आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||
आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||
सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||
चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||
लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||
काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||
कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||
उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||
जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
८ मे २०१६
कविता-गझल
दिपूनी गेले नयन त्या क्षणी
बघता तिची सोज्वळ मुर्ती ।
हाक निघाली अंतःकरणीं
तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।
जरी बघीतल्या अनेक सुंदरी
ठाव मनाचे हिने जींकले ।
सहचारीणी ही होईल तुझी
अंतरमनी शब्द उमटले ।।
अनामिक जे होते पूर्वी
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ ती येता क्षणी
ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।
शंका भिती आणि तगमग
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानूबंधन
बांधले होते भावबंधनी ।।
उचंबळूनी दाटूनी आला
ह्रदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं....१
कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती
कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती....२
शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत
एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात....३
कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो
चुकून देखील तुझ्या राज्यीं, कधी येत नसतो....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
इमारतीचा झाला आहे आता खंडहर,
अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण,
एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला,
आहे का कोणी आपली काळजी घ्यायला?
काळ चालला आहे वेगात,
न थांबता, न संपता,
बिचाऱ्या पाहत होत्या वाट
आपल्या ‘कांती’ बदलाची !
ओसरला त्यांचा आनंद क्षणात,
आले होते कोणी इमारत पाडण्या,
काही होत्या सुपात काही जात्यात,
बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत !
संपला होता त्यांचा निवास,
करोनिया मन घट्ट,
सारोनिया दूर विचार,
फिरून नाविण्याचा पुनर्विचार !
जगदीश पटवर्धन
बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय
मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय...
चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
अंगी झोंबे हा गार गार वारा
मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा
उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
सखे सुरू झालाय, आता वीजांचा कडकडाट
हिरवी होईल धरती अन् ओली चिंब पायवाट...
थोडी सावरत अन् बावरत, हात माझा हाती घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
धुंद कुंद ओल्या क्षणी, येऊ दे आता प्रेमाला बहर...
तप्त धरणीच्या मिलनासाठी “तो”ही करेल कहर
त्याच्यासारखीच मिलनाची ओढ, तुला देखील लागेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
निसर्गाच्या अमृतधारांनी, मन न्हाऊन निघतंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर, उगाच झुलत राहतंय
पुरे झाल्या आठवणी, आता सामोरी तू येशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
ऊन-पावसाच्या लपंडावात, बघ इंद्रधनुही साकारले
सप्तरंगांच्या या खेळात, झाले तुझेही मन बावरे
बावऱ्या तुझ्या या मनात, प्रेमाची पालवी फुटेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
बरसू दे त्याला मनासारखं, आपण मात्र एकांत शोधूया
आडोशाला उभे राहून, एकमेकांच्या मिठीत विसावूया
गोऱ्या गालावरून थेंब ओघळताच, लाजून हसशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
तसा आत खोलवर पाऊस, माझ्या रोजच बरसतो आहे
डोळ्यांतील आसवांसवे, नित्य ओघळतो आहे
उधाणलेल्या माझ्या मनाचा, किनारा तू होशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
©श्री. अल्केश प्रमोद जाधव®
अलिबाग, रायगड
दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।
देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।
आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।
लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।
माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।
जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ//
बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची
धन दूज्याचे म्हणूनी घेतले
परके त्यासी नाही समजले
बालपणीं जे प्रेम जमविले
क्षणांत मजला तेच मिळाले
भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
खट्याळ भाऊबहीण येथें
दिर नणंद तसेच तेथे
बहीण वहीनी एकच नाते
हट्ट पुरविण्या दुजे नव्हते
पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची //२//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी
सुख वाटले सदैव त्यानीं
मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची //३//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
सासरीं गेले सोडूनी बालपण
दुज्यासाठीं करण्या समर्पण
फुलणें फळणें खरे जीवन
हवे निसर्गा हेच ते धन
माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची //४//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गरीब माणुस दारु पितो.
मध्यमवर्गीय मद्यपान करतो..
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात...!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते..
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते...!
गरीब माणुस करतो ते लफडं.
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम..
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर...!
शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते.
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते..
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वप्न फरारीच बघायच का ?
अपना बजाज मधे सुख शाेधायचं...!
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ?
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे...!
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ?
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ?
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं...!
What's Up वर स्वत:चं मनोरंजन करायचं का ?
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं...!
जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच का ?
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ?
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा...!
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ?
निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...!
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ?
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं...!
वेस्ट केलं तरी वितळतं...!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका...!
वेस्ट तर ते तसंही होतच आहे...!
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा...!
कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...!
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!
टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते....
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
हा जन्म पुन्हा नाही
-- भरत कानविंदे
तो पुन्हा आलाय
पण तो गडबडलाय
आणि गोंधळलाय
थोडासा हिरमुसलाय
त्याच्या स्वागताची तयारी नाही
उत्साह तर कुठेच दिसत नाही
उत्सवी वातावरण नाही
कसलीच लगबग नाही
नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची
सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची
महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची
बालगोपाळांना मोदक पटकावण्याची
कलात्मक आरासी केल्या जातात
पानाफुलांनी मखरं सजवली जातात
घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात
दहा रात्री देखील जागवल्या जातात
पण या वर्षी असं काहीच नाही होणार
न भुतो न भविष्यती असंच घडणार
त्याचा विरस होणार
आणि तो निघून जाणार
तो जाण्यापुर्वी त्याला वचन देऊ
पुढच्या वर्षी सगळं नीट करू
नेहमीसारखंच तुझं स्वागत करू
या वर्षीचं उट्टं भरून काढू
-- शरद दिवेकर
कल्याण
70457 30570
विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू ,
तो तर केवळ एक थेंब
ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,--!!!
असे असता गर्व करी,
नको इतका अहंकार करी,
हातात नाही काही तरी,
उगीचच मिशीवर ताव मारी,--!!
मेंदू केवढा, बुद्धी केवढी,
आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली,
पोकळ बढाया मारती सगळे,--!
हातात नाहीत पुढचे क्षण ,
काय घडेल त्याचा नेमच नाही, जन्मामुळे दुःखे भोगती,
म्हणत आता येऊ दे मरण,--!!!
जन्ममरणाचा फेरा चुकवत,
का कधी कोण आला - गेला,-?
प्रारब्धाच्या अगम्य चरकांत,
जो तो चिरडला गेला,
निघून जातो जीवनरस,
राहतात फक्त चिपाडे,
क्रूर केवढे नशीब म्हणावे,
त्याला पुन्हा चरकातूनच काढे,--!!
कसला अहम अन् कसली गुर्मी
साध्या जगण्याचीही नसे हमी, ज्याला त्याला अहंकार नासवी, माणसा जाण आपली कमी--!!
© हिमगौरी कर्वे
Copyright © 2025 | Marathisrushti