(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

The Articles are displayed in the order of publishing date. Latest first.
Latest Modified: These articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
This is random sort
  • पहिलीपासूनचे सोबती

    माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला..

  • अजब न्याय नियतीचा – भाग २८

    आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अ‍ॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले.  सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.

  • मी आणि परी

    गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.

    आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).

    गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.

    कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.

  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

    भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या.

  • बारक्या

    आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!

  • जग हे अनेक पायांवर चालते (कथा)

    साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….

  • बगळा’ या कादंबरीचा वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद

    “बगळा” या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरीचा ज्येष्ठ साहित्यिक चरित्रकार वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद

  • ८ वी ड – भाग ५

    मुले खोटे का बोलतात? कधी बोलायला शिकतात, लागतात? ह्याचा खरेच कोणी विचार केला आहे का?

  • मला न पटलेली कथा

    अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटतात. त्या फक्त ऐकावयाच्या, बघावयाच्या, असतात. शक्यतो त्याचे रसग्रहण वा तात्पर्य करण्याचा कुणी विचार करु नये.

    तरी देखील कांही कथा ऐकताना, प्रसंगाची उकलन करताना, बघताना, मन विचलीत होते. सर्व कथा संग्रह थोर ऋषीमुनी, धर्मपंडीत, विद्वान, यांच्या विचार ज्ञानातून बाहेर आलेला. त्यामुळे त्याला आपल्या सारख्या सामान्यजनानी मान्यता देणे भागच पडते. रामायण कथा मधल्या अनेक कथा ऐकल्या. महान थोर गौतम ऋषीपत्नी आहिल्येची कथा समोर आली. थोडक्यांत जे सार वर्णन केले गेले ते असे. गौतम ऋषी पत्नी पतीवृता साधवी आहिल्यासह आश्रमांत रहात होते. देवलोकीचा राजा इंद्र ह्याची वक्रदृष्टी आहिलेवर पडली. त्याने चंद्राची मदत घेऊन दुष्टपणा करुन आहिल्येला फसविले. तिचा उपभोग घेतला. ऋषीना हे कळताच त्यानी दोघाना शाप दिला. आहिल्या शिळा होऊन पडली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती कालांतरानंतर पावन झाली. कथानक सर्वसाधारणपणे असेच घडू शकते. अनेक प्रसंगात अशा गोष्टी झालेल्या आज तागायत दिसतात. त्यांत वेगळेपणा फारसा नाही. एक बाब मात्र माझ्या वैयक्तीक मनाला खटकली. कथानकांत देवराजा इंद्र याला गोवण्याचा प्रयत्न केला. स्वर्ग मृत्यु पाताळ ही आपली संकल्पना. स्वर्ग हा देवलोक. सर्व ३३ कोटी देवांचे अस्तित्व समजले गेलेले असे विश्व. आम्ही सर्व मृत्युलोकातील मानव. आपणास निसर्गानेविचार विवेक आणि समज ह्याचे वरदान दिलेले आहे. ह्याच्याच क्षमतेने आम्ही सर्व सृष्टीचे विश्वाचे मुल्यमापन करीत असतो. निसर्ग आहे तसाच असतो. प्रत्येक मानव आपल्या क्षमतेनुसार ज्ञान विचारानुसार त्याचे विश्लेशन करतो. ह्यातच निर्माण झाले ते काव्य, ग्रंथ संपदा, ज्ञान सागर. व्यक्ति तितक्या प्रकृती, तितके विचार ह्या सत्य धबधब्यातून अनेक विवीध प्रवाहाचे उगम झाले.

    मानवाने देव योनीला सन्मानाचे स्थान दिले. आदर दिला. श्रेष्ठत्व दिले. कारण त्यांच्यामध्ये होती भव्यता, दिव्यता. एक वेगळीच उर्जा शक्ती, निर्मीती व संहार करण्याची क्षमता. ज्याचा विचार मानव करु शकत नाही. ते कार्य करण्याची योग्यता त्याना प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाना भजतो, पुजा करतो, त्यांचे गोडवे गातो. ते याचसाठी की त्याची आमच्यावर कृपा द्दष्टी व्हावी. आमच्या संसाराचा गाडा व्यवस्थीत चालावा.

    देव योनी मधील देवतानी मानवाला नेहमी सहाय्य केलेले आहे. संकटाचे निवारण केले आहे. संकट आणली वा कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही. म्हणूनच सर्व ३३ कोटी देवता आम्हास आदरणीय आहेत. इंद्र तर ह्या सर्व देवांचा राजा समजला गेला आहे. तो पर्जन्याचा, पाण्याचा अर्थांत सर्व जीवांचा आधिष्ठाता मानला जातो. म्हणूनच सर्व मानव प्राणी त्याला महान आदर देत त्याच्या कृपेसाठी पूजन करतात.

    अशा महान आदरणीय देवांने पृथ्वीवर येऊन, आपला देव योनीतील अस्थित्व विसरुन, त्यांच्यापेक्षा अत्यंत भिन्न अशा मानव योनीतल एका स्त्रीशी प्रेमचाळे करणे, हे मनास मुळीच पटणारे नाही. हे केंव्हाही शक्य होऊ शकत नाही. कदाचित् येथे १ अहिल्लेचे महात्म दाखविण्याचा विचार असावा, २ इंद्राचे अवमुल्ल्यन करण्याचा उद्देश असावा, ३ श्री. रामचंद्रांचे देवत्व उजळण्याचा प्रकार असावा, अथवा इतर कोणते तरी.

    तसेच कित्येक पुराणातील कथा, सत्यता ह्याच्या कल्पनेत टिकत नाहीत असे केंव्हा केंव्हा वाटते. विद्वान व ज्ञानी लोकांनी ह्यावर अभ्यास करुन ह्या कथामध्ये जो विक्षीप्त वाटणारा प्रसंग असेल तो काढून त्या कथांची गोडी कायम ठेवीत दुरुस्त्या सुचवाव्यात. जे चालत आले तसेच चालू द्या. आपण त्यांत बदल करणारे कोण ही भूमिका नसावी. काळ बदलत आहे, जग बदलत आहे, तसाच कथानकामध्ये मनास न पटणारा भाग काढून टाकल्यास सर्व सामान्याना आनंदच वाटेल. मात्र ते करताना अधुनिकतेतील वेगळी विक्षीपता नसावी. ही सद् इच्छा.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संतापातला शांतपणा

    एकदा मी `जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय?' या विषयावर बोलत होतो. अध्यात्म हे वाचण्यासाठी, सांगण्यासाठी, शिकण्यासाठी नव्हे, तर रोजच्या आचरणासाठी आहे. जीवनमुक्त अवस्थेत माणूस त्याचा नित्यक्रम, कामे, व्यवसाय करू शकतोच असं नव्हे, तर तो अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, असं माझ्या भाषणाचं सूत्र होतं. भाषण झालं. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला अन् प्रश्नांची सरबत्तीही! जीवनमुक्त अवस्था ही काहीतरी काल्पनिक बाब असावी. तुम्हाला कधी कोणाचा राग येत नाही का? माणसाला रागच आला नाही, तर त्याची प्रगतीच थांबणार नाही का? अशा आशयाचा एक प्रश्न आला. खरंतर राग येणं यात अस्वाभाविक काहीच नाही. तो कसा येतो, तो का आला? या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं. माणसाच्या जीवनात मान-सन्मान आणि अपमान या शब्दांपासून आणि त्याच्या अर्थाच्या प्रचितीपासून कोणी अलिप्त राहिला असेल असं संभवत नाही. कोणीही आपलं कौतुक केलं, सन्मान केला तर त्यानं जगण्याची उभारी येते. आपल्याला, आपल्या कामाला दाद देणारं कोणीतरी आहे, ही भावनाच खूप महत्त्वाची असते. `आजची भाजी छान झाली आहे हं' हे पसंतीचं वाक्य आपल्या बायको, सून, बहीण किंवा आईपुढं म्हणा अन् पाहा काय चमत्कार होतो. आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणावं, आपण नेहमीच यशस्वी व्हावं ही माणसाची स्वाभाविक भावना. ती माणसाला सुखावते, काही वेळा त्या व्यक्तीमधल्या अहंकारालाही सुखावते अन् क्वचितप्रसंगी ती अहंकाराला आमंत्रणही देते. चांगली भाजी करण्यातलं किंवा होण्यातलं श्रेय केवळ आपलंच आहे असं वाटू लागतं. अपेक्षाही वाढतात. मग कधी कौतुकाचा शब्द आला नाही तर दुःख होतं, वेदना होतात. कोणी जर आपलं कौतुक केलं नाही म्हणून वेदना होत असतील तर कोणी आपला अपमान केला तर काय होईल? राग ही त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. काही वेळा तो व्यक्त करता येतो, तर बर्‍याच वेळा तो गिळावा लागतो.

    अपमान मग असाच मनाच्या अंतरंगात साठविला जातो. ती व्यक्ती, तशी घटना किंवा प्रसंग पुढे आला, तरी आपण अस्वस्थ होतो. आपल्या झालेल्या अपमानाचं मूळ कशात आहे हे शोधण्याऐवजी, `माझी कोणाला किंमत नाही.' किंवा `त्याला काय वाटतं, अक्कल काय त्याला एकट्यालाच आहे का?' अशा शेलक्या शेऱयांनी आपण आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. इतरांना दोष देणं, परिस्थितीवर खापर फोडणं हेही मार्ग मग सहज स्वीकारले जातात. नेमकं कारण बाजूला पडतं. मनाच्या गाभाऱयातील अस्वस्थता अन्य कोणत्याही कामामध्ये जीव ओतू देत नाही आणि मग पुन्हा येतो तो अपमानाचाच प्रसंग. असा राग मग व्यक्त होतो आणि होतही नाही; पण तो सातत्यानं तुमचा ताबा घेतो. तुमचा आत्मविश्वास कमी होतो, जनजीवनात वावरणं कमी होतं, अलिप्तपणा आवडायला लागतो. बोलणं कमी होतं. अपमानाच्या परिस्थितीचा विचार न करता त्या क्षणाचा प्रदीर्घ परिणाम जीवनावर होत जातो. हा परिणाम टाळणं, त्या परिस्थितीला, त्या अपमानाला सामोरं जाणं, त्याच्या कारणांचा शोध घेणं हा वास्तव उपाय होय. तो रागात विरून जातो. राग, संताप ही काही केवळ नकारात्मक परिणामाचीच प्रक्रिया आहे असं नव्हे. जेव्हा स्वाभिमान डिवचला जातो त्या वेळी त्याचं स्वत्वही जागं होतं. माझा एक संपादक मित्र आहे. मेहनती अन् हुशार. त्याच्या उमेदीच्या काळात त्याला त्याची लायकी दाखवून देण्याचा प्रयत्न त्यावेळच्या एका ज्येष्ठ नेत्यानं केला. माझ्या मित्राला राग आला, पण तो त्यानं खचला नाही. त्यानं मुळातनं आपली पात्रता पाहिली. उणिवा जाणून घेतल्या आणि अवघ्या 10 वर्षांच्या अवधीत त्या ज्येष्ठ नेत्याच्या बरोबर जाहीर समारंभामध्ये त्यानं आपली क्षमता अप्रत्यक्ष सिद्ध केली. पत्रकारितेच्या प्रारंभी `ण'च्या जागी `न' करणारा मी अपमानित झालो होतो; पण आज ज्यांनी माझा अपमान केला त्यांनाही हा आता गावरान राहिलेला नाही, याची जाणीव झालेली होती. राग किंवा संताप या अभिव्यक्तीचे हे दोन परिणाम. म्हटले तर परस्परविरोधी. त्यामुळे जीवनमुक्त होणं म्हणजे राग किंवा संताप यापासूनच मुक्तता नव्हे. राग किंवा संताप तुमच्या जीवनावर किती दीर्घकाळ दुष्परिणाम करतो याची जाण येणं, संतापाच्या कारणापर्यंत जाण्याची वृत्ती जोपासणं म्हणजे जीवनमुक्तीचा एक टप्पा. कोणावर तरी संतापून एखादी गोष्ट साध्य करणं यात वाईट काही नाही; पण या सांध्याच्या जवळ जातानाची अस्वस्थता तुमच्यातील प्रेरकशक्तीची हानी करीत आहे का, याची जाणीव येणं महत्त्वाचं. कोणत्याही बाह्य घटना - घडामोडींचे परिणाम जसे बाह्य होतात त्यापेक्षा अधिक ते अंतरंगात होतात. अंतरंगात विपरित परिणाम होऊ न देता रागाचं प्रामाणिक परिमार्जन करणं म्हणजे जीवनमुक्तीचं एक चरण.

    -- किशोर कुलकर्णी