ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, --
देहातून आत्मा सुटावा.
घे स्वैर भरारी,
माझ्या देखण्या पाखरा,---
बद्ध पंख हे उचंबळती,
सोडून ही बंदिस्त कारां,---
पिंजर्याचे दार लागतां,
जीव तुझा घुसमटे,
स्वातंत्र्याच्या फोल कल्पना,
सर्वच विचारा खींळ लागे
आतल्या आत जीव तडफडे,
सीमित जागा, नुसताच हिंडे
डोळे भिरभिरत कसा शोधशी,
तू आपला मुक्तपणा, --!!!
जो येईल तो बोलू बघे,
इथेतिथे उगा हात लावे,--
कठोर काळीज करुन आपुले,
मानव कधी छेड'ही काढे,-!
नको नको परतंत्रता,
पटकन आता झेपाव गगनी,
मिसळ जाऊन भाईबंदा,
स्वातंत्र्याने होशील आनंदी,
झाडा झाडांवर कर आपला,
अगदी स्वच्छंद विहार,
गोड गोड फळे चाखावया,
कशाला रे उशीर फार ,--?
या कारे'त काय ठेवले,
बेचैनी, उलघाल, अस्वस्थता,
ताणतणाव विसरून साऱ्या,
पर" पसरून कर गोड सांगता,-!!
हिमगौरी कर्वे.©
नादावले सखीने
मन जडल्या नात्याचे
चंद्र पाकळ्यांची बरसात
फुलणार मग निशेने
भिजशिल गं प्रेमाने
सखी कोणता ऋतुमास
ओठावरी तुझा ध्यास
मन करुन वारुचे
ये प्रणयसखे वेगाने
भिजशिल गं प्रेमाने
भेटशील ना त्या ठिकाणी
दुसरे नसेल कोणी
क्षण तुझ्या भेटीचे
ये करुनि बहाणे
भिजशील गं प्रेमाने
-सौरभ दिघे
(भारताने न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ला. साउथ आफ्रिकेत चालू असणाऱ्या वर्ल्ड कप २००३च्या पहिल्याच सामन्यात आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा नामुष्कीचा पराभव खाल्ला. काय म्हणावे या कर्माला?)
वाघाची डरकाळी
सिंहाची गर्जना
कागदी वाघ
करतात वल्गना
चिखलातले बेडूकराव
करतात डराव डराव
तट्ट फुगले तर काय
नंदीश्वर होतील काय?
गाढवाने पांघरले
वाघाचे कातडे
म्हणून काय त्याचे
लपेल ओरडणे?
आपलाच डंका
आपणच पिटायचा
मूर्खाचे लक्षण
विकत आताचा तमाशा
-- विनायक अत्रे.
दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला
मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला
सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला
उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला
गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं
चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी
कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा
आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शान्त समईत जशी वात,
तशी समाजात स्त्री जात,
जळून जळून प्रकाश देत,
क्षणिक फक्त मोठ्या होत,--!!!
पणतीची ज्योत तशी,
आमुची ही असे जात,--
जगच छोटे भोवतालचे,-- स्वयंप्रकाशी मोठे करत,
लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,--!!!
नंदादीपातील जशी ज्योत,
स्त्री तशी तिच्या संसारात,
हळूहळू अगदी तेवत,--!!!
दुसऱ्याला प्रकाशमान करत,--!
निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
सारखे सारखे पहा जळत,
स्वतःला ओवाळून टाकत,--!!!
निमूट उभे राहणे,
खंबीर अचल होणे,
स्वतः चटके सोसत,
भोवताल उजळून टाकणे,--!!!
अंधारावर मात करत करत,
काळ्या तमास नष्ट करणे,
आपले स्त्रीत्व साकारत,
प्रकाश-कारणे झिजणे,--!!!
असे झिजत झिजत,
पुढे वाटचाल करणे,--
वाऱ्यावादळांतही पुरत्या,
जिद्दीने पुन्हा फडफडणे--!!!
जो येई तो हात लावी,
धक्के सहत राहणे,
वेदनांनी तडफडत,
आपुले तेज सांभाळणे,--!!!
कुणी धरू पाहे ज्योत"",
त्यास धीराने सामोरे जाणे,
वेळीअवेळी चमकत, चमकत
आपली अस्मिता जपत राहणे,-!
कणाकणाने पळापळाने,
जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
मग तेजाचावसा,दान देणे,--!!!
ज्योतीने ज्योत पेटवीत,
मगच संपत संपत जाणे,!--
उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!
हिमगौरी कर्वे.©
समजण आणि असणं
याच्यात तिनशे साठ
अंशाचा कोन होतो
त्यांच्या समीकरणातून
माणूस शून्यात जाऊन पोहचतो ||
कर्तबगारीच्या जमेतून
प्रौ़ढीची वजाबाकी करतो
त्यावेळी माणूस परत
शून्याकडेच वळतो ||
सत्कर्माच्या गुणाकराला
अनितीने भागतो त्यावेळी
माणूस परत शून्याकडे वळतो ||
हरिस्मरणाचे बीजगणीत
श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही
माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो ||
-- चंदाराणी कोंडाळकर
केली मशागत शेतीची
झाली स्वच्छता वावराची
वाट पाहतो पेरणीची
मेघराजाच्या आगमनाची
मे महीना ही गेला
जुन निम्मा हो झाला
एक थेंब ही नाही पावसाचा
कधी येईल पावसाळा
बरसावे पावसाने
शेतीला चिंब करावे
शिवारात पाणी पाणी व्हावे
शेत पेरणीसाठी सज्ज आहे
मग होईल पेरणी जोमात
बिज अंकुरेल कोंबात
तरारेल पीक शेतामधी
हीरवगार रान होईल
पण आहे प्रतिक्षा
मानसुन आगमनाची
वाट पाहतो बळीराजा
पावसाच्या एका सरीची
उमेश तोडकर
मर्यादेचा बांध घालूनी, मर्यादेतचि जगती सारे ।
अनंत असता ईश्वर , मर्यादा घाली त्यास बिचारे ।।
जाण जगाची होई इंद्रियांनी, त्याला असती मर्यादा ।
विचार सारे झेपावती, ज्ञान शक्ती बधूनी सदा ।।
अथांग वाटे विश्वमंडळ, दाही दिशांचा भव्य पसारा ।
ईश्वर आहे थोर त्याहूनी, मोजमापाच्या उठती नजरा ।।
कशास करीतो तुलना सारी, भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी ।
अज्ञानाने पडती मर्यादा, अनंत तत्वास त्याच क्षणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत.....१
चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही....२
थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चिर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा....३
थकून जाई शरिर जेंव्हां, प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी, घेई आसरा पुन्हा दुजाचा....४
आत्मा देखील थकून जाता, परमात्म्याशी विलीन इच्छीतो
चैतन्यातूनी विश्रांतीचा ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti