गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू
गोफ नको बाई गोफ नको त्यापेक्षा टिव्ही पाहू
गरे घ्या गरे पोटाला बरे नाही खाई त्याची म्हातारी जगे
जगली तर जगली आहे तशी चांगली
वृद्धाश्रमात राहते बापडी.
गझल
समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा
देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा
आलीच ना कधी ती भेटायला मला पण
स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा
नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो
सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा
युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना
जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा
भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा
या बावऱ्या मनाला समजावले कितीदा
खाणीत कोळशाच्या नाही हिरा मिळाला
काळेच हात झाले मी खोदले कितीदा
देवासमान वैद्या मी मानतो तुला रे
दुखण्यामधून मोठ्या तू तारले कितीदा
© जयवंत वानखडे,कोरपना
माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण,
कविमन तर त्याहून 'पक्षीण',
गगनात माराया उंच भरारी,
मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी !
"यांना" विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ?
आणि झरझर घरट्यात येते कधी ?
स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी,
तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी !
स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले,
म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले !
कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण,
करतो शब्दच्छल विनाकारण !
मनाचे तरंग पसरले स्वर्गात,
देवलोकीचे झाले हैराण क्षणार्धात !
मनाच्या हिंदोळ्यावर कवींचे शब्द,
नाही त्याला काश्याचे बंध !
कविमनाचे वरचे 'वर' जाणेयेणे,
शाब्दिक प्रदूषणात 'भर' पडणे !
करण्या स्वर्गातील शाब्दिक प्रदूषण कमी,
लावा कवी मनाला व्हिसा कुणी !
-- जगदीश पटवर्धन
शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
परतून येणे हे खूप गरजेचे आहे.
कधी तरी एक शब्दतरी बोलत जावे असे वाटते
-- कवी - कुशल डरंगे
आम्ही साहित्यिक ग्रुपमधून
मी सदैव जपतो
आज सार आठवतो
ताई तुझं प्रेम साठवतो
रक्षण करण्यास हात पुढे करतो
आज आहे रक्षाबंधन
भरून आले हे नंदन
बहीण भावाचे हे स्पंदन
नात्यात फुलवी सुगंधी चंदन
बहिणीने बांधली राखी आज
भावाच्या हातावर उजळला साज
या बंधनात नसते कसले व्याज
नाही उमगले या नात्याचे राज
महत्व जाणले धाग्याचे
नाते जपले कृष्णाने द्रौपदीचे
हुमायूने केले रक्षण राणी कर्मवतीचे
दाखवून दिले नाते बहीण भावाचे
नका दाखवू असला माज
आहे कोणाची बहीण वाटू द्या लाज
स्वच्छंदी तिचा सजलेला असतो साज
कलियुगात बहिणीला नको असले भाऊ आज
-- कुशल डरंगे
सौख्यसमृद्धीचे रांजण
भोगण्यासही पायबंदी
क्षण विकलांग पांगळे
शब्दभावनां जायबंदी
संसारी सर्वार्थी तृप्तता
धागे भाळी ऋणानुबंधी
सारा फुकाचा विसंवाद
सुसंवाद मात्र भोगवादी
विवेकाने जगती जगावे
दैवयोगे, प्रारब्ध भोगावे
शांतीच्याच आंनद डोही
जीवनी विनासक्त डुंबावे
स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल
दुर्लभ, निर्मळ सौख्यांगण
दुर्बोधीच अर्थ जीवनाचा
व्यर्थ! सौख्यदायी रांजण
-- वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १६५
१५ - ७ - २०२२.
कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी
वाटे मजला, तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती
बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती
ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी
ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी
फुलातील गंध, तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना
फळातील रस, देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला, देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी
देई देहा सुख, अल्हाद्कारी
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
कोणी म्हणे बाप माझा शेतकरी,
झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी,
घेवून वाड वडिलांची आण,
बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण..
जवान मरतो देशासाठी,
लाभते त्यास वीरमरण प्राप्ती,
मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी,
तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी…
अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई,
निसर्ग कोपाची भलतीच घाई,
उजाड माळरान फाटकी धरती,
कळोखांचा नभ डोळ्यांनभावती…
मान- सन्मान- सत्ता नाही,
काळी काया, हाडावर मुठभर मांस नाही,
मजसाठी नाही राजा कोणी,
छळवाद मांडला माझ्या भाळी…
पोशिंद्याची उपमा मला,
जय जवान जय किसान नारा,
जरी स्वातंत्र्य मिळाले देशाला,
तरी पारतंत्र्यात जगतोय माझा बळीराजा….!
Copyright © 2025 | Marathisrushti