खेड्यात-वस्तीवर असली तरी तिचं वाचन, सामान्यज्ञान आणि बातम्यांची माहिती चांगली होती. चर्चेच्या ओघात ती पगारदारांवर घसरली. आर्थिक खुलेपणाचं कौतुक करताय; पण इथं पाहिलंय का शेतीत काय चाललंय? प्यायला पाणी नाही. पावसाचा भरवंसा नाही. खतांचे दर वाढलेले, मजूर मिळत नाही. शिक्षणाला तर पैसाचा मोजावा लागतो असं खूप काही ती बोलत होती.

    मी पगारदार म्हणून जरा मागे हटूनच बोलत होतो. बरोबर माझा सहकारी होता. तोही काहीसा बिचकला असावा, घरचे चारघास खावेत म्हणून आलो अन् इथं तर वादळंच उभं ठाकलंय, असं त्यालाही वाटलं असावं. तुमचं ठीक आहे. तुम्हाला महिन्याला पगार मिळतो. फिरायला गाड्या मिळतात. सभा-समारंभामध्ये भाषणं करायला मिळतात; पण पत्रकारांना तरी शेती-शेतकरी यांचा कैवार घ्यावासा वाटतोय का? त्यांना मुळात हिरवीगार शेती पाहायची सवय. दुष्काळ, महागाई, प्रवास हे त्यांना तरी कुठे माहितयं? तुम्ही संघटित, इथं शेतकर्‍यांना कोण संघटित करणार? आमचे इथले नेतेही असेच. एकदा निवडून दिलं, की ते मुंबईत आणि आम्ही इथं वावरात! आता सख्ख्या भावाचा पत्रकार म्हणून उपयोग नाही तो नेत्यांना कशाला दोष द्यायचा? तिचे मन मोकळं करणं सुरूच होतं. आम्ही मुकाटपणे जेवण करीत होतो. मी ग्रामीण भागातला, शेतीतलं मला कळतं. शेतकर्‍यांची दुःखं मलाच माहिती असं मी समजायचो. इतकेच नव्हे, तर पुण्यात माझ्या संस्थेतही मी शेतीतला जाणकार असावा, असा समज होता. आज तो भोपळा फुटत होता. फुटला होता. तिची दुःख, तिच्या यातना, तिचे प्रश्न, समस्या या केवळ तिच्याच राहिल्या नव्हत्या. त्या शेतकर्‍यांच्या म्हणून माझ्यावर आदळत होत्या. मी शहरी, नागरी आणि नोकरदारांचा प्रतिनिधी म्हणून तिचे ते हल्ले सहन करीत होतो.
    आमची जेवणं झाली. आम्ही निघालो. निरोप द्यायला ती गाडीपर्यंत आली. गाडीत बसताना मला उगाचच अपराध्यासारखं वाटत होतं. आमच्या परतीच्या प्रवासात फारशी चर्चा, गप्पा झाल्या नाहीत. कदाचित आम्ही दोघंही अंतर्मुख झालेलो असू. आपणही शेती करावी, असं माझं एक स्वप्न होतं; पण ते वास्तवात आलं नाही; पण आज ती शेतकरी आणि मी नोकरदार अशी विभागणी झाली होती. पाठची भावंडं आम्ही; पण हे अंतर निर्माण झालं होतं. आता माझ्या बहिणीची शेती चांगली आहे. मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीतले प्रयोग करीत आहेत. कलिगडाचे भारे गाडीवर लादून कोपरगावच्या बाजारात विकताना मी भाच्यांना पाहिलं होतं. आता बाजार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. परवाच तिचा फोन आला. म्हणाली, ‘‘यावेळी आंब्याला खूप मोहोर आहे. आंबे खायला ये.’’ मी कदाचित जाईनही; पण जेव्हा जेव्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी ऐकतो, वाचतो तेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण होते. एक शेतकरी आणि एक पांढरपेशा नोकरदार यांची भेट आठवते. आमच्या नात्यात त्यानं निर्माण केलंलं अंतर आठवतं आणि पुन्हा एकदा शेतीविषयक काही लिहिताना शब्द आक्रमक होतात. हे वाढलेलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू होतो; खरंच हे अंतर कमी होईल? कधी?

    -- किशोर कुलकर्णी

  • रोजा

    गुलबट छटा असलेली सुरेख फर, वेधक बोलके डोळे, स्वतच्या सौंदर्याची जाणीव असलेल्या तरुणीसारखी चाल, कोणीही मला पाहिले, तर पुन्हा मान वळवून पाहावेच लागेल, असा कमालीचा विश्वास बाळगणारे हे व्यक्तिमत्त्व. रोजा. पामोरियन स्पीट्स जातीची कुत्री. अवघ्या तीन महिन्यांची असताना माझ्याकडे आली अन् घरातील एक महत्त्वपूर्ण घटक बनली. मी, पत्नी रेखा, मुलगा पराग या त्रिकोणी कुटुंबात रोजा आल्यामुळे चौकोन झाला. रोज घरातून बाहेर पडताना आणि आल्यावर तिला भेटणे, तिच्याशी खेळणे हा महत्त्वाचा रिवाज झाला. तिचे वय वाढू लागले तसा तिच्या जोडीदाराचाही शोध घ्यावा लागला. तिचे पहिले बाळंतपण डॉक्टरांनी दारात उभे राहून, तर मी तिला थेट आधार देऊन केले. छान पाच पिले दिली तिने. त्यांच्या आगमनानंतर तर दोन महिने आमचे घर गोकुळ बनले होते. वाटीवर चमचा वाजविला की पाचही पिल्लं धावत यायची. दूध प्यायची. रोजा तर स्वतचे आणि पिल्लांचेही आवर्जून करवून घ्यायची. आता ही पिले मोठी झाली असणार, नव्हे त्यांच्या काही पिढ्या झाल्या असाव्यात. माझ्या मित्राकडे त्याचेही बरे चाललेले असणार. रोजा आई झाली याचा आनंद तिच्यापेक्षाही कांकणभर आम्हालाच होता. त्यामुळे तिचा लाड वाढतच होता. आमच्या बिछान्यावर झोपण्यापासून तिला सांगून गेले नाही तर रुसून बसण्यापर्यंत तिची मजल गेली होती. घरात कोणी नसेल, तर हिच्या गप्पा चालत रोजाशी अन् तीही
    छान ऐके. तर अशी ही आमची रोजा. लाडकी रोजा. आज तिचीच गोष्ट सांगायची म्हणून एवढी प्रस्तावना.

    तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे

    नाही; पण आता तिला मोकळे

    सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
    यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा

    जाऊ? मी म्हटले, एकदा ठरवले ना? मग तो हिला म्हणाला, आई जाऊ? ती म्हणाली, कसे करतोस? रेखाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. मीही माझा निर्धार सोडायला उत्सुक होतो नि पराग तर ते काम केवळ उरावर दगड ठेवूनच करणार होता. सध्या राहू देत असे म्हणून पाटीतील पिले घरात आली. ``रोज म्हणत होती, मला माहीत होते, तू हे करू शकणार नाहीस म्हणून.'' तिने तिघांजवळ येऊन कृतज्ञता व्यक्त केली. बहुधा क्षमाही मागितली. नव्या उमेदीने आम्ही पिलांशी खेळू लागलो. त्यांचे फोटो काढू लागलो. कौतुक करू लागलो. माझे घर पुन्हा गोकुळ झाले. माझ्या, हिच्या अन् परागच्या मनात निर्माण झालेल्या राक्षसाची जागा माणसाने घेतली. मला माहीत आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक राक्षस आहे अन् देवही. काय जागवायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न.

    -- किशोर कुलकर्णी

  • पुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा!

    गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.

  • दर्जा

    मी त्यावेळी जपानच्या दौर्‍यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या अन् त्या ठरल्यावेळी पार पाडण्यावर तिथल्या लोकांचाही भर होता. आम्हा चौघा भारतीय पत्रकारांसाठी एका महिला गाईडची योजना होती. बुटकीशी पण लाघवी अन् भरपूर माहिती असणारी. चार दिवस होऊन गेले होते. हॉटेल ओतानी हे किती महागडं हॉटेल आहे, याची जाणीव झाली होती आणि विशेष म्हणजे या चार दिवसांत घरच्या जेवणाचं निमंत्रण कोणाकडूनही मिळालेलं नव्हतं. आता आपल्या गाईडलाच पकडायचं असं आम्ही चौघांनी ठरविलं. ‘‘आम्हाला तुझ्या घरी जेवायला यायचंय’’ असं स्पष्ट सांगितलं; पण ती सहजी तयार नव्हती. ‘‘मी माझ्या वतीनं तुम्हाला मेजवानी देते, बाहेर कुठे जाऊ,’’ असं तिचं म्हणणं होतं. जपानमध्ये पाहुण्यांना घरी बोलवायचा फारसा प्रघात नाहीये; अशी माहितीही तिनं दिली; पण आम्ही पिच्छा सोडायला तयार नव्हतो. अखेर संध्याकाळचं भोजन तिच्या घरी घ्यायचं ठरलं. ‘सुशी’ हा प्रकार तिनं केला होता. रॉ फिश असं त्याचं स्वरूप होतं. आमच्या जेवणाच्या तपशिलात जात नाही; पण त्यावेळी गप्पा चांगल्या रंगल्या. त्या ओघात तिनं सांगितलं की, मी राहते त्याच इमारतीत जपानची एक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ कॅलियोग्राफर राहते. खूप छान आहे ती. तिचे अक्षरलेखन जपानच्या अभिमानाचा विषय आहे.म्हा चौघात एक चित्रकार होता सतीश गुप्ता. तो म्हणाला, ‘‘आपली भेट होईल? आता? आम्ही त्यांना भेटलंच पाहिजं. इतक्या जवळ आल्यानंतर तर ही भेट व्हायलाच हवी.’’ जपानमध्ये व्यक्तिगत जीवनाला, खासगी जीवनाला विशेष महत्त्व आहे. कोणीही कोणाला असं ऐनवेळी भेटत नाही अन् घरी तर सहसा नाहीच, असं बरंच काही सांगण्याचा आमच्या गाईडनं प्रयत्न केला; पण आमचा आग्रह मोठा होता. अखेर तिनं त्या अक्षरकलावंत महिलेला फोन करायचं ठरविलं. ती फोनवर बोलत होती तेव्हा आमची उत्सुकता ताणली गेली होती. भाषा कळत नव्हती; पण बहुधा काम झालं असावं, असं वाटत होतं. झालंही तसंच. ती म्हणाली, ‘‘आणखी वीस मिनिटांनी तुम्ही भेटू शकता असं म्हणालीय ती. खरंच हे आश्चर्यच आहे, की कोणी जपानी व्यक्तीनं इतक्या झटपट भेटीची वेळ द्यावी. पुढची वीस मिनिटे अन्य विषय बाद झाले. आम्ही त्या कलाकार महिलेचीच माहिती घेत राहिलो. वयाची सत्तरी तिनं पार केलेली आहे. तेव्हा तुमची भेट लवकर संपवा, अशी सूचनाही पुढे आली. अखेर आम्ही तिथं पोहोचलो.
    छोटंसं घर, त्यात दहा बाय बाराचा हॉल. त्यांनी मोठ्या आदबीनं अन् सुहास्य वदनानं स्वागत केलं. उंची फार तर चार फूट दहा इंच. रंग पिवळसर गोरा. चेहर्‍यावर तांबूस चट्टे. कमरेत थोडा बाक आलेला आणि स्वागतासाठी, बोलण्यासाठी थोडंस वाकणं. सत्तरी पार केलेली, थकलेली तरी उत्साहानं भरलेली मुद्रा. हॉलमध्ये एक आयताकृती पाट आणि त्यावर कागद ठेवलेले. त्याभोवती आम्ही बसलो. अक्षरकलेच्या गप्पा सुरू झाल्या. शब्द, त्यामागचा वेग, ब्रशचा आकार, कलाकाराची मानसिक स्थिती, या सर्वांचा अक्षरांवर होणारा परिणाम या तुलनात्मक नव्या विषयावर ही चर्चा होती. अक्षरं काढतांना त्यामागचा कलाकार काय असू शकतो, कसा असावा याची जाणीव होत होती. गप्पांच्या ओघातच ‘काहीतरी प्रात्यक्षिक दाखवा,’ असा आग्रह सुरू झाला. तसा तो होणारच याची त्या कलावतीला जाणीव असावी. तो पाट आणि त्यावरील कागद त्याचीच साक्ष होते. अवघ्या मिनिटाभरता तिनं ब्रशनं त्या कागदावर ओणवं होऊन अक्षरं काढायला सुरुवात केली. एखादी ओळ झाली, की तो कागद टर्रकन फाडला जाई. त्याचा बोळा कोपर्‍यात भिरकावला जाई. एक-दोन-तीन असे दहा-बारा बोळे कोपर्‍यात जमा झाले होते. त्यानंतर मात्र सहा कागद लिहून बाजूला ठेवण्यात आले. आधीच्या कागदात काय कमतरता होती कोण जाणे? पण हे सहा कागद मात्र देखण्या चित्रासारखे होते. शब्दांचा अर्थ कळत नव्हता, तरी त्यांचा भाव लक्षात येत होता. आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सूर्यदेवतेला केलेली ती प्रार्थना होती. ‘आता उठायला हवं,’ असं आमच्या गाईडनं सुचविलं; पण त्या उत्साहमूर्ती वृद्धेच्या ऊर्जा अनुभवण्यात एक वेगळाच आनंद होता. ‘‘हे जे अक्षरलेखन केलंय ते आम्हाला मिळेल का?’’ एकाच वेळी दोघांनी प्रश्न केला. हाप्रश्नही तिला अभिप्रेत असावा. ती म्हणाली, ‘‘हो, थांबा हं मी त्यावर माझं सील लावून देते.’’ एका अर्थानं त्या कलाकारानेआपल्या कलेविषयी समाधान पावल्यानंतर उठविलेली मोहर म्हणजे हे सील. या कलाकाराच्या दर्जा परिमाणाचा एक अविष्कार त्याला जपानमध्येच नव्हे, तर अन्यत्रही तेवढीच मान्यता. तिनं सील घेतलं खरं, पण त्यापैकी चार कागदांवरच ते उमटविलं.
    एकेक कलाविष्कार आमच्या हाती ठेवला. ‘‘...आणि ती उरलेली दोन?’’ आमच्यापैकी एकानं विचारलंच. ती म्हणाली, ‘‘अक्षरकला म्हणून तीही छान जमलीत. ती तुम्ही घेऊनही जाऊ शकता; पण त्यावर सील नाही करणार. कारण जो दर्जा अपेक्षित आहे तो त्यात नाही देता आला.’’ आपली कथा, कविता, चित्रपट, गीत याविषयी बोलतांना कलाकार त्यांना अपत्याचं नाव देतो अन् त्यात भेदभाव कसा करणार? असा प्रश्न विचारतो. ... मला हे त्यावेळी आठवलं. खरंच, कलाकार आपल्या कलाकृतीमधल्या दर्जाची चिकित्सा करू शकतो? तशी करता येत नाही, असं म्हणणारे खरोखर किती प्रामाणिक असतात? वयाची सत्तरी पार केलेली, स्पर्धेतून बाजूला झालेली ही कलाकार मात्र अजूनही आपल्या सीलचा दर्जा कायम राखण्याबद्दल तत्पर होती. त्यासाठी तिनं दोन चित्र बाजूला काढली होती. अक्षरकला, त्यामागचे कष्ट, त्यातलं कसब याविषयी फारसं ज्ञान नसलेल्या मला तिचं ती दर्जाविषयीची प्रामाणिक आत्मीयता खूप काही सांगून गेली. ती कलाकार तर मोठी होतीच; पण स्वतःवर टीका करण्याचं धाडस, क्षमताही तिच्यातल्या कलाकाराला अधिक मोठं करीत होती.

    -- किशोर कुलकर्णी

  • गंमत

    परदेशात जाणं ही बाब आता काही खूप मोठी राहिलेली नाही. रोज हजारो-लाखो लोक भारतातून अन्य देशांत जातात आणि येतात;

  • राजा

    तुझा व्याप खरच खुप मोठा आहे. तुझे उंच सिहासन, तुझा मोठा लोकसंग्रह, तुझे ऐश्वर्य सारं काही आश्चर्यचकित करणारं आहे. या सर्वांपलीकडे पाहता, तुझ्या सुंदर, उदार, भारावून टाकणार्‍या जबरदस्त आकर्षक अशा प्रभावी व्यक्तीमत्वाचे दर्शन होते. तुझी गुणग्राहक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, सर्वसमावेशक उदार प्रवृत्ती आध्यत्मिक तेज, ...धार्मिक मन या सर्वांनी तुझे लोभस व्यक्तीमत्त्व एससंघ सुसूत्र होते. वरवरचा अतिशय साधा, तरल स्वभाव त्यामागे दडलेले काटेकोर, अचूक, सखोल तत्वज्ञ व्यक्तीचे विशाल मन, कुणाच्याही मनाला जादूचा स्पर्श करून जाते. तुला अत्यंत देखण्या तारुण्याचे वरदान असूनही तुझ्या वागण्या बोलण्यात एक जबाबदारपणा व पितृत्त्वाचा जिव्हाळा दिसून येतो. त्यामुळे संपर्कात येणारी व्यक्ती तुझ्यात कायमची गुंतून पडते. तुला ओझरते पाहणाराही कधी विसरू शकत नाही. रुबाबदार राजपुत्रासारखे तुझे वागणे, चालणे, चमकता, पूर्ण चंद्रासारखा चेहरा, मोठे, भावूक बोलके डोळे आणि अत्यंत सात्विक प्रेमळ वागणूक, या सगळ्या मोहपाशातून एखादी विरक्त-योग मार्गी व्यक्तीदेखील अलिप्त राहू शकणार नाही.
    तुझ्या स्वभावात, तुझ्या व्यक्तीत्वात विरोधभास नाही असे मुळीच नाही; पण उन्हासोबत सावली असा रमणीय विरोधाभास कुणालाही आवडेल कधी तुझे बोलणे तलवारीसारखे धारदार, वार करणारे असते. तर कधी तुझ्या संतप्त नजरेत ज्वलंत निखारे दिसून येतात. अशावेळी ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या, अग्नीफुलांचा साज घेतलेल्या पळसासारखा दिसतोस तू।
    दुसर्‍याच्या हळव्या दुसऱया मनावर कधी प्रेमाने तर कधी समजूतीच्या सुरात `उपचार' करीत असतांना तुझे कधी पित्यासारखे शिस्तीचे तर कधी मोठ्या भावासारखे धाकाचे बोलणे मनाला कायमची हुरहूर लावून जाते. तुझ्या धाकातही प्रेमाचे आश्वासन असते. अशा हिरव्यागार बहारदार गुलमोहराची ही रम्य सावली सोडून कुणाला जावेसे वाटेल?

    समोरच्या व्यक्तीमध्ये एकदम गुंतून गेल्यासारखे, समरस होणे तुला सहज जमते. मात्र एका

    क्षणात निघून जाताना तू कधीही विचलीत होत

    नाहीस. हृदयाची भाषा बोलून, दुसऱयाचे `विधीलिखीत' लिहिण्याची कला तू कुठे शिकलास?

    तुझ्या व्यक्तीमत्त्वाचे हे असंख्य पैलू उलगडण्यात माझे संपूर्ण आयुष्यही सरून जार्सल तरीही माझे मन अतृप्तच राहण्याची शक्यता आहे. तुझ्या नजरेतील उपेक्षा, तिरस्कार, अलिप्तपणा हे भाव मात्र असहनीय आहेत.
    तू रागवशील, बोलशील, प्रसंगी एखादे प्रायश्चित्त सांगशील इतपत सारे ठीक आहे; पण उपेक्षा मात्र मरण याताना देतील.
    तुझ्या अस्तित्वाने येते, रत्नमाणकाचे मूल्य.तुझ्या नसण्याने मनी, रित्या आकाशाचे शल्य.
    तुझ्याशिवाय माझे सारे आयुष्य, माझा संघर्ष, माझे अस्तित्व, गुण-अवगुण सारे काही व्यर्थ आहे. माझ्या आयुष्यात शिशिर असला तरी तुझा उत्कर्ष पाहून मला तृप्त वाटते. माझ्या दीपपूजनात, गायत्रीमंत्रात, शिवपूजनात तुलाही ...वाटा आहे. एकदा तुला ग्रहण लागले होते; पण तू त्यातून सहीसलामत, सुरक्षित निघालास आणि पुन्हा सर्वांग सुंदर बहरलास हे कळले तेव्हा मनात आलेल्या मिश्रभावना शब्दातीत आहेत. तुझे सारे दुःख, प्रारब्ध भोग मला मिळावे. व माझे आयुष्य तुला मिळावे. असेच मी प्रार्थनेत नेहमी मागीन.
    पारिजात नावाच्या राजकन्येने, सूर्याच्या प्रेमविरहात देहत्याग केला होता. तेव्हा त्याचा `प्राजक्त'झाला. रात्रीच `उमलून' हा वृक्ष पहाटेस सूर्याला पाहून अश्रूपात करतो. व `निषेध' व्यक्त करीत सारी फुले गळून पडतात. माझेही तुझ्याशिवाय `संपून जाणे' असेच रमणीय असावे. माझ्याही राखेतून असा बहारदार वृक्ष व्हावा व त्याच्या सुगंधाने तुला मंत्रमग्ध करावे.
    मला मृत्यूपंथी नेई, स्वैर दिशाहीन वाटमाझ्या प्रेमाची पुण्याई, तुझे चिरंजीव पद।आता नको अग्नीसाक्षी, नको वेदमंत्र थोरतुझ्या दिव्य अस्तित्वात, माझे शाश्वत सौभाग्य।

    -- किशोर कुलकर्णी

  • यशाच्या मार्गावर नेहमीच ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ची पाटी लटकत असते……

    "दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही."

    "ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा."

    लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात...

    आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना ' ठिक आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ? - आचार्य अत्रे

    हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?... .... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!

    यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते......

    ' सदैव' आणि 'कधीच नाही' हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.

    पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!

    माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत.... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा.... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!

    का? का? का? १. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? २. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?

    ३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का? ४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का 5. १00 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!

    आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!

    जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्‍या जुन्या गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल ? तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !

    तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही, तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही ....

    प्रोफेसर विसराळू का असतात याचं कारण एका प्रोफेसरांनीच शोधून काढलं. परंतु नंतर ते कारण प्रोफेसर विसरून गेले.

    हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!

    जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

    नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.

    मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला. त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत. त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद "जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ; तेव्हा मला फ़ार गंमत वाटते . त्याला हृदय नसतं ; आणि तिला डोके नसतं ....."

    -- सुमित्र श्रीधर माडगूळकर