(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सफाई कामगार

    भाजपच्या राजकीय दक्षिण मंथनाची दिशा काय, अशा स्वरूपाचं काही लिहायचं म्हणून टिपण तयार होतं… ते लिहावं म्हणून मी

    पेन उचलला. लिहू लागलो. तासभराच्या लेखनानंतर थांबलो तेव्हा लक्षात आलं मी भाजपवर काही लिहिलेलं नव्हतं, होती ती

    हॉटेलमध्ये साफसफाई करणार्‍या त्या महिलेची कथा… यशाचा, बळाचा, विकासाचा, विश्वासाचा मार्ग दाखविणारी कथा!

  • पावती

    त्या वेळी मी पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रासाठी काम करीत होतो. अर्थात, माझ्या कामाची जागा पुणे नव्हे, तर कोल्हापूर होती. या शहरात या दैनिकाची नवी आवृत्ती सुरू झाली होती. ती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, यशस्वी व्हावी, असं मला वाटणं स्वाभाविक होतं. या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्यात तर संस्थेचा असा मी एकमेव प्रतिनिधी होतो. त्यामुळं आपलं काम केवळ बातमीशी संबंधित आहे, असं वाटलं नव्हतं. तसं वाटावं असं संस्थेतही वातावरण नव्हतं. एकूण माझं कोल्हापुरात व्यवस्थित चालू होतं. याच काळात निपाणी इथं शेतकरीनेते शरद जोशी यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मी आंदोलनाच्या वृत्तसंकलनासाठी रोज निपाणीला जाऊ लागलो. सकाळी निपाणीला जायला निघावं अन् सायंकाळपर्यंत परत यावं, असा तो शिरस्ता होता. निपाणी शहराच्या अलीकडेच शेकडो बैलगाड्या रस्त्यात उभ्या करण्यात आलेल्या असायच्या. बैल विश्रांती घेत, तर आंदोलनकर्ते रस्ता पूर्ण बंद कसा राहील, याच्या विवंचनेत असायचे. दुचाकीसुद्धा या बंदोबस्तातून बाहेर पडणं कठीण झालं. कोल्हापूर-बेळगाव मार्गावरचे अनेक व्यवहार बंद पडायची वेळ आली. काही आडमार्ग, काही लांबचे मार्ग शोधण्याचाही प्रयत्न झाला; पण अशा ठिकाणीही अचानक ‘रस्ता बंद’ आंदोलन केलं जायचं. या आंदोलनाचा जो परिणाम व्यावसायिकांवर व्हायचा, तसाच तो वृत्तपत्रांवरही होत होता.

    निपाणीला तीस-पस्तीस हजारांचा जमाव असतानाही तिथं वृत्तपत्र येऊ शकत नव्हतं. आंदोलनाच्या प्रारंभीच माझ्या दैनिकानं या आंदोलनाच्या सविस्तर बातम्या दिल्या होत्या; पण आंदोलकांपर्यंत त्यातलं काही पोहोचत नव्हतं. बातमी द्यायची; पण ती आवश्यक त्या वाचकापर्यंत जात नाही, याची खंत वाढत होती. काही तरी करायला हवं होतं. बातमीसाठी मी रोज येतच होतो. निपाणीच्या एजंटनं एक माणूस रोज माझ्याकडे पाठवायचा आणि मी कोल्हापूरहून अंक घेऊन यायचं, असा तोडगा त्यावर काढला. शरद जोशींनाही त्याची कल्पना दिली. आपण दिलेली बातमी संबंधित माणूस वाचतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो, हा मोठ्या आनंदाचा भाग असतो. तो आनंद मिळवायला पत्रकारच व्हायला हवं; पण हा आनंद मी घेऊ लागलो. माझ्या स्कूटरला रोज दोन-तीनशे अंकांचा गठ्ठा बांधायचा आणि तो निपाणीला एजंटकडे द्यायचा, असं सत्र सुरू झालं. आपण संस्थेसाठी वेगळं काहीतरी करीत आहोत, असं काही वेळा वाटायचं, तर काही वेळा हे तर माझं कर्तव्यच आहे, असं वाटायचं. काही वेळा या आनंदाची तुलना कराविशीही वाटत नसे. माझं काम वाढलं होतं; पण त्याचं काही वाटत नव्हतं. रोजच्या रोज अंकाचा हिशेब व्यवस्थापकाला दिला जायचा. एक दिवस असा आला की, या यंत्रणेत काही बिघाड झाला. मी दोनशे अंक घेऊन आलो; पण ते घ्यायला कोणी फिरकलं नाही. आता काय करायचं? दुपारचे बारा वाजत आले होते. एका कार्यकर्त्यास बसवलं अंक विकायला. त्यानं ते काम केलंही; पण त्याला काही सर्व अंक विकता आले नाहीत. १००-१२५ अंक उरले असावेत. सायंकाळी चार वाजता मी कोल्हापूरला जाण्यासाठी परतत असे. आता या अंकांचं ओझं घेऊन परत जायचं? विचार केला, ज्यांच्यासाठी हे अंक आणले होते त्यांनाच वाटून टाकले तर? नाहीतरी आता चार वाजता त्याला कोण घेणार आहे? विचार पक्का झाला अन् त्याच कार्यकर्त्याला सांगितलं अंक वाटून टाक. मी कोल्हापूरला निघे पर्यंत अंक वाटले गेले होते. इतकच नव्हे, तर वाचनासाठी जागोजागी गटही पडले होते. खूप बरं वाटलं. मी कोल्हापूरला निघालो. ऑफिसमध्ये आलो. अंकाचा हिशेब दिला. १२० अंकांची रक्कम नव्हती. मी म्हटलं, एजंटला जसा तुम्ही क्रेडिट मेमो देता तसा द्या; पण इथं प्रश्न आला होता, मी एजंट नव्हतो अन् अंक एजंटला न देता मी तो विकला होता. एवढच नव्हे, तर वाटलाही होता. सकाळी काय ते पाहू, असं ठरलं आणि सकाळी जे झालं ते मला त्या वेळी तरी धक्का देणारच होतं. व्यवस्थापकांनी सांगितलं, ‘‘१२० अंकांचे पैसे भरा; अन्यथा तुमच्या वेतनातून ते कापून घेण्यात येतील.’’ गेले काही दिवस मी करीत असलेलं काम, निष्ठा, अंक वाटण्यामागची भावना, यांना असलेलं मूल्य शून्य तरी होतं किवा ते अमूल्य तरी होतं. ज्या काळामध्ये पत्रकाराला आपलं वेतन सांगायचीही लाज वाटायची, त्या काळात त्या १२० अंकांची रक्कम भरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी पैसे भरले. त्याची पावती माझ्या नावावर घेतली. तो दिवस माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा, निराश करणारा होता. आज जेव्हा मी माझ्या पत्रकारितेतल्या कामाचं दप्तर काढून बसतो तेव्हा त्या पावतीचं पाकीट मला खुणावतं. आज त्यानं मला अस्वस्थता नाही येत. मी त्या काळातही ती रक्कम भरल्याचा अभिमान वाटतो. कोणत्याही प्रमाणपत्रापेक्षा ती पावती मला माझ्या वाचकांबरोबरच्या नात्याची आठवण देते. ते नातं अधिकच दृढ होत जातं.

    -- किशोर कुलकर्णी

  • आंबा

    त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं जपणारी ही माणसं. जपानच्या या दौर्‍यात घरचं जेवण मिळायला हवं असं वाटत होतं अन् त्यासाठी आम्ही गळ घालीत होतो ती आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मुलीला. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर ती आम्हाला निमंत्रित करायला राजी झाली. तिचं घरही छोटसंच होतं. दोन खोल्या, बाल्कनी आणि स्वच्छतागृह. घरात येतानाच तिनं प्रत्येकाला सपाता दिल्या. घरात वापरण्यासाठी. प्रत्येक घरात असतातच त्या. घराच्या सजावटीत एक निसर्गचित्र असं लावलं होतं, की घरालाच एखाद्या बगिचाचं स्वरूप यावं. तिनं आमच्यासाठी `सुशी' केली होती. सुशी हा जपानमधला खास लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मासे कच्च्या स्वरूपात खायचे असतात, हे सारं आता आठवावं, याला कारणही तसंच आहे. कालच एक बातमी वाचली... आता भारतीय आंबा जपानला निर्यात होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय आंब्यांच्या उत्पादन पद्धतीपासून घटक नियंत्रणापर्यंतची तपासणी केल्यानंतर या हंगामात काही प्रमाणात आंबे जपानला जाऊ शकतील, अशी ती बातमी होती. तर, त्या वेळच्या आमच्या जेवणाच्या टेबलावर सुशी होत्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार होते आणि एक मद्याची बाटली. सहज पाहायची म्हणून ती बाटली पाहिली. `इंडियन हनी' असा ठळक उल्लेख त्यावर होता. स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली ती भारतीय पदार्थांवर. जपानच्या छोट्या-मोठ्या उत्पादनावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर. सहजी विषय निघाला आंब्याचा. मी म्हटलं,`तू हापूसचा आंबा खाल्लायस?' उत्तर नकारार्थीच होतं. आंबा हा काही वर्णन करून सांगायचा प्रकार नाही. तो अनुभवायचा असतो. त्याचा स्वाद सांगायचा नसतो, घ्यायचा असतो. आंबा खाल्ल्यानंतर हाताला दरवळणारा गंध साठवायचा असतो; पण त्या दिवशी आंबा हा आस्वादाचा नव्हे, तर गप्पांचा विषय होता. त्या वेळी लक्षात आलं, की बोलण्यासारखं खूप आहे, आंब्याबद्दल. जगात फळांचा राजा म्हणून त्याचं असलेलं निर्विवाद स्थान आम्हाला आंब्याविषयी बोलताना अभिमानाचा विषय वाटत होता. आमच्या चौघामध्ये मी मराठी, तर मालविका संघवी ही मुंबईत राहिलेली पत्रकार होती. आमच्या या गप्पात आमच्या यजमानबाईच्या मनात आंब्याविषयी कौतुकमिश्रित उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कारण आता आंब्याविषयीचे प्रश्न पलीकडून येत होते. आंबा न खाताही आणि सुशी खाऊन दात आणि दाढांची कसोटी लागलेली असतानाही आम्ही तो आस्वाद घेतला होता. ज्या वेळी समारोपाचं बोलणं सुरू झालं तेव्हा आमच्यापैकी एक जण म्हणाला, `तुझा पत्ता आहे माझ्याकडे. भारतात गेल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी काही पाठवून देऊ. म्हणजे आंबा आणि त्यातही हापूसचा आंबा काय असतो, ते कळेल.' आता यजमानबाई पुढे आल्या. धन्यवाद म्हणाल्या; पण तेवढ्यावरच थांबलं नाही. त्या म्हणाल्या, `कृपा करा आणि आंबा काही पाठवू नकात. मी त्याचा स्वीकार नाही करू शकणार.' काही तांत्रिक अडचण असेल तर दूर करता येईल, असं कोणी म्हणालं; पण त्यावर त्या म्हणाल्या, `तसं नाहीये. मीच नव्हे पण अनेकांनी हापूस आंब्याविषयी ऐकलं आहे. काहींनी भारतात तो खाल्लाही आहे; पण आम्ही तो भेट म्हणूनही नाकारतो. कारण तो जर इतका छान असेल तर त्याचा मोह नाही टाळता येणार. आणि एकदा आवड आणि मोह वाढला की भारतातून तो आयात करावा लागेल. आम्हाला तसं काही व्हावं, असं वाटत नाही.' आता अवाक् होण्याची वेळ आमच्यावर आली होती. जपानमधील एक महिला. सुशिक्षित महिला आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, त्याच्या हितसंबंधांचा इतक्या व्यक्तिगत पातळीवरही विचार करीत होती.

    जपानमधून परतताना पांडुरंग नावाच्या मराठी माणसाच्या मदतीनं मी जपानच्या बाजारात किरकोळ का होईना खरेदी केली होती. भारतात सहजी उपलब्ध असणाऱयाच त्या साऱया गोष्टी होत्या. त्या घेतानाही आपण एका अर्थानं जपानमधून या वस्तूंची आयात करतो आहोत, ही भावनाही मनात आलेली नव्हती. आज तर भारतीय बाजारपेठात अशी एकही वस्तू नसावी की जी भारतात मिळत नाही. तरीही भारतीय बाजारपेठेवर जपान नव्हे तर चिनी वस्तूंचं वर्चस्व दिसू शकतं. ती बातमी वाचली अन् विचार आला मनात आला... फळांचा हा राजा जपानवरही वर्चस्व मिळविणार... पण ती छोटी बाब कायम लक्षात राहिली. एखादा देश छोटा किंवा मोठा होतो तो त्या देशातल्या माणसांवर, त्यांच्या मनोवृत्तीवर, विचारपद्धतीवर... वाटलं, आपण कधी मोठे होणार?

    -- किशोर कुलकर्णी

  • माझ्या मनातले…

    ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.

  • खोटी नाणी

    कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागांना माझ्या भेटी होत. मराठवाडा हा भाग तर माझ्या विशेष जिव्हाळ्याचा. औंरगाबादेजवळ आमचं मूळ गाव, हे त्यामागचं कारण असावं. असाच एकदा औरंगाबादमार्गे पैठणला गेलो.

  • नामांतर

    ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक करणारी भाषणं होत होती. पत्रकारितेत तसा मी जुना झालो नव्हतो. भाषणांनी भारावून गेलो होतो. एका सदस्यानं सांगितलं, ``आपण इतिहास घडविला आहे; पण आज आपण सर्वांनी मराठवाड्यात जाण्याची गरज आहे. तेथील जनतेला शासनाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, भूमिका सांगण्याची गरज आहे.'' कौतुकाच्या भाषणात हे आवाहन, हा इशारा मागे पडला. त्याच दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं. मी पुण्यात येऊन माझ्या कामाला लागलो.
    त्यानंतर मराठवाड्यातून येणाऱया बातम्या पहात होतो. त्या भागात कमालीची अस्वस्थता होती. सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. दोन दिवसांतच त्याला उग्र रूप आलं आणि सारा मराठवाडाच पेटला आहे की काय, असं वातावरण निर्माण झालं. माझी अस्वस्थता वाढत होती. माझ्यातला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी थेट संपादकांना भेटलो. त्यांना म्हणालो, ``मला मराठवाड्यात जायचं आहे. रोज प्रत्यक्ष माहितीवर वृत्तांत पाठवीन.'' आजच्यासारखी त्या वेळी संवादसाधने विपुल नव्हती. फोन, तार, टेलेक्स असा तो जमाना होतो. संपादक म्हणून त्या वेळी श्री. ग. मुणगेकर होते. ते म्हणाले, ``तू जाऊ नयेस. ते धोक्याचं आहे. स्वतंत्र गाडी घेऊन जाणं अधिकच धोक्याचं आहे. स्थानिक पातळीवर आपले वार्ताहर आहेत, ते पाठवतील त्या बातम्या चांगल्या वापरा. वृत्तसंस्थांच्या बातम्या आहेतच.'' मी नाराज झालो; पण निराश नव्हे. मी म्हणालो, ``मला आठवडाभराची रजा द्या. मी बातम्या पाठवीन त्या वापरा. दुर्दैवानं काही घडलच, तर ती माझी जबाबदारी असेल. मी सुखरूप परत आलो, तर माझा दौरा अधिकृत समजा.'' माझ्या या प्रस्तावावर संपादक अधिक नाराज झाले. म्हणाले, ``तुम्ही तुमच्या जिवावर उदार झाला म्हणून काय झालं. माझ्याही काही जबाबदाऱया आहेत. तुम्हाला परवानगी देता येणार नाही.'' मी परतलो. त्या दिवशी रात्री झालेली घटना पत्नीला सांगितली. मी जावं, असंच तिलाही वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजले असतील. माझा एक सहकारी घरी आला होता. त्या वेळी घरात फोन नव्हता. तो म्हणाला, ``तुला मराठवाड्यात जायला संपादकांनी परवानगी दिलीय. तुझ्या सोयीनं तू जा. हा दौरा अधिकृत असेल.'' आनंद आणि उत्साह कशाला म्हणतात, त्याचा अनुभव घेतला मी अन् औरंगाबादकडे पहाटेच रवाना झालो. मजल-दरमजल करीत औरंगाबादेत पोहोचलो. परिस्थिती वाटत होती त्यापेक्षा गंभीर होती. महामार्गावर ठिकठिकाणी पूल कापण्यात आले होते. तारा बांधून रस्ता बंद करण्यात आला होता. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या. आंदोलनाचा वणवा वाढत होता. औरंगाबादेत माझी भेट झाली `टाईम्स'चे प्रतिनिधी पडियार यांच्याशी. आज ते हयात नाहीत; पण अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार. मला एकट्यानं नांदेडपर्यंत जाणं कठीण होतं. एसटी वाहतूक बंद होती. टॅक्सीही नव्हत्या. त्या वेळी औरंगाबादेत शहा नावाचे एक एजंट होते. त्यांची एक गाडी नांदेडकडे अंक नेण्याचा प्रयत्न करणार होती. त्यात मुंबईच्या मोठ्या दैनिकाचे म्हणून पडियार यांना नेण्याचं ठरलं होतं. मोठ्या हिकमतीनं पडियार यांना चिकटलो आणि आमचा दौरा सुरू झाला. घटना मोठी होती. टाईम्सनं स्वतंत्र फोटोग्राफरही दिला होता. टाईम्स या इंग्रजी दैनिकाची आणि आमच्या दैनिकाची स्पर्धा नाही, असं सांगत मी त्या छायाचित्रकाराकडून फोटो मिळण्याची व्यवस्था केली. त्या वेळी औरंगाबादेत नागनाथ फटाले नावाचे ज्येष्ठ पत्रकार काम पहात होते. आमच्यासाठीही ते बातम्या पाठवत. विशेष म्हणजे, एसटीच्या हमाल संघटनेचे ते अध्यक्ष होते. याचाच अर्थ, माझ्या अंकात फोटो प्रसिद्ध होण्यासाठी सायंकाळपर्यंत तरी ते औरंगाबदला पोहोचणे आवश्यक होते. पुढची जबाबदारी फटालेंची होती. काम सुरू झालं. वृत्तांत, मुलाखती, घटना, प्रतिक्रिया, असा रोजच्या रोज मजकूर जमा होत होता आणि फोन-तार या माध्यमातून जातही होता. टाईम्सचा फोटोग्राफर खऱया अर्थानं व्यावसायिक छायाचित्रकार होता. त्याचे फोटो उत्तम असत. ते मी पाठवीत होतो आणि आश्चर्य म्हणजे, माझ्या दैनिकात ते फोटो रोजच्या रोज ठळकपणे प्रसिद्ध होत असत. तेच फोटो टाईम्समध्ये दुसऱया दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध होत असत.
    वृत्तपत्रात मग ते कोणत्याही भाषेतलं असो, स्पर्धा ही असतेच. आजही आहे; पण त्या काळी अत्यल्प साधनसामग्रीत टाईम्सच्या आधी ठसठशीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा मान माझ्या वृत्तपत्राला मिळाला आणि समाधान मला मिळालं.
    मी जे काही केलं ते योग्य की अयोग्य, असा प्रश्न त्या वेळीही मला कोणी केला नाही. आज तो कोणी करील, अशी स्थिती नाही.
    म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!
    तसंच काहीसं हे असावं

    -- किशोर कुलकर्णी

  • सगळ्यांना पॅक करू!

    हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते.

  • शिकण्याचं वय!

    ही गोष्ट आहे भगवान रजनीश यांची. ओशो यांची. मानवाला प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या आध्यात्मिक गुरूंची. खरंतर
    त्यांचं विपुल साहित्य जगात सर्वत्र उपलब्ध आहे. त्यांच्या कॅसेट आणि व्हिडिओ, सीडीच्या माध्यमातून त्यांचं चालणं, बोलणं
    पाहता, ऐकता येतं. तरीही त्यांची ही गोष्ट पुन्हा एकदा सांगाविशी वाटतेय.
    ओशो एकदा समुद्र प्रवासाला निघाले होते. प्रवास मोठा होता आणि काही दिवस जहाजावरच राहायचे होते. वाचन, संवाद आणि
    डेकवरची भ्रमंती हा त्यांचा छंद किवा त्यावेळी वेळ घालविण्याचं साधन. डेकवरनं फिरत असताना अनेक देशांचे, विविध
    वयोगटांतील आणि भाषेची माणसं भेटायची. काहींशी बोलणं व्हायचं तर काही केवळ स्मितहास्यानंच संवाद साधायचे. डेकवरच
    एका बाजूला एक वृद्ध गृहस्थ एका टेबलाशी बसलेला असायचा. काहीवेळा त्याचं वाचन सुरू असायचं, तर काही वेळा तो लिहीत
    असायचा. त्याचं लिहिणं म्हणजे एका पुस्तकात पाहायचं अन् लिहायचं असं होतं. समाधी लागावी अशी त्याची ती स्थिती
    असायची. जवळपास कोणी आहे, नाही, आवाज येत आहेत या कशाचंही भान नसायचं त्याला. भगवान रजनीश तेव्हा एवढे
    सर्वदूर ख्यातकीर्त झालेले नव्हते. त्या वृद्धाशी बोलावं असं त्यांना वाटे; पण त्याची समाधी पाहून ते पुढे जात. एके दिवशी मात्र
    त्या वृद्धाशी संवाद साधायचाच असं त्यांनी ठरविलं. ते त्या वृद्धाकडे पाहातच आपली शतपावली करीत होते. त्याला त्रास होणार
    नाही, अशा अंतरावर थांबून त्याच्याकडे पाहात होते. अखेरीस एका क्षणी त्यानं मान वर केली अन् रजनीश म्हणाले, ‘‘माफ

    करा, पण मी इथं तुमच्यासमोर बसू शकतो का?’’ त्यानं मानेनंच होकार भरला. रजनीश बसले. आता संवाद

    साधायचा होता.

    भगवान

    म्हणाले, ‘‘मी काही दिवस झाले तुमच्याशी बोलू इच्छितोय. तुम्ही हे नेमकं काय करातय?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘मी

    चिनी भाषा शिकतोय.’’ चिनी भाषा शिकायला खूपच अवघड हे रजनीश जाणून होते. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला लिहिता येते?’’ तो
    वृद्ध म्हणाला, ‘‘ नाही, अजून नाही; पण आता मला कोणी बोललं तर ती कळते. काही शब्द मी बोलूही शकतोय; पण लिहिणं,
    शिकायला वेळ लागेल अन् भाषेवर प्रभूत्व मिळवायला त्याहूनही अधिक काळ लागेल.’’ ‘‘किती दिवस झालेत तुम्ही ही भाषा
    शिकायला लागून?’’ रजनीशांनी प्रश्न केला. ‘‘तीन वर्षे झालीत. आणखी वर्ष-दोन वर्षांत लिहायला शिकेन. मग आणखी दोन
    वर्षांत त्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचीन. मग मला खर्‍या अर्थाने चिनी भाषा अवगत होईल, असं वाटतं.’’ रजनीशांनी त्या
    वृद्धाकडे पाहिलं... पंचाहत्तरी तर नक्कीच पार केलेली असावी त्यानं अन् तो आणखी पाचेक वर्षांचं भाषा शिकण्याचं नियोजन
    करीत होता.
    रजनीशांना राहावलं नाही. त्यांनी विचारलं, ‘‘माफ करा; पण तुमचं वय काय असेल?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘ऐंशी!’’ भगवान
    आश्चर्यचकित झाले व म्हणाले,‘‘भाषा अवगत व्हायला आणखी पाच वर्षे लागणार. म्हणजे, जेव्हा तुम्ही या भाषेवर प्रभूत्व
    मिळवाल तेव्हा तुमचं वय पंच्याऐशी असेल.’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘हो, खरंय ते,’’ भगवान म्हणाले, ‘‘इतकी वर्षे शिकल्यानंतर
    त्या शिक्षणाचा वापर किती वर्षे करू शकाल असं तुम्हाला वाटतं?’’ आता तो वृद्ध सावरून बसला, म्हणाला, ‘‘बरोबर आहे तुमचा
    प्रश्न. मी किती वर्षे त्याचा वापर करू शकेन? तुम्ही विद्वान दिसता. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझा जन्म झाला तेव्हा मला
    कोणीही सांगितलं नव्हतं, की मी ऐंशी वर्षे जगणार आहे. आजही मला कोणी ठामपणे असं सांगत नाहीये, की मी पाचच वर्षे
    जगणार आहे. मी किती जगेन हे तुम्ही सांगा. मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन.’’ भगवान रजनीश म्हणाले, ‘‘मी तुम्हाला
    पाहात होतो. तुमच्याबद्दल खूप उत्सुकताही होती; पण एक वृद्ध माणूस म्हणून मी तुमच्याकडे पाहात होतो. आता मला कळलं,
    की तुम्ही वृद्ध नाही आहात. तुम्ही मॅच्युअर्ड यंग आहात!’’
    शिकण्याला वय नसतं आणि तारुण्याला वयाची तमा नसते, याची शिकवण ओशोंच्या या अनुभवावरून सहजी येते. स्वतः
    ओशोंनी हा अनुभव याच आशयासह लिहून ठेवलेला आहे. या विश्वामध्ये माणूस हा विद्यार्थी आहे अन् आयुष्य ही त्याची शाळा.
    अनुभव हे शिक्षण आणि अनुभवातून शिकत जाणं हेच उत्तीर्ण होणं अन्यथा एकाच इयत्तेत ठाण मांडून बसलेले अनेक आपण
    पाहातोच की! एका अनुभवानंतर त्याच त्या चुका करीत नशिबाला दोष देणारे आपण पाहतोच की! आयुष्याच्या शाळेत सतत
    नवनवीन धडे गिरविण्याची तुमची उर्मी कायम राहो आणि तुमचं वर्णनही कोणीतरी ‘मॅच्युअर्ड यंग’ अशा शब्दात करो, हीच
    सदिच्छा!

    -- किशोर कुलकर्णी

  • बहिणीची भेट

    मी आणि व्यवस्थापकीय विभागातला एक सहकारी असे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होतो. कोपरगाव, राहता, संगमनेर, श्रीरामपूर हा तर माझ्या खूपच परिचयाचा असा परिसर. या भागातून माझ्या लहानपणी अनेकवार फिरलो होतो. काही वर्षे कोपरगावात शिकलो होतो. मित्रांचा परिवारही या भागात होता. एका अर्थानं माझ्या दृष्टीनं हा माहेरचा दौरा होता. राहता येथे एक कार्यक्रम होता. तो आटोपायला अकरा वाजले. नंतर शिर्डीला जावं असं ठरलं. त्यावेळी साईबाबाचं दर्शन इतकं अवघड नव्हतं. दुपारी बाराच्या आरतीलासुद्धा सहज जाता यायचं. कोपरगाव ते शिर्डी असं सायकलनंही अनेकवेळा आलेलो होतो. बाबाचं दर्शन झालं. आता इथंच जेवणं अन् पुढे जाणं असा विचार सुरू होता. मी माझ्या सहकार्‍याला म्हटलं. इथनं अवघ्या दहा किलोमीटरवर माझ्या बहिणीचं शेत आहे. शेतावरच घर करून ती राहते. तिथं जाऊ आपण. घरचं जेवण होईल आणि बहिणीला भेटणंही होईल. या प्रस्तावावर वाद होण्याचा प्रश्न नव्हता. आमची गाडी बहिणीच्या वस्तीकडे निघाली. माझी बहीण, दोन वर्षांनी मोठी. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षे लग्न झालं तिचं. तिचे पती शेती करायचे. सगळं आयुष्य मातीतलंच. अचानक काही झालं आणि त्यात मेहुणे वारले. माझी बहीण एकटी पडली. पदरी मुलांचा गोतावळा; पण हिंमत नाही हरली ती. कोपरगावातलं घर बदलून ती इथं शेतात आली. आधी झोपडी बांधली आता दोन खोल्यांचं घर होतं. मुलांची शिक्षणं करायची. राबायला हात नाहीत; पण तिचा संघर्ष चालू होता. तिच्या कष्टाच्या आठवणी मनात दाटत असतानाच आमची गाडी तिच्या वस्तीजवळ पोहोचली होती. ऑफिसची मोठी-थोरली गाडी तिथं बांधाला उभी करून नांगरलेलं रान तुडवत आम्ही तिच्या घराकडे निघालो. ऊन रणरणत होतं. त्यावेळी शेतावर मोठी गाडी येणं हेही वेगळंच होतं. आसपासच्या लोकांचं लक्षही वेधलं जात होतं. आम्ही बहिणीच्या घराजवळ पोहोचलो. तेव्हा ती

    ी कोण आलंय? हे उत्सुकतेनं

    पाहात होती. तिनं ‘या’ म्हणून आत घेतलं. बसायला एक खाट होती. शेजारी चार-सहा धान्यांची पोती होती. तो काळ भारतातल्या जागतिकीकरणाचा प्रारंभीचा काळ होता. शेती हा दुर्लक्षित भाग होता अन् मनमोहनसिंग यांचा अर्थसंकल्प चर्चेचा, स्वागताचा विषय होता. आम्ही बसलो. पाणी प्यायलो. मी म्हटलं, ‘‘आम्ही जेवणार आहोत.’’ ती काय करायचं याची तयारी करायला लागली. मी आतल्या खोलीत तिच्यासोबत बसलो. प्रारंभीच खुशालीचं बोलणं झालं आणि अचानक चर्चेची गाडी राजकारणावर आली. राज्याच्या, देशाच्या धोरणावर आली. बहीण खेड्यात-वस्तीवर असली तरी तिचं वाचन, सामान्यज्ञान आणि बातम्यांची माहिती चांगली होती. चर्चेच्या ओघात ती पगारदारांवर घसरली. आर्थिक खुलेपणाचं कौतुक करताय; पण इथं पाहिलंय का शेतीत काय चाललंय? प्यायला पाणी नाही. पावसाचा भरवंसा नाही. खतांचे दर वाढलेले, मजूर मिळत नाही. शिक्षणाला तर पैसाचा मोजावा लागतो असं खूप काही ती बोलत होती.

    मी पगारदार म्हणून जरा मागे हटूनच बोलत होतो. बरोबर माझा सहकारी होता. तोही काहीसा बिचकला असावा, घरचे चारघास खावेत म्हणून आलो अन् इथं तर वादळंच उभं ठाकलंय, असं त्यालाही वाटलं असावं. तुमचं ठीक आहे. तुम्हाला महिन्याला पगार मिळतो. फिरायला गाड्या मिळतात. सभा-समारंभामध्ये भाषणं करायला मिळतात; पण पत्रकारांना तरी शेती-शेतकरी यांचा कैवार घ्यावासा वाटतोय का? त्यांना मुळात हिरवीगार शेती पाहायची सवय. दुष्काळ, महागाई, प्रवास हे त्यांना तरी कुठे माहितयं? तुम्ही संघटित, इथं शेतकर्‍यांना कोण संघटित करणार? आमचे इथले नेतेही असेच. एकदा निवडून दिलं, की ते मुंबईत आणि आम्ही इथं वावरात! आता सख्ख्या भावाचा पत्रकार म्हणून उपयोग नाही तो नेत्यांना कशाला दोष द्यायचा? तिचे मन मोकळं करणं सुरूच होतं. आम्ही मुकाटपणे जेवण करीत होतो. मी ग्रामीण भागातला, शेतीतलं मला कळतं. शेतकर्‍यांची दुःखं मलाच माहिती असं मी समजायचो. इतकेच नव्हे, तर पुण्यात माझ्या संस्थेतही मी शेतीतला जाणकार असावा, असा समज होता. आज तो भोपळा फुटत होता. फुटला होता. तिची दुःख, तिच्या यातना, तिचे प्रश्न, समस्या या केवळ तिच्याच राहिल्या नव्हत्या. त्या शेतकर्‍यांच्या म्हणून माझ्यावर आदळत होत्या. मी शहरी, नागरी आणि नोकरदारांचा प्रतिनिधी म्हणून तिचे ते हल्ले सहन करीत होतो.
    आमची जेवणं झाली. आम्ही निघालो. निरोप द्यायला ती गाडीपर्यंत आली. गाडीत बसताना मला उगाचच अपराध्यासारखं वाटत होतं. आमच्या परतीच्या प्रवासात फारशी चर्चा, गप्पा झाल्या नाहीत. कदाचित आम्ही दोघंही अंतर्मुख झालेलो असू. आपणही शेती करावी, असं माझं एक स्वप्न होतं; पण ते वास्तवात आलं नाही; पण आज ती शेतकरी आणि मी नोकरदार अशी विभागणी झाली होती. पाठची भावंडं आम्ही; पण हे अंतर निर्माण झालं होतं. आता माझ्या बहिणीची शेती चांगली आहे. मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीतले प्रयोग करीत आहेत. कलिगडाचे भारे गाडीवर लादून कोपरगावच्या बाजारात विकताना मी भाच्यांना पाहिलं होतं. आता बाजार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. परवाच तिचा फोन आला. म्हणाली, ‘‘यावेळी आंब्याला खूप मोहोर आहे. आंबे खायला ये.’’ मी कदाचित जाईनही; पण जेव्हा जेव्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी ऐकतो, वाचतो तेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण होते. एक शेतकरी आणि एक पांढरपेशा नोकरदार यांची भेट आठवते. आमच्या नात्यात त्यानं निर्माण केलंलं अंतर आठवतं आणि पुन्हा एकदा शेतीविषयक काही लिहिताना शब्द आक्रमक होतात. हे वाढलेलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू होतो; खरंच हे अंतर कमी होईल? कधी?

    -- किशोर कुलकर्णी

  • रोजा

    गुलबट छटा असलेली सुरेख फर, वेधक बोलके डोळे, स्वतच्या सौंदर्याची जाणीव असलेल्या तरुणीसारखी चाल, कोणीही मला पाहिले, तर पुन्हा मान वळवून पाहावेच लागेल, असा कमालीचा विश्वास बाळगणारे हे व्यक्तिमत्त्व. रोजा. पामोरियन स्पीट्स जातीची कुत्री. अवघ्या तीन महिन्यांची असताना माझ्याकडे आली अन् घरातील एक महत्त्वपूर्ण घटक बनली. मी, पत्नी रेखा, मुलगा पराग या त्रिकोणी कुटुंबात रोजा आल्यामुळे चौकोन झाला. रोज घरातून बाहेर पडताना आणि आल्यावर तिला भेटणे, तिच्याशी खेळणे हा महत्त्वाचा रिवाज झाला. तिचे वय वाढू लागले तसा तिच्या जोडीदाराचाही शोध घ्यावा लागला. तिचे पहिले बाळंतपण डॉक्टरांनी दारात उभे राहून, तर मी तिला थेट आधार देऊन केले. छान पाच पिले दिली तिने. त्यांच्या आगमनानंतर तर दोन महिने आमचे घर गोकुळ बनले होते. वाटीवर चमचा वाजविला की पाचही पिल्लं धावत यायची. दूध प्यायची. रोजा तर स्वतचे आणि पिल्लांचेही आवर्जून करवून घ्यायची. आता ही पिले मोठी झाली असणार, नव्हे त्यांच्या काही पिढ्या झाल्या असाव्यात. माझ्या मित्राकडे त्याचेही बरे चाललेले असणार. रोजा आई झाली याचा आनंद तिच्यापेक्षाही कांकणभर आम्हालाच होता. त्यामुळे तिचा लाड वाढतच होता. आमच्या बिछान्यावर झोपण्यापासून तिला सांगून गेले नाही तर रुसून बसण्यापर्यंत तिची मजल गेली होती. घरात कोणी नसेल, तर हिच्या गप्पा चालत रोजाशी अन् तीही
    छान ऐके. तर अशी ही आमची रोजा. लाडकी रोजा. आज तिचीच गोष्ट सांगायची म्हणून एवढी प्रस्तावना.

    तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे

    नाही; पण आता तिला मोकळे

    सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
    यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा

    जाऊ? मी म्हटले, एकदा ठरवले ना? मग तो हिला म्हणाला, आई जाऊ? ती म्हणाली, कसे करतोस? रेखाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. मीही माझा निर्धार सोडायला उत्सुक होतो नि पराग तर ते काम केवळ उरावर दगड ठेवूनच करणार होता. सध्या राहू देत असे म्हणून पाटीतील पिले घरात आली. ``रोज म्हणत होती, मला माहीत होते, तू हे करू शकणार नाहीस म्हणून.'' तिने तिघांजवळ येऊन कृतज्ञता व्यक्त केली. बहुधा क्षमाही मागितली. नव्या उमेदीने आम्ही पिलांशी खेळू लागलो. त्यांचे फोटो काढू लागलो. कौतुक करू लागलो. माझे घर पुन्हा गोकुळ झाले. माझ्या, हिच्या अन् परागच्या मनात निर्माण झालेल्या राक्षसाची जागा माणसाने घेतली. मला माहीत आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक राक्षस आहे अन् देवही. काय जागवायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न.

    -- किशोर कुलकर्णी