चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे
खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे ।
वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही
मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे ।
आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले
एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे ।
तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी
त्या कवितेतील रचनांचा कैफ असाच राहू दे ।
मधूर तव कंठामधून ऐकल्यात मी माझ्या गझल
त्या मधूर तव कंठातील नशा अशीच धुंद राहू दे ।
एकेक शब्द तुझ्या मुखीचा अमृताचा प्याला जणू
अमृतानुभव तो मजला सदैव मिळत राहू दे ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
दि. १६ सप्टेंबर २०१८
हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।
करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।
एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।
डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।
गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।
कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।
येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।
शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।। १
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।। २
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।। ३
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।। ४
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।। ५
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले ।। ५
द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।। ६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात,
जळून जळून प्रकाश देत,
क्षणिक फक्त मोठ्या होत,--!!!
पणतीची ज्योत तशी,
आमुची ही असे जात,--
जगच छोटे भोवतालचे,-- स्वयंप्रकाशी मोठे करत,
लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,--!!!
नंदादीपातील जशी ज्योत,
स्त्री तशी तिच्या संसारात,
हळूहळू अगदी तेवत,--!!!
दुसऱ्याला प्रकाशमान करत,--!
निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
सारखे सारखे पहा जळत,
स्वतःला ओवाळून टाकत,--!!!
निमूट उभे राहणे,
खंबीर अचल होणे,
स्वतः चटके सोसत,
भोवताल उजळून टाकणे,--!!!
अंधारावर मात करत करत,
काळ्या तमास नष्ट करणे,
आपले स्त्रीत्व साकारत,
प्रकाश-कारणे झिजणे,--!!!
असे झिजत झिजत,
पुढे वाटचाल करणे,--
वाऱ्यावादळांतही पुरत्या,
जिद्दीने पुन्हा फडफडणे--!!!
जो येई तो हात लावी,
धक्के सहत राहणे,
वेदनांनी तडफडत,
आपुले तेज सांभाळणे,--!!!
कुणी धरू पाहे ज्योत"",
त्यास धीराने सामोरे जाणे,
वेळीअवेळी चमकत, चमकत
आपली अस्मिता जपत राहणे,-!
कणाकणाने पळापळाने,
जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
मग तेजाचावसा,दान देणे,--!!!
ज्योतीने ज्योत पेटवीत,
मगच संपत संपत जाणे,!--
उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!
हिमगौरी कर्वे.©
लहानपणी वाटायचं,
तो ससा फार गर्विष्ठ होता,
म्हणूनच शर्यतीत झोपला…
पण मोठा झाल्यावर समजलं,
प्रत्येक झोप ही आळशीपणाची नसते.
कधी कधी माणूस थकलेला असतो,
जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने वाकलेला असतो,
सगळ्यांना पुढे जाताना पाहत,
स्वतःला सावरायला
क्षणभर थांबलेला असतो.
जिंकण्याची इच्छा कमी नसते,
फक्त श्वास घ्यायला
एक निवांत क्षण हवा असतो.
जीवनाच्या शर्यतीत
प्रत्येक जण कासवासारखा संथ नसतो,
आणि प्रत्येक ससा बेफिकीरही नसतो.
काही जण हसत धावत असतात,
आतून मात्र हजारो लढाया लढत असतात.
आज समजतं…
त्या सशाने हार झोपेमुळे नाही पत्करली,
तर थकव्याने घेतलेल्या
त्या एका विश्रांतीची किंमत
त्याला पराभवाने चुकवावी लागली.
म्हणून आता
कोणाच्या प्रवासावर हसू येत नाही,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात
एक अशी शर्यत असते,
जिथे धावण्यापेक्षा
स्वतःला सावरणं अधिक महत्त्वाचं असतं.
आणि हो…
जिंकणं सुंदर असतंच,
पण थकलेल्या मनाला
स्वतःची साथ देणं,
हे त्याहूनही सुंदर असतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
कळप
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करिते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनूभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पूनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवनातील परमानंद,
केंव्हां लाभतो त्या जीवना ?
मातेच्या त्या उदरामध्ये,
शांत झोपला असताना ।।१।।
असीम ‘आनंद’ अनुभव,
घेत असे तो जीवात्मा
सोsहं निनाद करूनी,
सांगतो मीच परमात्मा ।।२।।
आनंदाने नाचू लागतो,
मनांत येता केंव्हां तरी,
मातेलाही सुखी करती,
त्याच्याच आनंदी लहरी ।।३।।
पुढे त्याचे प्रयत्न होती,
मिळवण्या तोच आनंद
सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,
विसरूनी जातो तो नाद ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti