(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • फोन उन्हाचा

    रोजच येतो फोन उन्हाचा
    पण नंबर अननोन उन्हाचा

    घड्याळातल्या काट्यांसोबत
    बदलत जातो कोन उन्हाचा

    वसंतपंचम वाटत नाही
    हा तर काळी दोन उन्हाचा

    शोधत आहे घर कौलारू
    छोटासा चौकोन उन्हाचा

    स्फोटक वातावरण केवढे !
    कुणी प्रसवला क्लोन उन्हाचा ?

    चटका-चटका वेगवेगळा
    जो न उन्हाचा, तो न उन्हाचा

    - ॐकार

  • पाऊसधारा

    क्षणक्षण सारे होता धुसर
    पापण्यातूनी दाटती पाझर
    व्याकुळ,कृष्णमेघ सावळे
    त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर
    सृष्टिचे रूप अवीट मनोहर
    तोषवीणारा मृदगंध अनावर
    लपंडाव तो उन सावल्यांचा
    मोहवितो मनामनास निरंतर
    चिंबचिंब ओल्या पाऊसधारा
    सुखद सरिंची रिमझिम सुंदर
    आसक्त, ओढ़ प्रीतसखीची
    तनमन हृदया लागे चिरंतर
    जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी
    प्रीतभावनांचे अंतरी गहिवर
    ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी
    कृपाळू, कृपावंत तो दिगंबर
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १५१.
    १२ - ६ - २०२२
  • आमचे ध्येय व दिशा

    कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,

    दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।

    धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,

    कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।

    नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,

    परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।।

    जीवन कशासाठीं कळले नाही कुणां

    जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।

    तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले

    मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • भाव जाण तू देवा

    कर पडले चरणीं

    भाव जाण देवा ।।धृ।।

    देह झुकला पुढती

    लिनतेनें मान वाकती

    मनाची करूनी एकाग्रता

    भावनेला वाट देतां

    अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १

    कर पडले चरणी भाव जाण देवा,

    प्रथम येई भावना,

    जागृत करते मनां

    मनाचा ताबा देहावरी

    तेच तुजला प्रणाम करी

    घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    मुखीं नाम तुझे घेई

    देह सारा शहारून जाई

    आनंदाची फूटते उकळी

    नाचते मन सर्व काळी

    मनाचा चंचल स्वभाव समजोनी तूं घ्यावा ३

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें
    विलंब न करता क्षणाचा, जायी दुजा टोका वरती,

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती
    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग
    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते
    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते,

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी
    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी,

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निसर्गाचे मार्ग वेगळे

    मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ ।
    चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ ।।१।।

    चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।
    करूया काही आगळे ठरवी विचारांनी ।।२।।

    आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।
    नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे ।।३।।

    परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।
    कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती ।।४।।

    करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।
    अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे ।।५।।

    जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।
    प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी ।।६।।

    मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।
    आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते ।।७।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मध्य रेल्वे माझं नाव

    मध्य रेल्वे माझं नाव
    वय माझं शंभरवर,
    काय सांगू बाबांनो आता
    कशी लागली मला घरघर…

    इंग्रजांच्या काळात
    खूप होती माझी बडदास्त
    फेऱ्याही होत्या कमी
    अन् माणसंही नव्हती जास्त…

    रुळावरून धडधडत आले
    की लोक मला घाबरायचे
    एक भोंगा वाजवताच
    दूर दूर पळायचे…

    पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
    सगळंच तंत्र बदललं
    शहरांचा झाला विस्तार
    माझं महत्त्व वाढलं…

    मी खूप खुशीत होते
    दिवसरात्र धावत होते
    नोकरदारांच्या प्रवासाची
    नित्य काळजी वाहत होते…

    पश्चिम उपनगरवासीयांच्या सेवेत
    माझी बहीण तत्पर होती
    धाकटीची भरधाव प्रगती
    सगळ्यांचेच डोळे दीपवत होती…

    आम्ही दोघी मुंबईची
    लाइफलाइन होऊन गेलो
    भावालाही सोबत घेऊन
    पनवेलपर्यंत जाऊन पोहोचलो…

    पण मरमर राबणाऱ्या,
    टार्गेट अचिव्ह करणाऱ्या
    अन् इन हँड सॅलरी पाहून
    मनात चरफडणाऱ्या
    कॉर्पोरेट एम्प्लॉयीगतच माझीही गत झाली
    बडी बडी स्वप्नं (बोनस, इन्सेन्टिव्ह, TVP) दाखवून
    ‘बेसिक’चीच काशी केली…

    स्वतंत्र खातं, स्वतंत्र बजेट,
    वरवर सगळंच होतं छान,
    पण मतांच्या राजकारणात
    विकासाला नव्हतं स्थान…

    उत्तरेचे मंत्री कुल्हडबाजीत रमले होते,
    भाडेवाढीचं नाव काढताच हुल्लडबाजी करत होते
    अधिकारीही उत्तरेचेच,
    त्यांना मूळ प्रश्नच कळत नव्हते
    बुडाखाली कार असल्याने
    त्यांचे काहीच अडत नव्हते…

    माझी मात्र आता दमछाक होऊ लागली होती,
    प्रत्येक स्टेशनावरची गर्दी पाहून धडकी भरू लागली होती…

    कधी कर्जत, कधी कसारा
    कधी स्लो कधी फास्ट,
    अप-डाउन करताना वाटतं
    हीच फेरी ठरेल लास्ट…

    हाडं खिळखिळी झालीयत, पायही लटपटतात,
    चुकून कधी पटरी सुटली तर सगळे जण खवळतात…

    तुम्हाला मी लेकरं मानते
    चीडचीड तुमची मला कळते
    चाकरमान्यांचे हाल पाहून
    माझेही मन हळहळते…

    त्यांच्या कर्माची फळं
    आपल्याला भोगावी लागत आहेत,
    भ्रष्टाचाराचा चारा खाऊनही
    ते तिकडे चैनीत आहेत…

    किती करायची अॅडजस्टमेंट
    आता सहन होत नाही,
    तुमच्यात अडकलेला जीव
    रामही म्हणू देत नाही…

    तुम्हीच आहात माझी लाइफ
    माझ्यावर नका रे रुसू,
    म्हातारी झाले रे पोरांनो
    ‘मरे’ म्हणून नका हसू…

    घरच्या आजी-आजोबांना
    तुम्ही देता ना रे औषध,
    मग या पणजीला जगवण्यासाठी
    काहीतरी करा की झटपट…

    तुमच्या सेवेत धावत राहणं
    हाच माझा ध्यास आहे
    व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना
    आता ‘प्रभू’कृपेची आस आहे!

  • वेडा अहंकार !

    एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला

    शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला

    जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती

    झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती

    किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे

    रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते.

    विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर

    राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर

    पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे

    पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते

    संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी

    परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी

    घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर

    आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार

    सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे

    कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे

    फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती

    मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती

    चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना

    शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना

    गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे

    आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे

    वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली

    अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली

    चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची

    लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • अस्तित्व

    अस्तित्व तुझे सभोवार
    सर्वत्र तुझाच स्पर्शभास
    वात्सल्य तुझे लडिवाळ
    माते तुझाच अंतरी ध्यास.....

    तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
    पान्हा, तुझा अमृती घास
    तव आशीष कवचकुंडले
    आठवे तुझे रूप निरागस.....

    सत्य! तुच जननी सृष्टिची
    निरपेक्ष तुझाच गे सहवास
    आज अंतरी अस्तिव तुझे
    मज सावरिते क्षणाक्षणास....

    साक्षात, तुच गे देवदेवता
    तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
    मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
    लाभते जन्मी भाग्यवंतास....

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २४१

    १९/९/२०२२

  • गरज

    शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
    संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
    कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
    परतून येणे हे खूप गरजेचे आहे.