लोणच्याला चव येते,
थोडे मुरल्यानंतर ।
आंबाही स्वादिष्ट लागे,
आंबून गेल्यानंतर....१,
विचारांची मजा वाटे,
ऐकता ज्ञानी विचार ।
परिपक्वता त्यांच्यातील,
देई आनंदाला धार...२,
परिपक्वता येण्यासाठीं,
अनुभवाची भट्टी हवी ।
ज्ञान चमकते,
जेव्हां तर्कज्ञान पाही....३,
विचारांत मुरलेला,
मुरब्बी तो असतो ।।
अनुभवाच्या शक्तीनें,
योग्य पाऊल टाकतो...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
सुगंध पसरे चारही दिशा,
मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा,
वारा वाही, सुवास खासा,--!!!
फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे,
किमया सारी निसर्गाची,
तोरणे सतत लावत असे,--!!!
जंगी असे स्वागत एवढे,
खास चालले कुणासाठी,
कोण कोणासाठी झुरे,-
-कोण अवतरे पृथ्वीवरती,---?
सडा पडतो खाली फुलांचा,
का घातल्या पायघड्या,
रंगांची अशी मांदियाळी,
अत्तराचे कोण शिंपी सडे,--!!!
कोमल, मऊ, तरल, तलम, पाकळ्यांचे जादू कशी बोले, हळूहळू पहा उमलत,
फूल झाडावर डोले,--!!!
पानोपानी रंगरंगोटी,
मधूनच कळी डोकावते,
सूर्यकिरणांशी होड चालली,
हळूच खोडाला बिलगे ,--!!!
फुलाफुलांवर रेंगाळत,
भुंगे खेळत राहती,
प्रणायक्रिडा त्यांच्या बघुनी लतावेली गाली हसती,--!!!
भ्रमरांच्या त्या प्रेमलीला,
पाहून त्या रोमांचित होती,
हळूच कवटाळती झाडा,
प्रियकर ना तो शेवटी,--!!!
© हिमगौरी कर्वे.
आमचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिक्कण सुपारी सुपारी
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेले गडगडत गडगडत
मामा आले बडबडत बडबडत
सुपारी गेली फुटून फुटून
मामा आले उठून उठून
आम्ही साहित्यिक आहोत
रमू सदैव लेखणीत
लिखाणात भाव असोत
चलाख शब्द पेरणीत
सौ.माणिक शुरजोशी
एक..
वाळली पाते
वावटळीशी नाते
बोडके झाड....
दोन
लाट येणार
नक्की विचारणार
घर कोणाचे ?
तिन
उदास पाने
भरकटत वारा
आनन्दी गाणे.....
-- श्रीकांत पेटकर
तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता
हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत
तू माझ्याकडे पहिलं, हसलीस
आणि हळू आवाजात म्हणालीस
“बाय”
मीही तुझ्याकडे पहिलं
हात खांद्यापर्यंत वर उचलत
आणि आतल्या आवाजात म्हणालो
“बाय”
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर
तू अचानक भेटलीस
तू अगदी फुललेल्या चेहर्याथने
हासत माझ्याकडे पाहिलस
आपली भेट झाल्याचा उत्साह
तुझ्या चेहरायवर साफ दिसत होता
मलाही तू भेटल्याचा तेव्हढाच
आनंद झाला होता
मीही भयंकर उत्साहित होतो... ‘मनात’
मी फार वेळ लावतोय हे पाहून
तूच म्हणालीस
कॉफी प्यायला जायचं?
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
तू मला तुझा फोन नंबर दिलास
मग आपल नेहमीच
भेटणं होऊ लागलं
त्याच हॉटेलात आपण भेटायचो
तू मला बरेच प्रश्न विचारायचिस
मी तुला एकच प्रश्न विचारायचो
काय घेणार?
कधी डोसा कधी उत्तपा खायचो
शेवटी ‘बाय’ म्हणत निघून यायचो
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
शेवटी एकदा
तू तुझ्या होणार्या नवर्या् बरोबर आलीस
त्याच हॉटेल मध्ये भेटलो
त्याच्याशी माझी ओळख करून दिलीस
मला त्याचा हेवा वाटत राहिला
आणि तू मला विचारलस
काय घेणार?
मागण्यासारख आता काहीच नव्हतं
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
जीवनात आपआपल्या वाटेवर
आपण आता फार पुढे निघून आलोत
मी सभ्यतेच्या मर्यादा पळणारा आणि
जपणारा माणूस आहे, त्यामुळे
मी आता ही
पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही
चूक.....माझीच आहे
-- विनायक आनिखिंडी, पुणे
मो ९९२२९७०३१७
तुम्ही चंदना प्रमाणे अपार झिजला बाबा
केले तुम्ही सुगंधीत अमुचे शिवार बाबा।।धृ।।
रामजी-भिमाबाई ,माता -पिता आपुले होते।।
पत्नी रमाई,सवीता
यशवंत पुत्र होते।।
भिवा,भीमा,भीम आपले टोपण नावे बाबा।।
केले तुम्ही सुगंधित अमुचे शिवार बाबा ।।१।।
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स ,
कोलंबिया।।
विद्यापिठातून अर्थशास्त्रात डॉ.मिळवल्या।।
अनेक पदव्या घेऊन शिक्षित झाले बाबा।।
केले तुम्ही सुगंधीत आमुचे शिवार बाबा ।।२।।
एकोणवीसशे छप्पन्नात बौद्ध धर्म घेतला।।
पत्रकारीतेस आपण सारा जन्म वाहीला।।
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला।।
केले तुम्ही सुगंधित आमुचे शिवार बाबा ।।३।।
महानिर्वाण दिनी पडते मी तुमच्या पाया।।
आपुल्या सम दुजा न होणे कोणी जगी राया।।
न्यायास विद्रोही पंढरपूर स्थापिती बाबा ।।
केले तुम्ही सुगंधीत अमुचे शिवार बाबा ।।४।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
-- स्वाती ठोंबरे.
चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती
संगे माझ्या, माझी छाया, मागून येत होती
वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग
खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग
तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली
समरस होण्या माझ्यामध्ये, पायी घुटमळली
ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला
प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला
पडू लागले पावूल माझे मंद मंद आता
श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता
दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी
काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी
एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री
प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती
सुखामधली सोबत सुटते, दु:खाच्या वेळी
सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी
पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला
सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला
छाया म्हणते:
रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या मागे
आठव देण्या रवि उदयाची, त्याला मी सांगे
तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने
पुनरपि आले तव सहवासे, त्याचाच साक्षीने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti