जीवन हर घडिला अवलंबूनी, आहे दूजावरी
व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी
नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या
शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या
माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता
तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता
घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी
समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी
वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा
हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा
मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती
त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती
जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन
कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी
पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी
उतावीळ उतावीळ
मिळालेल्या अनुभवांनी ...
संघर्षाची नकोय शक्ती
नाही गाठलेली कुणाची भक्ती
उतावीळ उतावीळ
तरीही येथे प्रत्येक व्यक्ती
विलंबाकडे करुनी पाठ
उद्द्येशाची लावूनी वाट
उतावीळ उतावीळ
त्रिशंकुंचा हा सारीपाट
चाले तंद्री झपाझप
बहिरा असावा जणू प्रत्येक
हेरून संकटांची पोटली
पुन्हा रस्ता त्याच चौकात...
-- सौ. देवयानी खरे
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता १
धगधगणारे अंगारे हे,
जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज २
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ३
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ४
सुख दु:खातील दु:ख आधीक ते,
पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी,
दु:खी अनूभवी धाव घेई ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई
सबळ दुर्बल ह्यांचा संघर्ष, टळत नेहमी जाई....१,
मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी
त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी....२,
ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी
हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी.....३,
मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते
देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते....४,
दिसून येतो ऊर्जा वापर, देह बुद्धी वा मनी
संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रखरखत्या उन्हांत बसूनी, भीक मागतो एक भिकारी
जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी...१,
नजीक येत्या वाटसरूंना, आशिर्वाद तो देत असे
‘प्रभू तुमचे भले करिल’ हेच शब्द ते उमटत असे...२,
अन्न न घेता दिवस जाई, खात भाकरी एकच वेळां
दिवसभरीचे श्रम होवूनी, उपवास तो सदैव घडला...३,
पूर्व जन्मीच्या कर्मफळाने, दीनवाणी ते जीवन मिळाले
आज पुण्याच्या राशि जमवूनी, उद्धरू लागला इतर सगळे...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
धन्य ती महाराष्ट्र माऊली
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ//
ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी
ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी
तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा
हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा
अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली //२//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला
तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला
भक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली //३//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
तसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले
श्री रामदास स्वामी, दासबोध रचिले
निवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी //४//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
शिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप
अंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप
प्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली //५//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
टिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले
सावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले
सारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली //६//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
International Civil Defence Organisation च्या जनरल असेंब्लीमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे.
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दूजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्तेक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासुर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
असे जगावे, तसे जगावे,
मला वाटते मुक्त जगावे,
कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या,
अगदी त्यांना कोळून प्यावे,--!!!
जीव टाकत स्वच्छंदाने,
मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे,
जीवनाचे मर्म लुटावे,--!!!
कधी कस्तुरी व्हावे वाटे,
सुगंध फैलावण्या सारे,
वाऱ्याने त्याचेच गान गावे,
घेऊन जग तृप्त व्हावे,--!!!
कधी वाटते डोंगरदरीत,
हरणउड्या मारत हिंडावे,
स्वैर आपुले आभाळचआपण, आपल्या हाते खाली आणावे,--!!!
कधी वाटे गरुड व्हावे,
ऐटदार पंख फैलावत,
साऱ्या पृथेवर राज्य करावे,
कधी वाटे कोकरू व्हावे,
इकडून तिकडे उड्या मारत, पटकन कुणाच्या कुशीत शिरावे,--!
कधी वाटे मधमाशी व्हावे, फुलांफुलातील मध चाखत, साठवण करत करत रहावे,
कधी वाटते राजहंस व्हावे पाणियात डुंबत डुंबत,
दिमाखाने झकास जगावे,--!!!
नकोत सगळे प्रश्न हे,
नकोशी ज्यांची उत्तरे,
माणूसपण सोडून देऊन,
थोडे जगून पहा बरे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
मिळेल कांहीतरी
गडबड मनां होऊन जातां
निराशाच पदरीं ।।१।।
शांत चित्त आपुले
तूं ठेव प्रत्येक समयी
मिळेल यश पदरी तुझ्या
खात्री याची घेई ।।२।।
आत्मविकास तूं सोडूं नको
आपल्या कामाचा
मोबदला मिळेल तुजला
योग्य प्रयत्नाचा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti