नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला
केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच
बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.
-- किशोर कुलकर्णी
एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्याचा
वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली अंतरही तसं आवाक्यातलं. सायंकाळी सांगलीत पोहोचलो. दादांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘असं कर, उद्या सकाळी सातला मी निघणार आहे. जत-कवठे महांकाळ आणि नंतर कर्नाटकच्या सीमावर्ती गावात दौरा आहे. बरोबर जाऊ. जाताना चर्चा होईल. काय लिहायचं ते लिहा.’ वसंतदादा पाटील यांच्या नावाचा दबदबा मोठा होता. अर्थात, त्यावेळी त्यांना सारं काही अनुकूल होतं असंही नव्हे. त्यांच्यासमवेत जायचं ठरविलं अन् तसा सकाळी हजरही झालो. छोट्या छोट्या सभा होत्या, तिथं दादा फारतर दहा मिनिटे बोलायचे; पण जे बोलणं असायचं ते नेमकं आणि मतदारांशी थेट संवाद साधणारं. बहुतेक भाषणांचं सूत्र पाणी आणि दुष्काळ हेच होतं. जतला तुलनात्मक मोठी सभा होती. सकाळचे साडेअकरा वाजून गेले होते. सभा झाली. आता दादा आणखी पुढे जाणार होते. मी दादांना म्हटलं, ‘मी इथं थांबतो. मिळेल त्या वाहनानं सांगलीला जातो. मला बातमी द्यायला हवी.’ त्यांचा निरोप घेऊन निघालो. सभास्थळापासूनचा एक रस्ता गावात जात होता, तर दुसरा आणखी एका जवळच्या गावाकडे. नेमकं काय झाले ते आठवत नाही; पण जिकडं जायचं होतं तो रस्ता हुकला अन् दुसर्याच रस्त्यानं निघालो. एक-दोन किलोमीटर चालल्यानंतरही गावाची चिन्हे दिसेनात; पण एक पोलीस अधिकारी पायीच पण वेगानं जात असल्याचं दिसलं. त्याला गाठायला हवं असं वाटलं अन् मी वेग वाढविला. त्याला गाठा
ला पाच-दहा मिनिटं तरी लागली. अखेर त्याला गाठलंच. मी माझी ओळख करून
दिली. त्याची ओळख त्याच्या छातीवरची नावाची पट्टी देत होती. खांद्यावर म. पो. ही अक्षरं आणि दोन तार्यांबरोबर तीन फिती सहजपणे सांगत होत्या, की हा पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. माझ्याप्रमाणे तोही इलेक्शन ड्युटीवर होता. त्याच्याशी बोलताना कळलं की जवळच्या गावातून सायंकाळी सांगलीसाठी बस मिळू शकेल. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. गप्पांच्या ओघात रस्ता संपत होता. चालत असताना आमच्यामागून काँग्रेसचे झेंडे असणारे दोन ट्रॅक्टर ट्रेलर जात होते. मी सहज त्या पीएसआयला म्हटलं, ‘अजून किती दूर आहे गाव?’ तो म्हणाला, ‘अजून सहा-सात किलोमीटर असेल. तासाच्या आत पोहचू आपण.’ मी त्याला म्हटलं, ‘हे ट्रॅक्टर तिकडेच चाललेत असं दिसतंय, त्यांना थांबवू आणि जाऊ त्यांच्याबरोबर.’ तो म्हणाला, ‘नको तुम्हाला जायचं तर जा. मी पायीच येतो.’ मी म्हटलं, ‘का हो? मी तर पत्रकार आहे. मला ट्रॅक्टर चालतो, कोणत्याही पक्षाचा असला तरी मला फरक पडत नाही. तेवढंच चालणं वाचेल.’ तो म्हणाला, ‘तुमचं बरोबर आहे. तुम्हाला चालेल ते; पण मला कोणत्याही पक्षाचं वाहन नाही वापरता येणार. मी इलेक्शन ड्युटीवर आहे. ड्युटीवर असताना एक तर पोलिसांचं वाहन किवा ही आपली विनोबा एक्सप्रेस!’ एक पोलीस अधिकारी निवडणुकीच्या काळात केवळ तो निवडणूक ड्युटीवर आहे म्हणून वाहन वापरायला नकार देतो, हा माझ्या दृष्टीने वेगळाच अनुभव होता. आता मला त्याच्यात रस निर्माण झाला होता. मीही पायी जायचं ठरविलं. जाताना त्याचं गाव, कुटुंब, त्याच्या नोकरीविषयी सतत बोलत होतो आणि तोही नेमकी उत्तरं देत होता. वाहन न वापरणं हा त्याचा संभावितपणा नव्हता, तर त्याच्या त्या निष्ठा होत्या हे सहजी जाणवत होतं. तासाभरातच आम्ही त्या गावी पोहोचलो. तिथं पंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो. पदाधिकार्यांपैकी कोणी नव्ह
तं. तिथंपण एकानं फौजदारासाठी चहा सांगितला. आम्ही चहा घेतला. पैशाचं काही न विचारता मी एस.टी. स्टँडकडे वळलो. सहज मागे पाहिले तर फौजदारमहाशय आमच्या चहाचे पैसे चुकते करीत होते.
-- किशोर कुलकर्णी
आपण सारे एकच आहोत; एकाच निसर्गाचे, परमेश्वराचे घटक आहोत, हे सारे ऐकले, वाचलेले गळून पडते. मी, माझे ... हे शब्द प्रभावी होतात. दुःख, वेदना, संकटे ही किमान आतातरी माझी नाहीत, ही भावना प्रबळ होते. वृत्तपत्रांतील छायाचित्रेही नकोशी वाटू लागतात ... मग नकोच वृत्तपत्र वाचणे, नकोच दूरचित्रवाणी पाहणे हा विचार प्रभावी होतो. ते सारे माझ्यासाठी नाहीच, असे म्हणून माणूस अन्य विषय शोधू लागतो. विषयांतर महत्त्वाचे ठरते. वास्तव न स्वीकारता, न पाहताच त्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपण आपल्या विश्वात रमायला लागतो. कोणी मानवतेची आठवण दिलीच किंवा आवाहन केलेच, तर आपल्या कर्तव्यपूर्तीचा एक तुकडा तोडून त्यापासून मुक्त होऊ पाहतो. निसर्गत मी जसा आहे, त्याचा अनैसर्गिक प्रवास त्याला कारणीभूत आहे का? कोठून सुरू होतो हा प्रवास? काय कारणीभूत असावे या प्रवासाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक या निव्वळ मनाच्या तर कल्पना नव्हेत? की ती ही मायाच? प्रश्नांची मालिका हवी तेवढी लांबविता येईल. आपणच आपल्यात डोकावून पाहिलं तर? मला वाटतं, स्वतशी होणारा प्रामाणिक संवाद जेथे थांबतो, तेथेच अनैसर्गिकतेचा प्रवास सुरू होत असावा अन्यथा जे वास्तव आहे त्यापासून दूर जाण्याचा, ते नाकारण्याचा प्रयत्न हेच नैसर्गिक आहे, असे वाटू लागलेच नसते. आपण आपल्याला तरी आहे तसे स्वीकारतो का? की, स्वतची फसवणूक करण्यातच आपल्याला आनंद लाभतो? दुःख नाकारणे किंवा त्या दुःखापासून दूर जाणे, ते आठवणीच्या एखाद्या बंदिस्त कप्प्यात बंद करणे, हा आनंद आहे का? तसे असेल तर मग हा आनंद शाश्वत का नाही? कदाचित, स्वतला स्वतपासून सातत्याने दूर नेणे, हे तर दुःखाचे खरे कारण नसेल? स्वत आहोत तसे स्वतला स्वीकारले, वास्तव आहे तसे स्वीकारले तर दुःख कोठे असेल? दुःखाचे अस्तित्वच नसेल तर आनंदाशिवाय काय असेल? मग आपल्या दुःखाचे मूळ नैसर्गिकतेमध्ये आहे की अनैसर्गिकतेमध्ये? आज मला होणार्या यातना किंवा घडलेल्या विदारकतेच्या वेदना जाणवतात, हे नैसर्गिक असायला हवेच; पण त्यापासून दूर जाण्यातच मला नैसर्गिकता वाटते. स्वतला संवेदनहीन करण्यातच आपण जीवनसंघर्षाशी सक्षम आहोत, असे वाटायला लागते. खरे तर संघर्षापेक्षाही वास्तव स्वीकारण्यात, त्याला सामोरे जाण्यात खरे धैर्य आहे. तुमच्या माझ्यात जर एकाच परमेश्वराचा वास असेल, तुम्ही अन् मी जर या सर्वशक्तिमान निसर्गाचाच एक घटक असू; तर त्यापासून कसे पळता येईल? त्याला किती टाळता येईल? माणसामाणसातील नैसर्गिकतेला, नैसर्गिक मानवतेला या दुर्दैवी घटनेमध्येही धुमारे फुटलेले दिसतात. मानवी हातांच्या रूपाने दुःखावर फुंकर घालणारे ते हात दिसू शकतात, अनुभवता येतात. अशा अनुभवासाठी परमेश्वर तुम्हाला सज्ज करो, ही प्रार्थना.
-- किशोर कुलकर्णी
हिंदी सिनेमात एक दृश्य नेहमी दिसते. हॉस्पिटलच्या पॉश कॉरिडॉरमध्ये हीरो अस्वस्थ फेऱया मारीत असतो. लाल दिवा लावलेल्या काचेच्या दरवाजातून एक नर्स धावत येते. ``मुबारक हो आपको बेटा हुआ है,' असे म्हणते. मग तो हीरो पळत आत जातो स्नेहार्द नजरेने हीरॉईनाचा हात हातात घेतो वगैरे.....
प्रसूतीपूर्व गर्भसंस्कार करून आपले बाळ चांगले जन्मावे म्हणून अत्यंतिक काळजी घेणारे समृद्ध सुशिक्षित; मॅटर्निटी लिव्ह सोबत पॅटर्निटी लिव्ह एन्जॉय करणारे इलाईट नोकरदार; प्रसूतीपूर्व तपासणीचे महत्त्व; प्रसूती काळातला आहार लसीकरण यांचे महत्त्व सांगणारे राष्ट्रीय कार्यक्रम ः टीव्हीवरच्या या संबंधातल्या जाहिराती या सगळ्या गोष्टी माझ्या मनासमोरून सरकत गेल्या. या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि कळा येणार्या आपल्या पत्नीला एकटे सोडून दारू प्यायला पळणारे पतीराज दुसरीकडे! खरंच, त्यावेळी त्या स्त्रीच्या मनात काय विचार आले असतील, आपला खंबीरपणा तिने कसा टिकवला असेल? आपल्या बाळाला त्याची जन्मकहाणी तिने सांगितली असेल? असंख्य प्रश्न मनात येत राहतात.
-- किशोर कुलकर्णी
पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. अटकसत्र सुरू होतं. घटना अत्यंत वेगानं घडत होत्या. आता विचार केला तर वाटतं आणीबाणीचं गांभीर्य त्यावेळी तरी तेवढ्या प्रमाणात जाणवलेलं नव्हतं. लोकशाहीवर संकट, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा याबाबी कळत होत्या; पण त्याहीपेक्षा आपण पत्रकारितेत आहोत आणि या सर्वांचा थेट अनुभव घेत आहोत याचं थ्रील अधिक होतं. कामापेक्षाही गप्पा, चर्चा, प्रतिक्रिया अधिक येत होत्या. मी ज्या दैनिकात काम करीत होतो त्याच्या ध्येयधोरणाला पाठिंबा द्यावा किवा विरोध करावा. अशी मानसिकताही नव्हती. मात्र, देशातल्या या घडामोडीमुळं सार्वत्रिक अस्वस्थता मात्र होती. आणीबाणीचा पत्रकारितेवरचा थेट परिणाम म्हणून सेन्सॉरशिपचा विषय पुढे येत होता आणि आता बातम्या द्यायच्या काय, कशा अन् किती असे प्रश्न पुढे येत होते. त्यावेळी मी या क्षेत्रामध्ये इतका नवा होतो, की त्याच्या परिणामाची कल्पना करता येऊ नये. मला आठवतं त्यादिवशी एस. एस. सी.चा निकाल होता आणि आणीबाणीतल्या घटना-घडामोडी होत्या. जयप्रकाशांपासून अडवाणींपर्यंत अन् जॉर्ज फर्नांडिसांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अटकसत्र सुरू होतं. बातम्यांना कमतरता नव्हती. आणीबाणीचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा कोरी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. एकूण काम सुरू होतं. रात्री अकरा-साडेअकराची वेळ असावी, एक फोन आला की सेन्सॉरचं काम आजपासूनु सुरू होणार. रात्री बारानंतर त्यावेळचे पोलीस उपायुक्त वसंतराव पारसनीस आपल्या ताफ्यासह कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी सोलापूरसाठीचा अंक छापून तयार होता. तो अंक त्यांनी पाहिला अन् कोणत्या बातम्या द्यायला नकोत याच्या खुणा ते करू लागले. एक, दोन, तीन, पाच अशा विविध बातम्यांवर लाल रेघा उमटत होत्या. आपल्या अधिकार्यांना सूचना देऊन ते निघून गेले. रात्रीच्या वेळी माझ्या दोन ज्येष्ठ सहकार्यांशिवाय अन्य कोणी नव्हते. या बातम्या काढून टाका, असा आदेश अधिकार्यांनी दिला. या बातम्या काढून टाकणं अशक्य आहे, कारण त्या बातम्या काढल्या, तर तिथे कोणत्या बातम्या टाकणार, हा प्रश्न होता. त्यावेळी मोनो किवा लायनो कास्टिंग पद्धतीनं कंपोज तयार केला जायचा. या बातम्या एकमेकाजवळ एका पानात रचून त्याचा छाप एका जाडसर कागदावर घेतला जायचा अन् त्यानंतर मशीनवर बसविता येईल असा अर्धगोलाकार साचा तयार व्हायचा. फ्लाँग, स्टिरिओ अशी नावं त्याला होती. या बातम्या काढून टाकणं किती अवघड आहे हे सांगण्याचं काम माझ्यावर आलं. पोलीस अधिकार्याला यंत्रणा आणि वास्तव मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या बातम्या काढल्या नाही तर अंक प्रसिद्ध होऊ देणार नाही अशी त्याची भूमिका होती. याचवेळी मला राऊटिग यंत्राची आठवण आली. मी म्हणालो, ‘‘जो अंकाचा, पानाचा साचा तयार झाला आहे. तेथून या बातम्या काढून टाकता येतील. एका अर्थाने पानात लिहिलेला मजकूर नको असेल तो खोडता येईल.’’ झाले, अधिकार्याला त्या बातम्या येऊ नयेत एवढेच हवे होते. त्याचे काम झाले होते. त्यानं माझ्या समवेत उभं राहून नको त्या बातम्या खोडायला सांगितल्या. राऊटिग मशीनमधला खोडकाम करणारा भाग त्या सयार्यावरची उमटणारी अक्षरं खोडत गेला आणि असं पान तयार झालं की जे प्रसिद्ध होणं सरकारला नको होतं. दुसर्या दिवशी विविध अंक प्रकाशित झाले ते तरुण भारतपेक्षा वेगळे नव्हते. त्यात एस. एस. सी.चा निकाला होता; पण दिल्लीतील वीज गायब हे वृत्त नव्हतं. सेन्सॉरशिपची चौकट होती; पण धरपकडीतलं नाट्य नव्हतं. २६ जून रोजी दिल्लीत किवा भारतात काय घडलं. याचं चित्रण पूर्णपणे पुसलं गेलं होतं. मात्र, अंकाचा तो चेहरा पाहून या रिकाम्या जागांवर काय, काय असू शकेल याचा अंदाज येत होता. आणीबाणीचा विरोध लोकांपर्यंत जाऊ नये असं शासनाला वाटत होतं अन् तो रिकाम्या जागातून अधिक तीव्रपणे व्यक्त होत होता. आणीबाणीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होतांना आपण वृत्तपत्राच्या इतिहासातल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार झालो याचा आनंद होता. आज जाणवतं, मौन हा केवळ रुकार असत नाही, तो नकारही असतो. निषेधही असतो अन् क्षोभही! त्यादिवशी सर्वच वृत्तपत्रे यार्या अर्थानं अभिव्यक्त झाली होती. काहीही न सांगता रिकामी असतानाही!
-- किशोर कुलकर्णी
आपण आनंदाचा विचार करतो त्या वेळी खरे तर विचार दुःखाचा असतो. दुःख आहे म्हणूनच आनंदाचा शोध आहे. प्रश्न असा येतो की, माणूस दुःखी का होतो आणि माणूस आनंदी तरी का होतो? मध्यंतरी माणसाच्या आनंदाच्या, समाधानाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. माणसाकडे खूप पैसे असले की आनंदाची साधने त्याला खरेदी करता येतात, असा त्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. खूप पैसा असला म्हणजे खूप आनंद, असा त्याचा अर्थ घेता येत नाही. म्हणूनच पैसेवाला माणूस आनंदी असेलच, असे नव्हे. पैशाने विकत घेता येतील, अशा गोष्टींसाठी पैसा असणे एवढ्या मर्यादित अर्थानेच ही पाहणी घ्यायला हवी, असे दिसते. भारतात अशीच पाहणी करण्यात आली तेव्हा भारतातील 40 टक्क्यांपेक्षा अधिक लोक समाधानी, आनंदी असल्याचा निष्कर्ष पुढे आला. हे सर्वंच आर्थिकसंपन्न होते, असा भाग नाही. त्यातील खूप मोठ्या प्रमाणावरचे लोक दरिद्री अवस्थेमध्येच होते. मात्र, तरीही ते समाधानी होते, आनंदी होते. अलीकडेच आपण वृत्तपत्रातून मोठ्या घराण्यातील वादविवादाविषयी खूप काही वाचतो. सुख खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही ते सुखी आहेत, आनंदी आहेत, असा दावाही करता येणार नाही. मग प्रश्न पडतो की आनंद किंवा दुःखाचे उगमस्थान कोणते असावे? आनंद किंवा दुःखाचे कारण आपल्यात असेल की बाहेर? याच स्तंभात पहिल्याच लेखात वास्तव स्वीकारण्याचा उल्लेख केला होता. आपण जे आहोत, जसे आहोत तसे स्वीकारण्याची तयारी किंवा समोरची व्यक्ती किंवा घटना आहे तशी स्वीकारण्याची तयारी असणे किंवा नसणे यात तर दुःखाचे मूळ नसेल. जर दुःखाचे मूळ सापडले, तर त्यावर मात करणे कठीण असावे. जर दुःखाचे अस्तित्वच शून्य होणार असेल, तर तेथे आनंदाशिवाय अन्य काय असेल? आपण अनेक वेळा किंवा सततच म्हणा कोणाशीही बोलताना, व्यवहार करताना त्या त्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या प्रतिमांशी संवाद साधण्याचा, व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. माझा ज्येष्ठ अधिकारी माझ्याबद्दल नीट विचार करीत नाही, त्याला माझ्या कामाची किंमतच नाही, सातत्यानं तो मला रागावतोच आणि माझी काहीही चूक नसताना रागावतो असे वाटणे, ही काही फार अस्वाभाविक घटना आहे, असे नव्हे. अनेक कार्यालयांमध्ये ज्येष्ठ-कनिष्ठ संबंध असेच असल्याचे पाहायला मिळते. स्वाभाविकपणे या संबंधातून जी निर्मिती होते त्याला दुःख, वेदना, तणाव, राग, चिडचिड असेच म्हणावे लागते. ही स्थिती सहज टाळता येते. प्रश्न येतो तो स्वतमध्ये स्वतला शोधण्याचा, स्वतला ओळखण्याचा आणि मान्य करण्याचा. तसे होत नाही. मी आळशी आणि कामचुकार आहे, हे मी पाहायला हवे आणि स्वीकारायला हवे. हे जर झाले, तर तुम्ही आळशी किंवा कामचुकार राहण्याची शक्यताच संपते. मी तर कार्यतत्पर आणि कामसू ही स्वतची फसवणूक जेथे थांबेल तेथेच स्वतला मान्य करण्याची, स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणणे आणि घाबरणे, यापेक्षा मी भित्रा आहे, हे स्वीकारणे खर्या अर्थाने महत्त्वाचे. एकदा हा टप्पा झाला की भीतीचा मागमूसही तुम्हाला लागणार नाही. तुमचे काम तुम्ही योग्य पद्धतीने कराल. जे शक्य नाही त्यासाठी मदत घ्याल, जे जमणार नाही तेही मान्य करण्याची लाज वाटणार नाही. रोज कार्यालयात जाताना येणारा ताण आणि घरी आल्यानंतर त्या ताणाचा इतरांवर केला जाणारा भडिमार थांबेल. प्रश्न आहे तो स्वतला स्वीकारण्याचा, मान्य करण्याचा. हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. मी करून पाहिला आहे आणि दुःखाचे मूळच मी नष्ट केलेय. दुःख संपेल तेथे आनंदाशिवाय अन्य काहीही असणार नाही, याची खात्री बाळगा. स्वतशी संवाद साधण्याची सवय नसते. नैसर्गिक क्रियेपासून दुरावलेलो असतो आपण अशावेळी आपल्या आराध्यदैवताशी बो , आपल्या अंतरात्म्याशी बोला. तुमचा संवाद सहज होईल.
-- किशोर कुलकर्णी
संध्याकाळी मित्राकडे गेलो. भूक लागत नाही, असं सांगितलं. तो म्हणाला, `तुला काय झालंय? हे घे थोडं, छान भूक लागेल.' घेतलं ते मी. घरी गेलो. जेवलो अन् भडभडून ओकलो. मद्य पचलं नव्हतं, हे खरं; पण त्यानंतर अन्नाचा कणही पचेनासा झाला. आता माझ्या आजाराचं निदान झालं होतं. कावीळ. त्यात विष घेतलेलं. विश्रांती, पथ्य आवश्यक. उपचाराला पैसे नाहीत. कुणीतरी सांगितलं म्हणून लोणावळ्याला गेलो. तिथं काविळीवरचा जालीम उपचार केला. पुढचे तीन दिवस कावीळ विसरून जावी, असा त्रास झाला. चालता येईना. प्रयत्न केला तर मस्तकात हादरे जात. ऑफिसमध्ये
जाणं अशक्यच होतं. घरात
राहावं तर पगार नसेल तर खायचे काय, असा प्रश्न होता. स्वत:च्या पायावर उभं राहायचं म्हणून बाहेर पडलो होतो; पण पुन्हा आई-वडिलांकडे गेलो. औषधं चालू होती आणि विश्रांतीही. आता प्रकृती सुधारत होती; पण कामाला लागावं एवढी स्थिती नव्हती अन् अचानक एके दिवशी पत्र आलं. पुण्याहून संस्थेचा लिफाफा होता. काय असेल त्यात याचा अंदाज मलाच काय घरातल्या सगळ्यांनाच येत होता. नव्यानं लागलेल्या नोकरीवर तीन आठवडे अनुपस्थिती हे कारवाईसाठी पुरेसं कारण होतं. पुरता हादरून गेलो होतो. थरथरत्या हातानं ते पत्र घेतलं. इतर माझ्याकडे पाहत
-- किशोर कुलकर्णी
पुणं हे शहर मराठी माणसाच्या दृष्टीनं औत्सुक्याचं शहर ठरलं आहे. माणूस मग तो पुण्याचा असो वा नागपूर-नाशिकचा, पुण्याबद्दल त्याचं स्वतचं असं ठाम मत असतं. तो नागपूरचा असेल, तर त्याला या गावाचा हेवा वाटतो. नाशिकचा असेल, तर पुण्याला स्थायिक व्हावं असं वाटत असतं. पुण्यातल्या माणसाला, मग तो मूळ पुण्याचा असो वा नसो अपार असं कौतुक असतं.
तर, त्या वेळी मी पुण्यातल्या राजा धनराज गिरजी शाळेमध्ये शिकत होतो. पाचवी किवा सहावी असेल, पण त्या वेळी वि. कृ. क्षोत्रिय नावाचे मुख्याध्यापक होते. मराठीत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, सुभाषितांचे संग्रह काढले, मुलांच्या मनावर संस्कार घडविले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आचार्य प्र. के. अत्रे यांनीही काम पाहिलं होतं. पुण्याच्या पूर्वभागातील ही शाळा त्या वेळी फारशी प्रख्यात नव्हती. गरिबांची शाळा असंही काही वेळा तिचं वर्णन केलं जायचं; पण शाळेसाठी देखणी इमारत होती, सुसज्ज प्रयोगशाळा होती, शरीराला व्यायाम व्हावा आणि मनाला ऊर्जा लाभावी, असं मैदानही होतं. त्या दिवशी शनिवार असावा. सकाळची शाळा होती. मी वर्गात प्रवेश करणार एवढ्यात उजवीकडे, भितीलगत काहीतरी चमकणारं दिसलं. वेग कमी झाला. मी थांबलो. पाहिले, तिथं एक घड्याळ पडलेलं होतं. उचललं आणि खिशात ठेवलं. घड्याळ ही मौल्यवान चीज आहे एवढं कळण्याजोगं वय होतं माझं. माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी घड्याळ घेतलं त्या वेळी त्या हॅन्री सॅन्डोजच्या घड्याळाला ९० रुपये लागले होते. हे घड्याळ तर भारी दिसत होतं. वर्गात बसलो; पण शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे लक्ष नव्हतं. अर्ध्या चड्डीच्या उजव्या खिशात त्या घड्याळाला मी सतत स्पर्श करीत होतो. या घड्याळाचं काय करावं, हा प्रश्न मला अस्वस्थ करीत होता. तोपर्यंच्या बालसुलभ आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा काही माझा स्थायिभाव नव्हता. शिवाय मोहही खूप होते. शाळेबाहेर बसणारा हिदुस्थानी काजूवाला (शेंगदाणे) चिक्कीवाला, शिवाय चुंबकीय खेळण्याचं नवं विश्वही मला कळलेलं होतं. काय करावं? काय करू शकू? प्रश्नांची मालिका मनात फेर धरीत असतानाच बेल झाली अन् मधली सुटी झाली. माझी तंद्री भंग पावली. मी उठलो, वर्गाबाहेर आलो. शेजारीच मुख्याध्यापकांची खोली होती. पाहिलं अन् सरळ आत घुसलो. श्रोत्रिय सर बसले होते. त्यांच्यासमोर ते घड्याळ ठेवलं. म्हटलं, ‘सकाळी हे घड्याळ सापडलं. माझा तास सुरू होता म्हणून जवळच ठेवलं, हे घ्या. ज्याचं असेल त्याला मिळायला हवं.’ मी हे बोललो. काही खरं होतं, काही खोटं... पण मी घड्याळ परत केलं होतं. का, हे मला आजही सांगता येणार नाही. कदाचित घड्याळासारखी वस्तू विकण्याची, पचविण्याची माझी क्षमता नसावी. सरांनी ते घड्याळ पाहिलं. शाब्बास म्हणाले अन् मी परत वर्गात आलो. आपण जे केलं ते योग्य की अयोग्य याचा वेध घेता येत नव्हता. स्वाभावाकिपणे कोणाला काहीच सांगितलं नाही. कदाचित इतर मुलं वेड्यात काढतील अशी भीतीही असावी. त्यानंतर आठवडाभरानं म्हणजे दुसर्या शनिवारी प्रार्थनेसाठी सर्व वर्ग एकत्र आलेले असताना प्रार्थनेनंतर सरांनी मला पुढे बोलावलं. सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. झालेली घटना सांगितली आणि अशी प्रामाणिक मुलं ही या शाळेचं नाव मोठं करतात, असं काहीतरी सांगितलं. हजार विद्यार्थ्यांच्या समोर आज मी प्रामाणिक विद्यार्थी झालो होतो. शाळेच्या अभिमानाचा विषय झालो होतो. ज्याचं घड्याळ होतं त्यानं मला देण्यासाठी एक पेन दिलं होतं. माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. मी काही केलं नसताना मिळालेला! दोन दिवसांनी घरी पत्र आलं. मी मावशीकडे राहत असे. शाळेचं पत्र पाहून घरचे चकावले; पण पत्र वाचून त्यांनाही आनंद झाला. एका पोस्टकार्डवर श्रोत्रिय सरांनी माझ्या प्रामाणिकपणाला दाद दिली होती. आता घरातही मी प्रामाणिक ठरलो होतो. घरसामान आणताना दोन-पाच पैशाची हेराफेरी करणारा मी प्रमाणित प्रामाणिक ठरलो होतो. त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मला खास प्रमाणपत्र देण्यात आलं. ‘तू प्रामाणिक आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ असं ते प्रमाणपत्र सांगत होतं. जे माझं नव्हतं, जे मला मिळालं, ते मी परत केलं या एवढ्याशा बाबीवरून मी शाळेतला एक विशेष विद्यार्थी झालो होतो. खरोखर मी प्रामाणिक होतो का? मला तरी ठामपणे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता येत नाही. घड्याळाऐवजी पाच-दहा रुपये सापडले असते तर? तर कदाचित माझा प्रामाणिकपणा कधीच पुढे आला नसताही! पण एक मात्र खरं, या घटनेनंतर ज्या ज्या वेळी मोहाचे क्षण आले, त्या त्या वेळी जे आपलं नाही, जे दुसर्याचं आहे; ते आपल्याला नको, हाच आवाज मनानं दिला. मला ती शाबासकी, ते पेन, ते प्रमाणपत्र याचा कधी विसर पडू दिला नाही. मी मुळतः प्रामाणिक होतो की नाही मला माहीत नाही; पण वि. कृ. श्रोत्रिय सरांनी तू प्रामाणिक आहेस, असाच संस्कार केला. तो कायम राहिला हा त्यांच्या विश्वासाचा परिणाम असावा.
-- किशोर कुलकर्णी
मला जे प्रिय ते देवाला अर्पण होऊ लागले. माणूस स्वार्थी झाला आणि आपल्याला सर्वाधिक प्रिय आपणच आहोत ही भावनाही लोप पावली. आनंदाचा धनी मी आणि दुःखाचे प्राक्तन दुसऱयाचे यात अस्वाभाविक काही आहे, असे वाटेनासे झाले. माझ्याऐवजी कोंबडा, बोकड एवढेच काय दुसर्या माणसाचा बळी देण्याएवढा माणूस स्वतला सक्षम मानू लागला, स्वतच्या अंतरात्म्याला गाडून टाकले, की इतरांची काय पत्रास? हा निसर्ग, ही वृक्षवल्ली, हे प्राणी-पक्षी माझाच अंश आहेत, ही भावना लोपली आणि मग परमेश्वर हा धाक दाखविण्याचाही एक मार्ग होऊन गेला. शनिच्या डोक्यावर थोडे तेल ओतले, की आपली इतिकर्तव्यता संपली, असे मानण्यात धन्य होता येते, हा अनुभव माणसाला येऊ लागला. कुठे तेलाच्या नद्या, तर कुठे कोंबड्यांचा पिसांचा उकिरडा, कुठे बोकड, तर कुठे मनुष्यबळी-माणसाच्या विद्वेशाच्या अभिव्यक्ती सर्वत्र साकारू लागल्या. त्याला संस्कृती म्हटले जाऊ लागले. त्याला धार्मिक आधार मिळू लागला. काहीवेळा भीतीने, तर काहीवेळा धर्माच्या धाकाने माणूस आपल्यातल्या परमेश्वराला जिवंतपणी ठार करू लागला. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, खरेतर खूप भीषण, माणसाच्या मनाचा थरकाप उडविणारी; पण वास्तव मांढरदेवीच्या नवसपूर्ती यात्रेत शेकडोंचा बळी गेला. बोकड, कोंबड्या नव्हेत, तर बाया-बापड्यांचा, लहान पोरांचा, थोर-वृद्धांचा आणि कमावत्या शरीराच्या तरुणांचाही. माणसाने माणसाला तुडवले. ठार मारले. त्यात माझे, आपले कोणाला दिसले नाही. प्रत्येकाला स्वतच्या पलीकडे काही पाहता आले नाही. पाहिले ते देव होते, स्वत जिवंत राहण्यासाठीचे आधार होते, त्यात मुले होती, बायका होत्या; पण मला मी जगणे आवश्यक वाटले. त्यांना तुडवत माझ्यातल्या `मी'ने जिवंत राहण्याचा आनंदसोहळा साजरा केला. एवढ्यावरच भागले तर तो माणूस कसला? त्याने मृतदेहावरच्या चीजवस्तू लुबाडल्या. आपल्याच आया-बहिणींच्या अंगावरच्या साड्या ओढताना त्याने आपल्यातल्या दुःशासनाला तृप्त केले. तिथे कृष्ण कोणी अवतरला नाही. कारण तशी आर्त हाकच त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. मांढरदेवीचे रूपच असे होते, की तिला आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकायची होती. त्यांना कौल द्यायचा होता. भक्तांची मागणी हीच होती, ``माझ्या शत्रूचा नायनाट कर'', ``त्याचे तळपट होऊ देत'' एक भक्त दुसऱयाबद्दल हीच कामना करीत असेल, तर त्याच्या देवाने काय करावे. त्यालाही कंटाळा आला असावा, या मत्सराचा, द्वेषाचा, त्यालाही खऱया प्रेमाची तहान लागली असावी. देवाने मग माझा-तुझा न पाहता सर्वांना `तथास्तू' म्हटले. मांढरदेवीचे पठार लाल होऊन गेले.
-- किशोर कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti